.

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

हे गुरूदेव ! हम सबको सदबुध्दी दे ,सतकर्तव्य करनेकी प्रवृत्ति दे ,सच बोलनका अभ्यास दे ,सतस्वरूप का ग्यान दे । हे जगदव्यापी परमेश्वर ! हम हर मनुष्य मात्र से प्रेमका,सत्यताका,बंधुत्व- -भावका आचरण करे और सुख दुखःमे सम रहे,ऐसी हमको शक्ती दे,युक्ती दे और भक्ती दे । हे सर्वधर्ममें,सर्व संतमे,समस्त संसार में,रममाण होनेवाले चैतन्यघन!हम तेरे लिए,तेरे देश के लिए,हर जीव जंतु के लिए,कुटीलताका,अनैत्तिकताका,छलछिद्र द्रोहताका त्याग करे ऐसा साहस दे । हे भगवान! अंतमे तुझमें समरस हो जाये यह हमारा ध्येय हैं,उद्देश है । इसके लिये तुझको स्मरके निश्चय करते है, प्रतिज्ञा करते है । हे विश्व धर्मको नियमन करनेवाले परमात्मा !जहाँभी,जिधरभी,हममें कुछ कमी दिखती हो,उसमे हमारा ध्यान लगाकर,उस चिज को,उस कार्यको,पुरा करने में हम अपना स्वराज्य समझते है , सूराज्य समझते है ।यह समझने की और कर्तव्य करनेकी हमको प्रियता दे,शक्ती दे ,वरदान दे

मंगळवार, ६ जून, २०१७

अध्याय १७ वा,गरीबी-श्रीमंती



अध्याय १७ वा


गरीबी-श्रीमंती

 

श्रोतेजन प्रश्न करिती । आमुच्या गांवीं आहे संपत्ति ।

 परि सुख न मिळे लोकांप्रति । ऐसें झालें ॥१॥

 

विकास कार्याचा कोठला गांवीं वाद बळावला ।

 धनिक-गरीबांचा लागला । वर्ग-कलह ॥२॥

 

समाज या दोहोंभागीं विभागला । एक न मानी एकाला ।

 परस्परांवरोनि विश्वास गेला । उडोनि त्यांचा ॥३॥

 

आता काय करावी योजना कोणाची थोरवी पटवावी जना !

 कैसेनि होईल ग्रामरचना । सुंदर आमुची ॥४॥

 

ऐका प्रश्न हा महत्वाचा । आवश्यकचि निर्णय याचा ।

 त्यावांचूनि गांवाचा । मूळपायाचि ढासळे ॥५॥

 

श्रीमंत-गरीबांचा वाद । गांवास करील बरबाद ।

म्हणोनि ही दूर करावी ब्याद । जाणत्यांनी ॥६॥

 

देवाघरीं एकचि प्राणी । ना श्रीमंत ना भिकारी कोणी ।

ही आहे समाजरचनेची उणी । मानवनिर्मित ॥७॥

 

मूलसिध्दांतीं भेदचि नाही । हा प्रलोभनांचा खेळ सर्वहि ।

समज येतां दोघांसहि । भेद कांही दिसेना ॥८॥

 

खेळाकरितां दोन पक्ष केले । परि खेळ विसरोनि लढूं लागले ।

 आपसांत वैमनस्य आले । अज्ञानाने ॥९॥

 

एकाकडे आले अधिक कंचे । तो म्हणे माझ्याचि मालकीचे ।

 मग खेळणेंहि थांबलें इतरांचें । एकाचिया लोभामुळे ॥१०॥

 

ऐसेंचि आहे संसाराचें । घरचें आणि समाजाचें ।

 तितंबे झाले कुटूंबांचे । अज्ञानें आणि लोभाने ॥११॥

 

कामाकरितां जाति केली । काम विसरून जातचि धरली ।

 जन्मजात थोरवी मिरविली । वर्णधर्माच्या नांवाने ॥१२॥

 

ऐसेंचि झालें अर्थव्यवस्थेचें । हिस्सेदार सर्वचि धनाचे ।

 पण कांहीच राहिले मानाचे । बाकी मेले भुकेने ॥१३॥

 

एक राहिला गरीब गडी । एकाची वाढली श्रीमंती बडी ।

 ही सर्व अज्ञानाची बेडी । भोवली सगळया ॥१४॥

 

एकापाशीं ठेव ठेवली । त्याने अविचाराने उपभोगिली ।

कुणाची ठेव ही बोलीच गेली । कालांतराने ॥१५॥

 

देवळामाजी पुजारी ठेवला । तो देवूळचि ग्रासूनि बसला ।

 बायकापोरंसाठीहि केला । उपयोग त्याने देवळाचा ॥१६॥

 

कोणी तीर्थी सदभक्त झाले । त्यांची देवळावरि सत्ता चाले ।

पुढे व्यापाराचें साधनचि केलें । हक्क दावूनि मुलांनी ॥१७॥

 

एकाकडे दिली खूप जमीन । गांवें वसवोनि त्यांना द्याया वाटून ।

 परि तोचि बसला गबर होऊन । राबणारांसि पिळोनि ॥१८॥

 

धनासाठी राखणदार आणला । त्याने कमजोर मालक पाहिला ।

 आपणचि बळकावून बसला । पैसा शक्तियुक्तीने ॥१९॥

 

ऐसेंचि झालें गरीबी-श्रीमंतीचें । कष्ट करणारे झाले दूरचे ।

पैसे घेणारे झाले कायमचे । मालक येथे ॥२०॥

 

श्रमणारापदरीं मोजकें माप । उरला गल्ला आपोआप ।

 तो स्वयें उपभोगणें हें महापाप । परि ठरविला न्याय्य हक्क ॥२१॥

 

खोटयासि दिलें खरें नांव । पैशांनी पैशांचें वाढलें वैभव ।

म्हणती ही पूर्वजांची ठेव । हक्क कुठला श्रमिकांचा ॥२२॥

 

आता कांही केल्या समजेना । कोण पुसतो उपदेश-कीर्तना 

फार तर मुंगियासि साखरकणा । देवोनि म्हणे दान केलें ॥२३॥

 

हजारोंचें जीवन पिळावें । तेणें त्यांच्यांत रोग वाढावे ।

 मग दवाखाने धर्मार्थ घालावे । धर्मशील म्हणवोनिया ॥२४॥

 

पाहतां आजचा मजूर । न मिळे पोटासि भाकर ।

तैसेंचि काम करवी अहोरात्र । वारे मालक धर्मशील ! ॥२५॥

 

हा तों राहतो महालीं शहरीं । मुलें गाडी नेती सिनेमादारीं ।

 शिकती व्यभिचार व्यसनें चोरी । लुटती कारभारी खेडुतां ॥२६॥

 

कांहींनी खूप बुध्दि लढविली । संपत्ति अतोनात वाढविली ।

 काढोनि कवडीहि नाही दिली । प्राण जातां श्रमिकांचा ॥२७॥

 

गांवांतील लोक उपाशी मरे । म्हणती मरती ते मरोत बिचारे ।

आयुष्य सरल्या कोण तारे पैसा-दवा सब झूट ! ॥२८॥

 

ऐसें अधिक धन जमविलें । समाजीं कामीं नाही आलें ।

 ते चोरचि म्हणावे ठरले । एकलकोंडे आपगर्जी ॥२९॥

 

ज्याचे पाशी अधिक जमीन । न देई मजुरां पोट भरून ।

 तो कशाचा भाग्यवान महाकदर्यु म्हणावा ॥३०॥

 

भव्य वाडा पडला सुनसान । एकचि पत्नी एक संतान ।

 परि न देई शेजारपण । वा रे भूषण कृपणाचें ! ॥३१॥

 

कित्येकांचें जनावरी वागणें । सरंजामशाहीने वजन टाकणें ।

धाकदडपणाने कामें घेणें । घातक होईल यापुढे ॥३२॥

 

गरीब सारेच ओरडती । श्रीमंत हे गुंड आहेत म्हणती ।

 परि यांची लागली नेत्रपाती । कांहीं केल्या उघडेना ॥३३॥

 

यासि उपाय करावा कांही । त्यासाठी मार्ग दोनचि पाही ।

 कायदा अथवा धर्ममार्ग राही । सेवाभावें समज द्याया ॥३४॥

 

यासहि कोणी न घालती भीक । त्याने पुढे चिडती लोक ।

 मग रक्तक्रांतीची ऐकूं ये हांक । वाढे धाक मनस्वी ॥३५॥

 

कोणी घर फोडोनि चोरी करिती । कोणी डाके मारूनि लुटती ।

 कोणी भरदिवसां कापिती । मुलाबाळांसहीत ॥३६॥

 

ही पाळीच कां येऊं द्यावी म्हणोनि कांही योजना शोधावी ।

 गरीब-श्रीमंत दोन्हीहि बरवीं । राहतील ऐसी ॥३७॥

 

परस्परांचा विचार घ्यावा । आपला समतोल हिस्सा ठेवावा ।

कोणासहि राग न उदभवावा । ऐसें करावें गांवाने ॥३८॥

 

तुमचा पैसा आमचे श्रम । तुमची बुध्दि आमुचा उद्यम ।

 एकाचा घोडा एकाचा सरंजाम । असावा जैसा ॥३९॥

 

मुळीं जीवनाची तैसीच रचना । एकास हात लागती नाना ।

 सर्वां मिळोनीच हा आपुल्या स्थानां । बनतो सन्माना घ्यावया ॥४०॥

 

कोणाचे निभेना वगळूनि ग्राम । प्रत्येकासि प्रत्येकाचें काम ।

 काम झालिया पुन्हा भ्रम । वाढतो याचा ॥४१॥

 

सुतार याचे खांब करी । बेलदार याची भिंत उभारी ।

कुंभार याचे कवेलू उतारी । छावणीसाठी ॥४२॥

 

लोहार खिळेफासे घडवी । मजूर बांधी घरें-पडवी ।

ऐसें न करितां हा गोसावी । राहता कोठे ॥४३॥

 

चांभार याचे जोडे बनवी । विणकर याला वस्त्रें पुरवी ।

 नीटनेटके कपडे शिवी । शिंपी यासाठी ॥४४॥

 

शेतकरी याला पिकवोनि दे । धान्य मिरची भाजी कांदे ।

 सर्वांच्या श्रमें घर आनंदें । साजवी हा आपुल्यासाठी ॥४५॥

 

सर्वांचे हात सर्वासि लागे । सर्वांस जगविती गुंतले धागे ।

 हें समजोनि जो गांवीं वागे । तोचि खरा बुध्दिमान ॥४६॥

 

परि यांत भाव वाईट शिरला । कोणी न मानीच कोणाला ।

 म्हणे पैसे देतों आम्हीं सकलां । म्हणोनि कामें करिती हे ॥४७॥

 

खरे महत्त्व आहे परिश्रमाला । परि हा मानतो पैशाला ।

 काम न करितांपैसा असला । तरी काय भागतसे ॥४८॥

 

खोदूनि आणली गोटेमाती । तासली फाडी रचल्या भिंती ।

 तेव्हाच बनली ती संपत्ति । परिश्रमाच्या स्पर्शाने ॥४९॥

 

रानीं असोत लांकडे काडया । त्या श्रमाविण न होती गाडयामाडया ।

श्रमाविण संपत्ति म्हणजे कवडया । त्याहि वेचल्या श्रमाने ॥५०॥

 

खरें याचें तारतम्यज्ञान । सर्वांनी असावें समजोन ।

 वाहावा सर्वांचा योगक्षेम पूर्ण । हाचि धर्म धनिकांचा ॥५१॥

 

गांवीं जे जे श्रीमंत असती । तयांचें धन गांवची संपत्ति ।

समजोनि वागावें या रीतीं । मदत द्यायासि प्रसंगीं ॥५२॥

 

आपणापाशी अधिक असे । शेजार्‍यासि पुरवावें हर्षें ।

 सर्व मिळोनि राहावें सरिसें । गांवधर्म म्हणोनिया ॥५३॥

 

धन हें गरीबांचें रक्त । समजोनि वागोत श्रीमंत ।

 श्रम ही गांवाची दौलत । म्हणोनि व्हावा मान तिचा ॥५४॥

 

ऐसें केलिया सकळ जनांनी । वर्गभेद मिटतील गांवचे दोन्ही ।

 यास बुध्दि द्यावया उपजोनि । साधुसंतांनी काम घ्यावें ॥५५॥

 

आणि सावध असावें सरकार । नीटनेटका घडवाया व्यवहार ।

 जनतेमाजी भराभर । वारें शिरवावें शिक्षणाचें ॥५६॥

 

लहान मुलीमुलांपासोनि । मिटवावी गरीब-श्रीमंत श्रेणी ।

 सर्वांस पाहाया समानपणीं । लावावें प्रत्यक्ष कृतीने ॥५७॥

 

शब्दांत नको समसमान । प्रत्यक्ष पाहिजे धनमानशिक्षण ।

 फूट पाडिती ते द्यावेत हांकोन । गांवचे भेदी ॥५८॥

 

नसतील ऐकत जे जे कोणी । त्यांना कायद्याने घ्यावें आटपोनि ।

मग रचना करावी समानगुणीं । इमान जागीं ठेवोनिया ॥५९॥

 

जैसे बापास पुत्र सारिखे । तैसे गरीब श्रीमंत राजाचे सखे ।

हा भेद मिटविणें काम निकें । त्याचेंचि असे राजधर्में ॥६०॥

 

पण जेथे सरकार मिंधा झाला । तेथे आग लागली प्रजेला ।

मग कोण पुसे कोणाला धिंगाणा झाला पहा सर्व ॥६१॥

 

संतसाधूहि मिंधे झाले । दक्षणेवरील मोहून गेले ।

 मग पर्वताचे कडेचि लोटले । समाजावरि ॥६२॥

 

जनतेचा मग वालीच नाही । ती चेततां मग आगचि सर्वहि ।

 भस्म होईल सगळी मही । हाहा:कारें ॥६३॥

 

सगळी जनता बंदिस्त केली अथवा मारोनि टाकिली ।

 तरी श्रमाविण पैदास कुठली कष्टावें लागेल सर्वांसि ॥६४॥

 

मग हें ऐसें कां होऊं द्यावें सकळांनी आधीच जागृत व्हावें ।

 आपुल्या परीने सावरावें । कार्य नीट गांवाचें ॥६५॥

 

उत्तम व्यवहारें धन घ्यावें । उत्तम कार्यासाठी लावीत जावें ।

 जेणें परस्परांचें कल्याण व्हावें । तैसेचि करावे व्यवहार ॥६६॥

 

ऐसा कदर्युपणा नसावा । की ज्याने गांवचि व्याजें बुडवावा ।

प्रसंग पडतांहि न द्यावा । साथ लोकां ॥६७॥

 

अविचाराने न उधळावें धन । फसवोनि न घ्यावें गरीबांपासून ।

 दोन्ही मार्ग समसमान । ठेवावे देवघेवीचे ॥६८॥

 

न व्हावा शेवटचा कळस । म्हणोनि सहानुभूतीचा वाढो हव्यास ।

विरोधचि करूं नये यास । कोणी कोणा ॥६९॥

 

सगळयांनी मिळोनि वागावें । सर्वांचें समजोनि कार्य करावें ।

 श्रीमंत-गरीब दिसोंचि न द्यावे । बहिरंग जीवनीं ॥७०॥

 

ते दिसावेत गुणावरि । बुध्दीवरिकार्यावरि ।

 ऐसे असले प्रकार जरी । समताभाव तरी न सोडावा ॥७१॥

 

याचें समाजासि मिळे शिक्षण । तोचि खरा भाग्याचा दिन ।

 त्यासि नाही मग भंग जाण । कल्पकाळीं ॥७२॥

 

समाजांत जेव्हा धुरीण वाढती । तेव्हाचि ऐसी होय क्रांति ।

आपोआपचि मिटेल भ्रांति । पक्षभेदांची ॥७३॥

 

तेचि करितील परिवर्तन । समाजांत उत्तम ज्ञानकण ।

 पेरूनि करितील परम पावन । भारतमाता ॥७४॥

 

ऐसी सुबुध्दता सगळयांत यावी । तरी श्रीमंती-गरीबी मिटावी ।

नाहीतरि गति बरवी । नाही आता समाजीं ॥७५॥

 

हें समजणेंचि जरूर आहे । काळ याचीच वाट पाहे ।

तो ऐसा थांबलाचि न राहे । स्वारी करील वेगाने ॥७६॥

 

म्हणोनि माझें एवढेंचि सांगणें । वाढवा सामाजिक वृत्तीचें लेणें ।

मिरवा सामुदायिकतेचीं भूषणें । लोकांमाजी ॥७७॥

 

नुसतें श्रीमंत सहकार्य देती । खर्चूनि लक्षावधि संपत्ति ।

तरी तेवढयाने ही भेदवृत्ति । जाणार नाही ॥७८॥

 

ओळखोनि श्रमाची प्रतिष्ठा । त्यांनी दावावी कार्यनिष्ठा ।

 श्रमणारांच्या निवारावें कष्टा । स्वत: श्रम करोनिया ॥७९॥

 

सर्वांनी सर्वांसि पूरक व्हावें । ऐसें धर्माचें सूत्र बरवें ।

हें काय तुम्हांसि सांगावें शहाणे जनहो ! ॥८०॥

 

त्याअभावीं बिघडली गांव-स्थिति । कोणी जनावरासम राबती ।

कोणी नाजुक होवोनि फिरती । टोळभैरव ॥८१॥

 

कोणी म्हणती धनी आम्ही । काय आहे आम्हां कमी ?

 कमाई केली वडिलें नामी । घरबसल्याचि आमुच्या ॥८२॥

 

हें तयांचें महाअज्ञान । कळली नाही त्यांना खूण ।

यापुढे जाईल धन-जमीन । निकष्टिकांची ॥८३॥

 

न करितां काजकाम । पावेल कोणा जीवा आराम ?

 सर्व धांवतील होवोनि बेफाम । निकष्टिकांमागे ॥८४॥

 

म्हणोनि सांगणें उद्योगा शिका । पराधीन राहूं नका ।

आपुल्या हक्काचा हा पैका । गोडी चाखा तयाची ॥८५॥

 

आज निकष्टिकांची चालती । उद्या विचारूं नका फजीती ।

म्हणोनि समजोनि घ्यावी युक्ति । उद्योगाची ॥८६॥

 

सर्व तर्‍हेच्या कलाकुसरी । शिकूनि वागावें शहाण्यापरी ।

 पोट भरावयाची उजागरी । तेव्हा लाभे ॥८७॥

 

हें जंव करितील शिक्षितजन । तेव्हा बंद होतील मजुरांचे वाग्बाण ।

नाहीतरी ते बेईमान । ठरवितील आपणां ॥८८॥

 

म्हणतील आम्हीं कष्ट करावे । तुम्ही आरामांत राहावें ।

सांगतां ’ समानतेने ठेवावें ’ । कोण म्हणेल पुढारी ॥८९॥

 

सर्वांवरि सारखेंच प्रेम । मग सर्वांकरितां एकचि नियम ।

 सर्वांनी करावेत परिश्रम । अपापल्या परींनी ॥९०॥

 

एकाने करावें काम । दुसर्‍याने करावा आराम ।

 हें तों आहे हराम । देश-हिताच्या दृष्टीने ॥९१॥

 

दुनिया आहे कष्टिकांची । जो जो कसेल शेती त्याची ।

 जो काम करील लक्ष्मी तयाची । दासी व्हावी नियमाने ॥९२॥

 

ऐसी आहे आजची प्रवृत्ति । पाहिजे हेंचि समाजा प्रति ।

 त्यांत थोरांनी तरी खंती । काय म्हणोनि मानावी ॥९३॥

 

विद्वानाने शिक्षिताने । महंताने श्रीमंताने ।

 कष्ट कराया मुद्दाम लागणें । हेंचि मोठेपणाचें ॥९४॥

 

तेणें सर्वांस होईल सुकर । कामें करितील जन भराभर ।

 लाज जाईल निघोनि पार । वैभवाने निर्मिलेली ॥९५॥

 

कामांत पडले बुध्दिमान । तेणें प्रत्यक्षांत येईल ज्ञान ।

 शेतीभातीची उन्नति पूर्ण । विकास होईल देशाचा ॥९६॥

 

एरव्ही उद्योगाविण जें भोगणें । तें मानवासि लाजिरवाणें ।

आळशासि खाणेंपिणें । देणें असे महापाप ॥९७॥

 

श्रमाने अंगीं हीनता येते । ऐसें बोलती कोणी एक ते ।

 समजावे देशघातकी पुरते । उपद्रवी पापभक्षी ॥९८॥

 

आपुलें करावयासि काम । कां वाटावी लाजशरम ?

 उलट गर्व असावा निस्सीम । कामाचा आपुल्या ॥९९॥

 

जयास जैसी अभ्यासरीति मानवेल जैसी कार्यपध्दति ।

घेऊनि तेंचि शिक्षण सुमति । यावें पुढती तयाने ॥१००॥

 

कामें सर्वचि मूल्यवान । त्यांची योग्यता समसमान ।

श्रीकृष्णें सिध्द केलें उच्छिष्टें काढून । ओढिलीं ढोरें विठ्ठलें ॥१०१॥

 

कोणाचीच योग्यता कमी नाही । सर्वचि कामें आवश्यक हीं ।

म्हणोनि कामाचा बदला सर्वांहि । सारखा असे सामान्यत: ॥१०२॥

 

एक शेतीकामाचा कामगार । एक बेलदार सुतार लोहार ।

 शिंपी धोबी कुंभार चांभार । सारिखेची उपयुक्त ॥१०३॥

 

कोणी भंगी-काम करी । कोणी वैद्य नाम घरी ।

कोणी देवालयीं सक्रिय पुजारी । सारिखेचि उपयुक्त ॥१०४॥

 

कोणी बुध्दिवंत पुराण सांगे । कोणी चुकलिया लावी मार्गे ।

 जैसी ज्याची योजना निसर्गे । सहजचि केली त्यापरीं ॥१०५॥

 

परि सर्वांना सर्वांचा आदर । ऐसा असावा जगाचा व्यवहार ।

कोण ब्राह्मण कोण महार कामामाजीं सारिखे ॥१०६॥

 

येथे कामांत उच्च-नीचता । कोणें ठरवावी व्यवहारत: ?

 प्रत्येक काम महत्त्वपूर्णता । आपुल्या स्थानीं ठेवितसे ॥१०७॥

 

आहे सर्वांचीच गरज । सर्वकाळ सहजासहज ।

 एक नसतां जग-जहाज । अपूर्णता दावीतसे ॥१०८॥

 

दोर घेवोनि साखळीचा । बोझा बांधावा लाकडांचा ।

एक तुटतां तार कडीचा । सर्व पडे विस्कटोनि ॥१०९॥

 

तैसी आहे कामांची गति । काम असावें सर्वांप्रति ।

तरीच जगेल ही क्षिती । सारखेपणीं राबतां ॥११०॥

 

ज्याचा असेल जो जो बाणा । तो लावावा देश-कारणा ।

 जो असेल ज्या कार्यी शहाणा । तेंचि पुरवावें तयाने ॥१११॥

 

ज्यासि पुरेल जैशापरी । तैसी भरपूर द्यावी सामुग्री ।

श्रम करावे आपापल्यापरी । जैसी बळबुध्दि ज्यापाशीं ॥११२॥

 

ऐसें गांवीं कराल काम । तेणेंच पावेल आत्माराम ।

लाभेल संतोषाचें निजधाम । नाहीतरि संकट ना टळे ॥११३॥

 

अरे ! उठा उठा श्रीमंतांनो ! । अधिकार्‍यांनो ! पंडितांनो ! ।

 सुशिक्षितांनो ! साधुजनांनो ! । हांक आली क्रांतीची ॥११४॥

 

गांवागांवासि जागवा । भेदभाव हा समूळ मिटवा ।

उजळा ग्रामोन्नतीचा दिवा । तुकडया म्हणे ॥११५॥

 

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्र-स्वानुभव संमत ।

श्रमसंपत्तिमहत्त्व कथित । सतरावा अध्याय संपूर्ण ॥११६॥




अध्याय१७वाऑडीओ स्वरुपात --



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

।।जय गुरुदेव।।