अध्याय ३३ वा
अवतारकार्य
श्रोतियांनी केला
प्रश्न । संतसंगें मिळे संतपण ।
ऐसें झालें निरूपण । हें तों जीवा पटेना ॥१॥
संत देवाचे अवतार
। आम्ही गांवचे गवार ।
कैसें त्यांच्या बरोबर । व्हावें आम्ही ? अशक्य हें ! ॥२॥
याचें ऐका समाधान
। जग झालें ईश्वरापासोन ।
नर तोचि नारायण ।
दाविली खूण संतांनी ॥३॥
जन्मासि आला तोचि
अवतार । अवतार सर्वचि प्राणिमात्र ।
त्या अवताराचे अनंत प्रकार । प्रकट होती
सत्कर्मे ॥४॥
कोणी आपुलें
पोटचि भरी । कोणी कुटुंबाचें पोषण करी ।
कोणी गांवाची काळजी निवारी । आपुल्यापरीने ॥५॥
कोणी होती
प्रांतव्यापी । प्रांताकरितां कष्टी-तपी ।
जनाकरितां वाट सोपी । करोनि द्याया हौसेने ॥६॥
हे अवतार साधारण
। यापुढे विशेष अवताराचें लक्षण ।
जो मिरवी देशाचें भूषण । शरीरीं स्वयें ॥७॥
" माझा देशचि माझें घर । देश दु:खी जणुं माझेंचि शरीर ।
त्यासाठी मी निरतर । कष्टी होईन सांभाळाया
" ॥८॥
ऐसें ज्याने मनीं
धरिलें । किंबहुना कार्यें अनुभवा आलें ।
अनेक आपत्तींनी उजळलें । सत्कार्य ज्याचें ॥९॥
त्यासि म्हणावा
अवतार । जो करी सज्जन चिंता निरंतर ।
दुष्ट बुध्दीचा तरस्कार । सदा जयासि सक्रिय ॥१०॥
जगाचें उद्दिष्ट
आहे सत्य । तिकडे जग करावें प्रवृत्त ।
ऐसें ज्याचें ज्याचें कृत्य । तोचि अवतार
निश्चयें ॥११॥
षडगुण ऐश्वर्याच्या
प्रमाणांत । अंश, पूर्ण आदि प्रकार त्यांत ।
ज्ञानी कर्तबगार निरासक्त । उदार श्री-यशसंपन्न
॥१२॥
या अवताराचे पंथ
दोन । एक हृदयपरिवर्तन दुसरा दमन ।
एका क्रांति करी सशस्त्र पूर्ण । दुसरा
भावभक्तीने वळवी ॥१३॥
धर्मनीति
सेवामार्गे गवसिली । त्यासि संत-अवतार संज्ञा लाभली ।
सामदामदंडभेदाने क्रांति केली । त्यासि म्हणती
देवावतार ॥१४॥
देव-अवतार नित्य
नसती । ते महाप्रसंगीं पुढे येती ।
संत-अवतार नेहमी चालती । लोकीं सुनीति वाढवाया
॥१५॥
कांही अवतारांची
महिमा । विश्वव्यापक त्यांचा आत्मा ।
प्रकट करण्या
मानवतेची सीमा । प्रचार त्यांचा ॥१६॥
ज्यांचा जैसा
अधिकार । त्यांचा चाले तैसा व्यवहार ।
मार्ग एकचि परि मागे-समोर । पाय अनुभवें पडताति
॥१७॥
कोणी भक्ति
शिकवोनि सुधारी । मंत्र शिकवोनि जनता तारी ।
कोणी ज्ञानमार्ग सांगोनि समर्थ करी । मानवता
लोकीं ॥१८॥
अखेर मानवांची
उन्नति करणें । तयां राष्ट्रधर्म निजधर्म शिकविणें ।
हेंचि संतांचें असतें लेणें । सर्वतोपरी ॥१९॥
वाउगा संकल्पचि
नाही उठला । स्फुरला तो अनुभवचि ठरला ।
त्या दिव्यदृष्टीच्या पुरुषाला । संत-अवतार
म्हणों आम्हीं ॥२०॥
कोणी कुटुंबासि
त्रस्त करी । कोणी गांवाचे होती वैरी ।
कोणी देशांत
उपद्रव करी । पाखांडपंथीं ॥२१॥
जो देशद्रोही
धर्मद्रोही ठरला । प्रेमाने सांगतां न समजला ।
सर्व प्राण्यांना त्रास झाला । ज्याच्या योगें
॥२२॥
कांही केल्या न
सुधारें । शिरलें क्रूरवृत्तींचें वारें ।
सज्जनांचें मनहि थरारे । ज्याच्या धाकें ॥२३॥
त्याची झाली
परिसीमा । तेव्हा देवावतार येतो कामा ।
पाठवावयासि विरामा । देहा त्याच्या निरुपायें
॥२४॥
ते दुर्जन
राक्षस-अवतार । जे जनतेसि दु:ख देती फार ।
त्यांना दंड
द्याया देव-अवतार । प्रकट होती ॥२५॥
ऐसें हें नेहमीच
चालतें । जैसें जन्ममरण-रहाट फिरतें
तैसेचि संत-देव
येताति ते । भूमीवरि ॥२६॥
राक्षसी आणि
देववृत्ति । रूपांतरें खेळते जगतीं ।
संतदेव स्थापूं पाहती । शांति प्रेमशक्तीने ॥२७॥
येथे श्रोत्यांनी
प्रश्न केला । जरि दुष्ट तोचि राक्षस ठरला ।
तरि त्याने वरदहस्त कैसा मिळविला । दैवतांचा ? ॥२८॥
काय ठावे नव्हते
त्याचे गुण ? कां दिले शक्तीचें वरदान ?
आम्हां न कळे हें पुराण । कैसें आहे सांगा की ॥२९॥
याचें ऐकावें
उत्तर । हा राक्षसहि आधी भक्त फार ।
त्याच्या तपानेचि देवता निरंतर । प्रसन्न त्यासि
॥३०॥
त्याचिया
गुणकर्मे मिळालें वरदान । तें सहन न झालें मागाहून ।
त्याचा दुरुपयोग दारुण । केला त्याने मनमाने
॥३१॥
प्रथम हाती आली
सत्ता । मग भुलला तो भगवंता ।
लागला उपभोगाच्या
पंथा । नीतिप्रवृत्ति सोडोनि ॥३२॥
त्याची राखती संत
मर्जी । तंव तो अधिकचि चढे समाजीं ।
जनतेमनीं वाढतांहि नाराजी । पर्वा न करी
अहंकारें ॥३३॥
भरावया पापांचा
रांजण । त्यासि देती प्रोत्साहन ।
जेणें त्वरित होय निकाल पूर्ण । पंख फुतलिया
उधळीपरी ॥३४॥
कितीहि साधुसंत
समजाविती । परि न वळे त्याची मति ।
म्हणोनि देवावताराहातीं । कार्य आलें तयाचें
॥३५॥
देव-अवतार
समजाविती । नाना योजना करूनि पाहती ।
शेवटीं शस्त्र
धारण करिती । दुष्टासाठी ॥३६॥
त्याच्या
मोक्षाने सुटती जन । मुक्त होती दु:खापासून ।
म्हणोनि करावा लागे प्रयत्न । अवतारासि
निर्वाणींचा ॥३७॥
ऐसें ज्याने
ज्याने केलें । दु:ख जगाचें निवारिलें ।
ते सर्व अवतारचि ठरले । पुराणें झालीं तयांचीं
॥३८॥
तैसें कोणी करी
अजून । त्यांचीं गुणकर्मे पाहून ।
पूर्वीच्या थोरांचे अवतार जन । मानिती तयां ॥३९॥
तुलसीदास आधी
आसक्त । ते वैराग्यें झाले महाभक्त ।
रामकथा गावोनि
तारिलें जगत । म्हणोनि वाल्मीकि-अवतार ॥४०॥
कोणी भिन्न देवां
अवतार मानिती । हेहि आहे आपुलीच भक्ति ।
पुढे पुढे कळेल
तयांप्रति । पायर्या अवतार-कार्याच्या ॥४१॥
कोणा म्हसोबा
खंडोबा मान्य । कोणी शक्तिअवताराचें करी पूजन ।
कोणी अवतार राम-कृष्ण । म्हणती महाविष्णूचे ॥४२॥
कोणी दश अवतार
मानिती । कोणी गुरुनानक-परंपरा वानिती ।
कोणी तीर्थकरचि अवतार म्हणती । कोणी गणती चोवीस
॥४३॥
कोणी बुध्द-अवतार
पूजती । कोणी दत-अवतारा भजती ।
कोणी येशु
ईशपुत्रावतार समजती । जगतीं झाला ॥४४॥
कोणी म्हणे महंमद
प्रेषित-अवतार । कोणी म्हणे संत अंशावतार ।
लोक मानिती अनंत प्रकर । किती सांगों ? ॥४५॥
याचें एकचि कारण
। जो जो उन्नतीसि लागला न्यूनपूर्ण ।
तोचि अवतार
मानिला वेगळा समजोन । सज्जनांनी ॥४६॥
कोणी
ब्राह्मा-विष्णु-हर । यांसि मानिती खरे अवतार ।
कोणी म्हणती
देवचि भूमीवर । कधी नाही प्रकट झाला ॥४७॥
देव आहे
आत्मशक्ति । तो देह धारण न करी कल्पान्तीं ।
त्यासि जाणणें यांतचि उन्नति । मानवाची ॥४८॥
ऐसीं भिन्न
लोकांचीं भिन्न मतें । सत्य सर्वांतचि उणेंपुरें तें ।
परि संगति कैसी
लावावी यातें । विसरोनि गेले ॥४९॥
जे जे पुरुष थोर
झाले । त्यांसि अवतारचि संबोधिलें ।
ज्यांचें ज्यांना
चारित्र्य पटलें । त्यांनी मानलें त्यांलागी ॥५०॥
जुने ते सोनें
विशेष ठरले । येथे कोणाचेंचि नाही चुकलें ।
परि ज्यांनी सत्य
अनुभवलें । तेचि पावले देव-पदा ॥५१॥
कोणी म्हणती
देवता अयोनिसंभव । अवतार करी चमत्कारचि सर्व ।
हें म्हणणें आहे अर्थगौरव । भाविकपणाचा ॥५२॥
गर्भ, नर्क, वैकुंठपुरी । यांचें महत्त्व
काय देवाअंतरीं ?
हें पाहोनि भांति-मोह धरी । तरि तो देव कैसेनि ? ॥५३॥
देवास वैकुंठ
गर्भ सारिखे । येणें-जाणें स्वाभाविकें ।
सुखदु:खें एकाचि कौतुकें । राहती तयापुढे ॥५४॥
योनीद्वारें जरी
प्रकटला । तरी दु:ख न वाटे त्याच्या हृदयाला ।
म्हणोनीच तो
अयोनिसंभव मानिला । ज्ञानियांनी ॥५५॥
एरव्ही जन्ममरण
सकला सारिखें । सहनशक्ति अधिकारभेद राखे ।
जैसें जयाचें स्थानमान देखे । तैसें निकें नाम
तया ॥५६॥
सर्व अवतार
मानवीच असती । परि अधिकाराऐसें कार्य करिती ।
त्यांची धारणा जीवन्मुक्ति । तैसीच असते सर्वदा
॥५७॥
अनेक जन्मांची संस्कार-संगति
। घेवोनि येताति सांगातीं ।
उध्दराया जड
जीवांप्रति । मार्ग दाविती अवतार ॥५८॥
परि मानवीच कार्य
करणें । मानवी मार्गानेचि येणें-जाणें ।
मानवांच्या
भूषणापरी मिरविणें । अवताराचें ॥५९॥
मानवें सर्व
प्राणिमात्रा सुखवावें । सर्व कार्य सुरळीत चालवावें ।
एक असोनि अनंत
व्हावें । उल्हास हाचि अंतरीं ॥६०॥
हें समजोनि जो
वर्तला । तोचि अवतार शेवटीं ठरला ।
ज्याने पृथ्वीचा
संबंध जोडला । एकसूत्रीं प्रयत्नें ॥६१॥
ज्यांनी सर्व
विश्व सूत्रांत गोविलें । सन्मार्ग मानवमात्रा शिकविले ।
तेचि थोर अवतार झाले । पुढेहि होतील निश्चयें
॥६२॥
म्हणोनि अवतार हा
उन्नतिवाद । अधिकार तैसा प्रकटे विशद ।
विश्वात्मभावें स्वयंपूर्ण सिध्द । अवतार आम्ही
मानतों ॥६३॥
तोचि सर्वांसि एक
करी । एक करोनि अनेकत्वीं वावरी ।
त्यासीच पावली पूर्णता खरी । विश्वात्म्याची
॥६४॥
एवढी विशाल
ज्याची धारणा । एवढा कार्याचा व्याप जाणा ।
विश्वाचिया मतभेदांना । मिटवूं शके जो ॥६५॥
तोचि शेवटचा
अवतार । महामानव विकासकेंद्र ।
आपण तयाचे अंश अंकुर । मानवधर्मी ॥६६॥
निश्चय व्हावा
श्रोतियाजना । अवतार म्हणजे अतिमानव जाणा ।
मानवाची पूर्णता म्हणा । अवतारकार्य ॥६७॥
देवताची करावी
उपासना । उपासकासीच ये अवतारपणा ।
ऐसाचि आहे अवताराचा बाणा । आजवरीचा ॥६८॥
यांत एकचि
तारतम्य पहावें । मानवा कोणाचेनि सुख पावे ।
कोण समाजकार्य करी बरवें । जनमानस रंगवोनि ॥६९॥
तोचि समजावा
महाभला । जो जनहितार्थी लागला ।
दैवी शक्तीचा सागर भरला । अंगीं ज्याच्या ॥७०॥
अवतारासि
सामर्थ्य पाहिजे । आत्मबल प्रखर तयासि साजे ।
बोलिजे तैसेंचि कार्य कीजे । अवतार तो या जनीं
॥७१॥
ऐशा
शांति-अवतारांची कीर्ति । मानवांसि संत सांगती ।
देव-अवतार प्रकट होती । क्रांति कराया देशामाजीं
॥७२॥
शांति-अवतार
क्रांति-अवतार । या दोघांचें कार्य भिन्न सर्वत्र ।
एक करी सदबोध मात्र । एक करी निर्णय ॥७३॥
दोघांचीहि असे
जरूरी । म्हणोनि ही योजना मानिली चतुरीं ।
आपणहि व्हावें अवतारी । त्यांचिया ऐसें
निर्धारें ॥७४॥
नाहीतरि अरत्र ना
परत्र । हेंहि म्हणतां ये अवतार-वैचित्र्य ।
परंतु अवतार तो
अवतारकार्य । करावयासि ॥७५॥
मानवधर्मासि
उजळोन । दुष्कृतिनाशा सज्जनरक्षण ।
करणें हेंचि
अवतारलक्षण । सर्वमान्य सेवात्मक ॥७६॥
ज्यांनी जगाची
सेवा केली । त्यांसीच अवतार पदवी लाभली ।
त्यावांचूनि अवतार बोली । ही तों आपुल्या
भावनेची ॥७७॥
सेवेएवढें
महत्त्व नाही । ज्ञान ध्यान वैराग्यासहि ।
ह्या सर्व साधनीं सफलता ही । सेवेनेचि होतसे
॥७८॥
देव-देवता जगीं
आली । जपतपें करूं लागली ।
परि पूर्णता नाही झाली । सेवा नाही तोंवरि ॥७९॥
जेव्हा सेवाकार्य
प्रकट केलें । अनंत जीव संतुष्ट झाले ।
तेव्हाचि अवतार तयां मानिलें । भूलोकीं या ॥८०॥
रामचंद्रें राज्य
त्यागिलें । रावणा संहारूनि सज्जन रक्षिले ।
म्हणोनीच अवतार ठरले । सर्वतोमुखीं ॥८१॥
श्रीकृष्णें कंस
मर्दिला । दुर्योधनाचा नाश घडविला ।
सुख देवोनि गोरगरीबांला । मगचि ठरला अवतार तो
॥८२॥
ऐसें सेवाकार्य
केलें ज्याने । त्यासीच जन अवतार म्हणे ।
त्या कार्यलीला आठवती जीवेंप्राणें । सर्वतोपरी
॥८३॥
आठवती तेहि अवतार
होती । तैसी करितां सेवाकृति ।
परि कोरडी सहानुभूति । ही तों नव्हें उध्दारक
॥८४॥
ज्यांनी
सेवाकार्यासि जीवन दिलें । स्वानंदीं बुडोनि जगा तारिलें ।
तेचि संत आणि
अवतार झाले । कर्तव्यशील मानव ॥८५॥
साधुसंतें सेवा
केली । अनंत हृदयें संतोषविलीं ।
व्यवहार-उपासनेने
दाविली । सिडी मोक्षमार्गाची ॥८६॥
साधुसंतें सेवा
केली । जीवासि ब्रह्मप्राप्तीची ओळख दिली ।
तैसी सेवा पाहिजे घडली । आपणांसीहि ॥८७॥
एक संत जन्मास
आला । त्याने प्रांताचा प्रांत कीर्तीने व्यापला ।
परि काम जनसुधारणेला । अपुरा पडला व्याप त्याचा ? ॥८८॥
याचें कारण आम्ही
लोक । संदेश ऐकतांना डोळेझांक ।
नमस्कार करायाचें
कौतुक । आमुच्यापाशी ॥८९॥
लोक करिती
त्यांचा उत्सव । गाती मनोभावें गौरव ।
परन्तु तैसा
सेवाभाव । अंगीं न आणिती आपुल्या ॥९०॥
देव घेतील अवतार
। म्हणोनि वाट पाहती उतराया भार ।
हा दुबळेपणाचा
विचार । शिरला थोर या लोकीं ॥९१॥
अरे ! हें सर्व
आता विसरावें । संतीं सांगितलें तेंचि करावें ।
मानवाने मानवां सुधारावें । याहूनि पुण्य कोणतें ? ॥९२॥
हें पवित्र
अवतारकार्य । आपणचि होऊनिया निर्भय ।
कां न करावें
टाकोनि पाय ? लाभेल जय निश्चयाने ॥९३॥
कोणी रोगराईने
मरे । त्यास कोण पुसतो सांगा बरें ?
परि सेवा करितां प्राण अंतरे । लोक श्रध्दाभरें कीर्ति गाती ॥९४॥
म्हणोनि बोललों
सेवक बना । ओळखा मानव म्हणोनि आपणा ।
घेवोनि
अवतार-तत्त्वाचय खुणा । उजळा भुवना कीर्तीने ॥९५॥
नका अज्ञानामाजी
दडूं । नका बायकापोरांसाठी रडूं ।
नका स्वार्थासाठी अडूं । निघा मानवसेवा साधाया
॥९६॥
जो आपुल्या
स्वार्थासि मुकला । विश्वस्वार्थ मानितो आपुला ।
तोचि अवतारकार्यी लागला । मानतों आम्ही ॥९७॥
यासाठी करा आपुली
उन्नति । सेवा देवोनि गांवाप्रति ।
गांवापासोनि विश्वाप्रति । पोहचोनि जावें ॥९८॥
आपली समज वाढवावी
। पैस तेवढीं कामें करावीं ।
म्हणजे लाभेल अवतारपदवी । क्रमाने आपणा ॥९९॥
सेवेंतचि आहे
देवभक्ति । कार्य करण्यांतचि राष्ट्रशक्ति ।
यानेच मिळे
शेवटीं मुक्ति । अवतारदीप्ति अंगीं येई ॥१००॥
कोणालाहि न
वाटावें अवघड । कैसें अवतारकार्य प्रचंड ।
पावतां नये ऐसें उदंड । नाहीच कांही ग्रामजनहो !
॥१०१॥
तैसें भयचि
वगळावें । म्हणोनि बोलिलों साध्या भावें ।
तुकडया म्हणे समजोनि घ्यावें । तारतम्याने मर्म
याचें ॥१०२॥
इतिश्री
ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत ।
कथिला अवतारकार्याचा पथ । तेहतिसावा अध्याय
संपूर्ण ॥१०३॥
अध्याय ३३वाऑडीओ स्वरुपात --
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा