.

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

हे गुरूदेव ! हम सबको सदबुध्दी दे ,सतकर्तव्य करनेकी प्रवृत्ति दे ,सच बोलनका अभ्यास दे ,सतस्वरूप का ग्यान दे । हे जगदव्यापी परमेश्वर ! हम हर मनुष्य मात्र से प्रेमका,सत्यताका,बंधुत्व- -भावका आचरण करे और सुख दुखःमे सम रहे,ऐसी हमको शक्ती दे,युक्ती दे और भक्ती दे । हे सर्वधर्ममें,सर्व संतमे,समस्त संसार में,रममाण होनेवाले चैतन्यघन!हम तेरे लिए,तेरे देश के लिए,हर जीव जंतु के लिए,कुटीलताका,अनैत्तिकताका,छलछिद्र द्रोहताका त्याग करे ऐसा साहस दे । हे भगवान! अंतमे तुझमें समरस हो जाये यह हमारा ध्येय हैं,उद्देश है । इसके लिये तुझको स्मरके निश्चय करते है, प्रतिज्ञा करते है । हे विश्व धर्मको नियमन करनेवाले परमात्मा !जहाँभी,जिधरभी,हममें कुछ कमी दिखती हो,उसमे हमारा ध्यान लगाकर,उस चिज को,उस कार्यको,पुरा करने में हम अपना स्वराज्य समझते है , सूराज्य समझते है ।यह समझने की और कर्तव्य करनेकी हमको प्रियता दे,शक्ती दे ,वरदान दे

सोमवार, ५ जून, २०१७

अध्याय ११ वा ग्रामरक्षण

अध्याय ११ वा 



ग्रामरक्षण

 

ईश्वरसेवाचि गांव-सेवा । तो सर्वांच्याचि सुखाचा ठेवा ।

परि कांही असुरहि असती गांवां । यज्ञभंग करावया ॥१॥

 

एका सज्जनें प्रश्न केला । गांवीं बाग फुलूं लागला ।

 परि दुष्ट लाविती आग त्याला । काय उपाय नित्यासाठीं ? ॥२॥

 

आम्हीं केली संघटना । निवडोनि आणिलें सज्जना ।

 परंतु दुर्जनापुढे बनेना । कांही केलें तरीहि ॥३॥

 

त्यांना दावा आदर्श जीवन । अथवा प्रचारें द्या पटवून ।

किंवा सेवा रात्रंदिन । करा त्यांची हवी ती ॥४॥

 

परंतु ते न जुमानिती । उपदेश देतां उलटे चिडती ।

कार्यकर्त्यांसि हाणूनि पाडिती । पदोपदीं अडवोनिया ॥५॥

 

चांगल्यातूनहि काढिती वाईट । हवा फैलाविती रोगट ।

सज्जनांवरि आणिती संकट । कारस्थानें करोनि ॥६॥

 

कमलकसाई बोलभांड । मुडदेफरास गांवगुंड ।

 कज्जेदलाल धनाढय धेंड । हातीं तयांच्या ॥७॥

 

सत्तेचाहि पाठिंबा सतत । घेवोनि आणिती पेचांत ।

बसली लोकांना त्यांची दहशत । सांगा काय करावें ? ॥८॥

 

मित्रा ! जो जो जेयीचा रोग । तेथेचि त्याची औषधि सांग ।

 योजकचि पाहिजे कराया उपयोग । कुशलपणाने ॥९॥

 

सत्य पडताहे कमजोर । म्हणोनीच असत्य होई शिरजोर ।

 यास्तव सत्यासि करावें कठोर । सामर्थ्यशाली सेवेसाठी ॥१०॥

 

सत्याचें बळ वाढेल कैसें । तेंहि सांगतों ऐका शांतसे ।

सज्जनांनी न बसावें आळसें । अथवा हताश होवोनि ॥११॥

 

लोकांचिया मनीं जरी दहशत । तरी तुमच्यासारिखेचि कांही त्यांत ।

असतील हृदयीं तळमळत । चांगलें व्हावें म्हणोनि ॥१२॥

 

ऐसी ज्यांना ज्यांना आवडे सेवा । जे सत्याचा जपती ठेवा ।

त्या लोकांचा करोनि मेळावा । सक्रिय संघटन वाढवावें ॥१३॥

 

जनतंत्राचा हा काळ । शक्ति लोकांअंगींच सकळ ।

 जनतेच्या निश्चयाचें बळ । साम्राज्यासहि नमवूं शके ॥१४॥

 

हत्तीस आवरी गवती दोर । मुंग्याहि सर्पासि करिती जर्जर ।

 व्याघ्रसिंहासि फाडिती हुशार । रानकुत्रें संघटोनि ॥१५॥

 

संघटनेने काय नोहे ? । बिंदू मिळतां सिंधुपणा ये ।

 गांवचा बाग बहरोनि जाय । फुलाफळांनी संघटनेच्या ॥१६॥

 

ग्रामसुधारणेचा मूलमंत्र । सज्जनांनी व्हावें एकत्र ।

संघटना हेंचि शक्तीचें सूत्र । ग्रामराज्य निर्माण करी ॥१७॥

 

गांव करी तें राव न करी । ऐसें सांगोनि ठेविलें चतुरीं ।

 जरी दाद न घेतील अधिकारी । तरी गांव तय सुधारूं शके ॥१८॥

 

यासाठीच पाहिजे सशक्त संघटन । जें करी अन्याय-निर्मूलन ।

देवोनिया न्यायदान । करी रक्षण गांवाचें ॥१९॥

 

संघटन गांवीं मजबूत असावें । आपापलें दु:ख त्यासि सांगावे ।

कोणावरि अन्याय होऊं न द्यावे । कार्य संघटनेचें ॥२०॥

 

त्यासाठी मिळोनि लोक नेमावे । जे असतील इमानी बरवे ।

 त्यागी निर्भयचरित्र असावें । उज्जल ज्यांचें ॥२१॥

 

गांवाचे जे पवित्र सेवक । तेचि प्रसंगी होती सैनिक ।

ज्या गांवी ऐसे सावध पाईक । तेथ विघ्न न ठाके ॥२२॥

 

कांही अपराध घडतां गांवांत । त्वरित कळवावी खबरमात ।

 सर्वांनी भाग घेवोनि त्यांत । ठीक करावें बिघडेल तें ॥२३॥

 

गांवचा प्रत्येक सज्ञान । यांचें असावें सहकार्य पूर्ण ।

हांक देतां सर्वजण । जमोनि यावेत एकत्र ॥२४॥

 

एकाने कोणी गुन्हा केला । शहाणपण सांगावें सकळांनी त्याला ।

 गुन्हेगार ऐकेनासा झाला । शिक्षा द्यावी गांवाने ॥२५॥

 

जेथे समजदार प्रलोभनीं पडला । सोंग करोनि घोरूं लागला ।

 चिमटे घेवोनीच त्याला । उठविलें पाहिजे ॥२६॥

 

कोळसा साबूने धुवा उगाळा । परि तो शेवटवरि काळा ।

अग्निसंस्कारी जळतां उजाळा । येई त्यालागी ॥२७॥

 

म्हणोनि बहिष्कार असहकार । करोनि त्याचे तोडावे आधार ।

नाक दाबतां तोंड सत्वर । उघडों लागे ॥२८॥

 

ऐसी सर्वांनी पाठ पुरवावी । जो कोणी गांवास बिघडवी ।

ऐकेनासा होतां सत्ताप्रभावीं । मुक्त करावा गांवांतूनि ॥२९॥

 

उत्तमांचाचि संग्रह बरवा । वाईटाचा निषेध करावा ।

जराहि पनपूं न द्यावा । वृक्ष वाईटाचा ॥३०॥

 

सर्वांनी झटावें यासाठी । करावी लागेल ती आटाआटी ।

प्राण गेला तरी संकष्टीं । सहन करावें सेवेस्तव ॥३१॥

 

ऐसी असावी गांवाची तयारी । तरीच गांव बनेल स्वर्गपुरी ।

नलगे सत्ताधीशांची तुतारी । पाठीमागे ॥३२॥

 

ऐसा होतां आचार-विचार । गांव होईल न्यायभांडार ।

जागृत असतां सज्जन चतुर । सेवेसाठी ॥३३॥

 

ऐसें जें जें गांव वागलें । त्या गांवाचें भाग्य उघडलें ।

 नाहीतरि टक्केटोणपे आले । नशिबीं त्याच्या ॥३४॥

 

हें ऐकोनि एक बोलला । म्हणे तुम्ही शांतीचा पुरस्कार केला ।

 आणि तुम्हीच ससेमिरा लाविला । दुराचार्‍यांपाठीं ॥३५॥

 

सज्जन आणि दुर्जन । सर्वांत सारखाचि भगवान ।

एकासि देतां दंड धावोन । तेव्हा सेवा कुठे राहे ? ॥३६॥

 

दया क्षमा आणि शांति । हीच सात्विकाची संपत्ति ।

निष्ठुरपणें दंडावें विरोधकांप्रति । हें सज्जनपण कशाचें ? ॥३७॥

 

ऐका ऐसी विचारसरणी । ऐकोनि भुलूं नये कोणी ।

तारतम्यचि ठेवोनि मनीं । गांव सुधारावें विचारें ॥३८॥

 

काय केलें म्हणजे होतो सज्जन । याचें आहे मोजमाप जाण ।

हें प्रथमक्षणींच ओळखोन । हुशार व्हावें गांवाने ॥३९॥

 

सेवा द्यावी कोणे ठायीं । हें तारतम्य असावें हृदयीं ।

याची दृष्टि ज्यांस नाही । होतील फजीत ते प्राणी ॥४०॥

 

ज्यासि करणें चोरबाजार । त्यासहि नोकर पाहिजे इमानदार ।

 त्यासि देतां सेवा सुंदर । पुण्य लाभेल कोणासि ? ॥४१॥

 

साधुसंतें जनसेवा केली । परि सत्यासाठीच काया झिजविली ।

कधी आसचि नाही ठेविली । राजेरजवाडयांची ॥४२॥

 

जगीं अनंत राजे झाले । परि सर्वचि नाही पूजिले ।

 संतसज्जनचि देव मानले । हृदयमंदिरीं तयांनी ॥४३॥

 

म्हणोनि कोणी कोणास सेवा द्यावी । हेचि प्रथम दृष्टी यावी ।

मग सेवेसाठी उडी घ्यावी । हाचि धर्म मानवाचा ॥४४॥

 

सदैव दया असावी चित्तीं । मनास परोपकाराची प्रीति ।

 राहूं न द्यावी उणीव कोणती । दिसतां कोठे ॥४५॥

 

क्षमाशांतिमय हृदय । विश्वासूपणाचें वर्तन निर्भय ।

 प्राण गेलियाहि निर्दय । न व्हावें आम्ही ॥४६॥

 

परि जेथे निर्दयपण हवें । तेथे दगडापेक्षाहि कठिण व्हावें ।

 हेंहि सांगणें लक्षांत घ्यावें । तारतम्याने ॥४७॥

 

नाहीतरि दया केली । उलट आपुल्यासचि  भोवली ।

 जिने गांवाची नासाडी झाली । नव्हे ती दया ॥४८॥

 

भिकार्‍यास भीक दिली । त्याने दारू-गांजांत उडविली ।

 सांगा काय दया घडली । ऐशियापरीं ? ॥४९॥

 

कांही चोरटे गांवीं फिरती । दिवसां साधुवेष घेती ।

रात्रौ तेचि डाका मारिती । वेषभूषा बदलोनि ॥५०॥

 

ते लोकांनी सहन करावें । साधु म्हणोनि सोडोनि द्यावें ।

 ऐसे दयेचे वेडे गोडवे । गाऊं नयेत वीरांनी ॥५१॥

 

दयाधर्म दानधर्म । यांचें ओळखावें वर्म ।

वेडयापरी न करावें कर्म । पोषक आळसा विकारा ॥५२॥

 

एरव्ही संसार सोडोनि बुवा झाले । दारोदारीं भिकेसि लागले ।

 सदाचार सर्व बुडविले । ऐसे झालें याच गुणें ॥५३॥

 

कष्ट नाही करणें अंगीं । नाही संग्रहाचे खरे त्यागी ।

वेष घेवोनि फिरती ढोंगी । नांव बुडवाया संतांचें ॥५४॥

 

यांना दानधर्म द्यावे । तरि सर्व पापांसि स्थान मिळावें ।

 म्हणोनि तारतम्य ठेवावें । दानधर्मियाने ॥५५॥

 

गांवीं मागती माधुकरी । खुशाल खेळती फिचर जुगारीं ।

 दारूगांजा भांग पोरी । गुप्त राखती मठामाजी ॥५६॥

 

ऐशा लोकां दान द्यावें । गांव बुडवावेंबदनाम व्हावें ।

ऐसा धर्म कोणत्या देवें । सांगितला सांगा ? ॥५७॥

 

दया हें मुख्य धर्मलक्षण । परि दया म्हणजे प्राण्यांचें पालन ।

 आणि कंटकांचें निर्दालन । बोलिलें संतीं ॥५८॥

 

सज्जनांचें संरक्षण । आणि दुर्जनांचें दमन ।

हेंचि अवतारांचेंहि कार्यलक्षण । न्यायसंगत ॥५९॥

 

म्हणोनि गांवीं कोणी अन्याय केला । दु:ख दिलें कोणा गरिबाला ।

त्याचा प्रतिकारचि पाहिजे झाला । गांवामाजी ॥६०॥

 

नाहीतरि गुंडांस फावे । सुटती जैसीं स्वैर गाढवें ।

दुष्टासि दया करोनि सोडोनि द्यावें । नव्हे हा धर्म ॥६१॥

 

अन्याय होतां प्रतिकारचि करावा । प्रथम अन्याय समजूनि घ्यावा ।

 निश्चित कळतां आवाज द्यावा । संघटनेचा ॥६२॥

 

अन्याय नाना तर्‍हेचे असती । कांही धनाचे मानाचे दिसती ।

कांहींनी वाढे व्यसन अनीति । लोकांमाजी ॥६३॥

 

त्या सर्वांतूनि मार्ग काढावा । गांवीं दुराचार होऊं न द्यावा ।

हाचि खरा धर्म ओळखावा । विचारवंताने ॥६४॥

 

न्यायाचा कांटेकोरपणा । भिनावा आपुल्या हृदयीं जाणा ।

एका बाजूने दयेचा बाणा । दुसर्‍या बाजूने न्यायदंड ॥६५॥

 

हेंचि खरें मानवाचें लेणें । उगीच आहे सोनें मिरविणें ।

अंगीं वीरता नसतां मरणें । चोराहातीं ॥६६॥

 

कांहीलोक भोळे असती । आपुलें मानव्यभूषण खोविती ।

लोक त्यांसीच सात्विक म्हणती । वेडयापरी ॥६७॥

 

ज्यास करवेना ब्रीदाचें रक्षण । नाही अंगीं न्यायाचें भूषण ।

 तो कैसा सात्विकजन । म्हणावा आम्हीं ? ॥६८॥

 

जो चोरांनी नागवावा । गुंड लोकांनी फसवोनि द्यावा ।

परस्त्रियेने भोंदवावा । तो सात्विक कैसा ? ॥६९॥

 

तोंडावरची न उडवी माशी । दच्के पाहतांचि पोलिसासि ।

न कळे आपुला हक्कहि ज्यासि । सात्विक त्यासि म्हणों नये ॥७०॥

 

त्यास म्हणावें दुबळा प्राणी । भित्रा विकासहीन अज्ञानी ।

ज्यांत नाही पुरुषार्थाचें पाणी । रक्षणासाठी ॥७१॥

 

त्यास कोणीहि उचलोनि न्यावें । दारूगांजादिक पाजोनि द्यावें ।

त्याने भोळा म्हणोनि पिऊनि घ्यावें । वारे भोळा ऐसा ॥७२॥

 

हा तो निर्बुध्दसा पाषाण । उत्तम वागण्याचें नाही ज्ञान ।

 गंभीर शांत म्हणती जन । मुकामैंद म्हणोनिया ॥७३॥

 

खरा शांत तोचि नेमाने । जो न फसे कोणाच्या फसविल्याने ।

 कधीहि चकाटया पिटणें ज्याने । पाहिलें नाही ॥७४॥

 

परनिंदा नावडे ज्यासि । परदु:ख न पाहवे डोळयांसि ।

धांवोनि जाय अडल्या-पडल्यासि । सहकार्य द्याया ॥७५॥

 

उगीदुगी ऐकतां कानीं । लगेच जाय तेथोनि उठोनि ।

लोकां सांगे उगीच बोलणीं । बोलूं नयेत ॥७६॥

 

कोणाची लपोनि टीका न करी । बोलणें ज्याचें तोंडावरि ।

 निर्भय निर्मळ अंतरीं । स्फटिक जैसा ॥७७॥

 

गंदेपणा मुळीच नावडे । सुजनांचे गातो सदा पवाडे ।

सत्संगतीसि जीव धडपडे । सदैव ज्याचा ॥७८॥

 

सर्वांशीं बंधुत्वाचें वागणें । मन-मिलाफ संपादणें ।

लोकसंग्रह कुशलतेने करणें । जागृतीसाठी ॥७९॥

 

सुखीं अहंकारें न चढावें । संकटीं घाबरोनि न जावें ।

न्यायाने वागावें वागवावें । सर्व जना ॥८०॥

 

हें ज्यांनी अंगीं बाणविलें । तेचि शांतसात्विक बोलिले ।

तयांनीच गांवाचें हित झालें । समजतों आम्ही ॥८१॥

 

याऐवजीं दुबळेपण आलें । तरि गांवचि मग विलया गेलें ।

सांभाळितां न जाय सांभाळिलें । कोणाकडोनि ॥८२॥

 

म्हणोनि पाहिजे न्यायनिष्ठुरता । दयेमाजींहि तारतम्यता ।

 उन्नति करील तीच सेवा तत्त्वता । हरप्रकारें ॥८३॥

 

द्वेष न करितां दुर्जनदमन । हें त्यांच्याहि उन्नतीसचि कारण ।

 डॉक्टरें करावें अवयवच्छेदन । ती दयाचि तयाची ॥८४॥

 

सर्वाभूतीं परमेश्वर । त्यासि बाधक नसे सत्यव्यवहार ।

करावें संघटनेने गांव सुंदर । ही पूजाचि तयाची ॥८५॥

 

सर्वाभूतीं प्रेमभाव । वाढवावा गुणगौरव ।

दूर सारोनि उपद्रव । गांवचे आपुल्या ॥८६॥

 

‘जग तरि आम्हां देव । परि हा निंदितों स्वभाव ’ 

 म्हणोनि गुंडांसि आणिला खेव । संत तुकारामांनी ॥८७॥

 

’ हरिभक्त राहती जेथे । परचक्र यावें कैसें तेथे ? ’

 ऐसें म्हणोनि लाविला पणातें । जीव त्यांनी ॥८८॥

 

आपुले वारकरी भाविक । तेचि वारकर्ते पाईक ।

करोनि दुष्टांसि  लाविला धाक । शिवाजीच जणुं सर्वहि ॥८९॥

 

तीच घेवोनि प्रेरणा । गांवी उभारावी न्यायसेना ।

जेणें कांही नुरे धिंगाणा । गांवीं आपुल्या ॥९०॥

 

दारू गांजा भांग अफीम । जुगार वेश्यादि वाईट काम ।

यांचें उरूं न द्यावें नाम । आपुल्या गांवीं ॥९१॥

 

त्यासाठी गांवच्या कांही सज्जनांनी । लागावें व्यसन-निर्मूंलनीं ।

 उत्तम गुणांच्या अनेक श्रेणी । वाढवाव्या गांवीं ॥९२॥

 

गांवचे चार सज्जन मिळोनि । अनिष्टप्रथा बंद कराव्या त्यांनी ।

ज्याने गांवास पावे नुकसानी । न ठेवावें तें ॥९३॥

 

कांही उन्मत्त शेतकरी । टोचती बैलासि तुतारी ।

 रक्त काढूनि वासना पुरी । करिती आपुली ॥९४॥

 

देवाचिया नांवाखाली । कांही देतात जीव बळी ।

 बंद करावी प्रथा असली । भावना सुधारोनि लोकांची ॥९५॥

 

कोणी घुमारे लुबाडिती । बुवा लोकांस फसविती ।

 भ्रमिष्ट मतें व्रतें शिकविती । सावध करावें त्याठायीं ॥९६॥

 

परस्परांना मदत करावी । अडीअडचण ती निभवावी ।

सर्वांकडोनि करोनि घ्यावी । योग्य सेवा ॥९७॥

 

गांवसेवेंत आली अडचण । तिला द्यावें अग्रस्थान ।

आपापली जागा-जमीनहि देऊन । सोय करावी सर्वांची ॥९८॥

 

सर्वांकडोनि ऐसी सेवा नव्हे । तरि गरजूंना सहकार्य द्यावें ।

होईल तेवढें तरी करावें । निष्कपटपणें ॥९९॥

 

मुलाबाळांचें असतां लग्न । सर्वांनी जावें धावोन ।

पडोंचि न द्यावें ओझेंन्यून । आईवडिलांसि तयांच्या ॥१००॥

 

थोडेंथोडें सर्वांनी आणावें । वरवधूंना साहित्य द्यावें ।

भोजनापासोनि उरकवावें । सर्वतोपरीं ॥१०१॥

 

मांडवावरी पांच डहाळे । टाकावे हा धर्म गांवकर्‍या कळे ।

 तैसेचि निभवावे प्रसंग सगळे । सहकार्याने ॥१०२॥

 

जैसें जैसें सहकार्य वाढे । तैसें गांव उन्नतीस चढे ।

 न पडे विपत्तीचें कोडें । गांवीं कोणा मानवासि ॥१०३॥

 

ऐसी सेवा बिंबतां जीवनीं । कांहीच गांवीं न पडे उणी ।

तरीहि असावा स्वतंत्रपणीं । सेवकांचा विभाग ॥१०४॥

 

सुसज्ज असावेत गांवचे तरुण । कोणतेंहि संकट येतां ऐकून ।

आपुलीं सर्व कामें सोडून । धांव घ्यावी तयांनी ॥१०५॥

 

आग लागणेंविहिरींत पडणें । कॉलरा होणेंमूर्च्छा येणें ।

 प्रत्येक प्रसंगीं धांवून जाणें । कर्तव्य त्यांचें ॥१०६॥

 

ऐसी ग्रामसेवेची योजना । जागृत जेथे ग्राम-सेना ।

 तेथे स्वर्गींच्या नंदनवना । बहर येई सहजचि ॥१०७॥

 

ऐसें संघटनांनी गांव । भोगूं लागेल दिव्य वैभव ।

ग्रामराज्यचि सुखाची ठेव । तुकडया म्हणे ॥१०८॥

 

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्रस्वानुभवसंमत ।

ग्रामरक्षणाचा वर्णिला पंथ । अकरावा अध्याय संपूर्ण ॥१०९॥




अध्याय११     वा   ऑडीओ स्वरुपात -



 

 

।।जय गुरुदेव।।