.

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

हे गुरूदेव ! हम सबको सदबुध्दी दे ,सतकर्तव्य करनेकी प्रवृत्ति दे ,सच बोलनका अभ्यास दे ,सतस्वरूप का ग्यान दे । हे जगदव्यापी परमेश्वर ! हम हर मनुष्य मात्र से प्रेमका,सत्यताका,बंधुत्व- -भावका आचरण करे और सुख दुखःमे सम रहे,ऐसी हमको शक्ती दे,युक्ती दे और भक्ती दे । हे सर्वधर्ममें,सर्व संतमे,समस्त संसार में,रममाण होनेवाले चैतन्यघन!हम तेरे लिए,तेरे देश के लिए,हर जीव जंतु के लिए,कुटीलताका,अनैत्तिकताका,छलछिद्र द्रोहताका त्याग करे ऐसा साहस दे । हे भगवान! अंतमे तुझमें समरस हो जाये यह हमारा ध्येय हैं,उद्देश है । इसके लिये तुझको स्मरके निश्चय करते है, प्रतिज्ञा करते है । हे विश्व धर्मको नियमन करनेवाले परमात्मा !जहाँभी,जिधरभी,हममें कुछ कमी दिखती हो,उसमे हमारा ध्यान लगाकर,उस चिज को,उस कार्यको,पुरा करने में हम अपना स्वराज्य समझते है , सूराज्य समझते है ।यह समझने की और कर्तव्य करनेकी हमको प्रियता दे,शक्ती दे ,वरदान दे

सोमवार, ५ जून, २०१७

अध्याय १४ वा ग्राम आरोग्य


अध्याय १४ वा 


(
श्री चक्रधर स्वामीबद्दल अधिक माहितीसाठी क्लिक करा .)

ग्राम आरोग्य

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥



एक श्रोता महाभाविक । म्हणे गांवहि केलें ठीक ।

तरी देवाने मारली मेख । ती निघूं शकेना ॥१॥



प्रत्यक्ष शहर जरी झालें । तरी देवापुढे ताब न चाले ।

 तेथे खेडें शहरापरी केलें । तरी काय होतें ? ॥२॥

 

देवीदेवतांचा कोप झाला । कॉलरापटकीचा झटका आला ।

म्हणजे सुधारूंच न शके कोणाला । बाप वैद्याचा ॥३॥



म्हणोनि देवता राहती प्रसन्न । ऐसें करावें पूजन ।

 गांव असो की शहर संपन्न । सुखी त्याविण न राहे ॥४॥



मित्रा ! ऐक याचें उत्तर । देवदेवता किंवा परमेश्वर

। हे कृपेचेचि अवतार । कोपचि नाही त्याठायीं ॥५॥




कोप करिती ते दुष्टावरि । त्यांतहि उध्दार भावचि अंतरीं ।

 तेथे निरपराध्यांस छळती जरि । तरि त्या देव न म्हणावें ॥६॥



सर्व लोक लेकरें त्याचीं । छळणा कां करील कोणाची ?

कृति आपुलीच आपणा जाची । शत्रु आपणचि आपुले ॥७॥



चहूबाजूंनी केली घाण । त्यांत जंतु झाले निर्माण ।

 त्यांतूनि रोगांच्या सांथी भिन्न भिन्न । वाढ घेती ॥८॥



नाही नेमाचा आचार । शुध्द नाही आहारविहार ।

अशुध्द हवापाणी, संहार । करिती जनांचा ॥९॥



कांही केव्हा कुठेहि खाणें । कधी झोपणें कधी जागणें ।

सप्तहि धातु कोपती याने । रोगरूपाने फळा येती ॥१०॥



हाटेलीं खाणें मसणा जाणें । ऐसें बोलती शहाणे ।

 त्यावरि नाना तिखट व्यसनें । आग्यावेताळासारिखीं ॥११॥



कशास कांही नियम नुरला । कोण रोगी कोठे थुंकला ।

कोठे जेवला संसर्गी आला । गोंधळ झाला सर्वत्र ॥१२॥



त्याने रोगप्रचार झाला । लागट रोग वाढतचि गेला ।

 बळी घेतलें हजारो लोकांला । वाढोनि सांथ ॥१३॥



मग कोणी म्हणे कोपली देवी । कोणी मांत्रिकांसि बोलावी ।

 बाहेरभितरचें समजोनि गांवीं । काढती आरत्या अंधारीं ॥१४॥



कोणी करणी कौटाळ म्हणती । कोणी पिशाच्चास भारती ।

औषधेंहि न देतां रोगी मारती । मूर्खपणाने ॥१५



भगत मांत्रिक अरबाडी जाणते । घुमारे बघती भाविक कोणते ।

 पोटासाठी नाना मतें । फैलाविती लोकांमाजी ॥१६॥



करविती नवस सायास थोर । देवीपूजेचा जोरसोर ।

रेडे बकरे कोंबडे पामर । कापिताति अज्ञानें ॥१७



देवानेचि केले जीव । त्यास कैची मारण्याची हाव ?

मधले दलाल करिती ठेव । आपुली हौस पुरवावया ॥१८॥



संतें देवास केलें प्रसन्न । तेव्हा बळी दिले कोण ?

 चोखोबा, श्रीचक्रधर, रामकृष्ण । म्हणती प्रसन्न देव भावें ॥१९॥



देवासि पाहिजे बलिदान । तो पशु आपुला भ्रम अभिमान ।

गांवचें गेल्याविण अज्ञान । सुखी जीवन न होई ॥२०॥



गांव असो अथवा शहर । तेथील बिघडले आचारविचार ।

 म्हणोनीच रोगराईने बेजांर । जाहले सारे जन लोक ॥२१॥



गांव व्हावया निरोगी सुंदर । सुधारावें लागेल एकेक घर ।

 आणि त्याहूनहि घरांत राहणार । करावा लागेल आदर्श ॥२२॥



व्यक्ति व्हाया आदर्श सम्यक । पाहिजे दिनचर्याच सात्विक ।

सारें जीवन निरोगी सुरेख । तरीच होईल गांवाचें ॥२३॥



नियमीं बांधला एकेक दिन । त्यानेच सुधरे जीवन संपूर्ण ।

 गांवहि होय आरोग्यसंपन्न । सारे प्रसन्न देवीदेव ॥२४॥



नियमांचा मुख्य आधार । मजबूत पाहिजे निर्धार ।

 त्यावरीच उत्कर्षाची मदार । ऐहिक आणि आध्यात्मिक ॥२५॥



नाहीतरि मानवाने नियम केले । सर्व जीवन सुरळीत चाले ।

परि एकदा दुर्लक्ष झाले । की चुकतचि जातें ॥२६॥



एकदा रात्रभरि जागला । मग सकाळीं उठणेंच कशाला ?

आळसांत सर्व दिवस गेला । नियम मोडोनि ॥२७॥



त्यास धाक नाही काळजी नाही । घरचे लोक बोललेच नाही ।

हा उठला दुसरे दिवशींहि । दहा वाजतां दिवसाचे ॥२८॥



कांही दिवस अलक्ष झालें । उशीरां उठणें अंगवळणीं पडलें ।

 मग बदलेना, कांही केले । उपचार जरी ॥२९॥



ऐसें कासया घडूं द्यावें । रोज सकाळींच उठावें ।

न उठतां घरच्यांनी जागवावें । झोपणारासि निश्चयें ॥३०॥



कांही म्हणती उशीरां उठणें । हें तों भाग्यवंताचें लक्षणें ।

त्यास काय आहे उणें । पोट भराया धनवंता ? ॥३१॥



ऐसें समजोनि आळशी केला । अरे ! हा भाग्यवान कसला ?

निजण्यावरि भाग्यवान ठरला । तरि बीमार महाभागी कां नव्हे ? ॥३२॥



तो तर निजलाचि राहतो । झोपूनचि खातों-पितों ॥

काय अधिक भाग्यवान म्हणवितो ? सांगा सांगा ॥३३॥



भाग्यवंताची उलटी व्याख्या । करणें शोभतें का शहाण्यासारख्या ।

 अरे ! सकाळीं उठणारासचि सख्या । भाग्यवंत म्हणावें ॥३४॥



श्रमांतूनचि उपजे भाग्यसंपत्ति । निजणारे तिची हानि करिती ।

इतरां श्रम अधिक पडती । उत्साह घटे आपलाहि ॥३५॥



झोपी गेला घरचा धनी । सुर्य चालला डोक्यावरोनि ।

उन्ह पडले तरी निजूनि । कड फेरितो झोपेचा ॥३६॥



नोकरचाकर आळस करिती । म्हणती घरधनीच झोपती ।

 मग आपणचि कैशा रीतीं । काम करावें जावोनि ? ॥३७॥



ऐसा सारा अंधार पडे । वाजती श्वानांचे चौघडे ।

 मूलबाळ रडेओरडे । झोप काढिती आयाबाया ॥३८॥



घरदार कोठूनि पवित्र ? जागल्यावरीहि आळसलें गात्र ।

 अव्यवस्था माजे सर्वत्र । बध्दकोष्ठता वाढ घे ॥३९॥



यांतूनचि वाढती सर्व रोग । वैद्य डॉक्टरांचा लागला भोग ।

तिकडे बिघडत गेले उद्योग । शिरलें दुर्भाग्य त्या घरीं ॥४०॥



प्रात:काळची आरोग्यदायी हवा । सदासर्वदा मानवते जीवा ।

प्रसन्नता देई ऋतु तेधवा । सर्व प्राणीमात्रासि ॥४१॥



सर्व वनेंरानें जागीं होतीं । पुष्पें सारी विकास पावतीं ।

 पशुपक्षीहि नेहमी उठती । प्रात:काळीं ॥४२॥



पहाटे दोहतां गाय-म्हैस । त्यांत अधिकचि सार-अंश ।

 पहाटवारा चढवी रक्तास । लाली रोगप्रतिकारक ॥४३॥



म्हणोनि प्रात:काळीं उठावें । ब्राह्ममुहूर्ता डोळयांनी बघावें ।

 उठतांच प्रात:स्मरण करावें । आसनस्थानीं ॥४४॥



प्रात:स्मरण म्हणजे नवीन स्फूर्ति । उगवल्या दिवशीं व्हाया प्रगति ।

 उत्तम कार्य घडावें पूर्ण गतीं । म्हणोनि प्रार्थना देवाची ॥४५॥



त्यावेळीं जो संकल्प करतो । वाईट न घडो ऐसें चिंतितो ।

तो सुसंस्कारें वाढत जातो । उन्नतिमार्गे वेगाने ॥४६॥



म्हणोनि प्रात:स्मरण करावें । नैसर्गिक उत्साहभरें भरावें ।

 मग प्रातर्विधी आटोपावे । नित्यनेम हा अमोलिक ॥४७॥



पहाटेस शौचमुखमार्जन । त्याने वायुदोषांचें होय शमन ।

 शरीरीं नवा जोम निर्माण । होय निर्मळपण लाभोनि ॥४८॥



सकाळीं करावें उष:पान । त्याने अंतरींद्रियांचें शांतवन ।

नंतर करावें शीतजलस्नान । अति प्रसन्न चित्त राहे ॥४९॥



शीतजलस्नानाचें महिमान थोर । तेणें त्वचाशक्ति जागे सुंदर ।

शरीर राहे सदा तरतर । उत्साहाने ॥५०॥



मेंदूचा भाग थंड राहिला । तरीच बुध्दीचा उत्कर्ष झाला ।

ऐसा थोरांना अनुभव आला । कितीतरी ॥५१॥



उष्ण पाण्याने स्नान करणें । म्हणजे बीमारचि तो समजणें ।

 ऐसी संवय नेहमी लावणें । हानिकारक देहासि ॥५२॥



स्नानोत्तर अरुणोदयापूर्वी । सामुदायिक ध्यान-उपासना करावी ।

 प्रार्थनामंदिर अथवा पडवी । ध्यानास्तव पहावी निर्मळ ॥५३॥



अरुणोदयाची सुवर्णप्रभा । दिसे लावण्याची शोभा ।

 निसर्ग वाढवी शांति प्रतिभा । अलभ्यलाभा पावती योगी ॥५४॥



जन म्हणती योग्यांनी ध्यान करावें । आपण कासया उठावें स्मरावें ?

 हें म्हणणें कदापि नोहे बरवें । कोणाचेंहि ॥५५॥



योगी आपली समाधि घरी । साधक सन्मार्गाचा योग करी ।

जीवन-उज्ज्वलतेचा योग संसारीं । प्रात:काळीं साधतसे ॥५६॥



ध्यानापरीच सहल प्रात:काळची । जरूर करावी संवय रोजचि ।

 त्याने देह मन राहे निर्मल शुचि । प्राणवायुस्पर्शाने ॥५७॥



कोणी धावती कोणी चालती । कोणी आसनें सूर्यनमस्कार घालती ।

 कोणी गाती चिंतन करिती । हें दृश्य दिसो प्रभातीं ॥५८॥



कांही पठण-पाठण करावें । शरीरमनासि वळण लावावें ।

आयुष्य सुंदर होतें आघवें । ऐशा क्रमें ॥५९॥



घरीं असो वा आश्रमी । प्रवासीं असो वा तीर्थधामीं ।

 प्रात:काळीं नित्यनियमीं । अभ्यासक्रम उरकवावा ॥६०॥



घरा-आश्रमाची करावी सफाई । स्वच्छता मार्गी ठायीं ठायीं ।

गायीम्हशींचे गोठे सर्वहि । आरशासारखे करावे ॥६१॥



गडीमाणसांनी सहाय्य द्यावें । परि प्रत्येकाने काम करावें ।

आईबाई मिळोनि उरकवावे । कामधंदे चटचट ॥६२॥



कोणीहि बघे अरुणोदयीं । सडासंमार्जन रांगोळी रई ।

आंतबाहेर गलिच्छता नाही । कामें झालीं सकळांचीं ॥६३॥



ऐसें ज्या गांवीं झालें । समजावें लक्ष्मीचें मन मोहिलें ।

 आरोग्याचें राज्य आलें । तया गांवीं ॥६४॥



तेथे उदंड आयुष्य वाढतें । जेथे प्रात:काळीं स्वच्छता होते ।

कोणीहि न दिसे झोपला जेथे । प्राणीमात्र ॥६५॥



म्हणोनि ऐसे नियम करावे । चुकलियाहि चुकों न द्यावे ।

पुन:पुन्हा सावरावें । वर्तन आपुलें ॥६६॥



ऐसा अभ्यास जडल्यावरी । आरोग्य भाग्य नांदे संसारीं ।

औषधांची गरजचि नुरे शरीरीं । वाढे अभ्यंतरीं नवें तेज ॥६७॥



पूर्वी प्रात:काळीं माध्यान्हा । आणि सायंकाळीं जाणा ।

होती त्रिकाळ संध्याप्रार्थना । संस्कारास्तव लाविली ॥६८॥

 

 

तें सर्वकाळचि उचित । म्हणोनि प्रातर्ध्यान नियमित ।

 आणि सायंप्रार्थनाहि नेमस्त । करीत जावी सर्वांनी ॥६९॥

 

निद्रेचिया आदिअंतीं । दिवस-रात्रीच्या संधीप्रति ।

 आणि भोजनसमयीं संकल्प होती । ते बनती दृढ संस्कार ॥७०॥

 



जनींभोजनीं हरि आळवणें । गीतापाठादि उच्चारणें ।

 सात्विक भाव हृदयीं भरणें । शुध्द करी जीवनासि ॥७१॥



श्रोतयांनी प्रश्न केला । भोजनीं आळवावें भगवंताला ।

याचें फळ सांगा आम्हांला । काय कैसे ? ॥७२॥



भोजन म्हणजे आहार घेणें । तेथे कशाला देवाचें गाणें ?

 हास्यविनोद कां न करणें । उल्हासास्तव ? ॥७३॥



ऐका याचेंहि उत्तर । भोजन म्हणजे पिंडसंस्कार ।

यज्ञहि यासि म्हणती थोर । वैश्वानर अग्निमाजी ॥७४॥



भोजनाचे वेळीं प्रसन्न । केलिया विचार शुभचिंतन ।

 तैसेचि भिनती निर्मळ गुण । अन्नासवें ॥७५॥



पवित्र धूप सुगंध सात्विक । तेणें वातावरण रोगनाशक ।

रांगोळया आदि प्रसन्नकारक । स्वच्छ असावी जागा तरी ॥७६॥



स्वच्छतेविणा जें भोजन । समजावें तें मलीनपण ।

अग्नि वाढाया हातपाय धुवोन । पुसोनि भोजन करावें ॥७७॥



कांही करावें भोजनापूर्वी काम । जेणें मिळे सकळांसि आराम ।

कार्य होतसे सुगम । सर्व जनां मिळोनि ॥७८॥



कोणी आसने, पाट टाकावे । कोणी वाढावे, पाणी ठेवावें ।

 कोणी उदबत्ती, धूप लावावे । सुगंधासाठी ॥७९॥



प्रथम बसोनि पाठ म्हणावा । गंभीर सुरें रंग भरावा ।

वाढणें संपता शांतिमंत्र गावा । गांभीर्याने ॥८०॥



मग करावें ब्रह्मार्पण । आदराने करावें अन्नसेवन ।

 भोजनींहि श्लोक, मधुरवचन । उल्हासाने बोलावें ॥८१॥



भोजनापूर्वी आचमन । त्याचा उद्देश अग्निदीपन ।

चित्राहूति जलआवर्तन । समर्पण हाचि भाव त्याचा ॥८२॥



ईश्वरें उपजविलें अन्न । तें अन्न ईश्वरी कृपादान ।

ज्यावरि सर्वांचें असे जीवन । त्याचें ऋण आठवावें ॥८३॥



त्याचीं लेकरें जीवजन । त्यांना आधी लाभावें अन्न ।

यासाठी विश्वदेवाचें संतर्पण । यज्ञमय भोजन या भावें ॥८४॥



भोजन म्हणजे भूमातेचा प्रसाद । समजोनि सुखें घ्यावा आस्वाद ।

ज्यांत शेतकर्‍यांचे कष्ट विशद । तें अन्न सेवावें सेवेस्तव ॥८५॥



ऐशा सदभावें आदरें सेवावें । उत्तम श्लोक भोजनीं गावे ।

वेडेंवाकुडें न बोलावें । क्रोधा न यावें भोजनसमयीं ॥८६॥



हास्यविनोद जरी असला । तरी अश्लीलता न यावी प्रसंगाला ।

 उच्छिष्ट कण न पाहिजे टाकला । भोजनप्रसंगीं ॥८७॥



राजस तामस सात्विक । भोजनाचे प्रकार अनेक ।

 त्यांत आपली शक्ति पाहूनि सम्यक । पचेल तैसें करावें ॥८८॥



कोणी सज्जन म्हणती भले । पचनासाठी सर्वचि खाद्य निर्मिलें ।

परंतु पचनाचें तारतम्य पाहिलें । पाहिजे जुळवोनि ॥८९॥



कोणी खाद्य रोग करी । कोणी खाद्य भोग भरी ।

कोणी खाद्य वाईट संस्कारी । करितें प्राण्या ॥९०॥



कांही जीव चुनखडीहि खाती । कांही मांसकिडे भक्षिती ।

 परंतु त्यांची स्वभाव-प्रकृति । त्याचि परी राहे ॥९१॥



मानवाने काय खावें । म्हणजे मानवपणेंचि शोभावें ।

हेंचि येथे पाहावें । लागतें  सज्जनांसि ॥९२॥



शुध्द सात्विक अन्न घेतलें । त्याने सात्विक विचार प्रवर्तले ।

तामस राजस खाद्य सेविलें । तैसें झालें आचरण ॥९३॥



मद्यमांसाहार करिती कोणी । विकारबुध्दि वाढे मनमानी ।

भलतेचि रोग जाती लागोनि । सांसर्गिक आदि ॥९४॥



हें तों निश्चितचि आहे । खाद्यें रसरक्त उत्पन्न होय ।

रक्तापासूनि मांस मेद वीर्य । नि:संशय होती शरीरीं ॥९५॥

 

जैसे ज्याचे रक्तरसगुण । तैसे विचार होती स्फुरण ।

क्रूर-शूर मंद-बुध्दिमान । रक्तमिश्रणें दिसताति ॥९६॥



कांही आनुवंशिक गुण येती । रक्तरेताचिया मिश्रस्थितीं ।

कांही खाण्यापिण्याचेहि होती । संस्कार अंगीं ॥९७॥



कांही संगतीने वळण लागे । भूमिपात्रें कांही परिणाम जागे

कांही प्रयत्नशीलतेचे धागे । वळविती जीवा ॥९८॥



हें सर्व जरी खरें असलें । तरी मुख्य अंग खाद्यपेयचि झालें ।

कारण त्यानेच बनलें-घटलें । रक्तमांस जीवांचें ॥९९॥



उत्तम रक्ताचें असावें शरीर । तरि अन्नहि उत्तमचि खावें सुंदर ।

बाष्कळ खातां मेंदू-इंद्रियांवर । बाष्कळताचि येईल ॥१००॥



मग विषय-वासना नावरे । लागेल बहिरंगाचें वारें ।

झगडती जैसीं जनावरें । तैसे अनावर मानवहि ॥१०१॥



ज्यासि क्रूरकर्मचि करणें आहे । त्याने तेंचि खावें नि:संशय ।

तैसेचि भोगावेत अपाय । झालिया अंगीं ॥१०२॥

 

ज्यासि मनुष्यपण लाभावें । ऐसें वाटे जीवेंभावें ।

त्याने सात्विक अन्नचि सेवावें । सर्वतोपरीं ॥१०३॥



एकाने ऐसा प्रश्न केला । सात्विक अन्न कुठलें गरीबाला ?

 त्याने काय करावें बोला । जीवनासाठी ? ॥१०४॥



मित्रहो ! सात्विक अन्नचि सहज मिळतें । जें श्रमाने शेतींत पिकतें ।

भाजीभाकरी भातपोळी लाभते । अल्प प्रयासें ॥१०५॥



सूर्यकिरणांनी तयार झालीं । कंद भाज्याफळें बागेंत पिकलीं ।

सत्वांशयुक्त सर्व तीं भलीं । आरोग्यदायी ॥१०६॥



साधें सहज ताजें पावन । तेंचि असे सात्विक अन्न ।

नाना विकृतींचें मिष्टान्न । तें सात्विक नव्हे ॥१०७॥



कांहींना होते उदर-कुंदी । चाले अपानांतून दुर्गधी ।

 लोक हसती खाणेंपिणें स्वच्छंदी । कां करतो म्हणोनिया ॥११८॥



प्रकृतीच्या विरुध्द आहार । नाही काळवेळाचा सुमार ।

 आंबट तेलकट आदि विषम मिश्र । ऐसा आहार विषारी ॥११९

 

 

कांही लोक ऐसेंचि खाती । प्रकृति बिघडलिया औषध घेती ।

गरीबास कुठली इतकी संपत्ति ? वैद्य होती घरोघरीं ॥१२०॥

 



डॉक्टर म्हणती पथ्यचि नाही । तेणें रोगाचें मूळ तैसेंचि राही ।

 रोगी पाहती तेंच नित्यहि । मृत्यूची घाई झाल्यापरी ॥१२१॥

 



पहिलें खावोनि मस्त व्हावें । मग औषधि घेवोनि पचवावें ।

ऐसे उपद्रव कासयासि करावे । उन्मत्तपणें ? ॥१२२॥



उगीच आहे ऐसें खाणें । पचविण्यासाठी चूर्ण घेणें ।

 अन्नरसाची नासाडी करणें । कशासाठी ? ॥१२३॥



आंत वाढत जातां विकृति । धन्वंतरीहि काय करिती ?

 नष्ट करोनि औषधें, संपत्ति । मुखी माती पडतसे ॥१२४॥



परंतु लोक आग्रहीं पडती । हितचिंतक म्हणवोनि खाया देती ।

ते समजावे घातक श्रोतीं । ठेवावी निश्चिती आहाराची ॥१२५॥



नियमित सात्विक अन्नचि खावें । साधें ताजें, भाजीपाले बरवे ।

 दूधदही आपुल्यापरी सेवावें । भोजना करावें औषधचि ॥१२६॥



सर्व भोजनीं उत्तम भोजन । ज्यांत गोघृतदुग्धतक्रपान ।

 समजावें अमृताचें सेवन । शरीरासाठी ॥१२७॥



गोदूध नित्य सेवन करितां । कायाकल्पदि होय तत्त्वता ।

 शक्ति चपलता बुध्दिमत्ता । आरोग्य हातां नित्य राही ॥१२८॥ .

 

निरोगी आयुष्य लाभेल बहुत । अल्पमृत्यु अथवा रोगांची सांथ ।

 हे पाऊल न ठेवितील गांवात । तुकडया म्हणे ॥१२९॥



इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत ।

 व्यक्ति-आचारें ग्रामारोग्य वर्णित । चौदावा अध्याय संपूर्ण ॥१३०॥



॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥

*


 अध्याय  १४   वा  ऑडीओ स्वरुपात --



।।जय गुरुदेव।।