अध्याय ३८ वा
ग्राम-कुटुंब
श्रोते आत्मबोधीं
रंगले । म्हणती हेंचि पाहिजे कथिलें ।
साधुसंतीं हेंचि सांगितलें । सर्व जनांसि ॥१॥
धन्य धन्य
आत्मबोध । ऐकतां होय ब्रह्मानंद ।
येथे गांवसेवेची
ब्याद । कासयासि सांगावी ? ॥२॥
ऐसी श्रोत्यांची
धारणा । ऐका आता समाधाना ।
एकाग्र करोनिया
मना । सर्व जनहो ! ॥३॥
माझ्या जिवींचें
मनोगत । मी सांगतों आता सत्य ।
ग्रामगीतेचा मतितार्थ । यांतचि आहे सर्वहि ॥४॥
माझाच नव्हे हा
विचार । सर्व संतग्रंथांचा सार ।
महात्म्यांची
तळमळ अपार । तेंच वर्म कथितों मी ॥५॥
आपण त्यांचे
वाचता ग्रंथ । आत्मबोध ऐकता सतत ।
परंतु त्यांचें काय हृदगत । दुर्लक्ष झालें
तयाकडे ॥६॥
जगीं ज्यांनी
घेतला स्वानुभव । ज्यांनी जाणलें मूळतत्त्व ।
त्या सर्वांचा एकचि भाव । व्हावेत सर्व लोक सुखी
॥७॥
अवघाचि संसार
व्हावा सुखी । मंगलता निघो सर्वांमुखीं ।
खळदुर्जनांचीहि दृष्टि निकी । व्हावी सर्वथा ॥८॥
मित्रता नांदावी
सर्वजनीं । उणीव न दिसावी कोठे कोणी ।
जी जी इच्छा करिती प्राणी । व्हावी पूर्ण ती
न्यायें ॥९॥
नको कोठेहि
द्वेषवैर । न उरो कोठे हाहा:कार ।
दंभ मत्सर अत्याचार । अनाचार न राहो ॥१०॥
लया जावो जगाचा
भेद । परस्परपोषक होवोत वाद ।
नांदो आनंदी आनंद
। सगळीकडे सर्वदा ॥११॥
हीच तळमळ
रात्रंदिनीं । सारखी होती तयांचें मनीं ।
जगीं जे झाले थोर
कोणी । महापुरुष कोठेहि ॥१२॥
त्यांनी कथिलें
आत्मज्ञान । तेंहि सुखी कराया जन ।
आत्मवत जाणावें
सर्वांसि म्हणोन । प्रत्येकाने ॥१३॥
त्यांनी वर्णिलें
ईश्वर-भजन । तेंहि शुध्द व्हावया मन ।
पाहावीं देवाचीं लेकरें समान । म्हणोनिया ॥१४॥
त्यांनी कथिलें
त्यागवैराग्य । तेंहि जग न मानतां भोग्य ।
निष्काम सेवेने पावावें भाग्य । याचसाठी ॥१५॥
भूतदया परोपकार ।
दानधर्म यज्ञादि अपार ।
याद्वारें
दु:खितांसि आणावें वर । अधिक तें तें देवोनि ॥१६॥
करावी समाजीं
समानता । म्हणोनीच हीं साधनें तत्त्वता ।
तीर्थादिद्वारें सामुदायिकता । शिकविली
साधुसंतांनी ॥१७॥
एकमेकांमुखीं
काला द्यावा । समानभावें भात खावा ।
सोनें वाटोनि स्नेह वाढवावा । ऐशा प्रथा कितीतरी
॥१८॥
सर्वांमाजीं एकचि
भाव । आकुंचित न व्हावा मानव ।
सामुदायिक
वृत्तीने करावें सर्व । विश्वचि सुखी ॥१९॥
सर्व मिळोनि
एकत्वें रहावें । सर्वांनी सर्वांस चालवावें ।
सर्व भूत-हितीं रत व्हावें । ऐसेंचि वचन गीतेचें
॥२०॥
वेदापासूनि हाच
घोष । समानसुखें नांदावा मानववंश ।
सर्व धर्मांचा हाच उद्देश । जिव्हाळयाचा ॥२१॥
परंतु हें सारें
पडलें पचनीं । मानव राहिला मागासलेपणीं ।
करमणूक झाली संत-वाणी । उच्च ज्ञानाची ॥२२॥
एक एकाचे घेवोनि
शब्द । करिती चर्चा वितंडवाद ।
जीवनीं उतरायाचा बोध । त्यासि नाही ठाव कोठे
॥२३॥
संतांनी कथिलें
ब्रह्मज्ञान । विशाल व्हाया मानवी मन ।
सर्वांनी राहाया समान । परस्पर-सहकार्यें ॥२४॥
परि तें राहिलें
नुसतें मुखीं । स्वार्थाचीच वाढली शेखी ।
आपुला शेजारी मरो दु:खीं । नाही चिंता आज कोणा
॥२५॥
चर्चेसाठी
तत्त्वज्ञान । आणि चैनीसाठी जीवन ।
ऐसें घेतलें भिन्नपण । मानवांनी वाउगें ॥२६॥
तेणें संतऋषींचा
हेतु । ग्रासूनि गेला राहूकेतु ।
राम गेला बांधूनि
सेतु । गोटे राहिले जैसे-तैसे ॥२७॥
त्यांना सांगावी
संत-कहाणी । हाडें दिलीं दधीचींनी ।
जनसेवेसाठी
ऋषिमुनि । रात्रंदिवस कष्टले ॥२८॥
दामाजींनी
सुखविलें जना । त्यांतचि तृप्ति नारायणा ।
संत दादू करी पिंजणा । सेवाभावें ॥२९॥
हातीं घेवोनि
तूपवाटी । नामदेव लागे श्वानापाठीं ।
संतोषवी जगीं
जगजेठी । कपडे शिवोनि ॥३०॥
सावतोबांनी शेत
पिकविलें । चोखोबांनी गांव झाडलें ।
लोकसेवेचें महत्व कथिलें । सर्व संतांनी ॥३१॥
कबिरांनी विणले
शेले । जातिधर्मादि भेद निरसले ।
हें सर्व जरी
सांगितले । तरी जाग नये त्यांसि ॥३२॥
ते म्हणती हें
साधूंकरितां । आम्ही प्रापंचिक सर्वथा ।
आम्हां पाप्यांसि
त्या कथा । ऐकल्याने पुण्य लाभे ॥३३॥
आम्ही सकळांसाठी
जन्मलों । सर्व मिळोनि राहाया आलों ।
परस्परांशीं पाहिजे पूरक झालों । हें न कळे तयां
॥३४॥
तेणें ग्राम
झालें कुग्राम । नाही परस्परांशीं निर्मल प्रेम ।
सर्वांचे स्वार्थ वाढले बेफाम । आपुल्याचि
व्यक्तित्वाचे ॥३५॥
एक लाडू करोनि
खातो । तेथेचि दुजा उपाशी राहतो ।
हें आम्ही
गांवोगांवीं पाहतों । मानती भूषण ते त्यासि ॥३६॥
एक हौसेने महाल
करी । दुजास राहे घर कौलारी ।
तिजास कुडाचीहि झोपडी बरी । पाहतां दिसेना ॥३७॥
एकास नाही जराहि
वाव । एकास उधळपट्टीची हाव ।
एक बसोनि भोगी वैभव । कष्ट करोनि दु:खी एक ॥३८॥
सदा एक-दुसर्यासि
जळती । एक-दुजाचें वाभाडें काढिती ।
किंवा नशिबावरि हात ठेविती । हांक देती देवासि
॥३९॥
कैसा होईल यांचा
मिलाप ? कशाने फळेल संतसंकल्प ?
कैसियाने होईल
विश्वरूप । सुखी हें सारें ? ॥४०॥
यासाठी अनेक
महात्मे झटले । परि जगाचें दु:ख नाही मिटलें ।
उपदेश त्यांचे नाही उतरले । लोकजीवनीं म्हणोनिया
॥४१॥
यासाठी शोधिला
पाहिजे उपाय । जेणें जगीं सुखशांति राहे ।
महापुरुषांचें समाधान होय । विचारूं तैसें ॥४२॥
ऐसे संकल्प उठतां
। लागलों कराया विचार तत्त्वता ।
सापडला मार्ग निर्मळ हातां । ग्रामकुटुंबयोजनेचा
॥४३॥
उपदेश सुधारी
कांही लोकां । परि समाजरचना देई धोका ।
तेणें आणतां नये अनेकां । प्रत्यक्षांत संतबोध
॥४४॥
म्हणोनि
समाज-रचना बदलावीं । संतबोधावरि मांडणी करावी ।
ब्रम्हज्ञानासि
सक्रियता द्यावी । समत्व आणोनि जीवनीं ॥४५॥
देव एक असोनि
अनंत झाला । नाना रूपें धरोनि नटला ।
परि तो पाहतां
एकचि दिसला । तैसें व्हावें जनलोकीं ॥४६॥
एकाचें सुखदु:ख
सर्वांसि । सर्वांचा उपयोग एकासि ।
घटकासि आणि
विश्वासि । सांगड व्हावी सर्वथा ॥४७॥
सर्व विश्वचि
माझें घर । ऐसें बोलिले संत ज्ञानेश्वर ।
त्याचें प्रात्यक्षिक हें सुंदर । करावें ग्राम
आपुलें ॥४८॥
गांवाची करावी
आदर्श व्यवस्था । म्हणोनि कथिली ग्रामगीता ।
ग्रामापासोनि पुढे वाढतां । विश्वव्यापी व्हावें
॥४९॥
जेथे गांवाचाच न
कळे धर्म । तेथे विश्वधर्माचें कैचें वर्म ?
हेंचि कळावया साधन सुगम । धरिलें गांवाचें ॥५०॥
मनुष्य ग्रामाचा
संरक्षक । ग्राम देशासि पोषक ।
देश विश्वाचा घटक
। ऐसें व्हावें यथार्थ ॥५१॥
मनुष्याचें
सर्वस्व ग्राम आहे । त्याविण त्याला अस्तित्व नोहे ।
ग्राम सर्वांगपूर्ण राहे । तरीच वैभव मानवाचें
॥५२॥
गांवीं एकाने
माडी बांधली । सर्व घरें मोडून पडलीं ।
याने आमुची
कीर्ति वाढली हें समजणें वेडेपणाचें ॥५३॥
खरा स्वार्थ तोचि
करी । ज्याचा व्यवहार समाजा उध्दरी ।
नाही भिन्नत्वाची उरी । जयामाजीं ॥५४॥
नाहीतरि उलट घडे
। ऐसे चालत आले पोवाडे ।
श्रीमंत-गरीब हे
आकडे । पुसले पाहिजेत या पुढती ॥५५॥
आपुला स्वार्थचि
धरिला उरीं । पर्वा इतरांची न केली जरि ।
तेणें आपणांसहि
शांति संसारीं । न साधेल कधी ॥५६॥
म्हणोनि ज्यासि
दूरदृष्टि आली । त्याने हीच ठेवावी बोली ।
देवाने ही दुनिया निर्मिली । सकळांसाठी ॥५७॥
हीच खरी विकासाची
वाणी । जाणेल तोचि खरा ज्ञानी ।
अभ्यास करावा सर्व लोकांनी । आतातरी ॥५८॥
हा अभ्यास नको
शाब्दिक । बौध्दिक अथवा केवळ तात्त्विक ।
जीवनचि करा सामुदायिक । ग्राम-जन हो ! ॥५९॥
त्यानेच साधेल
संत-उद्देश । ईश्वरी संकल्प येईल फळास ।
व्यवहारीं लाभेल ब्रह्मरस । सर्व गांवासि ॥६०॥
यावरि श्रोतीं
विचारिलें । आपण सामुदायिकत्व सुचविलें ।
परि त्याचें स्वरूप कळलें । नाही आम्हां ॥६१॥
तेंचि ऐका
सविस्तर । परमार्थमय हा व्यवहार ।
जेणें गांवीं
वैकुंठपूर । नांदूं लागे सहजचि ॥६२॥
शक्ति, बुध्दि, सत्ता, धन । आज ज्याच्या जें स्वाधीन ।
तो त्या त्या साधनें स्वार्थ साधून । लुटतो
गांवा ॥६३॥
पाहती आपापल्या
पुरतें । लाभ इच्छिती आइते ।
इतर मेलियाची तेथे । पर्वा नाही कोणासि ॥६४॥
हें आकुंचितपण
बाधक । पोसाया आपुले कुटुंबीय लोक ।
इतरांसि मागाया
लावित भीक । नाना मार्गें ॥६५॥
म्हणोनि स्वरूप
द्यावें सामुदायिक । सर्व गांवचि कुटुंब एक ।
श्रमती खाती सर्वचि लोक । ऐसें दृश्य दिसावें
॥६६॥
गांवीं जेवढी
शक्ति बुध्दि । तो सर्व गांवाचाचि निधि ।
ऐसें होतां आधिव्याधि । नष्ट होतील सर्वचि ॥६७॥
आज मजुरां नाही
शास्त्रीय ज्ञान । शास्त्रज्ञाअंगीं श्रमाची वाण ।
तेणें वाढेल कैसें उत्पन्न । गांवाचें आमुच्या ? ॥६८॥
श्रम करितील सर्व
मिळून । तरि पिकूं लागेल बरड जमीन ।
मार्ग काढतील बुध्दिमान । नव्या नव्या शोधांनी
॥६९॥
सामुदायिक
प्रयत्नांनी । सामर्थ्य वाढेल कणोकणीं ।
जेथे नसे घोटभर पाणी । तेथे सरिता वाहूं लागे
॥७०॥
स्वच्छ पाण्याचें
भरेल तळें । विहिरी, जागोजागीं मळे ।
नदीचे प्रवाह
होतील सगळे । शेतीसाठी उपयोगी ॥७१॥
नदी सागरीं
मिळावी । तिची अपार शक्ति व्यर्थचि जावी ।
ऐसी ईश्वरी
इच्छाचि नसावी । उपयोगी यावी सर्वांच्या ॥७२॥
तैसीच मानवी
शक्तिबुध्दि । स्वार्थींच वाया न जावी कधी ।
गांवीं नांदवाव्या ऋध्दिसिध्दी । नाना प्रयत्नें
॥७३॥
आमुचें गांवचि
आमुचें घर । सर्व व्यवहार सगळयांवर ।
सर्वांचा
सर्वांठायीं हातभार । असलाचि पाहिजे ॥७४॥
बुध्दिकाम, देहपरिश्रम । कलाकाम, कौशल्यौद्यम ।
ज्याचें असेल जें जें कर्म । तें तें वाहावें
समाजा ॥७५॥
कोणी द्यावा
आपुला धंदा । कोणी द्यावी सर्व संपदा ।
कोणी नोकरीचा
पगार सर्वदा । समर्पावा या योजनेसि ॥७६॥
त्यांत असावे चांभार-कुंभार । त्यांत असावे सुतार-बेलदार ।शिक्षक, शिंपी, लोहार, कलाकार । दाई, सेविका सर्वचि ॥७७॥
शेती उत्तम
कसणारे । शेतीची योजना जमविणारे ।
वैद्य, कोष्टी, विणणारे- । कापड, साडया, सतरंज्या ॥७८॥
अजूनीहि जे
गांवीं असती । त्यांची पाहिजे अधिक भरती ।
त्या सर्वांची शक्तियुक्ति । संघटित व्हावी
गांव-सेवे ॥७९॥
धन द्यावें
धनवानांनी । भूमि द्यावी जमीनदारांनी ।
श्रम द्यावेत मजुरांनी । सर्वतोपरीं आपुले ॥८०॥
बुध्दि द्यावी
बुध्दिवंतांनी । कला द्यावी कलावंतांनी ।
सेवा करावी
वैद्य-डॉक्टरांनी । आळसी कोणीं नसावें ॥८१॥
सर्व लोकांनी झीज
सोसावी । गांवसोयीसाठी जागाहि द्यावी ।
गरीबांचीं घरें दुरुस्त करावीं । गांव-खर्चाने
॥८२॥
देवळांच्या जमिनी, पडीत खंडारें । वाटोनि द्यावें गरीबां सारें ।
व्यवस्था ठेवावी
उत्तम प्रकारें । सर्वांच्याच जीवनाची ॥८३॥
सर्वांनी समयदान
करावें । घरें, रस्तेहि सजवोनि द्यावे ।
गांव नंदनवन बनवावें । सामुदायिक कष्टांनी ॥८४॥
कोणी नसावा
गांवीं उपाशी । उद्योग द्यावे सकळ जनांसि ।
भीक मागण्याची
प्रथा जराशी । नसावी गांवीं आमुच्या ॥८५॥
असो पुजारी वा
पंडित । कामें करील जो उचित ।
तोचि राहील या गांवांत । सर्वानुमतें सांगावें
॥८६॥
सर्वांनी सारखेंच
काम करावें । आपुलाल्या कलेने बरवें ।
कष्टाविण कुणाला
पोसावें । ऐसें नाही ॥८७॥
कष्ट करोनि वृध्द
झाला । काम बदलोनि द्यावें त्याला ।
अथवा कोणी बिमार
पडला । तरीच पोसावें सर्वांनी ॥८८॥
असो साधु भक्त
विद्वान । त्यांनीहि न खावें कष्टाविण ।
उलट आदर्श दावावा
झटून । सर्व लोकांसि ॥८९॥
मुखें भजावें
गोविंदा । हातें करावा कामधंदा ।
प्रेम ठेवावें सदासर्वदा । सर्वेश्वराठायीं ॥९०॥
आपुलालें काम
करावें । सर्व लोकांशीं इमानदार व्हावें ।
घेणें देणें सर्वचि करावें । प्रांजळ बुध्दि
धरोनि ॥९१॥
जैसा गोरा कुंभार
मडकीं करी । नित्य उच्चारी हरिहरि ।
परि मडकियांत
बैमानी धरी । ऐसें कल्पान्तीं घडेना ॥९२॥
जनाबाई संत झाली
। परि गोवर्या वेचणें नाही भुलली ।
तैसीच चोख्याने
भक्ति केली । ढोरें ओढतां ग्रामाची ॥९३॥
खरा नाथ भक्तिवान
। देई मागासल्यांना ज्ञान ।
खाऊं घाली पितरांचें अन्न । कष्टकर्त्या दीनजना
॥९४॥
एका पैचा न चुको
हिशेब । म्हणोनि जागे, नसोनि लोभ ।
संतोषला पद्मनाभ
। पाणी पाजतां गाढवासि ॥९५॥
हेचि त्यांची खरी
भक्ति । स्वयें बोलला जगत्पति ।
नाचे सावत्याच्या
मळयाप्रति । नेटकें काम बघोनि ॥९६॥
ऐसें घडलें
पाहिजे साचें । काम करोनि ग्रामाचें ।
त्यांत ठेवावें भक्तिरसाचें । हृदय आपुलें ॥९७॥
जे जे गांवीं
भिन्न उद्योग । त्यांचा जुळवावा संयोग ।
ठराविक जागीं नाना प्रयोग । चालवावे गांवांत
॥९८॥
आपल्या कामाचा
ठरला वेळ । सर्वांनी झटावें लावोनि बळ ।
चिंता करूं नये
वेडगळ । भलतियाचि ॥९९॥
जो जो असे आपुला
धंदा । तल्लीन राहावें कामांतचि सदा ।
ठरल्या वेळीं व्यवसायाबंधा । सोडूनि द्यावें
सर्वांनी ॥१००॥
नियमित वेळीं काम
करावें । नियमितपणें खेळ खेळावे ।
नियमित समयीं प्रार्थने जावें । सर्व मिळोनि
॥१०१॥
एरव्ही सामुदायिक
जीवन । हेचि प्रार्थना असे महान ।
गांवासाठी कष्टावें पूर्ण । सेवाभावाने ॥१०२॥
काय नाही आपल्या
गांवीं । याची चौकशी असावी ।
नसेल ती साजवावी । पुष्पवाटिका ग्रामासि ॥१०३॥
गांव-जीवनासि जें
आवश्यक । त्याची मागावी नलगे भीक ।
ऐसें सर्वांनी श्रमोनि करावें ठीक । जीवन सारें
॥१०४॥
कोणी गांवास्तव
जोडे शिवी । कोणी कपडे शिवोनि पाठवी ।
कोणी लोखंडी
कामेंहि बरवीं । पाठवी
वस्तुभांडारीं ॥१०५॥
कोणी कपडा विणूनि
आणावा । कोणी नवारी, दोर द्यावा ।
लाकडी कामें करोनि बरवा । आणतो कोणी ॥१०६॥
कोणी महिनोगणती
शेती करी । हंगाम होतां आणी दरबारीं ।
प्रत्येक ऋतूचि तुरी-बाजरी । तांदूळ आदि
सामुग्री ॥१०७॥
धान्य उपजवावें
सर्वतोपरीं । जें जें लागे गांवीं घरीं ।
दुसरीकडोनि न
घ्यावी माधुकरी । हेंचि उत्तम ॥१०८॥
जें जें आपुल्या
गांवीं होतें । आपणचि वापरावें सामान तें ।
उरलेलें विकावें भोवतें । भिन्न गांवीं ॥१०९॥
सर्व गांवाचें एक
दुकान । सर्वांच्या सहकार्याचें प्रदर्शन ।
फायदा झालियाचें धन । सर्वांच्याचि मालकीचें
॥११०॥
सर्वचि धन हें
सर्वांचें । हे उद्योगहि सकळिकांचे ।
हें भुवन
प्रत्येकाचें । ग्रामचि आहे ॥१११॥
म्हणोनि सर्व
एकत्र करावें । ज्याचें काम त्याला द्यावें ।
उणें असता अधिक मागावें । जास्त द्यावें
खजिन्यामाजीं ॥११२॥
अहो ! पैशांचें
तोंड काळें । सर्व आपुल्याच गांवीं मिळे ।
न मिळतां प्रयत्नबळें । तैसें करूं ग्राम आमुचें
॥११३॥
आमुच्या
गांवींचें सर्व धन । ग्रामवासियांचें सुखस्थान ।
आम्ही सर्वचि
मिळोन । करूं स्वर्ग गांवासि ॥११४॥
याहीवरि उणें पडे
। तरि मागूं देश-पित्याकडे ।
पूर्ण कराया
पोवाडे । गांवाचे आमुच्या ॥११५॥
ग्रामों जरि अधिक
उरे । तरि देऊं परगांवीं संतोषभरें ।
यांत तिळभरि अंतर
न शिरे । कल्पान्तींहि ॥११६॥
आधी ग्राम असावें
सुखी । कोणी न व्हावीं कोणाशीं पारखीं ।
सर्व कामें गांवींच निकीं । करूं आम्ही ॥११७॥
याच दृष्टीला
धरोन नामी । व्याप्ति करूं विश्वाची आम्ही ।
लावावया मानवता कामीं । सकळिकांची ॥११८॥
ज्या ज्या
मार्गें ऐसें घडे । तोचि धर्म तेंचि ज्ञान रोकडें ।
तुकडया म्हणे समाधान जोडे । सकळ जनांसि ॥११९॥
इतिश्री ग्रामगीता
ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत ।
सामुदायिक जीवन
कथित । अडतिसावा अध्याय संपूर्ण ॥१२०॥
अध्याय३८वाऑडीओ स्वरुपात --
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा