देवें निर्माण केली क्षिती ।
प्रजा वाढवी प्रजापति ।
मानवसमाज राहाया सुस्थितीं ।
धर्म सकळां निवेदिला ॥१॥
‘ धर्म ’ बोलावया शध्द एक । परि त्याचा विस्तार अलौकिक ।
लौकिक आणि पारमार्थिक । मिळोनिया ॥२॥
अनेक प्राणी जेथे राहती । त्या
सर्वांची राहावी सुस्थिती ।
समान समाधानाची गति । त्यास
धर्म म्हणावें ॥३॥
आत्मरूपाची धारणा । सर्वांठायी
समभावना ।
विश्वकुटुंब ऐशा आचरणा । धर्म
म्हणावे निश्चयें ॥४॥
आपुली साधावी उन्नति । सौख्य
द्यावे इतरांप्रति ।
या उद्देशे जी जी संस्कृति ।
धर्म म्हणावे तिजलागी ॥५॥
परस्परांशी वागणूक । ज्यांत न्याय
- नीति सम्यक ।
प्रत्येकांचे कर्तव्य चोख । धर्म ऐसें त्या नांव
॥६॥
कोणाचा द्रोह न करून । करावा
ऐहिक उत्कर्ष पूर्ण ।
साधावे आत्मसमाधान । हाचि बाणा
धर्माचा ॥७॥
सर्वांस असावा संतोष । दुःख न
व्हावें प्राणीमात्रास ।
याचा सक्रिय कराया अभ्यास । धर्मनीति बोलली ॥८॥
भिन्न लोकांची भिन्न कामें ।
मिळोनी पुरती जीवनकर्मे ।
असोत भिन्न गुण भिन्न नामें । परि सुख सर्वांचे
सहकारीं ॥९॥
नको सत्तेचा बडगा त्यासि । नको
दंडभय सत्कर्मासि ।
आपापले कर्म सर्वासि । धर्म शिकवी सर्वांगें ॥१०॥
धार्मिक त्यासचि म्हणावें ।
सत्तेवाचूनि वागे बरवें ।
स्वयें आपुल्याचि स्वभावें । समरस होई सर्वांशी
॥११॥
नको वैद्य अथवा डॉक्टर । आपणचि
राहे आरोग्यतत्पर ।
नको वकील न्यायाधीश दंडधर । न्यायव्यवहार सहजचि
॥१२॥
नको धाक तरवारीचा । चुकीस्तव
तळमळे आत्मा साचा ।
साक्ष देतो अंकुश देवाचा । अंतरामाजीं ॥१३॥
ऐसें ज्याचे हृदयीं स्फुरण ।
तोचि खरा धर्मवान ।
बाह्य अवडंबर धर्मचिहन । तें
तें गौण , धर्म नव्हे ॥१४॥
शुध्द सात्विकता प्रकट करावी ।
लौकिकीं तीच जागवावी ।
आपुल्या चारित्र्याने
सांभाळावी । सुव्यवस्था जगाची ॥१५॥
व्यक्तिधर्म , कुटुंबधर्म । समाजधर्म , गांवधर्म ।
बळकट होई राष्ट्र्धर्म ।
प्रगतिपथाचा ॥१६॥
व्यक्ति व्हावी कुटुंबपूरक ।
कुटुंब व्हावें समाजपोषक ।
तैसेंचि ग्राम व्हावें
राष्ट्रसहाय़क । राष्ट्र विश्वाशांतिदायी ॥१७॥
याकरितां जी जी रचना । तियेसि
धर्म म्हणती जाणा ।
देशद्रोह अधार्मिकपणा । एकाच
अर्थी ॥१८॥
मुख्य धर्माचें लक्षण । त्याग
अहिंसा सत्य पूर्ण ।
अपरिग्रह ब्रम्हचर्य जाण ।
तारतम्ययुक्त ॥१९॥
निर्भयता शरीरश्रम ।
परस्परांशी अभेद प्रेम ।
पूरक व्हावया विद्या सत्कर्म । सकलांसाठी ॥२०॥
सर्व विश्वची व्हावें सुखी ।
ही धर्माची दृष्टी नेटकी ।
ती आणावी सर्व गांवलोकीं ।
तरीच लाभ ॥२१॥
विश्वाचा घटक देश । गांव हाचि
देशाचा अंश ।
गांवाचा मूळपाया माणूस । त्यासि करावें धार्मिक
॥२२॥
व्यक्तिधर्म सर्वां कळावा ।
कुटुंबधर्म आचरणी यावा ।
ग्रामधर्म अंगी बाणावा ।
राष्ट्रधर्माच्या धारणेने ॥२३॥
व्यक्ति - व्यक्ति व्हावी
धार्मिक । धर्म नव्हे एकांगी लटक ।
भौतिक आणि पारमार्थिक । विकास
व्हावा सर्वांचा ॥२४॥
प्रत्येकासि शरीर , मन । वाणी , इंद्रियें , बुध्दि , प्राण ।
या सर्वांचें विकास साधन ।
तोचि धर्म ॥२५॥
ऐशा सदधर्माचें ज्ञान । आधी
प्राप्त व्हावें सर्वांगीण ।
मगचि त्यासारिखे जीवन । जगतां येई या लोकीं ॥२६॥
यासाठीच आश्रमव्यवस्था ।
पूर्वजांची उत्तम प्रथा ।
आरंभी मिळे धर्माची संथा । पुढे जीवन धर्ममय ॥२७॥
मानव पशूयोनींतूनि आला । नराचा
नारायण होणें त्याला ।
यासाठी संस्कार देऊनि सावरिला
। क्रमाक्रमाने ॥२८॥
मानवाकडोनि जें जें घडतें ।
तें बरें - वाईट दोन्ही होतें ।
त्यांतूनि निवडावे लागतें । पापपुण्य ॥२९॥
त्यांचे सुधारोनि आचरण ।
द्यावें लागतें नवें वळण ।
जेणें आपलें करील उध्दरण । इतरां सहायक होऊनि
॥३०॥
यासाठी धर्मे नेमिले संस्कार ।
आश्रम गोविले जीवनीं चार ।
आयुष्य कल्पूनि वर्षे शंभर । विभागलें ते
उन्नतिस्तव ॥३१॥
मानवजीवनीं करितां पर्दापण ।
ब्रम्हचर्याश्रम लागे जाण ।
जो सर्व आश्रमांचें मूलस्थान ।
पाया म्हणावा जीवनाचा ॥३२॥
ज्याचा ब्रह्मचर्याश्रम साधला
। त्याचा पुढील काळ सुखी गेला ।
मग प्रत्येक आश्रम त्याला ।
उत्कर्षदायी होतसे ॥३३॥
या ब्रह्मचर्याश्रमचें साधन ।
चाले गर्भधारणेपासून ।
पोटांतचि असतां जीव पडोन । जतन
करावा संस्कारें ॥३४॥
संस्कार दुष्परिणामकारी । न
पडावे आंतील गर्भावरि ।
म्हणोनी मातापित्यांनी सदाचारी
। राहावे सदभावें ॥३५॥
न करावें अश्लील भाषण । न
बघावें दृष्य हीन ।
न राहावे व्यसनाधीन । दुर्गुणी
अन्न न खावें ॥३६॥
आहारविहार सात्विक पूर्ण ।
उत्तमगुणी चिंतन वाचन ।
न ऐकावे शॄंगारगाय़न । गर्भवतीस
घेवोनि ॥३७॥
येथोनि पाहिजे जतन केलें ।
पुढे मूल जन्मासि आलें ।
तेव्हापासूनि संस्कार घडले ।
पाहिजेत सत्कर्माचे ॥३८॥
घरीं पुत्ररत्न जन्मलें ।
कांही दिवस त्याचें कौतुक केलें ।
परि जन पुढे पाहूं लागले ।
कर्तव्य तयाचें ॥३९॥
मुलगा काय खेळणें खेळतो । काय
बघतो कोठे जातो ।
कैसा बोलतो चालतो गातो । पाहती
जन ॥४०॥
मुलास जैसें कळों लागलें ।
तैसें त्यास सांभाळणें अवश्य झालें ।
त्याचे समोर न पाहिजे बोलिले ।
दुर्विषय कोणीं ॥४१॥
त्यावरि उत्तम संस्कार घडावे ।
म्हणोनीच व्रतबंधादि बरवे ।
शिकवावे पाठ करोनि घ्यावे ।
उत्तम विषय ॥४२॥
मग जो तो त्यासि म्हणे । काय
रे ! केलें की नाही वाचणे ?
कैसा फिरतोसि
रानेंवनें । वेडया - पिशांसारिखा ? ॥४३॥
तुज नाही का संस्कार । घडावया
सदगुणी व्यवहार ?
काय करिती
पालक चतुर ? लक्ष नाही तुझ्यावरि ॥४४॥
सांगितली
नाही का स्नानसंध्या । स्मरावयासि जगदवंद्या ?
