अध्याय १० वा
(गुरु गोविंदसिंह बद्दल अधिक माहितीसाठी क्लिक करा .)
संघटन-शक्ति
एक सेवानुभवी श्रोता । गहिवर दाटोनिया चित्तां ।
म्हणे माझी ऐका शोककथा । एकदा कानीं ॥१॥
सेवावृत्तीने वागतां ।
ग्रामोध्दाराचें फळ ये हातां ।
लोकवशीकरणाचा सेवेपरता
। मंत्र नसे कोणी ॥२॥
हें आहे सर्वचि खरें ।
अनुभवासहि ये निर्धारें ।
परि काहीं लोक
स्वार्थभरें । व्देषी होती सेवेचे ॥३॥
त्यांत कांही विद्वान
कांही श्रीमान । राजदरबारींहि कांहींचें वजन ।
त्यांना गांवाचें हवें
पुढारीपण । स्वार्थासाठी जेथे तेथे ॥४॥
लोक राहावेत पंखाखाली ।
म्हणजे आपुली पोळी पिकली ।
म्हणोनि खेळती अनेक चाली । सोंग घेवोनि सेवेचें
॥५॥
देती मिळवोनि दुर्मिळ सामान । कोणास कांही प्रलोभन ।
व्यसनी गुंडांस देती प्रोत्साहन । करिती संपादन
प्रेम ऐसें ॥६॥
तेथे आमुची सेवा सगळी । प्रसंगीं होऊनि पडे दुबळी ।
जनता फसते भोळीभाळी । जाऊनि जाळीं तयांच्या
॥७॥
आमुच्या गांवीं हेंचि झालें । गांव सेवकांनी उत्तम केलें ।
परि पुढे दुर्भाग्य ओढवलें । याच मार्गे ॥८॥
सुंदर वेली लावल्या अंगणीं । घालोनिया परिश्रमाचें पाणी ।
फुलाफळांनी गेल्या बहरोनि । गगनभेदी ॥९॥
तैशांत सोसाटियाने आणावें वादळा । गळावा फळें फुलें पाचोळा ।
त्यांसवें वेलींचाहि
चोळामेळा । व्हावा क्षणीं ॥१०॥
कैसें दु:खी न होईल मन । ज्याने वाढविलें करोनि जतन ।
गेलें घराचेंचि सुंदरपण । एकाएकीं ॥११॥
तैसें गांव नीतीने जतन केलें । मुलांबाळांसहि सांभाळिलें ।
परस्परांत प्रेम
नांदलें । सेवागुणें खेळींमेळीं ॥१२॥
परि घुसले गांवचे भेदी । लाविली स्वार्थासाठी उपाधि ।
उगीदुगी करोनि भ्रमविली
बुध्दि । पाडली फूट ॥१३॥
सेवेचें सोंग उभें केलें । आपले स्तुतिपाठक घुसविले ।
वाईट झालें तें तें
माथीं मारलें । खर्या सेवकांच्या ॥१४॥
नथींतून जैसा मारावा तीर । तैसे असती बहादूर ।
परि गांव केला चकनाचूर । द्वैत पाडोनि ॥१५॥
नाना तर्हेचे वाद वितंड । नाना पक्षांचें माजविलें बंड ।
कधी आड कधी उघड । सुरू
झालें कार्य त्यांचें ॥१६॥
गोंधळवोनि टाकिलें जनमना । झाला प्रेम-शक्तीचा धिंगाणा ।
जिकडे पाहावें तिकडे कल्पना । फुटीर वृत्तीच्या
॥१७॥
कांही सज्जनांनी गांव जमविलें । कांही गुंडानी गांव नाशविलें ।
नाना तर्हेचे तमाशे
झाले । गांवीं आमुच्या ॥१८॥
व्यक्तिस्वार्थ बोकाळला । जो तो मनाचा राजा झाला ।
वेगवेगळया प्रलोभनीं गुंतला । समाज सारा ॥१९॥
आमिषामाजी लपला गळ । परि माशासि दिसे आमिषचि केवळ ।
तैसे भ्रमिष्ट झाले लोक सकळ । प्रलोभनापायीं
॥२०॥
कांही अतिनम्रता दाखविती । साहेबांचे जोडेहि पुसती ।
मनीं वासना वाईट धरती । अधिकारी व्हाया गांवाचा
॥२१॥
नाही कोणा सेवेचें भान । घालिती सत्तेसाठी थैमान ।
गांव केलें छिन्नभिन्न
। निवडणुकी लढवोनि ॥२२॥
गांवीं होती निवडणुकी । माणसें होती परस्परांत साशंकी ।
कितीतरी पक्षोपक्षांनी दु:खी । व्यवहारामाजी
॥२३॥
तैसीच येथे गति झाली । कोणी जातीयतेची कास धरिली ।
कुचेष्टा करोनि प्रतिष्ठा मिळविली । वचनें दिलीं
हवीं तैसीं ॥२४॥
कांहीकांनी मेजवानी दिली । दारू पाजूनि मतें घेतलीं ।
भोळी जनता फसवोनि आणिली । मोटारींत घालोनिया
॥२५॥
ऐसा सर्व प्रकार केला । गुंडगिरीने निवडून आला ।
म्हणे संधि मिळाली सेवकाला । सेवा करीन
सर्वांहूनि ॥२६॥
साधन ज्याचें मुळांत अशुध्द । त्याचा परिपाक कोठूनि शुध्द ?
लोकां
पोळोनि व्हावें समृध्द । गांवीं दुफळी माजवोनि ॥२७॥
सत्तेसाठी हपापावें । वाटेल तैसें पाप करावें ।
जनशक्तीस पायीं तुडवावें । ऐसें चाले
स्वार्थासाठी ॥२८॥
याने गांवाची होय दुर्दशा । मतमतांतराचा वाढे तमाशा ।
सज्जनांची होय निराशा । मरणापरी ॥२९॥
आतां सांगा काय करावें ? कासयाने
गांव सुधारावें ?
जें जें होईल तें तें
पाहावें । ऐसें वाटे निराशपणें ॥३०॥
ऐसा श्रोतयाने प्रश्न केला । मीं तो मनापासोनि ऐकला ।
मित्रहो ! उपाययोजना तुम्हांला । सांगतों
माझेपरीं ॥३१॥
परिस्थिती ही साचचि आहे । परि निराश होणें काम नोहे ।
दुर्जनांचें बळ वाढाया
हे । कारण होई निराशा ॥३२॥
आपणांस काय करणें । ऐसे बोलती लोक शहाणे ।
तरि समजावें गांव या
गुणाने । नष्ट होईल सर्वस्वीं ॥३३॥
मग तो मुखंडहि नव्हे । ऐसें कां न समजावें ?
निर्धाराने प्रयत्न
करावे । सर्व मिळोनि जाणत्यांनी ॥३४॥
ऐसें असावें धोरण । तेंचि कार्यकर्त्यांसि भूषण ।
गांव निर्मावया आपुले
प्राण । पणा लावावे ॥३५॥
विरोध येतां बसावें घरांत । ऐसें नोहे सेवेचें व्रत ।
गंगा घाबरती पाहोनि पर्वत । तरी सागरा न मिळती
॥३६॥
कोरडया हौदामाजीं तरावें । याने गौरव कोणा पावे ?
पुरांच्या लाटांतूनि
पोहूनि जावें । यांतचि वैशिष्टय आपुलें ॥३७॥
म्हणोनि कर्तव्य सांभाळावें । गांवशील जतन करावें ।
सोसाटयाने झडपूं न
द्यावें । गांवचें कोणी ॥३८॥
ग्रामसेवाचि ईश्वर-सेवा । ऐसें समजावोनि जीवा ।
गांव सेवेसि तत्पर करावा । सर्वतोपरीं ॥३९॥
नि:पक्षपणें बौध्दिकें द्यावीं । सर्वांची समजून पटवावी ।
बुध्दि गांवाची
सांभाळावी । प्रचाराद्वारें ॥४०॥
जनजागृति झालियाविण । न संपेल गांवाचें दैन्य ।
दृष्टि येतां लोकांसि, दुर्जन । मेख गडवूं न शकती
॥४१॥
या कार्यासि मिळावी जोड । म्हणोनि हातीं कांही मुखंड ।
तेणें शक्ति लाभे तोडीस
तोड । पटती फिके ग्रामशत्रु ॥४२॥
असो नसो साथ सत्तेचा । सहयोग मिळवावा सज्जनांचा ।
जनसेवकांनी
ग्रामराज्याचा । पाया रचावा सत्यावरि ॥४३॥
ज्यांना ज्यांना न्यायाची चाड । आणि गांव-सेवेची आवड ।
त्यांचीच संघटना व्हावी
दृढ । करावी वाढ दिसंदिस ॥४४॥
जाणता दिसेल तो निवडावा । जिव्हाळयाचा पुरुष वेचावा ।
थोरांचिया नेतृत्वें चालवावा । कारभार
ग्रामोन्नतीचा ॥४५॥
श्रोता म्हणे तेंहि झालें । महाप्रयासें सज्जन जमविले ।
परंतु एकदा चुकलें ।
तें सुधरेचना की ॥४६॥
अहो ! एक कमेटी बसली । गांवीं सुंदरता आणाया भली ।
म्हणे पाहिजे निवडणूक केली । पुढार्यासाठी ॥४७॥
कोण गांवाचा पुढारी ठरवावा ? आधी
मान कोणास द्यावा ?
कोणाच्या
हातें चालवावा । कारभार गांव-सेवेचा ? ॥४८॥
म्हणोनि निवडणूक ठरविली । ती जणुं आगींत बारूद पडली ।
अथवा राकेलाची टाकीच
ओतली । अग्निमाजी ॥४९॥
तेणें जाहला अग्निबंबाळ । मतामतांचा हलकल्लोळ ।
एकमेकासि पाहती महाकाळ
। शहाणे गडी ॥५०॥
जो तो म्हणे मीच शहाणा । कोणीच कोणाचें ऐकेना ।
अरे ! तोबातोबा !
आरडाओरडांना । सुमारचि नाही ॥५१॥
घरोघरीं मारामारी । बायको उठूनि नवर्यासि मारी ।
मुलें म्हणती आम्ही शहाणे भारी । पुस्तकें सारीं
शिकलों की ॥५२॥
कोण पुढारी समजावा ? विचार झाला
सगळया गांवा ।
एकएकाच्या न मिळे भावा । सांगा काय करावें ? ॥५३॥
श्रोतयाचा हा अनुभव । येत आहे गांवोगांव ।
परंतु येथे मुळांतचि ठेव । चुकली सारी ॥५४॥
गढूळ पाणी ढवळों जातां । घाणचि उफाळोनि ये हातां ।
जेथे सेवेची नाही आत्मीयता । तेथे गोंधळ सहजचि
॥५५॥
यासाठी आधी सेवाभावी । लोकांचीच संघटना व्हावी ।
तेथे रीघचि नसावी ।
अन्य कोणासि ॥५६॥
गांवांतील एकेक सज्जन । शोदूनि घ्यावे त्यासि जोडून ।
सेवाभावी मंडळचि
संपूर्ण । तयार करावें प्रयत्नें ॥५७॥
त्याचें प्रामाणिक सत्कार्य । लोकांपुढे येतां निर्भय ।
आपोआपचि होईल निश्चय ।
लागेल सोय गांवासि ॥५८॥
सेवेची ही नैतिक सत्ता । वजन मिळवील गांवहिता ।
मग कोणी विरोध तत्त्वता । न टिके तेथे ॥५९॥
टाकूनि दाब कोणावरि । लालुच दावूनि करिती फितुरी ।
विघ्नें आणिती सत्कार्यावरि । होतील दुरी ते
सर्व ॥६०॥
सेवासंघटनेचा प्रमुख । तो निवडोनि देतां चोख ।
हळुहळू गांव होईल सुरेख । सर्वतोपरीं ॥६१॥
श्रोता म्हणे ठीक हें सारें । परि गांवीं आलें निवडणुकीचें वारें ।
तेणें गांव आमचें भरीं
भरे । भलतैशाचि ॥६२॥
स्वार्थापायीं सेवा-विरोध । करणारे जे गांवचे मैंद ।
ते नाना मार्गे करिती बुध्दिभेद । जनतेचा
तयेवेळीं ॥६३॥
तेथे आम्हीं काय करावें ? गांव कैसे
सुधारावें ?
याचें समाधान ऐकावें ।
श्रोतेजनीं ॥६४॥
सांगितलें ते साचचि आहे । गांवोगांवीं अनुभवा ये ।
यासाठी सरळ दावावी सोय
। विचाराने गांवलोकां ॥६५॥
निवडणुकीची चालू प्रथा । हीच मुळीं सदोष पाहतां ।
म्हणोनि योग्य दृष्टि
द्यावी समस्ता । गांववासियां ॥६६॥
जीवनाची जबाबदारी । किती आहे निवडणुकीवरि ।
हें पटवोनि निवडणूक खरी । करवावी न गोंधळता ॥६७॥
विचार केलिया हळूहळू । आपैसाचि मार्ग ये कळूं ।
निवडणुकीचें तत्त्व जातां आकळूं । मिटेल गोंधळ
सहजचि ॥६८॥
अहो ! पुढारीपण कशाला ? सेवा
गांवाची करावयाला ।
मग सेवेची कसोटी लावा कीं आपुला । समजेल पुढारी
कोण तो ॥६९॥
कोण गांवासाठी झटे । कोण उठतो रोज पहाटे ।
घेऊनि हातामाजीं खराटे
। झाडतो कोण ॥७०॥
साध्या राहणीने दिवसभरि । कोण गरीबाचें काम करी ।
कोण पायीं फिरोन करी
वारी । गांवाची आमुच्या ॥७१॥
कोण नीतीने असे चांगला । पक्षपात न आवडे कोणाला ।
छदामासि नसे लाजीम झाला । गांव-निधीच्या ॥७२॥
कोण सर्वांचें पाहतो सुख:दुख । कोणाचें दिसे सेवेंसाठी मुख ।
हीच त्याची जाणावी ओळख
। निवडावया ॥७३॥
किंवा सकळांना सांगा काम । सोडा हुकूम आपुला बेफाम ।
कोण पहा न करितां आराम । काम करी गांवाचें ॥७४॥
मग तोचि म्हणावा पुढारी । आंधळाहि त्याची निवड करी ।
येथे कासयास ही टिमकी भरजरी । जाहिरातींची ? ॥७५॥
गांवचा जो प्रत्येक घटक । त्यासि ठाऊक असावा माणूस एकेक ।
कोण चुकार, कोण सेवक । चालक कोण ? ॥७६॥
कोण गांवाची सेवा करतो । कोण प्रतिष्ठेसाठी मिरवितो ।
सांगावा प्रसंग येतां स्पष्ट तो । गांवामाजी
॥७७॥
तेथे नसावी लाजशरम । त्याने बिघडेल गांवाचें काम ।
म्हणोनि सर्वांनी
द्यावें त्याचेंच नाम । न गोंधळतां ॥७८॥
ज्यासि गांवाचा जिव्हाळा । जो कार्यज्ञानाचा पुतळा ।
तोचि सुखी करील गांव सगळा
। निवडोनि देतां ॥७९॥
ऐसें न करतां भांडणें माजती । गांवची होईल अनावर स्थिति ।
मग फावेल
स्वार्थीजनाप्रति । सज्जन राहती वेगळेचि ॥८०॥
यासाठी उत्तम गुणी निवडावा । ज्याची सर्व करिती वाहवा !
गांवाचा बागडोर त्यासि
द्यावा । आपुला पुढारी म्हणोनिया ॥८१॥
नाहीतरि गांवचे म्हणविती पुढारी । दांत बसला सवाई-दिढीवरि ।
आपण होऊनि वाघापरी ।
गांव मारिती उपवासी ॥८२॥
कांही लोक भाषणें करिती । बोलूनि पक्षभेद पाडिती ।
जुळल्यांची तोडूनि मति
। भरती करिती झगडयांची ॥८३॥
ऐसा नकोच पुढारी । ज्याने नाही केली कर्तबगारी ।
तो मित्र नव्हे, वैरी । समजतों आम्ही ॥८४॥
ज्याने केलें असेल उन्नत ग्राम । अथवा समुदायाचें आदर्श काम ।
तोचि बोलण्याचा अधिकारी उत्तम । समजतों आम्ही
॥८५॥
एरव्ही पैशाचे मिळाले तीन । देती भरभरा भाषण ।
न बसावें कोणाचेंहि मन । तयांवरि ॥८६॥
ऐसे पुढारेपण जेथे दिसे । गांवाने लावूनि न घ्यावें पिसें ।
जो इमानदार सेवक असे ।
तोचि समजावा गांवधनी ॥८७॥
बोलणें एक चालणें एक । लपविणें एक दाखविणें एक ।
हें गांवासि होईल घातक
। समजावें श्रोतीं ॥८८॥
भिडेखातरहि विष खादलें । किंवा चोरूनिहि सर्पा दूध पाजलें ।
वाघाशीं सोईरपणहि
संपादलें । तरी नाश होईल निश्चयें ॥८९॥
ऐसें न करावें वर्तन । असतील जे इमानदार सेवकजन ।
तेचि द्यावेत निवडोन ।
एकमतें सर्वांनी ॥९०॥
सर्वांस असावी चिंता समाजीं । कोण आहे लायक जनामाजी ।
कोण घेई गांवाची काळजी
। सर्वकाळ ॥९१॥
तोचि करावा पुढारी । एरव्ही पडों नये कुणाच्याहि आहारी ।
धन वेचतो म्हणोनि
गांवाधिकारी । करूं नये कोणासि ॥९२॥
पुढारीपण सेवेनेच मिळे । हेंचि बोलावें मिळोनि सगळे ।
तेथे पक्षबाजीचे चाळे ।
वाढोंचि न द्यावे ॥९३॥
नातीं गोतीं पक्ष-पंथ । जातपात गरीब-श्रीमंत ।
देवघेव भीडमुर्वत ।
यासाठी मत देऊंचि नये ॥९४॥
भवितव्य गांव अथवा राष्ट्राचें । आपुल्या मतावरीच साचें ।
एकेक मत लाख मोलाचें । ओळखावें याचें महिमान
॥९५॥
मत हें दुधारी तलवार । उपयोग न केला बरोबर ।
तरि आपलाचि उलटतो वार ।
आपणावर शेवटीं ॥९६॥
दुर्जन होतील शिरजोर । आपुल्या मताचा मिळतां आधार ।
सर्व गांवास करितील जर्जर । न देतां सत्पात्रीं
मतदान ॥९७॥
मतदान नव्हे करमणूक । निवडणूक नव्हे बाजार-चुणूक ।
निवडणूक ही संधि अचूक ।
भवितव्याची ॥९८॥
निवडणूक जणुं स्वयंवर । ज्या हातीं देणें जीवनाचे बागडोर ।
त्यासि लावावी कसोटी सुंदर । सावधपणें ॥९९॥
फोड चोखाया लावोनि जैसे । शिष्य निवडिले रामदासें ।
मृत्यूच्या कसोटीवरि
पाहणें तैसें । गुरु गोविंदसिंहाचें ॥१००॥
गडी पळावयासि लागले । कोण थकले कोण बाद झाले ।
कोणाचे नंबर पुढे आले ।
सहजचि कळे या रीतीं ॥१०१॥
तैसेंचि आहे निवडणुकीचें । कामचि पाहावें सगळयांनी त्यांचें ।
ज्याचें काम अधिक
मोलाचें । तोचि निवडावा मुख्य ऐसा ॥१०२॥
ऐसें सकळां पटवोनि द्यावें । तेणें गोंधळ मिटती आघवे ।
कार्यकर्त्यासीच संधि पावे । ऐसें होतें यायोगें
॥१०३॥
मग त्याचेंचि म्हणणें ऐकावें । सगळें गांव पुन्हा जमवावें ।
बाष्कळ बोले त्यास दाटोनि द्यावें । गांवकर्यांनी
॥१०४॥
ऐसें झालें की झाली संघटना । लागली सुरूं गांव-सुधारणा ।
झाला मुलामाणसांचा बाग पुन्हा । जिताजागता
प्रेमळपणें ॥१०५॥
तेथे नवनवीं योजना-फुलें । विकसोनि देतील गोड फलें ।
ग्रामराज्याचें स्वप्नहि भलें । मूर्त होईल त्या
गांवीं ॥१०६॥
कोणी उडवूं लागे धुरळा । तरि तो त्याचेचि जाईल डोळां ।
सुखें नांदेल गांव सगळा
। तुकडया म्हणें ॥१०७॥
इतिश्री ग्रामगीता
ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत ।
कथिला ग्रामराज्याचा
निर्वाचन-पथ । दहावा अध्याय संपूर्ण ॥१०८॥
अध्याय१०वा ऑडीओ स्वरुपात --
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा