मंगळवार, ६ जून, २०१७
सामुदायिक प्रार्थना
अध्याय ४१ वा ग्रंथ-महिमा
अध्याय ४१ वा
ग्रंथ-महिमा
ईश्वरें
व्यापिलें हें विश्व । म्हणोनि जगचि आम्हां देव ।
विश्वाचा मूळ घटक गांव । ग्रामगीता त्यासाठी ॥१॥
यांत ग्रामाचा
जयजयकार । सर्व तीर्थक्षेत्रांचें ग्रामचि माहेर ।
ग्राम हा
विश्वाचा पाया सुंदर । ग्राम नसतां प्रलयचि ॥२॥
ग्राम म्हणजे
देवमंदिरे । मानव देवमूर्ति सुंदर ।
सर्वांची सेवा समप्रकार । तीच पूजा आमुची ॥३॥
ग्रामगीता
शाब्दिक सेवा । परि दृढ करी संस्कारांचा ठेवा ।
तेणें ईश्वरी राज्य गांवां । नांदेल सदासर्वकाळ
॥४॥
ग्रामगीता
दु:खांसि नाशवी । ग्रामगीता मृत्यूसि हसवी ।
ग्रामगीता
सहकरीतत्त्व वाढवी । मानवधर्मा फुलवाया ॥५॥
चाळीस दिवस
म्हणजे मंडळ । ऐसीं अनुष्ठानें प्रांजळ ।
करितां गांव
सुधारेल सकळ । संस्कारें ग्रामगीतेच्या ॥६॥
म्हणोनि
चातुर्मास्यादि निमित्तां । मंदिरीं, पारीं, बैठकींत बसतां ।
वाचावी हर्षभरें ग्रामगीता । रंग रंगणीं आणोनिया
॥७॥
परि ऐसी नसावी
भावना । अर्थहीन करितां पारायणा ।
ना कळे तरी
पुण्यराशी नाना । जमा होतील आमुच्या ॥८॥
माझ्या मतें हें
अज्ञान । दूर सारोनि करावें वाचन ।
आधी शिकावें
अर्थज्ञान । ग्रंथपठन करितांना ॥९॥
प्रथम हीच
महत्त्वाची खूण । ग्रंथवाचनाचें कळावें ज्ञान ।
आपुलें वाचन आपणा
समजून । बोध व्हावा उत्तम ॥१०॥
असेल मित्रमंडळी
बसली । त्यांनाहि समजावी आपुली बोली ।
नाहीतरि वाचनपठनें केलीं । कोणा न कळलें तरि काय ? ॥११॥
काय वाचतो याचें
ज्ञान । नाही वाचकासीच झालें पूर्ण ।
श्रोते पळती उगेच
उठोन । अर्थ काय वाचनासि ? ॥१२॥
कोठे थांबावें
वाचकांनी । कोठे वाचावें जोर देवोनि ।
कोठे रंगवावें
गंभीरपणीं । कळलें पाहिजे वाचकां ॥१३॥
ऐसें जंव कळलेंच
नाही । केलीं पारायणें सर्वहि ।
लक्ष नसे अर्थप्रवाहीं । तरि तें व्यर्थ वाचन
॥१४॥
वाचतांनाचि बोध
होतो । अंगीं स्फुरणभाव उठतो ।
कर्म करावयासि वळतो । जीव जैसा अंतरीं ॥१५॥
ऐसें वाचन आधी
शिकावें । तरीच ग्रंथपठन करावें ।
मग आपणासि ओळखीत
जावें । अधिकारपरत्वें वाचकें ॥१६॥
वाचक असावा
आचारशील । तरीच श्रोत्यांवरि परिणाम करील ।
नाहीतरि होईल
टिंगल । जनतेमाजीं तयाची ॥१७॥
मुखाने ग्रंथ
वाचावे । घरीं विपरीत आचरावें ।
तैसेचि बाहेरि
गोडवे । गाती लोक थट्टेने ॥१८॥
मुखें वाचतो ’ सत्य बोलावें ’ । परि सत्य करणेंचि नाही ठावें
।
म्हणे ’ मज सत्यवान म्हणावें ’ । कैसे म्हणतील ग्रामवासी ? ॥१९॥
मी तों धनावरचा
सर्प बरवा । परि मला ’ उदार दाता ’ गौरवा ।
ऐसें कोण मानील आपुल्या गांवां ? सांगा सांगा ॥२०॥
रंजल्यासि न दे
पाणी । म्हणे ’ मज म्हणा दानशूर राणी ’ ।
ऐकेलचि का ऐसें कोणी । किती वाजविले चौघडे तरी ? ॥२१॥
पानतंबाखू खावोनि
आला । प्रवचनीं कीर्तनीं शाळेंत बसला ।
हसती श्रोते-विद्यार्थी त्याला । ’ व्यसनें सोडा ’ बोलतां ॥२२॥
एक पंडित जेवणासि
बैसला । आरंभ शांतिपाठासि केला ।
परि जरा वाढण्यासि उशीर झाला । मारलें त्याने
बाइलेसि ॥२३॥
ती म्हणे वाहवा
ऐसी शांति ! उत्तम मंत्राची फलश्रुति !
तोंडाने पति
दिव्य बोलती । आचरण करिती क्रूराचें ॥२४॥
ऐसें न व्हावें
आतातरी । असोत वाचक वक्ते शिक्षक भारी ।
आहे सर्वांवरीच जबाबदारी । आधी आत्मशुध्दीची
॥२५॥
उपदेशक वाचक
आचारशील । असले तरीच भाव फळेल ।
श्रोत्यांचें हृदय-परिवर्तन होईल । लागवेगेंसि
॥२६॥
वक्ता असेल सरळ
सात्विक । तरीच श्रोते बनतील भाविक ।
जनलोक करितील कौतुक । बघोनि दोघांसि ॥२७॥
म्हणोनि हेंचि
वरिष्ठांनी करावें । जैसें सांगावें तैसेंचि वागावें ।
तरीच होईल त्यांच्या प्रभावें । कल्याण
ग्रामजीवनाचें ॥२८॥
येथे श्रोत्यांनी
विचारलें । आपण अर्थासि वर्तनासि महत्त्व दिलें ।
परि कित्येक ग्रंथीं सांगितलें । पारायणचि
फलदायी ॥२९॥
कोणी म्हणती
ग्रंथाचें पारायण । करितां मिळेल पुत्र, धन ।
होईल भाग्याचा उदय पूर्ण । पारायणें ग्रंथाच्या
॥३०॥
कोणी म्हणती
मंत्रचि जपा । हजारोंनी करा संकल्पा ।
म्हणती सांगतों मार्ग हा सोपा । ज्ञान मिळेल न
वाचतां ॥३१॥
कोणी म्हणती
अनुष्ठान करा । वाचा भागवत-गीता-ब्रह्मसूत्रा ।
मोक्ष चालत येईल घरां । कानीं पडतां शब्दचि ॥३२॥
कोणी म्हणती
ग्रंथ ज्या घरीं । तेथे नये काळाची फेरी ।
याचा मेळ कोणेतरी
। बसेल सांगा ? ॥३३॥
याचें उत्तर ऐका
सज्जन ! फलश्रुति ही रोचक पूर्ण ।
ग्रंथ-प्रचार व्हावा म्हणून । दिलें प्रलोभन
दावूनि ॥३४॥
त्यांत एक आहे
उत्तमहि । लोक ठेविती ग्रंथ संग्रहीं ।
त्यापासूनि लाभ घेई । कोणी तरी थोडा-बहु ॥३५॥
कानीं पडो एकचि
वचन । परि त्यांत असे महापुण्य ।
हेंहि ओढ लागावीं म्हणून । कथिलें असे थोरांनी
॥३६॥
नुसत्या
पारायणाचें महत्त्व । त्यांतहि हेंचि आहे तत्त्व ।
कधीतरी येईल आचरणीं सर्व । संस्कार होतां ॥३७॥
कराया सांगितलें
जप-अनुष्ठान । तेंहि शुध्द कराया जीवन ।
क्रमाने तितुके
दिवस तरि मन । शुध्दाचरणीं लागाया ॥३८॥
म्हणोनि मी या
सकलां मानितों । परि जपणारे एकांगी समजतों ।
तेणेंचि लाभ हातां न येतो । बहुतेकांच्या ॥३९॥
घोडयासि पाणी
दाखवावें । म्हणतां तेंचि धरिलें जीवें ।
पाणी पाजणें नाही ठावें । तैसें झालें लोकांचें
॥४०॥
ऐसेचि नाना ग्रंथ
वाचले । परि तैसें मुळीच नाही वर्तले ।
कोण्या तोंडाने
मागावें भलें । फळ तयांसि ? ॥४१॥
कांही ग्रंथांतहि
अवास्तवपणा । हें न राहवें सांगितल्याविना ।
त्यांनी श्रध्देचा होतो धिंगाणा । फल न येतां
हातामाजीं ॥४२॥
ग्रंथीं अपार
फलश्रुति कथिली । परि अनुभवासि नाही आली ।
हजारो लोकांनी
आम्हां सांगितली । कर्मकहाणी ॥४३॥
ग्रंथीं सुखाची
फलश्रुति । म्हणोनि वाचती सकाम पोथी ।
आळसी भोळे ओढवोनि घेती । अधिक आपत्ति दानादिकें
॥४४॥
कोणी कोणास साधन
सांगती । सोने देवोनि करा म्हणे समाप्ति ।
घरोघरीं व्रतवैकल्यें आचरती । भुलती बायाबापडया
॥४५॥
व्रतांची वाचती
कहाणी-पोथी । दान-उद्यापन करा म्हणती ।
नाहीतरि होईल अधोगति । धाक देती जनतेसि ॥४६॥
कांही
उदरनिमित्तासाठी । पोथ्या वाचती उठाउठी ।
सोन्याचे करोनि ग्रंथ शेवटीं । अर्पा म्हणती
देवासि ॥४७॥
लोकहि असती आसक्त
बावरे । कांहीहि सांगोत सांगणारे ।
धावोनिया करिती
बिचारे । व्रतसाधनें वेडयापरी ॥४८॥
फळ न लाभतां मग
चिडती । म्हणती काय चाटावें ग्रंथाप्रति ।
रोज वाचावे ग्रंथ
किती । तरीहि पुत्र होईना ॥४९॥
पतिपत्नी
आरोग्याने वागेना । नवस करिती दगडोबासि नाना ।
काय होईल बापहो ! सांगाना । ऐशा रीतीं ? ॥५०॥
घाला उंबरीस
प्रदक्षिणा । परि सुधारूं नका आचरणा ।
भोजना करा जडान्न पुन्हा । रोगी व्हाया वेळ कैचा ? ॥५१॥
कलकत्त्याच्या
गाडींत बसावें । आणि म्हणे ’ देवा !
पंढरीसि न्यावें ’ । ऐशा प्रार्थनेसि फळ यावें ।
कोण्या प्रकारें ? ॥५२॥
एकाने चोरी केली
ग्रामाप्रति । म्हणती त्यास आली साडेसाती ।
ती जावया वाची शनीची पोथी । चोरी कांही सोडीना
॥५३॥
शेवटीं
पोलिसाहातीं सापडला । गुन्हा त्याचा साक्षींत आला ।
तो पुसतो आपुल्या गुरुला । ’ साधन सांगा सुटण्याचें ’ ॥५४॥
गुरुहि होता
लाचलुचपती । म्हणे वाच शनीदेवाची पोथी ।
शिवलीलामृताचा अध्याय चित्तीं । सदभावने आठवी
॥५५॥
लावी देवीचें
पुराण । करी नेटाने सत्यनारायण ।
आम्हांसि देई सुवर्णदान । मुक्त होशील लवकरचि
तूं ॥५६॥
त्याने तैसेंचि
सर्व केलें । ग्रंथ साधन करोनि वाचले ।
बुवाब्राह्मणा धन
उधळलें । दंड कांही चुकेना ॥५७॥
शेवटीं पडला
कैदेमाजीं । म्हणे दाखवा तो गुरु पाजी ।
त्याने केली फजीती माझी । धन तेंहि गमावलें ॥५८॥
वाचली नेमधर्माने
पोथी । परि जेल न चुके मजप्रति ।
काय करावी देवपूजा ती ? ग्रंथ जाळावे अग्नीवरि ? ॥५९॥
बिचारा चोरी
करणें सोडीना । पण गुरुसि मागे साधना ।
काय करिती गुरु, ग्रंथ नाना ? वाचणारा लबाड हा ॥६०॥
ऐसें जन्मभरि
साधन केलें । तरी मूर्ख ते मूर्खचि राहिले ।
याने सांगणारांचेंहि पतन झालें । फिकें पडलें
साधन त्यांचें ॥६१॥
ऐसें कासयासि
करावें । सत्य तेंचि शोधूनि आचरावें ।
आपण बुडावें
दुसर्या नर्कीं न्यावें । ऐसें न करावें स्वार्थभरें ॥६२॥
सांगणाराने
तर्कशुध्द सांगावें । करणाराने सत्यचि करावें ।
तेव्हाचि फळ
अनुभवास यावें । होतें ऐसें ॥६३॥
हीच मुख्य घेवोनि
धारणा । झाली ग्रामगीतेची रचना ।
हा ग्रंथ पुरवी
सर्व कामना । कैसा तें ऐका ॥६४॥
हा आहे प्रखर
शब्दबाण । जाय वाचकाचें हृदय भेदून ।
जैसी मूर्ति घडे टाकी लागून । तैसें वाचनबोधें
होतसे ॥६५॥
ग्रामगीता नव्हे
पारयणासि । वाचतां वाट दावी जनासि ।
समूळ बदली जीवनासि । मनीं घेतां अर्थ तिचा ॥६६॥
ही नव्हे फुलें
टाकण्यासाठी । ही ग्रामाची उध्दारदृष्टि ।
आजच्या युगाची संजीवनी बुटी । मानतों आम्ही
ग्रामगीता ॥६७॥
कोणी दु:खाने
होरपळला । कोणी संसारतापें तापला ।
कोणी असहाय्यपणें
संकटीं पडला । त्यासि धीरे दे ग्रामगीता ॥६८॥
कोणी अन्यायें
लोकां त्रासावी । त्यासि ग्रामगीता मार्गीं लावी ।
देवत्व सर्वांचें जागवी । दिव्य व्हाया जग सारें
॥६९॥
याने संस्कार
बनतील उत्तम । मनुष्य होई चारित्र्यक्षम ।
सुखशांति लाभेल
करितां उद्यम । सांगितले जे या ग्रंथीं ॥७०॥
अल्पबुध्दि जाईल
विलया । वाचतां ज्ञान होईल तया ।
खरा धर्म अंगीं ये सखया ! जीवन उज्ज्वल होतांचि
॥७१॥
प्रेम आजवरि
होतें एकटें । ग्रंथ-चिंतनें वाढेल चोखटें ।
सर्वांभूतीं
दयाभाव प्रकटे । ऐसी फलश्रृति ग्रंथाची ॥७२॥
द्वेषबुध्दीचें
अज्ञान । ग्रंथ वाचतां जाईल पळोन ।
सत्कार्य कराया
धावे मन । करितां अनुष्ठान सक्रिय ॥७३॥
ग्रामगीता वाचूनि
करी चिंतन । त्यास होईल आत्मज्ञान ।
दिव्यदृष्टीची संत-खूण । कळे त्यासि आचरतां ॥७४॥
ग्रामगीता ग्रंथ
वाचला । तैसाचि गांवीं वर्तूं लागला ।
त्यासि शत्रुचि नाही उरला । ग्राममाजीं कोणीहि
॥७५॥
सामुदायिक वाढली
वृत्ति । सारें गांव त्याची संपत्ति ।
ग्रामगीता घडवी मूर्ति । ऐशा आदर्श मानवाची ॥७६॥
ग्रामगीतेंतील
उद्योगचिंतन । जो कोनी करील मन लावून ।
त्याचे घरीं धनधान्य । भरपूर येईल समजावें ॥७७॥
आरोग्याचा वाचील
धडा । आणि घेईल हातीं फडा ।
रोगराईचा होईल निवाडा । तत्क्षणीं त्याच्या ॥७८॥
कार्यास लागतां
तत्क्षणीं । फलश्रुतीसि आरंभ होय झणीं ।
चरित्र सुधरे ग्रंथ ऐकोनि । लक्षांत घेतां अर्थ
त्याचा ॥७९॥
एकांतीं बैसोनि
वाचली गीता । अर्थ समजोनि मनन करितां ।
जीवनीं उतरे आदर्शता । घरादारांसहितहि ॥८०॥
ऐसें घर आदर्श
झालें । कीर्ति-स्फूर्तीने गांवीं चमकलें ।
मग लोक सारे तैसेचि वर्तले । दिसती जनीं ॥८१॥
हा केवढा लाभ
झाला ! सर्व लोकांना स्वर्ग जणू लाभला !
आपुला गांव आदर्श केला । ग्रामगीता वाचूनिया
॥८२॥
ग्रामगीतेचें फळ
नव्हे एकटयासि । एकासहित आहे ग्रामासि ।
उध्दरतील गांववासी । वाचूनि वर्ततां ग्रामगीता
॥८३॥
एक एक साधन
वाचतां । आणि मग तैसेंचि वर्ततां ।
केवढे लाभ येतील हातां । सांगतां नये ॥८४॥
ग्रामगीतेंतील
संस्कार-रचना । उपासनेची तत्त्वयोजना ।
ग्राम-रक्षण ग्राम-सुधारणा । ग्राम-रचना आदर्श
॥८५॥
नाना कलांची
उन्नति । शेती-सुधारणा श्रम-संपत्ति ।
समजूनि येतां विद्या-महती । विकास होई जीवनाचा
॥८६॥
सामुदायिक
प्रार्थनेची प्रथा । रामधून, संत-उत्सव व्यवस्था ।
साधनसंपदा ऐकतां वर्ततां । शांति लाभे सर्वांसि
॥८७॥
गायीगुरांची
वाचतां सेवा । करितां तैसेंचि आपुल्या गांवा ।
दहीदुधाचा दुष्काळ पहावा । न लागे कधी ॥८८॥
विवाहादि सर्व
संस्कार । समाजीं होतील सुखकर ।
मागासल्यांची सुधारणा उध्दार । करील राष्ट्राचा
॥८९॥
स्त्रिया-मुलें
होतील आदर्श पूर्ण । हा ग्रंथ घरीं होतां पठन ।
ग्राम होईल वैकुंठभुवन । वाचतां वर्ततां
ग्रामगीता ॥९०॥
भिकारी बेकारी
गांवीं राहीना । सत्तेचीं बंधनें नुरतील कोणा ।
सर्वचि शिकतील शहाणपणा । ग्रामगीता वाचूनिया
॥९१॥
आरोग्यसंपन्न
होतील जन । नाही गांवीं तंटाभांडण ।
अन्याय, व्यसनें, कारस्थान । जातील लया द्वेषादि
॥९२॥
गांवीं वाढेल
संघटना । बळ लाभेल सकळांच्या मना ।
नांदेल
विश्वकुटुंबाची रचना । आपुल्या गांवीं ॥९३॥
ग्राम नांदेल
स्वर्गापरी । सुखी होतील नरनारी ।
परमार्थाच्या खुलतील घरोघरीं । आनंद-लहरा ॥९४॥
जी जी इच्छा कराल
मनीं । ती ग्रामदेवता देईल पुरवूनि ।
यांत संदेहचि नाही माझिया मनीं । उरला
श्रोतेवक्तेहो ! ॥९५॥
येथे नाही
अंधश्रध्दा । प्रत्यक्ष अनुभव मिळे सर्वदा ।
जे जे शब्द निघती
ते गोविंदा । प्रिय समजावे निश्चयेंसि ॥९६॥
मी पंडित नोहे
आपुल्या ठायीं । सांगावया पंडिताई ।
ईश्वराचीच प्रेरणा ही । प्रकट झाली
ग्रंथाद्वारें ॥९७॥
माझिया बालरूप
वृत्तींतूनि । स्फुरला तो गुरुदेव चक्रपाणी ।
चंद्रभागेतिरीं उमटली वाणी । केली ऐकोनि
लिपिबध्द ॥९८॥
जैसे जडजीवाने
वेद बोलावे । पंगूने हिमगिरीस ओलांडावें ।
तैसेंचि
दासाकडोनि घ्यावें । गीताकथन मानतों मी ॥९९॥
म्हणोनि
पुन:पुन्हा प्रार्थितो । माझा आवाज नव्हे सत्य तो ।
या शरीराचा शंख वाजवितो । ध्वनि काढतो भगवंत
॥१००॥
भगवदगीतेचें हें
सक्रिय रूप । प्रकट झालें आपोआप ।
अर्जुनासम व्हावे महाप्रताप । सर्व ग्रामीन
म्हणोनि ॥१०१॥
गीता बोधिली
अर्जुनाला । ग्रामगीता ही सर्व ग्रामाला ।
राहूं नये कोणी
मागासला । म्हणोनि बोलला देव माझा ॥१०२॥
मी तों केवळ
बालकापरी । संतांचे आशीर्वाद घेतले शिरीं ।
म्हणोनिच प्रकटली
धीट वैखरी । देहबासरीमधूनिया ॥१०३॥
श्री ज्ञानराज
गुरुमाउली । त्यांच्या कृपादृष्टीची साउली ।
परंपरेने फळासि आली । ग्रामगीतास्वरूपाने ॥१०४॥
ग्रामगीतेंत
ज्यांचीं नांवें, चित्रण । त्या सर्व संतांचेंचि
सहवरदान ।
ऐसें मी मानतों विश्वासें पूर्ण । फळेल निधान
ग्रामगीता ॥१०५॥
ग्रामगीता माझें
हृदय । त्यांत बसले सदगुरुराय ।
बोध त्यांचा
प्रकाशमय । दिपवोनि सोडील ग्रामासि ॥१०६॥
शब्दरचना गावंढळ
। हें मी समजतों मनीं प्रांजळ ।
दोष तो तो माझा सकळ । गुण तो तो थोरांचा ॥१०७॥
वालुकापात्रीं
गंगाजळ । तें पापनाशक मधुर निर्मळ ।
तैसें वाचक
श्रोते केवळ । शुध्द घेवोत समजोनि ॥१०८॥
आमचें गांवचि
मागासलें । तेथे जाड शब्द जरि योजिले ।
ग्रामीण म्हणतील नाही कळलें । सांगा अर्थ
पंडितहो ! ॥१०९॥
घरोघरीं पंडित
कुठले ? आहेत तेहि विकृत झाले ।
पोटापाण्यासि
लागले । नोकरी धरिली धनिकांची ॥११०॥
जे जे कोणी उरले
उत्तम । त्यांनाहि कांही रूढिभ्रम ।
ते म्हणतील हा उपक्रम । वेदबाह्य अधार्मिक ॥१११॥
क्वचित असती
विद्वदरत्न । सर्वचि याती-यातींमधून ।
त्यांना आहे हा ग्रंथ प्रमाण । मानतों मी
अंत:करणें ॥११२॥
ऐसियांसीच पंडित
मानावें । जे असतील सात्विक संत स्वभावें ।
त्यांचे पिसाट शब्दचि ऐकावे । सुधारिती जे
ग्रामासि ॥११३॥
धुंडाळूं नयेत
पंडित कोणी । वाचक निवडावा गांवांतूनि ।
आचारशील सात्विक इमानी । सुबुध्द प्रेमळ
कार्यकर्ता ॥११४॥
जो ग्रंथहि
प्रेमें वाचतो । नांगर धराया शेतींतहि जातो ।
वेळ पडल्या सेवा करितो । गांवलोकांची पाहिजे ती
॥११५॥
ऐसा असेल
कोण्याहि जातीचा । अथवा धर्म, पंथ, देश-विदेशींचा ।
तरी तो चालेल, ग्रामोन्नतीचा । जिव्हाळा जया ॥११६॥
पंडितांनी वाचूं
नये । ऐसें माझें म्हणणें नोहे ।
परि काम न अडावें त्याशिवाय । नको निष्क्रिय वाद
कोणी ॥११७॥
पंडित पुराणिक
विद्वान । यांनीहि अवश्य करावें वाचन ।
समाजाचे जबाबदार
म्हणोन । यथार्थ ज्ञान द्यावें सर्वां ॥११८॥
ग्रामीं विचारी
शिक्षकजन । त्यांनी वाचावी ग्रामगीता पूर्ण ।
सकळांस द्यावी समजावोन । लहान-थोरां जमवोनि
॥११९॥
जमवोनि श्रोते
वृध्द-तरुण-बाल । मुली-तरुणी-माता सकल ।
मागासल्यांसहि लावावी चाल । उन्नतीची हळूहळू
॥१२०॥
जे जे नारीनर
साक्षर असती । त्यांना माझी नम्र विनंति ।
वाचा ग्रामगीता, अर्थसंगति । समजावोनि द्या निरक्षरां ॥१२१॥
जो समजोनि हा
ग्रंथ न वाचे । ग्राम मागासावें असें मत ज्याचें ।
तो मार्ग धरील अधोगतीचे । पाप न चुके तयालागी
॥१२२॥
पाप म्हणजे बिघाड
करणें । पाप म्हणजे कुमार्ग धरणें ।
पाप म्हणजे बळीच राहणें । गरीब प्राण्यां पिळोनि
॥१२३॥
ऐसें नसावें
वाचकाचें । जें ज्ञान मिळेल ग्रामगीतेचें ।
तैसेंचि वर्ततां
वर्तवितां पुढचे । दोष जळती बाधक जे ॥१२४॥
ग्रामगीता ग्रंथ
वाचोन । कोणी घेऊं नयेत पैसे आपण ।
ग्रामासीच लाभाया महत्त्व पूर्ण । धन वेचावें
वक्त्याने ॥१२५॥
ग्रामगीता ग्रंथ
सुंदर । निर्मावया गांवाचें चारित्र्य ।
प्रचार करावा सर्वत्र । होऊनि पवित्र आपणहि
॥१२६॥
जे कोणी माझे
स्नेही प्रेमळ । त्यांनी करावा ग्रंथाचा सुकाळ ।
घरोघरीं चालवावा प्रचार । निर्मळ ।
ग्रामगीता-वाचनाचा ॥१२७॥
ग्रामांत खेळावी ग्रामगीता । सर्वांस पाठ असावीं सूत्रें तत्त्वता ।
प्रमाण द्यावें
कोणाचें चुकतां । सर्व आपुले म्हणोनिया ॥१२८॥
ज्याचे हातीं हा
ग्रंथ पडला । अचानक मधूनि उघडला ।
वाचतांचि समजावा उपदेश केला । ग्रामदेवतेने
मजलागी ॥१२९॥
मग तयाचा न घडो
अपमान । विचार करावा तारतम्य जाणून ।
कळत नसतां घ्यावी
पटवोन । ओवी जाणत्यापासूनि ॥१३०॥
उत्तम उपदेश
हातीं लाभला । समजावा शुभदिन आज उदेला ।
तैसेंचि वर्तावें समजोनि बोला । ग्रामगीतेचिया
॥१३१॥
प्रथम ऐकावें हें
गीतावचन । आचरणासि दृढ करावें मन ।
मग संकल्पावें कार्याचें साधन । ग्राम स्वर्ग
करावया ॥१३२॥
प्रथम श्रध्देने
वाचन करावें । अर्थ सर्व लक्षांत घ्यावे ।
उठतां बसतां
कार्यास लागावें । ग्रामाच्या आपुल्या ॥१३३॥
यांतचि माझें
समाधान । सुधारेल । ग्रामाचें जीवन ।
पाखंड जाईल
वितळोन । मतलबियांचें ॥१३४॥
संपोनि जातील भेदवाद
। नांदेल गांवीं प्रेम शुध्द ।
लाभेल आनंदी आनंद । सर्व जना सर्वभावें ॥१३५॥
मानवांतील
असुरत्व, पशुत्व । संपोनि उजळेल देवत्व ।
जीवनीं संचरेल
शुध्द तत्त्व । निरूढ ऐसें सर्वांच्या ॥१३६॥
निसर्ग साह्य दे
वेळच्या वेळीं । वृक्षवेली बहरती फुलींफळीं ।
जलपूर्ण होतील नद्यातळीं । आपुली मर्यादा न
सोडतां ॥१३७॥
आरोग्य होईल
सर्वांचें भूषण । लोपेल दारिद्रय, उणीव, अज्ञान ।
कोणीच न राहतील
हीनदीन । खळदुर्जन कोठेहि ॥१३८॥
समानतेची
समाजरचना । शांति देईल जीवजना ।
प्रगतीची नवी नवी
प्रेरणा । करील भुवना उन्नत ॥१३९॥
शोषण अथवा शासन ।
यांचें गळोनि पडेल बंधन ।
नाही शत्रूंचें आक्रमण । स्वयंपूर्ण गांव होता
॥१४०॥
दास होतील
त्रिविध ताप । नुरेल वैताग वैर पाप ।
गांव झालिया स्वर्गरूप । शांति लाभेल विश्वासि
॥१४१॥
स्वर्गींचे अमर
हेंचि इच्छिती । हेंचि संतऋषींच्या चित्तीं ।
ऐसिया गांवीं लाभतां वस्ती । कासया जाती
वनांतरां ? ॥१४२॥
सांडोनिया
आत्मस्थितिभाव । संतसज्जनांचे समुदाव ।
ऐसिया गांवा
देतील वैभव । आपुल्या जीवन्मुक्तीचें ॥१४३॥
त्यांच्या बोधें
धर्मनीति । त्यांच्या सहवासें सेवाभक्ति ।
त्यांच्या प्रभावें शांति, शक्ति । राहील जागती सर्वकाळ ॥१४४॥
ऐसी ग्रामगीतेची
फलश्रुति । ज्यांत संतविभूतींची संकल्पपूर्ति ।
देवचि गेला
बोलूनि चित्तीं । वरदवाणी सज्जन हो ! ॥१४५॥
उभा विश्वाचिया
विटेवर । सदगुरु विठ्ठल सर्वेश्वर ।
त्याच्या कृपेचाचि विस्तार । तुकडया म्हणे
ग्रामगीता ॥१४६॥
इतिश्री
ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत ।
लाभ घेवोत नित्य
ग्रामस्थ । म्हणोनि अर्पिला विश्वरूपा ॥१४७॥
अध्याय ४१ वाऑडीओ स्वरुपात --
।।जय गुरुदेव।।
-
सामुदायिक प्रार्थना आदर्श पाठ ( प्रारम्भ मे दो मिनिट तक शान्ति से ' मौन - प्रार्थना ' कर...
-
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे निवडक अभंग PDF स्वरुपात डाउनलोड करा . अ.क्र. शिर्षकावर क्लिक करून PDF डाउनलो...
-
आरती राष्ट्रसंताची आरती राष्ट्रसंता, जगद्गुरु कृपावंता| रोमरोमी विश्वचिंता, योगियाच्या महंता||ध...