नमस्कारिलें
नाहीस का प्रतिपाद्यां। सकाळींसायंकाळी जाऊनि ? ॥४५॥
मग का फिरतोसि रानावना ? कैसा होशील शहाणा ?
उपदेश देती ऐसा , सदगुणा । वाढवाया जन थोर ॥४६॥
घडावया उत्तम संस्कार मायबाप
शिकविती सदाचार ।
व्हावया उत्तम गुणी चतुर ।
मोठेपणी ॥४७॥
आठवर्षांचें आंतचि त्याला ।
पाहिजे उपनयन संस्कार केला ।
तोहि नको रूढीचा बांधला । नाटक
नुसतें बटूचें ॥४८॥
उपनयन म्हणजे विद्येचें व्रत ।
ब्रह्मचर्याश्रमाची सुरुवात ।
गुरुजवळी करणें समर्पित । जीवन
त्याचें घडवावय़ा ॥४९॥
तोहि गुरु असावा ब्रह्मचारी ।
अथवा वानप्रस्थ तरी ।
त्याने घ्यावी काळजी पुरी । मुलांचिया
ब्रह्मचर्याची ॥५०॥
त्याचें राहणें खाणें पिणें ।
खेळ खेळणें ग्रंथ वाचणे ।
लक्ष ठेवावें आचार्याने ।
मनोरंजनादिकावरि ॥५१॥
जरा चुकलिया चुकतचि जातें । मग
सावरेना कांही केल्य़ा तें ।
इंद्रियां वळण जैसे लागतें ।
तैसेंचि होतें जन्मभरि ॥५२॥
म्हणूनि गुरुआश्रमीं नियम ।
प्रत्येक आचरणी संयम ।
छात्रालयी हीच उत्तम । दॄष्टी
असावी सर्वत्र ॥५३॥
मुलगा अभ्यासा लागला । कीं
सात्विक खाणें असावें त्याला ।
खारट आंबट तिखट मसाला । देऊं
नये भोजनीं ॥५४॥
चमचमीत चुरचुरीत । अति मधुर
तळीव पदार्थ ।
अथवा रुक्ष कृत्रिम मिश्रित । भोजनासि न द्यावें
॥५५॥
साधें ताजे अन्न द्यावें ।
वेळेवरि झोपवावें जागवावें ।
झोपतां जागतां जवळी नसावें ।
स्पर्शणारें कोणी ॥५६॥
कराया लावावें प्रातर्ध्यान ।
सांयकाळीं प्रार्थना पूर्ण ।
झोपतां जागतां चिंतन । आदर्श
महापुरूषांचें ॥५७॥
नित्य नियमें उषःपान ।
सुर्यनमस्कार आसन ।
पोहणें आणि निंबसेवन ।
आरोग्यदायी जें सोपें ॥५८॥
शीतजलें करवावें स्नान ।
सकाळीं रानींवनीं गमन ।
करवावें नेहमी पठणपाठण ।
चारित्र्यवंतांचें ॥५९॥
शौकिन राहणी वर्जावी । सुगंधी
अत्तरें फुलेंहि त्यजावीं ।
कोणी बाल न ठेवी तेल न लावी ।
ऐसें करावें ॥६०॥
बघूं न द्यावें दर्पणीं तोंड ।
वाढूं न द्यावें पोषाखाचें बंड ।
पान बिडी चहाचे थोतांड ।
सर्वतोपरी वर्जावें ॥६१॥
कोणीहि न घ्यावे मादक द्रव्य ।
तोंडी नसावें नाटकीं काव्य ।
समजावूनि द्यावें सेव्यासेव्य । उपवासहि करवावा
॥६२॥
कराया सांगावें आपुलें काम ।
दुसर्यासाठीहि परिश्रम ।
शिकवावें बंधुभगिनी - प्रेम ।
सेवाधर्म शिकवावा ॥६३॥
बसवूं नये मुलींसह शिक्षणीं ।
तेथे संमिश्र नाटकें कोठोनि ?
स्त्रैणांसंगती शृंगारगायनी ।
क्षणभरीहि बसों न द्यावें ॥६४॥
मुलाचें वय जसजसें वाढे ।
तोडावे स्त्रियाचें संबंध गाढे ।
नेहमी चरित्रवंतांचे धडे ।
द्यावेत तयासि ॥६५॥
विवाहादि कार्ये न दाखवावीं । शॄंगारकाव्यें न शिकवावीं ।
व्यायामदंगलीं खेळवावी । मुले निर्भयत्वें ॥६६॥
अश्लीलता कोठेहि न दिसावी ।
दिनचर्या आदर्श असावी ।
सकाळीं सायंकाळी द्यावीं ।
बौध्दिकें ब्रह्मचर्याची ॥६७॥
सांगावे ब्रह्मचर्याचें महिमान
। ब्रह्मचर्याचा उद्देश कोण ।
काय सेविल्या होतें रक्षण ।
ब्रह्मचर्याचें ॥६८॥
ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्माचरण
। ब्रह्मतेजाचें साधन ।
विद्याप्राप्तीचें वर्तन ।
वीर्यरक्षण ब्रह्मचर्य ॥६९॥
ब्रह्मचर्यासमान कोण । जगीं
महत्त्वाचें साधन ?
जो ब्रह्मचर्य करी पालन । तो
देवासमान होतसे ॥७०॥
रिध्दिसिध्दी त्याच्या दासी ।
देव धांवती त्याच्या हांकेसि ।
सूर्यासमान कांति तयासि ।
लाभतसे निरोगी ॥७१॥
भीष्मचा व्रतनिश्चय ।
कार्तिकेयाचें चातुर्य ।
शुकाचा ज्ञानयोग निर्भय । लाभे
ब्रह्मचर्याने ॥७२॥
अवधूताची दृष्टी विशाल ।
हनुमंताचे महाबल ।
ब्रह्मचारी पावे महाचपल । वज्रदेह ॥७३॥
सर्व बळांत वीर्यबळ । वीर्य नाही
तो दरिद्री दुर्बळ ।
रोगांचिया मुखींचा कवळ । नेहमी
होतो ॥७४॥
ज्याने वीर्य सांभाळलें । यश
तयासि माळ घाले ।
वीर्य क्षीण होतां मॄत्युने
केले । शिकार त्यासि ॥७५॥
वीर्यअंगी आहे ओज । वीर्याअंगी
नवें तेज ।
वीर्याअंगी आरोग्यबीज । बुध्दिसामर्थ्यहि ॥७६॥
ऐका वीर्य कैसें बनतें । चाळीस
शेर अन्न पचतें ।
त्याचें एक शेर रक्त होतें ।
वीर्य त्याचें दोन तोळे ॥७७॥
पुरुष रोज एक शेर जेवला । तरी
एक महिना तीस शेरांला ।
त्यांत दीड तोळा उपजला । वीर्यरसबिंदु ॥७८॥
तो नष्ट होय एका क्षणीं ।
केवढी थोर केली हानि !
द्रव्य मिळविलें कष्ट करोनि । केली धुळधाणी
हौसेने ॥७९॥
ब्रह्मचारी पतन पावला ।
महिन्याची कमाई खोवतो क्षणाला ।
केवढा हा तोटा झाला ।
आयुष्याचा ? ॥८०॥
सातां दिशा अन्नरस होई । तो
साता दिसां रक्तपण घेई ।
रक्तामधूनि मांस होई । थोडें
थोडें ॥८१॥
त्यांतूनि मेद आणि हाडें ।साता
दिसां मज्जा वाढे ।
मग वीर्य निपजे थोडथोडें ।
सप्ताहानंतरी ॥८२॥
बेचाळीस दिवसानंतर । वीर्य
शुक्रधातु शक्तिकर ।
त्यासि किती प्रयास दिवसरात्र
। अन्नखर्च कितीतरी ॥८३॥
तें अमोल वीर्य देहातील रत्न ।
ज्यावरि देहाचें जीवन ।
ते आरोग्यदायी अमृतकण । तेज
वाढे रोमरोमीं ॥८४॥
म्हणून यासि सांभाळावे । ओज
सामर्थ्य वाढवावें ।
सूर्यचंद्रापरी शोभावें । ब्रह्मचर्याने ॥८५॥
ऐसें शिकवावें बाळां तरुणां ।
बौध्दिक द्यावें सर्व जना ।
बुध्दि बनतां वेळ लागेना ।
जीवन आदर्श व्हावया ॥८६॥
गुरुजनीं ऐसे द्यावेत धडे ।
आपुला आदर्श ठेवोनि पुढे ।
विद्यार्थी तयार होतां चहूकडे
। राष्ट्र होई तेजस्वी ॥८७॥
चोवीस वर्षे ऐसीं गेलीं ।
त्याची जीवन - सफलता झाली ।
गृहस्थपणें गुढी उभारली ।
सत्कार्याची त्यापुढे ॥८८॥
ब्रह्मचारी घे गृहस्थपण । शंभर
वर्षे जगे तयाचें संतान ।
रोगराई दुबळेपण । तया न बाधे
सर्वथा ॥८९॥
यानेच गांव होईल आदर्श । बलवान
बनेल सर्व देश ।
मानवासमाजाचा उत्कर्ष । होईल
सर्वतोपरी ॥९०॥
हें साधाया पहिला उपक्रम ।
पाहिजे ब्रह्मचर्याश्रम ।
जेणें प्रजा होई कार्यक्षम । स्वतःसाठी तैसी
राष्ट्रासाठी ॥९१॥
राष्ट्रासाठी जीवन बनविणें ।
त्यासि चारित्र्ययोग संपादणे ।
आरोग्यबल शरीरीं राखणें ।
ब्रह्मचर्यायोगें ॥९२॥
परस्परांत प्रेम राखणें ।
समाजाकरितां तत्पर होणें ।
त्यासाठीहि आधी जीवन बनविणे । हाचि पाया आवश्यक
॥९३॥
जे हे नियम मुलांसाठी । तीच
मुलींकरितां रहाटी ।
वयाचीच मुख्य़ विषमता पोटी । राही तयांच्या ॥९४॥
भारतीं झाल्या ब्रह्मचारिणी ।
विद्यासंपन्न तेजस्विनी ।
त्यांचे आश्रम स्वतंत्र स्थानी । आदर्शरूप ॥९५॥
जोंवरि हे होते आश्रम । तोंवरि
राष्ट्र बलवान उत्तम ।
वाढूनि व्यसनें विषयप्रेम ।
पतन झाले समाजाचें ॥९६॥
धर्माचा पाया विद्यार्थीधर्म ।
तयासाठी ब्रह्मचर्याश्रम ।
त्यानेच जीवन होईल उत्तम । व्यक्तीचें आणि
राष्ट्राचें ॥९७॥
म्हणोनि साधा या व्रतनियमाला।असेचि आश्रम काढा गांवाला ।
शिकवा आपुल्या भावी पिढीला । लक्ष देऊनि मित्रहो ! ॥९८॥
शिकवा आपुल्या भावी पिढीला । लक्ष देऊनि मित्रहो ! ॥९८॥
मी हें जाणतो मागील वर्म ।
त्याकाळीं सुलभ श्रध्दा संयम ।
तैसे आज करितां आश्रम । कठीण जाईल गांवासि ॥९९॥
उपभोग सकलांचे वाढले ।
राहणीमाजीं अंतर पडलें ।
सभोवताली तार चढले ।
विषयसतारीचे ॥१००॥
मुलींचें विद्यालय अलग नाही ।
विधवाहि शृंगाराविण न राही ।
धाक कोणाचा कोणाहि । उरला
दिसेना ॥१०१॥
नटवेष घुसले जीवनीं । भुलविलें
चित्रपट - कादंबर्यांनी ।
अध्यापक तोचि विलासी व्यसनी । शॄंगारकाव्य
शिकवितो ॥१०२॥
रस्तोरस्तीं खाद्य पेयें । वैभवशाली विद्यालयें ।
चैन हेंच जणू जीवन ध्येय ।
कोणीं सोय लावावी कोणा ? ॥१०३॥
ऐसे वातावरण जरी असलें । तरी
ह्रदयवंताने पाहिजे सुधारलें ।
आपुलें गांव बिघडू दिलें । ऐसे
न करावें सुज्ञाने ॥१०४॥
नियमित मुलांचें वर्तन ।
नियमित ठेवावें खानपान ।
नियमित ब्रह्मचर्याचें पालन ।
घडलेंच पाहिजे ॥१०५॥
सर्व भुक्तिमुक्तिसि कारण ।
असे ब्रह्मचर्य धर्मज्ञान ।
म्हणोनि विनवितों श्रोतेजन ।
इकडे दुर्लक्ष न व्हावें ॥१०६॥
ऐसे साधाल जेवढयापरीं । संतान
बळकट होई संसारीं ।
गांवाचे स्वास्थ वाढेल
निर्धारीं । तुकडया म्हणे ॥१०७॥
इति श्री ग्रामगीता ग्रंथ ।
गुरू - शास्त्र - स्वानुभव - समंत ।
धर्म ब्रह्मचर्य निवेदिले येथ । दुसरा अध्याय
संपूर्ण ॥१०८॥