.

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

हे गुरूदेव ! हम सबको सदबुध्दी दे ,सतकर्तव्य करनेकी प्रवृत्ति दे ,सच बोलनका अभ्यास दे ,सतस्वरूप का ग्यान दे । हे जगदव्यापी परमेश्वर ! हम हर मनुष्य मात्र से प्रेमका,सत्यताका,बंधुत्व- -भावका आचरण करे और सुख दुखःमे सम रहे,ऐसी हमको शक्ती दे,युक्ती दे और भक्ती दे । हे सर्वधर्ममें,सर्व संतमे,समस्त संसार में,रममाण होनेवाले चैतन्यघन!हम तेरे लिए,तेरे देश के लिए,हर जीव जंतु के लिए,कुटीलताका,अनैत्तिकताका,छलछिद्र द्रोहताका त्याग करे ऐसा साहस दे । हे भगवान! अंतमे तुझमें समरस हो जाये यह हमारा ध्येय हैं,उद्देश है । इसके लिये तुझको स्मरके निश्चय करते है, प्रतिज्ञा करते है । हे विश्व धर्मको नियमन करनेवाले परमात्मा !जहाँभी,जिधरभी,हममें कुछ कमी दिखती हो,उसमे हमारा ध्यान लगाकर,उस चिज को,उस कार्यको,पुरा करने में हम अपना स्वराज्य समझते है , सूराज्य समझते है ।यह समझने की और कर्तव्य करनेकी हमको प्रियता दे,शक्ती दे ,वरदान दे

मंगळवार, ६ जून, २०१७

अध्याय ३० वा भजन-प्रभाव



अध्याय ३० वा

भजन-प्रभाव

 

एक श्रोता करी प्रश्न । भजनीं देवाचें गुणगान ।

 त्यासि बनवितां प्रचाराचें साधन । पावित्र्य मग कैसें उरे ॥१॥

 

भजनासि हें ऐसें वळण । देवोनि चुकवितां आपण ।

 साध्या गोष्टीहि शिकविता त्यांतून । हें तों न पटे धार्मिकां ॥२॥

 

याचें ऐकावें उत्तर । धर्म म्हणजे धारणा सुंदर ।

 त्यांत सर्वचि अंगांचा विचार । जीवनाच्या ॥३॥

 

कलीयुगीं भजन कीर्तनभक्ति । यामाजीं बोलिली विशेष शक्ति ।

 ती नव्हे एकांगी संतउक्ति । केवळ मुक्ति मिळवाया ॥४॥

 

आमुचें संपूर्णचि जीवन । सुधारूं शके कीर्तनभजन ।

 वेदशास्त्रस्मृति संपूर्ण । याच काजा जन्मल्या ॥५॥

 

समाजरचना गांवरचना । विवाहादि संस्कार राज्ययोजना ।

औषधिशेतीकलादि नाना । वेदस्मृतींत वर्णिल्या ॥६॥

 

पुरातन संस्कृत वेदकाळ । त्यांतूनि जन्मला पुराणकाळ ।

पुढे प्राकृतजना कळावया सरळ । संत-भजनें अवतरलीं ॥७॥

 

साधुसंतीं लिहिलें नामभजन । भावभक्ति हृदयीं धरून ।

 बोध कळावया जनतेलागून । सहजासहजीं सर्वचि ॥८॥

 

कांही वेदान्तरूपकें कथिलीं । कांही वैराग्यभावें बोलिलीं ।

कांही सलगीचीं भजनें केलीं । साधुसंतीं विनोदें ॥९॥

 

कांही रचिलें भजन-भारूड । बहुरूपीगोंधळीजोहारगारूड ।

 पाईकमातंगगांवगुंड । रूपकें समाज-जीवनाचीं ॥१०॥

 

कांही केलें लीला-लाघव । गौळणीगोपाळदेवीदेव ।

समाजसुधारणेचा गौरव । वर्णिला कांही ॥११॥

 

जैसा प्रसंग आला सामोरी । तैसींच भजनें केलीं बहुपरी ।

 हें कळावया वर्म अपुरी । बुध्दि झाली लोकांची ॥१२॥

 

वाईट भावना नाशावया । लोकीं कर्तव्यशीलता यावया ।

 समाज सुस्थितींत नांदावया । भजनें केलीं संतांनी ॥१३॥

 

सौरी विराण्याहि गाऊनि । लोकांवरि पाडिली मोहिनी ।

बिघडल्या जना आपुलेंसें करोनि । जागृत केलें समाजा ॥१४॥

 

गाऊनि नाचूनि नाना रीतीं । भावभक्ति भरोनि गीतीं ।

 त्यांतूनि केली जनजागृति । शहाणें केलें संतांनी ॥१५॥

 

संत तुकारामनामदेव । शेखमहंमदज्ञानदेव ।

 चैतन्य प्रभुनानकदेव । जनामीरामुक्ताबाई ॥१६॥

 

कबीरतुलसीदासरामानंद । सूरदासदादूब्रह्मानंद ।

नरसीदेवनाथपरमानंद । संत झाले असंख्य ॥१७॥

 

ऐसे कितीतरी संत झाले । ज्यांनी अभंग-भजनादि कथिले ।

 कित्येक जन उध्दरोनि गेले । नामभजनें तयांच्या ॥१८॥

 

ज्यांची ऐकतां भजन-वाणी । जाय गगनमंडळ भेदोनि ।

झालेआहेतहोतील अजूनि । संत-सज्जन यापरी ॥१९॥

 

म्हणोनि बोलिले सकळ लोकां । ’ भजन-मार्ग सोडूं नका ’ 

परि भजनीं तारतम्य शिका । म्हणायाचें हेंचि असे ॥२०॥

 

राम झाले कृष्ण झाले । संतपुढारीसर्वचि झाले ।

 परि आज काय पाहिजे केलें । हेंचि कथिलें तयांनी ॥२१॥

 

जगाची नित्य बदलती गति । आज कोणती उद्या कोणती ।

 कोणते बोल कोणाप्रति । सांगावे कधी कळावें हें ॥२२॥

 

मुडदा स्मशानीं चालला । तेथे काय करावें शृंगाररसाला ?

 पाहिजे वैराग्यभाव वाढविला । भजनमार्गे ॥२३॥

 

भजनी लग्नकार्यासि बोलाविला । त्याने स्मशानींचा रस वर्णिला ।

लोक म्हणतील काढा याला । काय बरळतो या स्थानीं ॥२४॥

 

तैसेंचि देवुळीं केलें भजन । गायिलें स्त्रीसौंदर्य शृंगारपूर्ण ।

जन पाहतील हसून । वेडयापरी समजोनिया ॥२५॥

 

रणांगणीं भजनी नेला । वीरांस म्हणे सोडा शत्रूला ।

काय करितां मिथ्या गलबला । ऐसें बोलिल्या कोण ऐके ॥२६॥

 

हें सर्व जयाने जाणावें । तेणेंचि भजनभाव वर्णावे ।

शहाणे करूनि सोडावे । भोळेजन सर्व ॥२७॥

 

समाज झाला रूढिबध्द । तेथे सांगावे सिध्दांत शुध्द ।

 समाजकार्याहि करावें विशद । वेळ पडेल त्यापरी ॥२८॥

 

प्रसंग पाहोनि उपदेशावें । सत्य तत्त्व तें न सोडावें ।

 सत्यचि गोड करोनि सांगावें । वेळकाळादि पाहोनि ॥२९॥

 

ऐसेंचि समजोनि संतजनें । केले ग्रंथ गीतें भजनें ।

 तैसेंचि आज पाहिजे नव्याने । वर्णिलें सारें ॥३०॥

 

सर्व पंथांचा समन्वय । सर्व जातींचा मेळ होय ।

 ऐशाचि भजनांनी लागेल सोय । आमुच्या गांवाची ॥३१॥

 

हें जरी मागे संतांनी कथिलें । परि आज पाहिजे पुढे वर्णिलें ।

 वर्णन करणारेच भ्रमांत पडले । मग ते मेले जनलोक ॥३२॥

 

कोणी ब्रह्मज्ञानाचीं भजनें गाती । अर्थाविणेच वाचती म्हणती ।

उगीच दंभ अंगीं आणती । आपण ज्ञानी म्हणोनिया ॥३३॥

 

घेऊनि संतांचें पाठांतर । आपणचि बनती महात्मा सुंदर ।

 निभवाया पोटाचा व्यवहार । आयुष्यभरी ॥३४॥

 

कोणी गौळणींत रंगोनि नाचती । वेष धरोनि दंढार करिती ।

अर्थ सोडोनि मजा मारिती । विषयांधभावें ॥३५॥

 

ऐसी ऐकतां कृष्णलीला । जनमनीं भाव वेगळा झाला ।

 वाटे हा तमाशाचि बनविला । देवादिकांचा ॥३६॥

 

कोणी रागरागिणी गाती । शब्द तोडोनि अर्थाची माती ।

 पाहिजे तसे बनवोनि घेती । शब्द भजनाचे ॥३७॥

 

कोणी पाठांतर खूप करिती । ताल-बेताल करोनि गाती ।

 चीड येते ऐकतां चित्तीं । अर्थ अनर्थ सगळाचि ॥३८॥

 

कांही गाती अति सुंदर । ताल कुशल आलाप मधुर ।

 तेथे अर्थाचा नसे अंकुर । भजनभाव जागेना ॥३९॥

 

कोणी भजन करावया आधी । गांजा-तंबाकूची पाहती संधि ।

 चहाप्रसादाविण न होई गर्दी । भजनकर्‍यांची ॥४०॥

 

कांही म्हणती आमुचें भजन वेगळें । तें तुम्हांसि कैसें कळे ?

 त्यासि पाहिजे गुरुदेव-हस्तकमळें । डोक्यावरि ॥४१॥

 

कांही सांप्रदायिक भजनी असती । ते आपुलीच शेखी मिरविती ।

 माळ-तंदुरीसाठी भांडती । शत्रु जैसे जन्मांतरीचे ॥४२॥

 

कांही खंजरीसाठी रागें भरती । कांही स्पर्धेने पुढे येती ।

परि समाधान नाही चित्तीं । तिळभरी कोणाचिया ॥४३॥

 

कांही म्हणती दुसर्‍या संताचें । भजन नका बोलूं मंडपीं आमुचे ।

 आमुचें भजन संप्रदायाचें । आमुच्याच साठी ॥४४॥

 

मित्रहो ! आता ऐसें करणें । सोडोनि द्यावें जीवेंप्राणें ।

 कोणत्याहि संतांचीं सदवचनें । म्हणावीं प्रेम धरोनि ॥४५॥

 

ज्या भजनाचा अर्थ न कळे । तें भजन न म्हणावें आपुल्या बळें ।

ज्याने समाजांत परिणाम सगळे । व्यर्थ होती ॥४६॥

 

भजनें करावी गांव-जागृति । हृदयजागृति कार्यजागृति ।

 सर्वांनी लागावें सत्कर्माप्रति । ऐसें लोकां सांगावें ॥४७॥

 

भजन म्हणणाराचि आळसी । काय सांगेल जनतेसि ?

 करोनि घेईल आपुली हसी । ऐसें कोणा न करावें ॥४८॥

 

जें जें करावें तें समजोनि । पाऊल न टाकावें विचारावांचोनि ।

 विचारचि नेतो मोक्षभुवनीं । ऐसी साक्ष थोरांची ॥४९॥

 

विचाराविण देवभक्ति केली । तेथेहि दिसे फजीती झाली ।

लोक म्हणती लोभें फैलाविली । देवपूजा दांभिकाने ॥५०॥

 

रात्रभरि केलें भजन । पडला खाटलीं बिमार होऊन ।

 मग कोठलें नामस्मरण । ’ अरे बापा ’ ओरडतो ॥५१॥

 

अभ्यासावांचूनि उपास केला । दोनदिवसां पित्तवात उमळला ।

मग सहा महिने खातचि गेला । दवापाणी मोसंबी ॥५२॥

 

ऐसें कासयासि करावें तारतम्य सोडोनि द्यावें ।

 मग तो भोग भोगीत राहावें । आयुष्यभरि ॥५३॥

 

मनुष्याने बुध्दि वापरावी । अनुभवियाची सल्ला घ्यावी ।

अति सर्वत्रचि वर्जावी । अभ्यासें करावी आत्मोन्नति ॥५४॥

 

समाजीं जेणें हानि घडे । तें सुधारावयाचे पोवाडे ।

वाजवावे संतांचे चौघडे । विचाराने गर्जोनि ॥५५॥

 

त्यांचेहि करूं अनंत प्रकार । रुचिभेदाचा जाणूनि व्यवहार ।

परि मूळचे सिध्दान्त थोर । सोडूं नेदूं कोणासि ॥५६॥

 

आधुनिक बसवूं चाली । जेणें लक्ष वेधेल आसुच्या बोलीं ।

 परि दाखवूं संतांनी केली । तेचि वाणी या काळीं ॥५७॥

 

भजनांचे असोत अनंत प्रकार । मागचे पुढचे कांही विचार ।

 परि संतांचें काव्य अति थोर । उमटोनि निघे बाहेरी ॥५८॥

 

परि संतांचीं भजनें दुकान थोर । तेथे अमोलिक वस्तु अपार ।

 त्यांतूनि निवडोनि सारासार । देऊं पात्र पाहोनि ॥५९॥

 

संतभजनीं देवभक्तीच नाही । जीवनाचे सर्व दृष्टान्तहि ।

प्रसंगीं शिव्या देवोनीहि । समजाविलें त्यांनी ॥६०॥

 

मीराबाईचीं प्रेमभजनें । सूरदासाचीं लीलाकवनें ।

तैसींच गोस्वामींचीं जीवनदर्शनें । उपदेशगाणें कबीराचें ॥६१॥

 

तें सर्वचि प्रिय देवा । जेणें घडे जीवांची सेवा ।

हें जाणोनि समाज जागवावा । भजनप्रकारें या काळीं ॥६२॥

 

कांहींनी राममंत्र सांगितला । त्यांतूनि समाज जागविला ।

कांहींनी  दत्तमंत्र शिकविला । लोक केले सेवाभावी ॥६३॥

 

कृष्णरंगीं रंगली मीरा । राज्यवैभव वाटे कचरा ।

छंद लागला घराघरां । तिच्या प्रभावें भक्तीचा ॥६४॥

 

चैतन्याची गर्जतां वाणी । अनिष्ट रूढया गेल्या पळोनि ।

पावन झाली श्रीकृष्ण-भजनीं । बंगालभूमि त्याकाळीं ॥६५॥

 

कबीरनानकदेवादिकांनी । भजनें केलीं विदेशीं फिरूनि ।

 विवेकानंद-रामतीर्थांनी ।  केलें प्रभावित जग जैसें ॥६६॥

 

ऐसे अनेक मार्गी झाले । परि ते आज अपुरेच पडले ।

देशापुरतेहि नाही व्यापले । समाजा सुमार्गी लावाया ॥६७॥

 

त्यांची पडली आज उणी । मानव राहिले मागासल्यापणीं ।

याची कराया भरपाई अजूनि । प्रचारक पाहिजे सेवाभावी ॥६८॥

 

तोचि उत्तम प्रचारक । ओळखे वेळप्रसंग सम्यक ।

मार्ग सांगतो लायक । लोकां हांक देवोनिया ॥६९॥

 

म्हणे आमुचें कांही नव्हे । संतीं कथिलें जैसें बरवें ।

 तेंचि विशद करोनि सांगावें । हाचि धर्म भजनियांचा ॥७०॥

 

भजनासनीं भजनी बैसला । जनलोकांच्या दृष्टीस आला ।

 पाहती लोक सदभावें त्याला । गंभीर दिसला पाहिजे तो ॥७१॥

 

साधी राहणी सात्विक लेणीं । विनम्र हावभाव-निशाणी ।

 शुध्द बोल प्रेमळ वाणी । पाहिजे भजनी लोकांची ॥७२॥

 

कपाळावरि आठया पडल्या । वेडयावाकडया बाहुल्या फिरल्या ।

हेकडें तोंड मुद्रा फाकल्या । ऐसें कधी न व्हावें ॥७३॥

 

मनांत असावा नितांत आदर । वृत्तींत असावा भाविक गहिवर ।

 रोमांच उठावेत अंगावर । भजनियाच्या ॥७४॥

 

असावी कोमल रसाळ वाणी । उच्चारितां जावी हृदय भेदोनि ।

 जागृत व्हावे ऐकतांच प्राणी । लागावे ध्यानीं सुजनांच्या ॥७५॥

 

भजनें म्हणावीं सरळ सात्विक । गोड आवाज ओजस्वी रसिक ।

 तालबध्द मधुर नि:शंक । अर्थपूर्ण निर्भयपणें ॥७६॥

 

ऐशाचि पावन प्रचारासाठी । संतीं केली आटाआटी ।

 जना कळावी ओठाओठीं । भाषा त्यांची म्हणोनि ॥७७॥

 

आमुचा देशचि भाविकभक्त । त्याचा विश्वास भजनासक्त ।

देवधर्म म्हणतांचि चढतें रक्त । अंगीं त्याच्या ॥७८॥

 

हिरण्यकश्यपूसि नामाची चीड । परि नारदाचिया भजनीं ओढ ।

 ऐसेंच आहे भजनाचें गूढ । नागहि होई शांत तेथे ॥७९॥

 

म्हणोनि भजनाचें महत्त्व । भाषणासि येतें गौणत्व ।

  हें समजोनि संतांनी तत्त्व । भजन केलें प्रेमाने ॥८०॥

 

भाषणांत भरलें समाजकारण । धर्मकारण राजकारण ।

लोककारण विज्ञानकारण । रुक्ष वाटे तें सर्वां ॥८१॥

 

लोक समजती भजनाची भावना । अर्थ सांगतां सुगंध सुवर्णा ।

चमत्कारें बदलावा जमाना । तैसें होतें भजनाने ॥८२॥

 

भजनाची वाजली खंजरी । थाप पडली मृदंगावरि ।

 झाली जनता वेडीबावरी । ऐकावया भजनासि ॥८३॥

 

लोक पाहती चातकावाणी । कधी निघेल दुसरी वाणी ।

ऐसा समाज जातां मोहूनि । गांव होई जागृत ॥८४॥

 

आपुल्या गांवीं व्हावें भजन । जेणें जागृत होती वृध्द-तरुण ।

 स्त्रियामुली सकळ सज्जन । कार्य करिती ग्रामाचें ॥८५॥

 

प्रत्येकाच्या तोंडीं गीतें । ’ आपुलें गांवचि सुधारूं पुरतें ।

 हेंचि सांगितलें भगवंतें । ग्रंथामाजीं ’ म्हणती सारे ॥८६॥

 

गुराखी ढोरकी शेत-मजूर । दुकानदार शिंपी सुतार लोहार ।

दळणीं कांडणीं घरोघर । गाती भजनें उल्हासें ॥८७॥

 

म्हणती ’ या रे सगळयांनो ! या । एकेक काम हातीं घ्या ।

 गांवची सुधारणा करूंया । आपुल्यापरीं ’ ॥८८॥

 

हेचि स्फूर्ति जागवाया संतीं । केली भजनमालिकेची प्रगति ।

 समाधान लाभावया लोकांप्रति । सेवागुणें सुसंस्कारें ॥८९॥

 

आज सेवेची नोकरी झाली । भजनावरीच जिंदगी चालविली ।

याने साधनांची किंमतचि उडाली । जाहला तो पोटधर्म ॥९०॥

 

वीणा चिपळया झाल्या भिकारी । पोटास्तव फिरती दारोदारीं ।

 त्या मागची संत-तपस्या सारी । लुप्त झाली वाटे जणूं ॥९१॥

 

यासि फिरूनि दुरुस्त करावें । सुसंस्कारें लोक भरावे ।

घरोघरीं रोपटें पेरावें । सेवावृत्तीचें ॥९२॥

 

एक सेवक सेवेसि लागला । हजारो लोकांसि मार्ग दिसला ।

 मानवजातीचा पांग फेडला । ऐसें व्हावें निश्चयें ॥९३॥

 

हनुमंत जेव्हा भावनेने चेतला । राममंत्र घेवोनि निघाला ।

 कार्य सिध्दचि करोनि आला । उल्हासें श्रीरामाचें ॥९४॥

 

तैसेंचि आपण आज करावें । भजनादि साधनां सुधारावें ।

 गांवोगांवींच्या लोकीं भरावें । बंधुप्रेम त्याद्वारें ॥९५॥

 

सर्वांभूतीं प्रेमभाव । यांतूनचि सेवेचा उदभव ।

चारित्र्याचा वाढे गौरव । संस्कार होतां भजनांचे ॥९६॥

 

भजनांची चालतां परंपरा । जना मिळे सत्प्रवृत्तींचा झरा ।

लोकशिक्षणाचा यापरी दुसरा । उपाय नाही सात्विक ॥९७॥

 

म्हणोनि विनवितों गांवकर्‍यांनो ! तरुण मुलांनो ! वृध्दजनांनो !

 सगळेचि प्रेमळ गीतें म्हणो । करा ऐसा प्रचार ॥९८॥

 

वाणी रंगूं द्या हरिनामाची । चटक लागूं द्या सत्कर्मांची ।

 चीड येऊं द्या दुर्व्यसनांची । सर्व जना या द्वारें ॥९९॥

 

जतन करा गांवसंस्कृति । होऊं द्या भजनें जनजागृति ।

जनता-विद्यापीठ हें निश्चिती । तुकडया म्हणे ॥१००॥

 

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत ।

 भजनसाधना ग्रामहितार्थ । तिसावा अध्याय संपूर्ण ॥१०१॥




अध्याय३०वाऑडीओ स्वरुपात --



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

।।जय गुरुदेव।।