अध्याय १९ वा
पूज्य श्री साने गुरुजी बद्दल अधिक माहिती साठी क्लिक करा.जीवन-शिक्षण
श्रोतियाने केला प्रश्न । खेडें शहराहूनि महान ।
ऐसें म्हणतों आपण जन । परि एक खूण न विसरावी ॥१॥
शहरांत आहे उच्च शिक्षण । तें खेडयांत पावेल कोण ?
कोणी आला जरी शिकोन । तरी येथे होतो गावंढळ ॥२॥
’ नगरामाजीं नागरचि होइजे ’ । यासाठी शहरचि विद्यार्थ्यां पाहिजे ।
खेडयामाजीं ’ नांगरचि वाहिजे ’ । ऐसें होतें ॥३॥
ऐका ऐसी जयांची भावना । लक्ष द्यावें त्यांनी या वचना ।
येथे शिक्षणाची मूळ कल्पना । तीच चुकली आपुली ॥४॥
दिखाऊ कपडे कोरडी ऐट । नोकरपेशी थाटमाट ।
हें शिक्षणाचें नव्हे उद्दिष्ट । ध्यानीं घ्यावें नीट हें
आधी ॥५॥
अजब ऐसी शिक्षणाची प्रथा । जेथे कामीं नये बापाची संथा ।
बाप करी शेतीची व्यवस्था । मुलगा मागे नोकरी ॥६॥
व्हावें मोठे बाबूसाहेब । काम जुजबी पैसा खूब ।
मोठी पदवी दिखाऊ ढब । ही उच्चता म्हणोंचि नये ॥७॥
हें सर्व मागील विसरोन । मुलामुलींना द्यावें शिक्षण ।
जेणें गांवाचें वाढेल भूषण । सर्वतोपरीं ॥८॥
नुसतें नको उच्च शिक्षण । हें तों गेलें मागील युगीं लपोन ।
आता व्हावा कष्टिक बलवान । सुपुत्र भारताचा ॥९॥
शिक्षणांतचि जीवनाचें काम । दोन्हींची सांगड व्हावी उत्तम ।
चिंता नसावी भोजनासाठी दाम । मागण्याची भीक जैसी ॥१०॥
मुलांत एखादा तरी असावा गुण । ज्याने पोट भरेल त्यांत निपुण ।
नये संसारामाजी अडचण । कोणत्याहि परी ॥११॥
जीवनाच्या गरजा संपूर्ण । निर्वाहाचें एकेक साधन ।
संबंधित विषयांचें समग्र ज्ञान । यांचा अंतर्भाव शिक्षणीं
॥१२॥
नदी तलाव आणि विहिरी । यांत पोहणें नानापरी ।
आपत्ति येतां धावोनि तारी । ऐसें शिक्षण असावें ॥१३॥
गांवीं भोजनाचे असती प्रसंग । स्वयंपाक करतां यावा यथासांग ।
हेहि कला शिकवावी सप्रयोग । मुलांमुलींसि ॥१४॥
असलें शिक्षण वाटतें साधारण । परि याचें जीवनांत अग्रस्थान ।
नाहीतरि जगावें जनावरासमान । होईल स्वयंपाक न येतां ॥१५॥
मुलगी बहु शिकली शाळेमाझारीं । परि स्वयंपाक करतां नये घरीं ।
काय करावी विद्याचातुरी ? कामाविण लंगडी ती ॥१६॥
अशिक्षित स्वयंपाक करोनि खाई । सुशिक्षित चणे फाकीत राही ।
दोरास घालता नये वंधाहि । जेथे तेथे पराधीन ॥१७॥
मुलास पंगत वाढतां नये । घरचें पाणी भरतां नये ।
आपुल्याच तोर्यामध्ये राहे । तरि तें व्यर्थ ज्ञान
त्याचें ॥१८॥
घरीं ज्याची उणीव पडे । मुलगा धावोनि पुरवी कोडें ।
धडाडीने कर्म करण्या धडपडे । तरीच शिक्षण कामाचें ॥१९॥
विद्येअंगीं व्हावा विनय । विद्या करी स्वतंत्र निर्भय ।
शिक्षणाने वाढावा निश्चय । जीवन-जय करावया ॥२०॥
याचसाठी शिक्षण घेणें । कीं जीवन जगतां यावें सुंदरपणें ।
दुबळेपण घेतलें आंदणें । शिक्षण त्यासि म्हणों नये ॥२१॥
गांवावर आली गुंडांची धाड । विद्यार्थी दारें लाविती धडाधड ।
वाडवडिलांच्या अब्रूची धिंड । काय शिक्षण कामाचें ? ॥२२॥
म्हणोनि पाहिजेत बलवान मुलें । कुस्ती मल्लखांब खेळणारे भले ।
धडाडीने प्रतिकारार्थ धजले । तरीच शिक्षण उपयोगी ॥२३॥
ऋषिकालीन ऐसी प्रथा । शिक्षणांत होती जीवन-संथा ।
याकरितां आश्रमांची व्यवस्था । होती पूर्वी ॥२४॥
धनुर्विद्या मल्लविद्या । आयुर्वेद आणि शस्त्रास्त्रविद्या ।
उत्तमोत्तम चौदा विद्या । शिकवीत होते आचार्य ॥२५॥
चित्रकला चर्मकला । रांगोळियांचीहि उत्तम कला ।
बुरडकाम कुंभारकामादि सकला । चौसष्ट कला नानापरी ॥२६॥
संगीतशास्त्र स्वयंपाकशास्त्र । गृह स्थापनेचें सुंदर तंत्र ।
अश्वपरीक्षा रत्नपरीक्षादि समग्र । जीवनविद्या शिक्षणीं
॥२७॥
ऐसी प्रथा पूर्वी होती । आता उच्च ज्ञान घेवोनि येती ।
परि गांवची न सुधारवे शेती । गांवच्या उपलब्ध साधनांनी
॥२८॥
शिक्षण झालें वैभवस्थानीं । मग गांवचें जीवन न बसे मनीं ।
उच्च ज्ञान आणावें साध्या जीवनीं । कैसें तेंहि कळेना
॥२९॥
त्यापेक्षा उच्च ज्ञानाचीं विद्यालयें । गांवींच आणावीं निश्चयें ।
जीं ग्रामजीवन सजवितील चातुर्ये । शिकवोनि जना ॥३०॥
मुलांना शिकवाव्या नाना कला । चापल्य ध्येयनिष्ठादि सकला ।
गांवचि सांभाळूं शकेल आपुला । ऐसें द्यावें शिक्षण ॥३१॥
गांवासि कैसें आदर्श करावें । याचेंचि शिक्षण प्रामुख्यें द्यावें ।
सक्रियतेने करावयासि लावावें । विद्यार्जनीं ॥३२॥
सहकार्याची प्रबल भावना । हेंचि शिक्षणाचें मुख्य सूत्र जाणा ।
सहकार्यावाचोनि शिक्षणा । महत्त्व नाही ॥३३॥
व्हावें परस्पराशीं पूरक । हेंचि आहे शिक्षणाचें कौतुक ।
व्यक्तिनिष्ठतेने भयाण दु:ख । मानव-जीवनीं ॥३४॥
जनसेवेचें प्रमाणपत्र । त्यासि महत्त्व यावें सर्वत्र ।
उद्याचें राष्ट्र आजचे कन्यापुत्र । समजोनि त्यांना सुधारावें ॥३५॥
गांवचें सर्वांत मुख्य पुत्रधन । त्याचें संरक्षावें चरित्रधन ।
तेणें गांवाचें वाढेल महिमान । चारित्र्यापरी उज्ज्वल ॥३६॥
आपणांसि वाटे जैसें गांव व्हावें । तैसेंचि बालकांना शिकवावें ।
शहाणे करोनि सोडावे । विद्याशिक्षणें सर्वचि ॥३७॥
बाळपणींच शिक्षण होई । वय झालिया त्रास जाई ।
वळविल्याहि न वळती कांही । इंद्रियें त्यांचीं ॥३८॥
मग तो राही आंगठाछाप । कोणीहि त्याला द्यावी थाप ।
आयुष्यभरी कष्ट-संताप । भोगीतसे आंधळयापरी ॥३९॥
त्यासि बंद उन्नतीचीं द्वारें । आयुष्य जाय हमालींत सारें ।
किसान परि कळेना गोजिरें । शेतीचेंहि नवें ज्ञान ॥४०॥
नाही अवजारांत सुधारणा । सुधारूं न शके पिकें नाना ।
घाण्याच्या बैलापरी धिंगाणा । जीवनाचा त्याच्या ॥४१॥
वडिलाने मुलगा नाही शिकविला । तोहि पापांचा भागीदार झाला ।
जैसें जन्म देणें कर्तव्य त्याला । तैसेंचि शिक्षण देणें
अगत्याचें ॥४२॥
जरि आपुल्याने व्यवस्था नव्हे । तरि देशोध्दारक संस्थेसि सोपवावें ।
परि मुलास पतित न ठेवावें । अशिक्षितपणें कधीहि ॥४३॥
आईबापांनी अंगावरि । मुलें ठेवूं नयेत निरंतरी ।
सोपवावीं बालकांच्या विद्यामंदिरीं । रक्षक असतील जे
त्यांना ॥४४॥
जन्म देण्याचें काम मातापित्यांचें । शिक्षणाचें काम विद्यागुरूंचें ।
तेथे आसक्तीने पुत्रधन देशाचें । बिघडवूं नये लाडवोनि
॥४५॥
आईबापांचा प्रेमळ चाळा । पुरवी लहान मुलांचा आळा ।
मुलगा होतो ठोंब्या-भोपळा । अतिलाडाने निकामी ॥४६॥
हें तों विद्यागुरु साहेना । अथवा शिक्षिका चालूं देईना ।
मुलांस वळवावें कैसें त्यांना । माहीत असतें मानसशास्त्र ॥४७॥
म्हणोनि सर्व गांवाने मिळून । काढावें शिशुसंगोपन ।
बाईबुवास शिक्षण देऊन । नेमावें त्या कार्यासि ॥४८॥
असावें गांवींच विद्याभुवन । बालोद्यान शिशुसंगोपन ।
मुलें बाळपणींच त्यांत ठेवोनि । वळण द्यावें साजेसें ॥४९॥
आईबापांस फुरसत नाही । कामास जातां अडचण येई ।
मुलाबाळांची आबाळ होई । हें सर्व मिटे विद्याश्रमें ॥५०॥
याचेंचि त्यांना असावें शिक्षण । कैसें करावें बालसंगोपन ।
आपलें काम द्यावें नेमून । मुलामुलींना कैशापरी ॥५१॥
कोठेहि मुलांना लहानपणीं । व्यसनें लागूं न द्यावीं कोणी ।
लागतांचि घ्यावी झाडणी । शिक्षकां-पालकांची ॥५२॥
नाहीतरि एककल्ली । शिक्षण घेवोनि वृत्ति केली ।
आपण फसोनि दुसर्यांचीं फसविलीं । मुलेंबालें, ऐसें न हो ॥५३॥
म्हणे मी शिक्षणकार्यी लागलों । पवित्र गुरुजी मुलांचा झालों ।
परि व्यसनांचा अवतार बनलों । म्हणोनि मना धिक्कारीना ॥५४॥
मुलांस म्हणे सद्वर्तनी राहा । आपण बिडी पिण्यांत वाजवी दहा ।
मग उष्णतेने बोलतो पहा । साजरा रेलगाडीपरी ॥५५॥
ओळखोनि गांवाची जबाबदारी । शिक्षक जिव्हाळयाने काम करी ।
तरीच गांव होय स्वर्गपुरी । न पडे जरूरी कोणाची ॥५६॥
घरींदारीं उत्तम पाठ मिळे । जें जें पाहिजे तें तें कळे ।
तरीच गुरुजनांचा आशीर्वाद फळे । काम केल्या विकासाचें
॥५७॥
जीवन-विकासाचें शिक्षण । गांवींच असावें सर्वसंपन्न ।
आपुल्याचि ग्रामरचनेचें आयोजन । शोभवाया शिकवावें ॥५८॥
पाठशाळा असावी सुंदर । जेथे मुलीमुलें होती साक्षर ।
काम करावयासि तत्पर । शिकती जेथे प्रत्यक्ष ॥५९॥
सुंदर गाणें बोलणें वागणें । टापटिपीने घरीं राहणें ।
आपलें काम आपण करणें । शिकवावें तयां ॥६०॥
ऐसें करितां होईल प्रगति । मुलें उत्तम विद्यार्थी बनती ।
थोरथोर उद्योगधंदेहि शिकती । पुढे पुढे ॥६१॥
विद्यार्थी कार्याने सुरवात करी । त्यांतचि गणितशास्त्रादि सांवरी ।
नाहीतरी वाचनपठणचि परोपरी । कांही करवेना अंगाने ॥६२॥
म्हणोनि अभ्यासाबरोबरी । सक्रिय करूं द्यावी तयारी ।
मुलगा सर्व कामें करी । जीवनाचीं आपुल्या ॥६३॥
तो पुढे ज्यांत दिसे निष्णात । त्या विद्येचा घेऊं द्यावा अंत ।
होऊं द्यावें अभ्यासें संशोधनांत । गर्क त्याला ॥६४॥
ऐसें जीवन आणि शिक्षण । यांचें साधावें गठबंधन ।
प्रथमपासूनचि सर्वांगीण । शिक्षण द्यावें तारतम्यें ॥६५॥
जीवनाचें प्रत्येक अंग । शिकवावा महत्त्वपूर्ण उद्योग ।
काम करावायची चांग । लाज नसावी विद्यार्थ्या ॥६६॥
मुलगा वरोनि दिसे शिक्षित । काम करतांहि दिसे निष्णात ।
कामाची लाजचि नाही ज्यांत । जन्मास आली ॥६७॥
करितो शेताचें निंदण । उपणणें, उतारी, नांगरण ।
शेण काढावयासहि उत्सुक मन । दिसे जयाचें ॥६८॥
सर्व तर्हेचा उद्योगधंदा । कराया लागला मुलगा छंदा ।
वाढला अभिमान गांवचा बंदा । तयार झाला म्हणोनिया ॥६९॥
ऐसी घ्यावी गांवें काळजी । मुलांच्या अज्ञानपणामाजीं ।
तरीच गांवाचा उत्कर्ष सहजीं । होईल तेणें ॥७०॥
अवधी धरला अठरा वर्षांचा । पांग फेडील हजारो पिढयांचा ।
नमुना बनेल उत्तम गांवाचा । विद्यार्जनें ॥७१॥
जीवनाचें उज्ज्वल अंग । मुलें शिकतील होवोनि दंग ।
वाढेल गांवाचा रागरंग । म्हणाल तैसा ॥७२॥
आजचे सान सान बाल । उद्या तरुण कार्यकर्ते होतील ।
गांवाचा पांग फेडतील । उत्तमोत्तम गुणांनी ॥७३॥
म्हणोनि म्हणतों बालधन । ठेवा गांवकर्यांनो ! जपून ।
कोण सांगेल निघतील रत्न । किती गांवीं ॥७४॥
ईश्वराचें जन्म देणें । आईबापासि निमित्त करणें ।
विद्यागुरूंचें शिकवणें । भाग्य बने गांवाचें ॥७५॥
या कोवळया कळयांमाजीं । लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी ।
विकसतां प्रकटतील समाजीं । शेकडो महापुरुष ॥७६॥
कितीक होतील सेवाभावी । कित्येक चतुर कलावैभवी ।
उद्योगधंद्यांनी रंगवी । ग्रामासि आपुल्या ॥७७॥
कित्येक निर्मितील यंत्रागार । कित्येक होतील इतिहासकार ।
कित्येक होतील सल्लाचतुर । गांवीं आपुल्या ॥७८॥
कित्येक होतील न्यायाधीश । कित्येक काव्य सृष्टीचे ईश ।
कित्येक पिकवितील शेतीस । नवनव्या
शोधांनी ॥७९॥
कित्येक होतील राजकारणी । कित्येक होतील तत्त्वज्ञानी ।
कित्येक देतील भूषण मिळवोनि । क्रीडांगणीं गांवासाठी ॥८०॥
कित्येक संत-उपदेशक । कित्येक वीर-संरक्षक ।
कित्येक व्यापारनिपुण, सेवक । हरकामी ऐसे ॥८१॥
ऐसा हा साजेल गांव-संच । सर्व गुणांचा आदर्श उच्च ।
कोणी न दिसेल जीव नीच । आपुल्या गांवीं संस्कारें ॥८२॥
गांवचें राज्य गांवचि करी । कोणाचीच न चाले हुशारी ।
आमुचे आम्हीच सर्वतोपरीं । नांदूं गांवीं ॥८३॥
प्रेमें सर्वचि करूं सेवा । जेणें सर्व गांवासि लाभ बरवा ।
मग ऐसा कोण उरेल ठेवा । जो न लाभे खेडयामाजीं ? ॥८४॥
खेडयांत उपजले ज्ञानेश्वरादि । काय उणी त्यांची बळबुध्दि ?
श्रीकृष्ण आणि महात्मा गांधी । हालवी सूत्रें खेडयांतूनि ॥८५॥
म्हणोनि मित्रहो ! ऐका निश्चिती । गांवींच मुलांचें शिक्षण घ्या हातीं ।
पांग फिटेल जन्मजातीं । सुखी होतील सकळ जन ॥८६॥
कोणी म्हणती जातचि मूर्ख । मुलें कैसी निघतील चलाख ?
कांही जाती मुळांतचि चोख । हुशार असती शिक्षणीं ॥८७॥
ही कल्पनाहि चूक असे । भेद मुळामाजीं नसे ।
तो परंपरागुणें भासे । वातावरणाच्या योगें ॥८८॥
एकाचा बाप न्यायाधिकारी । काका करतो प्रोफेसरी ।
मामा कथाकीर्तन करी । मग तो हुशार कां नोहे ? ॥८९॥
भोवती बुध्दिवंतांचा मेळावा । खावया सत्त्वशील मेवा ।
घरींदारीं सहवास बरवा । त्याची उन्नति सहजचि ॥९०॥
बाप गुराखी आणतो मोळी । चुलता विकतो बांगडयाचोळी ।
मामा सरकारी नोकरी सांभाळी । परि तो शिपाई-चपराशी ॥९१॥
खावयासि कळणाकोंडा । संगतीस ढोरांचा तांडा ।
परि तो अभ्यासें पुढे जाय थोडा । तरी कौतुक कां न करावें ? ॥९२॥
त्याला सहवास उत्तम द्यावा । दर्जा जीवनाचा वाढवावा ।
त्याने समाज होईल नवा । ज्ञानवंतांचा निर्माण ॥९३॥
हें होण्यास पाहिजे शिक्षण । शिक्षणाशिवाय व्यर्थचि भाषण ।
हें कळेल तेव्हाचि जन । सुशिक्षित होतील ॥९४॥
नाहीतरि पूर्वजांनी मूर्खपण केलें । तें मुलाबाळांस भोगणें आलें ।
लौकरि सुधारेना एकदा चुकलें । दोष चाले कुळीं सार्या
॥९५॥
घराण्यांत एकाने पाप करावें । पिढीजात पुढेहि तेंचि भोवे ।
ऐसें चालू आहे हें स्वभावें । लोकांमाजीं ॥९६॥
मागील कलंक धुण्यासाठी । पुढे घडावें पुण्य गांठीं ।
तरीच सुटते बदनामी पाठी । लागलेली सारी ॥९७॥
एकाने सदगुण आचरिले । नांव त्याचें दिगंतरीं गेलें ।
पुढे पुत्र वांढाळ झाले । तरी कीर्ति मुरेना ॥९८॥
खपती सारे मागील नांवें । जो तो म्हणे वडिलांस बघावें ।
कीर्तिवंत झाले पूर्वज बरवे ।
घराण्यामाजीं ॥९९॥
परि त्याहूनि घडलें पाप अधिक । नांवाचा वाजा झाला आणिक ।
मग न विचारी मागील कौतुक । ’ काय झालें ’ कोणीहि ॥१००॥
चाले तीच परंपरा । जोंवरि विशेष न घडे पुत्रपौत्रां ।
ऐसीच आहे नामयात्रा । इहलोकींची ॥१०१॥
एक एकवीस कुळें उध्दरितो । एक बेचाळीस कुळें बदनाम करतो ।
सारांश, विशेष घडल्यावरीच होतो । पालट नांवा ॥१०२॥
रावण पवित्र ब्रह्मकुळींचा । राक्षस ठरे वंशचि त्याचा ।
विश्वमित्र राजर्षीचा । ब्रह्मर्षि
होय विशेषत्वें ॥१०३॥
ऐसा विशेष कृतीचा महिमा । जाणोनि करावें परिश्रमा ।
उध्दरावें आपल्या कुळा ग्रामा । शिक्षण देवोनि नेटाने ॥१०४॥
गोरगरीबांचीं मुलें असती । ज्यांसि नाही शिक्षणाची शक्ति ।
त्यांसि सरकार वा जनपदाहातीं । देवोनि
शिक्षण पुरवावें ॥१०५॥
असतील भिकार्यांचीं मुलें । शिक्षण देवोनि करावे चांगले ।
पुण्य लाभेल पांग फेडले । त्यांचे
म्हणोनि गांवासि ॥१०६॥
असोत गरीब किंवा धनिक । मुलांस विद्या शिकवाव्या अनेक ।
गांवाने संपत्ति पुरवावी अधिक । याच मार्गी ॥१०७॥
यांतचि वेचावें खूप धन । करावें पूर्वजांचिया नांवाने दान ।
विद्यालयें झालिया पवित्र संपन्न । गांव होईल स्वर्गपुरी ॥१०८॥
आदर्श होतील विद्यार्थीगण । गांवाचें पालटेल जीवन ।
कोठेच न उरेल गावंढळपण । टिकाऊ
परिवर्तन या मार्गे ॥१०९॥
विद्यामोलें ऐसें चढतां । येईल भाग्य गांवाचे हातां ।
तुकडयादास म्हणे तत्त्वता । विसरूं
नका हा मूळमंत्र ॥११०॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत ।
कथिला सर्वोन्नतीचा विद्यार्जनपथ ।
एकोणिसावा अध्याय संपूर्ण ॥१११॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा