अध्याय ११ वा
ग्रामरक्षण
ईश्वरसेवाचि गांव-सेवा । तो
सर्वांच्याचि सुखाचा ठेवा ।
परि कांही असुरहि असती गांवां ।
यज्ञभंग करावया ॥१॥
एका सज्जनें प्रश्न केला । गांवीं बाग
फुलूं लागला ।
परि दुष्ट लाविती आग त्याला । काय उपाय
नित्यासाठीं ? ॥२॥
आम्हीं केली संघटना । निवडोनि आणिलें
सज्जना ।
परंतु दुर्जनापुढे बनेना । कांही केलें तरीहि
॥३॥
त्यांना दावा आदर्श जीवन । अथवा
प्रचारें द्या पटवून ।
किंवा सेवा रात्रंदिन । करा त्यांची
हवी ती ॥४॥
परंतु ते न जुमानिती । उपदेश देतां
उलटे चिडती ।
कार्यकर्त्यांसि हाणूनि पाडिती ।
पदोपदीं अडवोनिया ॥५॥
चांगल्यातूनहि काढिती वाईट । हवा
फैलाविती रोगट ।
सज्जनांवरि आणिती संकट । कारस्थानें
करोनि ॥६॥
कमलकसाई बोलभांड । मुडदेफरास गांवगुंड
।
कज्जेदलाल धनाढय धेंड । हातीं तयांच्या ॥७॥
सत्तेचाहि पाठिंबा सतत । घेवोनि आणिती
पेचांत ।
बसली लोकांना त्यांची दहशत । सांगा
काय करावें ? ॥८॥
मित्रा ! जो जो जेयीचा रोग । तेथेचि
त्याची औषधि सांग ।
योजकचि पाहिजे कराया उपयोग । कुशलपणाने ॥९॥
सत्य पडताहे कमजोर । म्हणोनीच असत्य
होई शिरजोर ।
यास्तव सत्यासि करावें कठोर । सामर्थ्यशाली
सेवेसाठी ॥१०॥
सत्याचें बळ वाढेल कैसें । तेंहि
सांगतों ऐका शांतसे ।
सज्जनांनी न बसावें आळसें । अथवा हताश
होवोनि ॥११॥
लोकांचिया मनीं जरी दहशत । तरी
तुमच्यासारिखेचि कांही त्यांत ।
असतील हृदयीं तळमळत । चांगलें व्हावें
म्हणोनि ॥१२॥
ऐसी ज्यांना ज्यांना आवडे सेवा । जे
सत्याचा जपती ठेवा ।
त्या लोकांचा करोनि मेळावा । सक्रिय
संघटन वाढवावें ॥१३॥
जनतंत्राचा हा काळ । शक्ति
लोकांअंगींच सकळ ।
जनतेच्या निश्चयाचें बळ । साम्राज्यासहि नमवूं
शके ॥१४॥
हत्तीस आवरी गवती दोर । मुंग्याहि
सर्पासि करिती जर्जर ।
व्याघ्रसिंहासि फाडिती हुशार । रानकुत्रें
संघटोनि ॥१५॥
संघटनेने काय नोहे ? । बिंदू मिळतां सिंधुपणा ये ।
गांवचा बाग बहरोनि जाय । फुलाफळांनी संघटनेच्या
॥१६॥
ग्रामसुधारणेचा मूलमंत्र । सज्जनांनी
व्हावें एकत्र ।
संघटना हेंचि शक्तीचें सूत्र ।
ग्रामराज्य निर्माण करी ॥१७॥
गांव करी तें राव न करी । ऐसें
सांगोनि ठेविलें चतुरीं ।
जरी दाद न घेतील अधिकारी । तरी गांव तय सुधारूं
शके ॥१८॥
यासाठीच पाहिजे सशक्त संघटन । जें करी
अन्याय-निर्मूलन ।
देवोनिया न्यायदान । करी रक्षण
गांवाचें ॥१९॥
संघटन गांवीं मजबूत असावें । आपापलें
दु:ख त्यासि सांगावे ।
कोणावरि अन्याय होऊं न द्यावे । कार्य
संघटनेचें ॥२०॥
त्यासाठी मिळोनि लोक नेमावे । जे असतील
इमानी बरवे ।
त्यागी निर्भय, चरित्र असावें । उज्जल ज्यांचें ॥२१॥
गांवाचे जे पवित्र सेवक । तेचि
प्रसंगी होती सैनिक ।
ज्या गांवी ऐसे सावध पाईक । तेथ विघ्न
न ठाके ॥२२॥
कांही अपराध घडतां गांवांत । त्वरित
कळवावी खबरमात ।
सर्वांनी भाग घेवोनि त्यांत । ठीक करावें बिघडेल
तें ॥२३॥
गांवचा प्रत्येक सज्ञान । यांचें
असावें सहकार्य पूर्ण ।
हांक देतां सर्वजण । जमोनि यावेत एकत्र
॥२४॥
एकाने कोणी गुन्हा केला । शहाणपण
सांगावें सकळांनी त्याला ।
गुन्हेगार ऐकेनासा झाला । शिक्षा द्यावी गांवाने
॥२५॥
जेथे समजदार प्रलोभनीं पडला । सोंग
करोनि घोरूं लागला ।
चिमटे घेवोनीच त्याला । उठविलें पाहिजे ॥२६॥
कोळसा साबूने धुवा उगाळा । परि तो
शेवटवरि काळा ।
अग्निसंस्कारी जळतां उजाळा । येई
त्यालागी ॥२७॥
म्हणोनि बहिष्कार असहकार । करोनि
त्याचे तोडावे आधार ।
नाक दाबतां तोंड सत्वर । उघडों लागे
॥२८॥
ऐसी सर्वांनी पाठ पुरवावी । जो कोणी
गांवास बिघडवी ।
ऐकेनासा होतां सत्ताप्रभावीं । मुक्त
करावा गांवांतूनि ॥२९॥
उत्तमांचाचि संग्रह बरवा । वाईटाचा
निषेध करावा ।
जराहि पनपूं न द्यावा । वृक्ष वाईटाचा
॥३०॥
सर्वांनी झटावें यासाठी । करावी लागेल
ती आटाआटी ।
प्राण गेला तरी संकष्टीं । सहन करावें
सेवेस्तव ॥३१॥
ऐसी असावी गांवाची तयारी । तरीच गांव
बनेल स्वर्गपुरी ।
नलगे सत्ताधीशांची तुतारी । पाठीमागे
॥३२॥
ऐसा होतां आचार-विचार । गांव होईल
न्यायभांडार ।
जागृत असतां सज्जन चतुर । सेवेसाठी
॥३३॥
ऐसें जें जें गांव वागलें । त्या
गांवाचें भाग्य उघडलें ।
नाहीतरि टक्केटोणपे आले । नशिबीं त्याच्या ॥३४॥
हें ऐकोनि एक बोलला । म्हणे तुम्ही
शांतीचा पुरस्कार केला ।
आणि तुम्हीच ससेमिरा लाविला । दुराचार्यांपाठीं
॥३५॥
सज्जन आणि दुर्जन । सर्वांत सारखाचि
भगवान ।
एकासि देतां दंड धावोन । तेव्हा सेवा
कुठे राहे ? ॥३६॥
दया क्षमा आणि शांति । हीच सात्विकाची
संपत्ति ।
निष्ठुरपणें दंडावें विरोधकांप्रति ।
हें सज्जनपण कशाचें ? ॥३७॥
ऐका ऐसी विचारसरणी । ऐकोनि भुलूं नये
कोणी ।
तारतम्यचि ठेवोनि मनीं । गांव
सुधारावें विचारें ॥३८॥
काय केलें म्हणजे होतो सज्जन । याचें
आहे मोजमाप जाण ।
हें प्रथमक्षणींच ओळखोन । हुशार
व्हावें गांवाने ॥३९॥
सेवा द्यावी कोणे ठायीं । हें तारतम्य
असावें हृदयीं ।
याची दृष्टि ज्यांस नाही । होतील फजीत
ते प्राणी ॥४०॥
ज्यासि करणें चोरबाजार । त्यासहि नोकर
पाहिजे इमानदार ।
त्यासि देतां सेवा सुंदर । पुण्य लाभेल कोणासि ? ॥४१॥
साधुसंतें जनसेवा केली । परि
सत्यासाठीच काया झिजविली ।
कधी आसचि नाही ठेविली ।
राजेरजवाडयांची ॥४२॥
जगीं अनंत राजे झाले । परि सर्वचि
नाही पूजिले ।
संतसज्जनचि देव मानले । हृदयमंदिरीं तयांनी ॥४३॥
म्हणोनि कोणी कोणास सेवा द्यावी ।
हेचि प्रथम दृष्टी यावी ।
मग सेवेसाठी उडी घ्यावी । हाचि धर्म
मानवाचा ॥४४॥
सदैव दया असावी चित्तीं । मनास
परोपकाराची प्रीति ।
राहूं न द्यावी उणीव कोणती । दिसतां कोठे ॥४५॥
क्षमाशांतिमय हृदय । विश्वासूपणाचें
वर्तन निर्भय ।
प्राण गेलियाहि निर्दय । न व्हावें आम्ही ॥४६॥
परि जेथे निर्दयपण हवें । तेथे
दगडापेक्षाहि कठिण व्हावें ।
हेंहि सांगणें लक्षांत घ्यावें । तारतम्याने
॥४७॥
नाहीतरि दया केली । उलट आपुल्यासचि भोवली ।
जिने गांवाची नासाडी झाली । नव्हे ती दया ॥४८॥
भिकार्यास भीक दिली । त्याने
दारू-गांजांत उडविली ।
सांगा काय दया घडली । ऐशियापरीं ? ॥४९॥
कांही चोरटे गांवीं फिरती । दिवसां
साधुवेष घेती ।
रात्रौ तेचि डाका मारिती । वेषभूषा
बदलोनि ॥५०॥
ते लोकांनी सहन करावें । साधु म्हणोनि
सोडोनि द्यावें ।
ऐसे दयेचे वेडे गोडवे । गाऊं नयेत वीरांनी ॥५१॥
दयाधर्म दानधर्म । यांचें ओळखावें
वर्म ।
वेडयापरी न करावें कर्म । पोषक आळसा
विकारा ॥५२॥
एरव्ही संसार सोडोनि बुवा झाले ।
दारोदारीं भिकेसि लागले ।
सदाचार सर्व बुडविले । ऐसे झालें याच गुणें ॥५३॥
कष्ट नाही करणें अंगीं । नाही
संग्रहाचे खरे त्यागी ।
वेष घेवोनि फिरती ढोंगी । नांव
बुडवाया संतांचें ॥५४॥
यांना दानधर्म द्यावे । तरि सर्व
पापांसि स्थान मिळावें ।
म्हणोनि तारतम्य ठेवावें । दानधर्मियाने ॥५५॥
गांवीं मागती माधुकरी । खुशाल खेळती
फिचर जुगारीं ।
दारूगांजा भांग पोरी । गुप्त राखती मठामाजी ॥५६॥
ऐशा लोकां दान द्यावें । गांव
बुडवावें, बदनाम व्हावें ।
ऐसा धर्म कोणत्या देवें । सांगितला
सांगा ? ॥५७॥
दया हें मुख्य धर्मलक्षण । परि दया
म्हणजे प्राण्यांचें पालन ।
आणि कंटकांचें निर्दालन । बोलिलें संतीं ॥५८॥
सज्जनांचें संरक्षण । आणि दुर्जनांचें
दमन ।
हेंचि अवतारांचेंहि कार्यलक्षण ।
न्यायसंगत ॥५९॥
म्हणोनि गांवीं कोणी अन्याय केला ।
दु:ख दिलें कोणा गरिबाला ।
त्याचा प्रतिकारचि पाहिजे झाला ।
गांवामाजी ॥६०॥
नाहीतरि गुंडांस फावे । सुटती जैसीं
स्वैर गाढवें ।
दुष्टासि दया करोनि सोडोनि द्यावें ।
नव्हे हा धर्म ॥६१॥
अन्याय होतां प्रतिकारचि करावा । प्रथम
अन्याय समजूनि घ्यावा ।
निश्चित कळतां आवाज द्यावा । संघटनेचा ॥६२॥
अन्याय नाना तर्हेचे असती । कांही
धनाचे मानाचे दिसती ।
कांहींनी वाढे व्यसन अनीति ।
लोकांमाजी ॥६३॥
त्या सर्वांतूनि मार्ग काढावा ।
गांवीं दुराचार होऊं न द्यावा ।
हाचि खरा धर्म ओळखावा । विचारवंताने
॥६४॥
न्यायाचा कांटेकोरपणा । भिनावा
आपुल्या हृदयीं जाणा ।
एका बाजूने दयेचा बाणा । दुसर्या
बाजूने न्यायदंड ॥६५॥
हेंचि खरें मानवाचें लेणें । उगीच आहे
सोनें मिरविणें ।
अंगीं वीरता नसतां मरणें । चोराहातीं
॥६६॥
कांहीलोक भोळे असती । आपुलें
मानव्यभूषण खोविती ।
लोक त्यांसीच सात्विक म्हणती ।
वेडयापरी ॥६७॥
ज्यास करवेना ब्रीदाचें रक्षण । नाही
अंगीं न्यायाचें भूषण ।
तो कैसा सात्विकजन । म्हणावा आम्हीं ? ॥६८॥
जो चोरांनी नागवावा । गुंड लोकांनी
फसवोनि द्यावा ।
परस्त्रियेने भोंदवावा । तो सात्विक
कैसा ? ॥६९॥
तोंडावरची न उडवी माशी । दच्के
पाहतांचि पोलिसासि ।
न कळे आपुला हक्कहि ज्यासि । सात्विक
त्यासि म्हणों नये ॥७०॥
त्यास म्हणावें दुबळा प्राणी । भित्रा
विकासहीन अज्ञानी ।
ज्यांत नाही पुरुषार्थाचें पाणी ।
रक्षणासाठी ॥७१॥
त्यास कोणीहि उचलोनि न्यावें ।
दारूगांजादिक पाजोनि द्यावें ।
त्याने भोळा म्हणोनि पिऊनि घ्यावें ।
वारे भोळा ऐसा ॥७२॥
हा तो निर्बुध्दसा पाषाण । उत्तम
वागण्याचें नाही ज्ञान ।
गंभीर शांत म्हणती जन । मुकामैंद म्हणोनिया ॥७३॥
खरा शांत तोचि नेमाने । जो न फसे
कोणाच्या फसविल्याने ।
कधीहि चकाटया पिटणें ज्याने । पाहिलें नाही ॥७४॥
परनिंदा नावडे ज्यासि । परदु:ख न
पाहवे डोळयांसि ।
धांवोनि जाय अडल्या-पडल्यासि ।
सहकार्य द्याया ॥७५॥
उगीदुगी ऐकतां कानीं । लगेच जाय
तेथोनि उठोनि ।
लोकां सांगे उगीच बोलणीं । बोलूं नयेत
॥७६॥
कोणाची लपोनि टीका न करी । बोलणें
ज्याचें तोंडावरि ।
निर्भय निर्मळ अंतरीं । स्फटिक जैसा ॥७७॥
गंदेपणा मुळीच नावडे । सुजनांचे गातो
सदा पवाडे ।
सत्संगतीसि जीव धडपडे । सदैव ज्याचा
॥७८॥
सर्वांशीं बंधुत्वाचें वागणें ।
मन-मिलाफ संपादणें ।
लोकसंग्रह कुशलतेने करणें ।
जागृतीसाठी ॥७९॥
सुखीं अहंकारें न चढावें । संकटीं
घाबरोनि न जावें ।
न्यायाने वागावें वागवावें । सर्व जना
॥८०॥
हें ज्यांनी अंगीं बाणविलें । तेचि
शांतसात्विक बोलिले ।
तयांनीच गांवाचें हित झालें । समजतों
आम्ही ॥८१॥
याऐवजीं दुबळेपण आलें । तरि गांवचि मग
विलया गेलें ।
सांभाळितां न जाय सांभाळिलें ।
कोणाकडोनि ॥८२॥
म्हणोनि पाहिजे न्यायनिष्ठुरता ।
दयेमाजींहि तारतम्यता ।
उन्नति करील तीच सेवा तत्त्वता । हरप्रकारें
॥८३॥
द्वेष न करितां दुर्जनदमन । हें
त्यांच्याहि उन्नतीसचि कारण ।
डॉक्टरें करावें अवयवच्छेदन । ती दयाचि तयाची
॥८४॥
सर्वाभूतीं परमेश्वर । त्यासि बाधक
नसे सत्यव्यवहार ।
करावें संघटनेने गांव सुंदर । ही
पूजाचि तयाची ॥८५॥
सर्वाभूतीं प्रेमभाव । वाढवावा
गुणगौरव ।
दूर सारोनि उपद्रव । गांवचे आपुल्या
॥८६॥
‘जग तरि आम्हां देव । परि हा निंदितों
स्वभाव ’ ।
म्हणोनि गुंडांसि आणिला खेव । संत तुकारामांनी
॥८७॥
’ हरिभक्त राहती
जेथे । परचक्र यावें कैसें तेथे ? ’
ऐसें म्हणोनि
लाविला पणातें । जीव त्यांनी ॥८८॥
आपुले वारकरी भाविक । तेचि वारकर्ते
पाईक ।
करोनि दुष्टांसि लाविला धाक । शिवाजीच जणुं सर्वहि
॥८९॥
तीच घेवोनि प्रेरणा । गांवी उभारावी
न्यायसेना ।
जेणें कांही नुरे धिंगाणा । गांवीं
आपुल्या ॥९०॥
दारू गांजा भांग अफीम । जुगार
वेश्यादि वाईट काम ।
यांचें उरूं न द्यावें नाम । आपुल्या
गांवीं ॥९१॥
त्यासाठी गांवच्या कांही सज्जनांनी ।
लागावें व्यसन-निर्मूंलनीं ।
उत्तम गुणांच्या अनेक श्रेणी । वाढवाव्या गांवीं
॥९२॥
गांवचे चार सज्जन मिळोनि ।
अनिष्टप्रथा बंद कराव्या त्यांनी ।
ज्याने गांवास पावे नुकसानी । न
ठेवावें तें ॥९३॥
कांही उन्मत्त शेतकरी । टोचती बैलासि
तुतारी ।
रक्त काढूनि वासना पुरी । करिती आपुली ॥९४॥
देवाचिया नांवाखाली । कांही देतात जीव
बळी ।
बंद करावी प्रथा असली । भावना सुधारोनि लोकांची
॥९५॥
कोणी घुमारे लुबाडिती । बुवा लोकांस
फसविती ।
भ्रमिष्ट मतें व्रतें शिकविती । सावध करावें
त्याठायीं ॥९६॥
परस्परांना मदत करावी । अडीअडचण ती
निभवावी ।
सर्वांकडोनि करोनि घ्यावी । योग्य
सेवा ॥९७॥
गांवसेवेंत आली अडचण । तिला द्यावें
अग्रस्थान ।
आपापली जागा-जमीनहि देऊन । सोय करावी
सर्वांची ॥९८॥
सर्वांकडोनि ऐसी सेवा नव्हे । तरि
गरजूंना सहकार्य द्यावें ।
होईल तेवढें तरी करावें । निष्कपटपणें
॥९९॥
मुलाबाळांचें असतां लग्न । सर्वांनी
जावें धावोन ।
पडोंचि न द्यावें ओझें, न्यून । आईवडिलांसि तयांच्या ॥१००॥
थोडेंथोडें सर्वांनी आणावें ।
वरवधूंना साहित्य द्यावें ।
भोजनापासोनि उरकवावें । सर्वतोपरीं
॥१०१॥
मांडवावरी पांच डहाळे । टाकावे हा
धर्म गांवकर्या कळे ।
तैसेचि निभवावे प्रसंग सगळे । सहकार्याने ॥१०२॥
जैसें जैसें सहकार्य वाढे । तैसें
गांव उन्नतीस चढे ।
न पडे विपत्तीचें कोडें । गांवीं कोणा मानवासि
॥१०३॥
ऐसी सेवा बिंबतां जीवनीं । कांहीच
गांवीं न पडे उणी ।
तरीहि असावा स्वतंत्रपणीं । सेवकांचा
विभाग ॥१०४॥
सुसज्ज असावेत गांवचे तरुण । कोणतेंहि
संकट येतां ऐकून ।
आपुलीं सर्व कामें सोडून । धांव
घ्यावी तयांनी ॥१०५॥
आग लागणें, विहिरींत पडणें । कॉलरा होणें, मूर्च्छा येणें ।
प्रत्येक प्रसंगीं धांवून जाणें । कर्तव्य
त्यांचें ॥१०६॥
ऐसी ग्रामसेवेची योजना । जागृत जेथे
ग्राम-सेना ।
तेथे स्वर्गींच्या नंदनवना । बहर येई सहजचि
॥१०७॥
ऐसें संघटनांनी गांव । भोगूं लागेल
दिव्य वैभव ।
ग्रामराज्यचि सुखाची ठेव । तुकडया
म्हणे ॥१०८॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ ।
गुरुशास्त्रस्वानुभवसंमत ।
ग्रामरक्षणाचा वर्णिला पंथ । अकरावा
अध्याय संपूर्ण ॥१०९॥
अध्याय११ वा ऑडीओ स्वरुपात -