अध्याय १७ वा
श्रोतेजन प्रश्न
करिती । आमुच्या गांवीं आहे संपत्ति ।
परि सुख न मिळे लोकांप्रति । ऐसें झालें ॥१॥
विकास कार्याचा
कोठला ? गांवीं वाद बळावला ।
धनिक-गरीबांचा लागला । वर्ग-कलह ॥२॥
समाज या
दोहोंभागीं विभागला । एक न मानी एकाला ।
परस्परांवरोनि विश्वास गेला । उडोनि त्यांचा ॥३॥
आता काय करावी
योजना ? कोणाची थोरवी पटवावी जना !
कैसेनि होईल ग्रामरचना । सुंदर आमुची ? ॥४॥
ऐका प्रश्न हा
महत्वाचा । आवश्यकचि निर्णय याचा ।
त्यावांचूनि गांवाचा । मूळपायाचि ढासळे ॥५॥
श्रीमंत-गरीबांचा
वाद । गांवास करील बरबाद ।
म्हणोनि ही दूर
करावी ब्याद । जाणत्यांनी ॥६॥
देवाघरीं एकचि
प्राणी । ना श्रीमंत ना भिकारी कोणी ।
ही आहे
समाजरचनेची उणी । मानवनिर्मित ॥७॥
मूलसिध्दांतीं
भेदचि नाही । हा प्रलोभनांचा खेळ सर्वहि ।
समज येतां
दोघांसहि । भेद कांही दिसेना ॥८॥
खेळाकरितां दोन
पक्ष केले । परि खेळ विसरोनि लढूं लागले ।
आपसांत वैमनस्य आले । अज्ञानाने ॥९॥
एकाकडे आले अधिक
कंचे । तो म्हणे माझ्याचि मालकीचे ।
मग खेळणेंहि थांबलें इतरांचें । एकाचिया
लोभामुळे ॥१०॥
ऐसेंचि आहे
संसाराचें । घरचें आणि समाजाचें ।
तितंबे झाले कुटूंबांचे । अज्ञानें आणि लोभाने
॥११॥
कामाकरितां जाति
केली । काम विसरून जातचि धरली ।
जन्मजात थोरवी मिरविली । वर्णधर्माच्या नांवाने
॥१२॥
ऐसेंचि झालें
अर्थव्यवस्थेचें । हिस्सेदार सर्वचि धनाचे ।
पण कांहीच राहिले मानाचे । बाकी मेले भुकेने
॥१३॥
एक राहिला गरीब
गडी । एकाची वाढली श्रीमंती बडी ।
ही सर्व अज्ञानाची बेडी । भोवली सगळया ॥१४॥
एकापाशीं ठेव
ठेवली । त्याने अविचाराने उपभोगिली ।
कुणाची ठेव ही
बोलीच गेली । कालांतराने ॥१५॥
देवळामाजी पुजारी
ठेवला । तो देवूळचि ग्रासूनि बसला ।
बायकापोरंसाठीहि केला । उपयोग त्याने देवळाचा
॥१६॥
कोणी तीर्थी
सदभक्त झाले । त्यांची देवळावरि सत्ता चाले ।
पुढे व्यापाराचें
साधनचि केलें । हक्क दावूनि मुलांनी ॥१७॥
एकाकडे दिली खूप
जमीन । गांवें वसवोनि त्यांना द्याया वाटून ।
परि तोचि बसला गबर होऊन । राबणारांसि पिळोनि
॥१८॥
धनासाठी राखणदार
आणला । त्याने कमजोर मालक पाहिला ।
आपणचि बळकावून बसला । पैसा शक्तियुक्तीने ॥१९॥
ऐसेंचि झालें
गरीबी-श्रीमंतीचें । कष्ट करणारे झाले दूरचे ।
पैसे घेणारे झाले
कायमचे । मालक येथे ॥२०॥
श्रमणारापदरीं
मोजकें माप । उरला गल्ला आपोआप ।
तो स्वयें उपभोगणें हें महापाप । परि ठरविला
न्याय्य हक्क ॥२१॥
खोटयासि दिलें
खरें नांव । पैशांनी पैशांचें वाढलें वैभव ।
म्हणती ही
पूर्वजांची ठेव । हक्क कुठला श्रमिकांचा ? ॥२२॥
आता कांही केल्या
समजेना । कोण पुसतो उपदेश-कीर्तना ? ।
फार तर मुंगियासि
साखरकणा । देवोनि म्हणे दान केलें ॥२३॥
हजारोंचें जीवन
पिळावें । तेणें त्यांच्यांत रोग वाढावे ।
मग दवाखाने धर्मार्थ घालावे । धर्मशील
म्हणवोनिया ॥२४॥
पाहतां आजचा मजूर
। न मिळे पोटासि भाकर ।
तैसेंचि काम करवी
अहोरात्र । वारे मालक धर्मशील ! ॥२५॥
हा तों राहतो
महालीं शहरीं । मुलें गाडी नेती सिनेमादारीं ।
शिकती व्यभिचार व्यसनें चोरी । लुटती कारभारी
खेडुतां ॥२६॥
कांहींनी खूप
बुध्दि लढविली । संपत्ति अतोनात वाढविली ।
काढोनि कवडीहि नाही दिली । प्राण जातां
श्रमिकांचा ॥२७॥
गांवांतील लोक
उपाशी मरे । म्हणती मरती ते मरोत बिचारे ।
आयुष्य सरल्या
कोण तारे ? पैसा-दवा सब झूट ! ॥२८॥
ऐसें अधिक धन
जमविलें । समाजीं कामीं नाही आलें ।
ते चोरचि म्हणावे ठरले । एकलकोंडे आपगर्जी ॥२९॥
ज्याचे पाशी अधिक
जमीन । न देई मजुरां पोट भरून ।
तो कशाचा भाग्यवान ? महाकदर्यु म्हणावा ॥३०॥
भव्य वाडा पडला
सुनसान । एकचि पत्नी एक संतान ।
परि न देई शेजारपण । वा रे भूषण कृपणाचें ! ॥३१॥
कित्येकांचें
जनावरी वागणें । सरंजामशाहीने वजन टाकणें ।
धाकदडपणाने कामें
घेणें । घातक होईल यापुढे ॥३२॥
गरीब सारेच ओरडती
। श्रीमंत हे गुंड आहेत म्हणती ।
परि यांची लागली नेत्रपाती । कांहीं केल्या
उघडेना ॥३३॥
यासि उपाय करावा
कांही । त्यासाठी मार्ग दोनचि पाही ।
कायदा अथवा धर्ममार्ग राही । सेवाभावें समज
द्याया ॥३४॥
यासहि कोणी न
घालती भीक । त्याने पुढे चिडती लोक ।
मग रक्तक्रांतीची ऐकूं ये हांक । वाढे धाक
मनस्वी ॥३५॥
कोणी घर फोडोनि
चोरी करिती । कोणी डाके मारूनि लुटती ।
कोणी भरदिवसां कापिती । मुलाबाळांसहीत ॥३६॥
ही पाळीच कां
येऊं द्यावी ? म्हणोनि कांही योजना शोधावी ।
गरीब-श्रीमंत दोन्हीहि बरवीं । राहतील ऐसी ॥३७॥
परस्परांचा विचार
घ्यावा । आपला समतोल हिस्सा ठेवावा ।
कोणासहि राग न
उदभवावा । ऐसें करावें गांवाने ॥३८॥
तुमचा पैसा आमचे
श्रम । तुमची बुध्दि आमुचा उद्यम ।
एकाचा घोडा एकाचा सरंजाम । असावा जैसा ॥३९॥
मुळीं जीवनाची
तैसीच रचना । एकास हात लागती नाना ।
सर्वां मिळोनीच हा आपुल्या स्थानां । बनतो
सन्माना घ्यावया ॥४०॥
कोणाचे निभेना
वगळूनि ग्राम । प्रत्येकासि प्रत्येकाचें काम ।
काम झालिया पुन्हा भ्रम । वाढतो याचा ॥४१॥
सुतार याचे खांब
करी । बेलदार याची भिंत उभारी ।
कुंभार याचे
कवेलू उतारी । छावणीसाठी ॥४२॥
लोहार खिळेफासे
घडवी । मजूर बांधी घरें-पडवी ।
ऐसें न करितां हा
गोसावी । राहता कोठे ? ॥४३॥
चांभार याचे जोडे
बनवी । विणकर याला वस्त्रें पुरवी ।
नीटनेटके कपडे शिवी । शिंपी यासाठी ॥४४॥
शेतकरी याला
पिकवोनि दे । धान्य मिरची भाजी कांदे ।
सर्वांच्या श्रमें घर आनंदें । साजवी हा
आपुल्यासाठी ॥४५॥
सर्वांचे हात
सर्वासि लागे । सर्वांस जगविती गुंतले धागे ।
हें समजोनि जो गांवीं वागे । तोचि खरा बुध्दिमान
॥४६॥
परि यांत भाव
वाईट शिरला । कोणी न मानीच कोणाला ।
म्हणे पैसे देतों आम्हीं सकलां । म्हणोनि कामें
करिती हे ॥४७॥
खरे महत्त्व आहे
परिश्रमाला । परि हा मानतो पैशाला ।
काम न करितां, पैसा असला । तरी काय भागतसे ? ॥४८॥
खोदूनि आणली
गोटेमाती । तासली फाडी रचल्या भिंती ।
तेव्हाच बनली ती संपत्ति । परिश्रमाच्या
स्पर्शाने ॥४९॥
रानीं असोत
लांकडे काडया । त्या श्रमाविण न होती गाडयामाडया ।
श्रमाविण संपत्ति
म्हणजे कवडया । त्याहि वेचल्या श्रमाने ॥५०॥
खरें याचें
तारतम्यज्ञान । सर्वांनी असावें समजोन ।
वाहावा सर्वांचा योगक्षेम पूर्ण । हाचि धर्म
धनिकांचा ॥५१॥
गांवीं जे जे
श्रीमंत असती । तयांचें धन गांवची संपत्ति ।
समजोनि वागावें
या रीतीं । मदत द्यायासि प्रसंगीं ॥५२॥
आपणापाशी अधिक
असे । शेजार्यासि पुरवावें हर्षें ।
सर्व मिळोनि राहावें सरिसें । गांवधर्म
म्हणोनिया ॥५३॥
धन हें गरीबांचें
रक्त । समजोनि वागोत श्रीमंत ।
श्रम ही गांवाची दौलत । म्हणोनि व्हावा मान तिचा
॥५४॥
ऐसें केलिया सकळ
जनांनी । वर्गभेद मिटतील गांवचे दोन्ही ।
यास बुध्दि द्यावया उपजोनि । साधुसंतांनी काम
घ्यावें ॥५५॥
आणि सावध असावें
सरकार । नीटनेटका घडवाया व्यवहार ।
जनतेमाजी भराभर । वारें शिरवावें शिक्षणाचें
॥५६॥
लहान
मुलीमुलांपासोनि । मिटवावी गरीब-श्रीमंत श्रेणी ।
सर्वांस पाहाया समानपणीं । लावावें प्रत्यक्ष
कृतीने ॥५७॥
शब्दांत नको
समसमान । प्रत्यक्ष पाहिजे धनमानशिक्षण ।
फूट पाडिती ते द्यावेत हांकोन । गांवचे भेदी
॥५८॥
नसतील ऐकत जे जे
कोणी । त्यांना कायद्याने घ्यावें आटपोनि ।
मग रचना करावी
समानगुणीं । इमान जागीं ठेवोनिया ॥५९॥
जैसे बापास पुत्र
सारिखे । तैसे गरीब श्रीमंत राजाचे सखे ।
हा भेद मिटविणें
काम निकें । त्याचेंचि असे राजधर्में ॥६०॥
पण जेथे सरकार
मिंधा झाला । तेथे आग लागली प्रजेला ।
मग कोण पुसे
कोणाला ? धिंगाणा झाला पहा सर्व ॥६१॥
संतसाधूहि मिंधे
झाले । दक्षणेवरील मोहून गेले ।
मग पर्वताचे कडेचि लोटले । समाजावरि ॥६२॥
जनतेचा मग वालीच
नाही । ती चेततां मग आगचि सर्वहि ।
भस्म होईल सगळी मही । हाहा:कारें ॥६३॥
सगळी जनता
बंदिस्त केली अथवा मारोनि टाकिली ।
तरी श्रमाविण पैदास कुठली ? कष्टावें लागेल सर्वांसि ॥६४॥
मग हें ऐसें कां
होऊं द्यावें ? सकळांनी आधीच जागृत व्हावें ।
आपुल्या परीने सावरावें । कार्य नीट गांवाचें ॥६५॥
उत्तम व्यवहारें
धन घ्यावें । उत्तम कार्यासाठी लावीत जावें ।
जेणें परस्परांचें कल्याण व्हावें । तैसेचि
करावे व्यवहार ॥६६॥
ऐसा कदर्युपणा
नसावा । की ज्याने गांवचि व्याजें बुडवावा ।
प्रसंग पडतांहि न
द्यावा । साथ लोकां ॥६७॥
अविचाराने न
उधळावें धन । फसवोनि न घ्यावें गरीबांपासून ।
दोन्ही मार्ग समसमान । ठेवावे देवघेवीचे ॥६८॥
न व्हावा शेवटचा
कळस । म्हणोनि सहानुभूतीचा वाढो हव्यास ।
विरोधचि करूं नये
यास । कोणी कोणा ॥६९॥
सगळयांनी मिळोनि
वागावें । सर्वांचें समजोनि कार्य करावें ।
श्रीमंत-गरीब दिसोंचि न द्यावे । बहिरंग जीवनीं
॥७०॥
ते दिसावेत
गुणावरि । बुध्दीवरि, कार्यावरि ।
ऐसे असले प्रकार जरी । समताभाव तरी न सोडावा
॥७१॥
याचें समाजासि
मिळे शिक्षण । तोचि खरा भाग्याचा दिन ।
त्यासि नाही मग भंग जाण । कल्पकाळीं ॥७२॥
समाजांत जेव्हा
धुरीण वाढती । तेव्हाचि ऐसी होय क्रांति ।
आपोआपचि मिटेल
भ्रांति । पक्षभेदांची ॥७३॥
तेचि करितील
परिवर्तन । समाजांत उत्तम ज्ञानकण ।
पेरूनि करितील परम पावन । भारतमाता ॥७४॥
ऐसी सुबुध्दता
सगळयांत यावी । तरी श्रीमंती-गरीबी मिटावी ।
नाहीतरि गति बरवी
। नाही आता समाजीं ॥७५॥
हें समजणेंचि
जरूर आहे । काळ याचीच वाट पाहे ।
तो ऐसा थांबलाचि
न राहे । स्वारी करील वेगाने ॥७६॥
म्हणोनि माझें
एवढेंचि सांगणें । वाढवा सामाजिक वृत्तीचें लेणें ।
मिरवा
सामुदायिकतेचीं भूषणें । लोकांमाजी ॥७७॥
नुसतें श्रीमंत
सहकार्य देती । खर्चूनि लक्षावधि संपत्ति ।
तरी तेवढयाने ही
भेदवृत्ति । जाणार नाही ॥७८॥
ओळखोनि श्रमाची
प्रतिष्ठा । त्यांनी दावावी कार्यनिष्ठा ।
श्रमणारांच्या निवारावें कष्टा । स्वत: श्रम
करोनिया ॥७९॥
सर्वांनी
सर्वांसि पूरक व्हावें । ऐसें धर्माचें सूत्र बरवें ।
हें काय
तुम्हांसि सांगावें ? शहाणे जनहो ! ॥८०॥
त्याअभावीं
बिघडली गांव-स्थिति । कोणी जनावरासम राबती ।
कोणी नाजुक
होवोनि फिरती । टोळभैरव ॥८१॥
कोणी म्हणती धनी
आम्ही । काय आहे आम्हां कमी ?
कमाई केली वडिलें नामी । घरबसल्याचि आमुच्या ॥८२॥
हें तयांचें
महाअज्ञान । कळली नाही त्यांना खूण ।
यापुढे जाईल
धन-जमीन । निकष्टिकांची ॥८३॥
न करितां काजकाम
। पावेल कोणा जीवा आराम ?
सर्व धांवतील होवोनि बेफाम । निकष्टिकांमागे ॥८४॥
म्हणोनि सांगणें
उद्योगा शिका । पराधीन राहूं नका ।
आपुल्या हक्काचा
हा पैका । गोडी चाखा तयाची ॥८५॥
आज निकष्टिकांची
चालती । उद्या विचारूं नका फजीती ।
म्हणोनि समजोनि
घ्यावी युक्ति । उद्योगाची ॥८६॥
सर्व तर्हेच्या
कलाकुसरी । शिकूनि वागावें शहाण्यापरी ।
पोट भरावयाची उजागरी । तेव्हा लाभे ॥८७॥
हें जंव करितील
शिक्षितजन । तेव्हा बंद होतील मजुरांचे वाग्बाण ।
नाहीतरी ते
बेईमान । ठरवितील आपणां ॥८८॥
म्हणतील आम्हीं
कष्ट करावे । तुम्ही आरामांत राहावें ।
सांगतां ’ समानतेने ठेवावें ’ । कोण म्हणेल पुढारी ? ॥८९॥
सर्वांवरि
सारखेंच प्रेम । मग सर्वांकरितां एकचि नियम ।
सर्वांनी करावेत परिश्रम । अपापल्या परींनी ॥९०॥
एकाने करावें काम
। दुसर्याने करावा आराम ।
हें तों आहे हराम । देश-हिताच्या दृष्टीने ॥९१॥
दुनिया आहे
कष्टिकांची । जो जो कसेल शेती त्याची ।
जो काम करील लक्ष्मी तयाची । दासी व्हावी
नियमाने ॥९२॥
ऐसी आहे आजची
प्रवृत्ति । पाहिजे हेंचि समाजा प्रति ।
त्यांत थोरांनी तरी खंती । काय म्हणोनि मानावी ? ॥९३॥
विद्वानाने
शिक्षिताने । महंताने श्रीमंताने ।
कष्ट कराया मुद्दाम लागणें । हेंचि मोठेपणाचें
॥९४॥
तेणें सर्वांस
होईल सुकर । कामें करितील जन भराभर ।
लाज जाईल निघोनि पार । वैभवाने निर्मिलेली ॥९५॥
कामांत पडले
बुध्दिमान । तेणें प्रत्यक्षांत येईल ज्ञान ।
शेतीभातीची उन्नति पूर्ण । विकास होईल देशाचा
॥९६॥
एरव्ही
उद्योगाविण जें भोगणें । तें मानवासि लाजिरवाणें ।
आळशासि
खाणेंपिणें । देणें असे महापाप ॥९७॥
श्रमाने अंगीं
हीनता येते । ऐसें बोलती कोणी एक ते ।
समजावे देशघातकी पुरते । उपद्रवी पापभक्षी ॥९८॥
आपुलें करावयासि
काम । कां वाटावी लाजशरम ?
उलट गर्व असावा निस्सीम । कामाचा आपुल्या ॥९९॥
जयास जैसी
अभ्यासरीति मानवेल जैसी कार्यपध्दति ।
घेऊनि तेंचि
शिक्षण सुमति । यावें पुढती तयाने ॥१००॥
कामें सर्वचि
मूल्यवान । त्यांची योग्यता समसमान ।
श्रीकृष्णें
सिध्द केलें उच्छिष्टें काढून । ओढिलीं ढोरें विठ्ठलें ॥१०१॥
कोणाचीच योग्यता
कमी नाही । सर्वचि कामें आवश्यक हीं ।
म्हणोनि कामाचा
बदला सर्वांहि । सारखा असे सामान्यत: ॥१०२॥
एक शेतीकामाचा
कामगार । एक बेलदार सुतार लोहार ।
शिंपी धोबी कुंभार चांभार । सारिखेची उपयुक्त
॥१०३॥
कोणी भंगी-काम
करी । कोणी वैद्य नाम घरी ।
कोणी देवालयीं
सक्रिय पुजारी । सारिखेचि उपयुक्त ॥१०४॥
कोणी बुध्दिवंत
पुराण सांगे । कोणी चुकलिया लावी मार्गे ।
जैसी ज्याची योजना निसर्गे । सहजचि केली
त्यापरीं ॥१०५॥
परि सर्वांना
सर्वांचा आदर । ऐसा असावा जगाचा व्यवहार ।
कोण ब्राह्मण कोण
महार ? कामामाजीं सारिखे ॥१०६॥
येथे कामांत
उच्च-नीचता । कोणें ठरवावी व्यवहारत: ?
प्रत्येक काम महत्त्वपूर्णता । आपुल्या स्थानीं ठेवितसे ॥१०७॥
आहे सर्वांचीच
गरज । सर्वकाळ सहजासहज ।
एक नसतां जग-जहाज । अपूर्णता दावीतसे ॥१०८॥
दोर घेवोनि
साखळीचा । बोझा बांधावा लाकडांचा ।
एक तुटतां तार
कडीचा । सर्व पडे विस्कटोनि ॥१०९॥
तैसी आहे कामांची
गति । काम असावें सर्वांप्रति ।
तरीच जगेल ही
क्षिती । सारखेपणीं राबतां ॥११०॥
ज्याचा असेल जो
जो बाणा । तो लावावा देश-कारणा ।
जो असेल ज्या कार्यी शहाणा । तेंचि पुरवावें
तयाने ॥१११॥
ज्यासि पुरेल
जैशापरी । तैसी भरपूर द्यावी सामुग्री ।
श्रम करावे
आपापल्यापरी । जैसी बळबुध्दि ज्यापाशीं ॥११२॥
ऐसें गांवीं कराल
काम । तेणेंच पावेल आत्माराम ।
लाभेल संतोषाचें
निजधाम । नाहीतरि संकट ना टळे ॥११३॥
अरे ! उठा उठा
श्रीमंतांनो ! । अधिकार्यांनो ! पंडितांनो ! ।
सुशिक्षितांनो ! साधुजनांनो ! । हांक आली
क्रांतीची ॥११४॥
गांवागांवासि
जागवा । भेदभाव हा समूळ मिटवा ।
उजळा
ग्रामोन्नतीचा दिवा । तुकडया म्हणे ॥११५॥
इतिश्री
ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्र-स्वानुभव संमत ।
श्रमसंपत्तिमहत्त्व
कथित । सतरावा अध्याय संपूर्ण ॥११६॥
अध्याय१७वाऑडीओ स्वरुपात --
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा