.

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

हे गुरूदेव ! हम सबको सदबुध्दी दे ,सतकर्तव्य करनेकी प्रवृत्ति दे ,सच बोलनका अभ्यास दे ,सतस्वरूप का ग्यान दे । हे जगदव्यापी परमेश्वर ! हम हर मनुष्य मात्र से प्रेमका,सत्यताका,बंधुत्व- -भावका आचरण करे और सुख दुखःमे सम रहे,ऐसी हमको शक्ती दे,युक्ती दे और भक्ती दे । हे सर्वधर्ममें,सर्व संतमे,समस्त संसार में,रममाण होनेवाले चैतन्यघन!हम तेरे लिए,तेरे देश के लिए,हर जीव जंतु के लिए,कुटीलताका,अनैत्तिकताका,छलछिद्र द्रोहताका त्याग करे ऐसा साहस दे । हे भगवान! अंतमे तुझमें समरस हो जाये यह हमारा ध्येय हैं,उद्देश है । इसके लिये तुझको स्मरके निश्चय करते है, प्रतिज्ञा करते है । हे विश्व धर्मको नियमन करनेवाले परमात्मा !जहाँभी,जिधरभी,हममें कुछ कमी दिखती हो,उसमे हमारा ध्यान लगाकर,उस चिज को,उस कार्यको,पुरा करने में हम अपना स्वराज्य समझते है , सूराज्य समझते है ।यह समझने की और कर्तव्य करनेकी हमको प्रियता दे,शक्ती दे ,वरदान दे

मंगळवार, ६ जून, २०१७

अध्याय ३८ वा ग्राम-कुटुंब



अध्याय ३८ वा

ग्राम-कुटुंब

 

 

श्रोते आत्मबोधीं रंगले । म्हणती हेंचि पाहिजे कथिलें ।

 साधुसंतीं हेंचि सांगितलें । सर्व जनांसि ॥१॥

 

धन्य धन्य आत्मबोध । ऐकतां होय ब्रह्मानंद ।

येथे गांवसेवेची ब्याद । कासयासि सांगावी ॥२॥

 

ऐसी श्रोत्यांची धारणा । ऐका आता समाधाना ।

एकाग्र करोनिया मना । सर्व जनहो ! ॥३॥

 

माझ्या जिवींचें मनोगत । मी सांगतों आता सत्य ।

 ग्रामगीतेचा मतितार्थ । यांतचि आहे सर्वहि ॥४॥

 

माझाच नव्हे हा विचार । सर्व संतग्रंथांचा सार ।

महात्म्यांची तळमळ अपार । तेंच वर्म कथितों मी ॥५॥

 

आपण त्यांचे वाचता ग्रंथ । आत्मबोध ऐकता सतत ।

 परंतु त्यांचें काय हृदगत । दुर्लक्ष झालें तयाकडे ॥६॥

 

जगीं ज्यांनी घेतला स्वानुभव । ज्यांनी जाणलें मूळतत्त्व ।

 त्या सर्वांचा एकचि भाव । व्हावेत सर्व लोक सुखी ॥७॥

 

अवघाचि संसार व्हावा सुखी । मंगलता निघो सर्वांमुखीं ।

 खळदुर्जनांचीहि दृष्टि निकी । व्हावी सर्वथा ॥८॥

 

मित्रता नांदावी सर्वजनीं । उणीव न दिसावी कोठे कोणी ।

 जी जी इच्छा करिती प्राणी । व्हावी पूर्ण ती न्यायें ॥९॥

 

नको कोठेहि द्वेषवैर । न उरो कोठे हाहा:कार ।

 दंभ मत्सर अत्याचार । अनाचार न राहो ॥१०॥

 

लया जावो जगाचा भेद । परस्परपोषक होवोत वाद ।

नांदो आनंदी आनंद । सगळीकडे सर्वदा ॥११॥

 

हीच तळमळ रात्रंदिनीं । सारखी होती तयांचें मनीं ।

जगीं जे झाले थोर कोणी । महापुरुष कोठेहि ॥१२॥

 

त्यांनी कथिलें आत्मज्ञान । तेंहि सुखी कराया जन ।

आत्मवत जाणावें सर्वांसि म्हणोन । प्रत्येकाने ॥१३॥

 

त्यांनी वर्णिलें ईश्वर-भजन । तेंहि शुध्द व्हावया मन ।

 पाहावीं देवाचीं लेकरें समान । म्हणोनिया ॥१४॥

 

त्यांनी कथिलें त्यागवैराग्य । तेंहि जग न मानतां भोग्य ।

 निष्काम सेवेने पावावें भाग्य । याचसाठी ॥१५॥

 

भूतदया परोपकार । दानधर्म यज्ञादि अपार ।

याद्वारें दु:खितांसि आणावें वर । अधिक तें तें देवोनि ॥१६॥

 

करावी समाजीं समानता । म्हणोनीच हीं साधनें तत्त्वता ।

 तीर्थादिद्वारें सामुदायिकता । शिकविली साधुसंतांनी ॥१७॥

 

एकमेकांमुखीं काला द्यावा । समानभावें भात खावा ।

 सोनें वाटोनि स्नेह वाढवावा । ऐशा प्रथा कितीतरी ॥१८॥

 

सर्वांमाजीं एकचि भाव । आकुंचित न व्हावा मानव ।

सामुदायिक वृत्तीने करावें सर्व । विश्वचि सुखी ॥१९॥

 

सर्व मिळोनि एकत्वें रहावें । सर्वांनी सर्वांस चालवावें ।

 सर्व भूत-हितीं रत व्हावें । ऐसेंचि वचन गीतेचें ॥२०॥

 

वेदापासूनि हाच घोष । समानसुखें नांदावा मानववंश ।

 सर्व धर्मांचा हाच उद्देश । जिव्हाळयाचा ॥२१॥

 

परंतु हें सारें पडलें पचनीं । मानव राहिला मागासलेपणीं ।

 करमणूक झाली संत-वाणी । उच्च ज्ञानाची ॥२२॥

 

एक एकाचे घेवोनि शब्द । करिती चर्चा वितंडवाद ।

 जीवनीं उतरायाचा बोध । त्यासि नाही ठाव कोठे ॥२३॥

 

संतांनी कथिलें ब्रह्मज्ञान । विशाल व्हाया मानवी मन ।

 सर्वांनी राहाया समान । परस्पर-सहकार्यें ॥२४॥

 

परि तें राहिलें नुसतें मुखीं । स्वार्थाचीच वाढली शेखी ।

 आपुला शेजारी मरो दु:खीं । नाही चिंता आज कोणा ॥२५॥

 

चर्चेसाठी तत्त्वज्ञान । आणि चैनीसाठी जीवन ।

 ऐसें घेतलें भिन्नपण । मानवांनी वाउगें ॥२६॥

 

तेणें संतऋषींचा हेतु । ग्रासूनि गेला राहूकेतु ।

राम गेला बांधूनि सेतु । गोटे राहिले जैसे-तैसे ॥२७॥

 

त्यांना सांगावी संत-कहाणी । हाडें दिलीं दधीचींनी ।

जनसेवेसाठी ऋषिमुनि । रात्रंदिवस कष्टले ॥२८॥

 

दामाजींनी सुखविलें जना । त्यांतचि तृप्ति नारायणा ।

 संत दादू करी पिंजणा । सेवाभावें ॥२९॥

 

हातीं घेवोनि तूपवाटी । नामदेव लागे श्वानापाठीं ।

संतोषवी जगीं जगजेठी । कपडे शिवोनि ॥३०॥

 

सावतोबांनी शेत पिकविलें । चोखोबांनी गांव झाडलें ।

 लोकसेवेचें महत्व कथिलें । सर्व संतांनी ॥३१॥

 

कबिरांनी विणले शेले । जातिधर्मादि भेद निरसले ।

हें सर्व जरी सांगितले । तरी जाग नये त्यांसि ॥३२॥

 

ते म्हणती हें साधूंकरितां । आम्ही प्रापंचिक सर्वथा ।

आम्हां पाप्यांसि त्या कथा । ऐकल्याने पुण्य लाभे ॥३३॥

 

आम्ही सकळांसाठी जन्मलों । सर्व मिळोनि राहाया आलों ।

 परस्परांशीं पाहिजे पूरक झालों । हें न कळे तयां ॥३४॥

 

तेणें ग्राम झालें कुग्राम । नाही परस्परांशीं निर्मल प्रेम ।

 सर्वांचे स्वार्थ वाढले बेफाम । आपुल्याचि व्यक्तित्वाचे ॥३५॥

 

एक लाडू करोनि खातो । तेथेचि दुजा उपाशी राहतो ।

हें आम्ही गांवोगांवीं पाहतों । मानती भूषण ते त्यासि ॥३६॥

 

एक हौसेने महाल करी । दुजास राहे घर कौलारी ।

 तिजास कुडाचीहि झोपडी बरी । पाहतां दिसेना ॥३७॥

 

एकास नाही जराहि वाव । एकास उधळपट्टीची हाव ।

 एक बसोनि भोगी वैभव । कष्ट करोनि दु:खी एक ॥३८॥

 

सदा एक-दुसर्‍यासि जळती । एक-दुजाचें वाभाडें काढिती ।

 किंवा नशिबावरि हात ठेविती । हांक देती देवासि ॥३९॥

 

कैसा होईल यांचा मिलाप कशाने फळेल संतसंकल्प 

कैसियाने होईल विश्वरूप । सुखी हें सारें ॥४०॥

 

यासाठी अनेक महात्मे झटले । परि जगाचें दु:ख नाही मिटलें ।

 उपदेश त्यांचे नाही उतरले । लोकजीवनीं म्हणोनिया ॥४१॥

 

यासाठी शोधिला पाहिजे उपाय । जेणें जगीं सुखशांति राहे ।

 महापुरुषांचें समाधान होय । विचारूं तैसें ॥४२॥

 

ऐसे संकल्प उठतां । लागलों कराया विचार तत्त्वता ।

 सापडला मार्ग निर्मळ हातां । ग्रामकुटुंबयोजनेचा ॥४३॥

 

उपदेश सुधारी कांही लोकां । परि समाजरचना देई धोका ।

 तेणें आणतां नये अनेकां । प्रत्यक्षांत संतबोध ॥४४॥

 

म्हणोनि समाज-रचना बदलावीं । संतबोधावरि मांडणी करावी ।

ब्रम्हज्ञानासि सक्रियता द्यावी । समत्व आणोनि जीवनीं ॥४५॥

 

देव एक असोनि अनंत झाला । नाना रूपें धरोनि नटला ।

परि तो पाहतां एकचि दिसला । तैसें व्हावें जनलोकीं ॥४६॥

 

एकाचें सुखदु:ख सर्वांसि । सर्वांचा उपयोग एकासि ।

घटकासि आणि विश्वासि । सांगड व्हावी सर्वथा ॥४७॥

 

सर्व विश्वचि माझें घर । ऐसें बोलिले संत ज्ञानेश्वर ।

 त्याचें प्रात्यक्षिक हें सुंदर । करावें ग्राम आपुलें ॥४८॥

 

गांवाची करावी आदर्श व्यवस्था । म्हणोनि कथिली ग्रामगीता ।

 ग्रामापासोनि पुढे वाढतां । विश्वव्यापी व्हावें ॥४९॥

 

जेथे गांवाचाच न कळे धर्म । तेथे विश्वधर्माचें कैचें वर्म ?

 हेंचि कळावया साधन सुगम । धरिलें गांवाचें ॥५०॥

 

मनुष्य ग्रामाचा संरक्षक । ग्राम देशासि पोषक ।

देश विश्वाचा घटक । ऐसें व्हावें यथार्थ ॥५१॥

 

मनुष्याचें सर्वस्व ग्राम आहे । त्याविण त्याला अस्तित्व नोहे ।

 ग्राम सर्वांगपूर्ण राहे । तरीच वैभव मानवाचें ॥५२॥

 

गांवीं एकाने माडी बांधली । सर्व घरें मोडून पडलीं ।

याने आमुची कीर्ति वाढली हें समजणें वेडेपणाचें ॥५३॥

 

खरा स्वार्थ तोचि करी । ज्याचा व्यवहार समाजा उध्दरी ।

 नाही भिन्नत्वाची उरी । जयामाजीं ॥५४॥

 

नाहीतरि उलट घडे । ऐसे चालत आले पोवाडे ।

श्रीमंत-गरीब हे आकडे । पुसले पाहिजेत या पुढती ॥५५॥

 

आपुला स्वार्थचि धरिला उरीं । पर्वा इतरांची न केली जरि ।

तेणें आपणांसहि शांति संसारीं । न साधेल कधी ॥५६॥

 

म्हणोनि ज्यासि दूरदृष्टि आली । त्याने हीच ठेवावी बोली ।

 देवाने ही दुनिया निर्मिली । सकळांसाठी ॥५७॥

 

हीच खरी विकासाची वाणी । जाणेल तोचि खरा ज्ञानी ।

 अभ्यास करावा सर्व लोकांनी । आतातरी ॥५८॥

 

हा अभ्यास नको शाब्दिक । बौध्दिक अथवा केवळ तात्त्विक ।

 जीवनचि करा सामुदायिक । ग्राम-जन हो ! ॥५९॥

 

त्यानेच साधेल संत-उद्देश । ईश्वरी संकल्प येईल फळास ।

 व्यवहारीं लाभेल ब्रह्मरस । सर्व गांवासि ॥६०॥

 

यावरि श्रोतीं विचारिलें । आपण सामुदायिकत्व सुचविलें ।

 परि त्याचें स्वरूप कळलें । नाही आम्हां ॥६१॥

 

तेंचि ऐका सविस्तर । परमार्थमय हा व्यवहार ।

जेणें गांवीं वैकुंठपूर । नांदूं लागे सहजचि ॥६२॥

 

शक्तिबुध्दिसत्ताधन । आज ज्याच्या जें स्वाधीन ।

 तो त्या त्या साधनें स्वार्थ साधून । लुटतो गांवा ॥६३॥

 

पाहती आपापल्या पुरतें । लाभ इच्छिती आइते ।

 इतर मेलियाची तेथे । पर्वा नाही कोणासि ॥६४॥

 

हें आकुंचितपण बाधक । पोसाया आपुले कुटुंबीय लोक ।

इतरांसि मागाया लावित भीक । नाना मार्गें ॥६५॥

 

म्हणोनि स्वरूप द्यावें सामुदायिक । सर्व गांवचि कुटुंब एक ।

 श्रमती खाती सर्वचि लोक । ऐसें दृश्य दिसावें ॥६६॥

 

गांवीं जेवढी शक्ति बुध्दि । तो सर्व गांवाचाचि निधि ।

 ऐसें होतां आधिव्याधि । नष्ट होतील सर्वचि ॥६७॥

 

आज मजुरां नाही शास्त्रीय ज्ञान । शास्त्रज्ञाअंगीं श्रमाची वाण ।

 तेणें वाढेल कैसें उत्पन्न । गांवाचें आमुच्या ॥६८॥

 

श्रम करितील सर्व मिळून । तरि पिकूं लागेल बरड जमीन ।

 मार्ग काढतील बुध्दिमान । नव्या नव्या शोधांनी ॥६९॥

 

सामुदायिक प्रयत्नांनी । सामर्थ्य वाढेल कणोकणीं ।

 जेथे नसे घोटभर पाणी । तेथे सरिता वाहूं लागे ॥७०॥

 

स्वच्छ पाण्याचें भरेल तळें । विहिरीजागोजागीं मळे ।

नदीचे प्रवाह होतील सगळे । शेतीसाठी उपयोगी ॥७१॥

 

नदी सागरीं मिळावी । तिची अपार शक्ति व्यर्थचि जावी ।

ऐसी ईश्वरी इच्छाचि नसावी । उपयोगी यावी सर्वांच्या ॥७२॥

 

तैसीच मानवी शक्तिबुध्दि । स्वार्थींच वाया न जावी कधी ।

 गांवीं नांदवाव्या ऋध्दिसिध्दी । नाना प्रयत्नें ॥७३॥

 

आमुचें गांवचि आमुचें घर । सर्व व्यवहार सगळयांवर ।

सर्वांचा सर्वांठायीं हातभार । असलाचि पाहिजे ॥७४॥

 

बुध्दिकामदेहपरिश्रम । कलाकामकौशल्यौद्यम ।

 ज्याचें असेल जें जें कर्म । तें तें वाहावें समाजा ॥७५॥

 

कोणी द्यावा आपुला धंदा । कोणी द्यावी सर्व संपदा ।

कोणी नोकरीचा पगार सर्वदा । समर्पावा या योजनेसि ॥७६॥

 

त्यांत असावे चांभार-कुंभार । त्यांत असावे सुतार-बेलदार शिक्षकशिंपीलोहारकलाकार । दाईसेविका सर्वचि ॥७७॥

 

शेती उत्तम कसणारे । शेतीची योजना जमविणारे ।

वैद्यकोष्टीविणणारे- । कापडसाडयासतरंज्या ॥७८॥

 

अजूनीहि जे गांवीं असती । त्यांची पाहिजे अधिक भरती ।

 त्या सर्वांची शक्तियुक्ति । संघटित व्हावी गांव-सेवे ॥७९॥

 

धन द्यावें धनवानांनी । भूमि द्यावी जमीनदारांनी ।

 श्रम द्यावेत मजुरांनी । सर्वतोपरीं आपुले ॥८०॥

 

बुध्दि द्यावी बुध्दिवंतांनी । कला द्यावी कलावंतांनी ।

सेवा करावी वैद्य-डॉक्टरांनी । आळसी कोणीं नसावें ॥८१॥

 

सर्व लोकांनी झीज सोसावी । गांवसोयीसाठी जागाहि द्यावी ।

 गरीबांचीं घरें दुरुस्त करावीं । गांव-खर्चाने ॥८२॥

 

देवळांच्या जमिनीपडीत खंडारें । वाटोनि द्यावें गरीबां सारें ।

व्यवस्था ठेवावी उत्तम प्रकारें । सर्वांच्याच जीवनाची ॥८३॥

 

सर्वांनी समयदान करावें । घरेंरस्तेहि सजवोनि द्यावे ।

 गांव नंदनवन बनवावें । सामुदायिक कष्टांनी ॥८४॥

 

कोणी नसावा गांवीं उपाशी । उद्योग द्यावे सकळ जनांसि ।

भीक मागण्याची प्रथा जराशी । नसावी गांवीं आमुच्या ॥८५॥

 

असो पुजारी वा पंडित । कामें करील जो उचित ।

 तोचि राहील या गांवांत । सर्वानुमतें सांगावें ॥८६॥

 

सर्वांनी सारखेंच काम करावें । आपुलाल्या कलेने बरवें ।

कष्टाविण कुणाला पोसावें । ऐसें नाही ॥८७॥

 

कष्ट करोनि वृध्द झाला । काम बदलोनि द्यावें त्याला ।

अथवा कोणी बिमार पडला । तरीच पोसावें सर्वांनी ॥८८॥

 

असो साधु भक्त विद्वान । त्यांनीहि न खावें कष्टाविण ।

उलट आदर्श दावावा झटून । सर्व लोकांसि ॥८९॥

 

मुखें भजावें गोविंदा । हातें करावा कामधंदा ।

 प्रेम ठेवावें सदासर्वदा । सर्वेश्वराठायीं ॥९०॥

 

आपुलालें काम करावें । सर्व लोकांशीं इमानदार व्हावें ।

 घेणें देणें सर्वचि करावें । प्रांजळ बुध्दि धरोनि ॥९१॥

 

जैसा गोरा कुंभार मडकीं करी । नित्य उच्चारी हरिहरि ।

परि मडकियांत बैमानी धरी । ऐसें कल्पान्तीं घडेना ॥९२॥

 

जनाबाई संत झाली । परि गोवर्‍या वेचणें नाही भुलली ।

तैसीच चोख्याने भक्ति केली । ढोरें ओढतां ग्रामाची ॥९३॥

 

खरा नाथ भक्तिवान । देई मागासल्यांना ज्ञान ।

 खाऊं घाली पितरांचें अन्न । कष्टकर्त्या दीनजना ॥९४॥

 

एका पैचा न चुको हिशेब । म्हणोनि जागेनसोनि लोभ ।

संतोषला पद्मनाभ । पाणी पाजतां गाढवासि ॥९५॥

 

हेचि त्यांची खरी भक्ति । स्वयें बोलला जगत्पति ।

नाचे सावत्याच्या मळयाप्रति । नेटकें काम बघोनि ॥९६॥

 

ऐसें घडलें पाहिजे साचें । काम करोनि ग्रामाचें ।

 त्यांत ठेवावें भक्तिरसाचें । हृदय आपुलें ॥९७॥

 

जे जे गांवीं भिन्न उद्योग । त्यांचा जुळवावा संयोग ।

 ठराविक जागीं नाना प्रयोग । चालवावे गांवांत ॥९८॥

 

आपल्या कामाचा ठरला वेळ । सर्वांनी झटावें लावोनि बळ ।

चिंता करूं नये वेडगळ । भलतियाचि ॥९९॥

 

जो जो असे आपुला धंदा । तल्लीन राहावें कामांतचि सदा ।

 ठरल्या वेळीं व्यवसायाबंधा । सोडूनि द्यावें सर्वांनी ॥१००॥

 

नियमित वेळीं काम करावें । नियमितपणें खेळ खेळावे ।

 नियमित समयीं प्रार्थने जावें । सर्व मिळोनि ॥१०१॥

 

एरव्ही सामुदायिक जीवन । हेचि प्रार्थना असे महान ।

 गांवासाठी कष्टावें पूर्ण । सेवाभावाने ॥१०२॥

 

काय नाही आपल्या गांवीं । याची चौकशी असावी ।

 नसेल ती साजवावी । पुष्पवाटिका ग्रामासि ॥१०३॥

 

गांव-जीवनासि जें आवश्यक । त्याची मागावी नलगे भीक ।

 ऐसें सर्वांनी श्रमोनि करावें ठीक । जीवन सारें ॥१०४॥

 

कोणी गांवास्तव जोडे शिवी । कोणी कपडे शिवोनि पाठवी ।

कोणी लोखंडी कामेंहि बरवीं  । पाठवी वस्तुभांडारीं ॥१०५॥

 

कोणी कपडा विणूनि आणावा । कोणी नवारीदोर द्यावा ।

 लाकडी कामें करोनि बरवा । आणतो कोणी ॥१०६॥

 

कोणी महिनोगणती शेती करी । हंगाम होतां आणी दरबारीं ।

 प्रत्येक ऋतूचि तुरी-बाजरी । तांदूळ आदि सामुग्री ॥१०७॥

 

धान्य उपजवावें सर्वतोपरीं । जें जें लागे गांवीं घरीं ।

दुसरीकडोनि न घ्यावी माधुकरी । हेंचि उत्तम ॥१०८॥

 

जें जें आपुल्या गांवीं होतें । आपणचि वापरावें सामान तें ।

 उरलेलें विकावें भोवतें । भिन्न गांवीं ॥१०९॥

 

सर्व गांवाचें एक दुकान । सर्वांच्या सहकार्याचें प्रदर्शन ।

 फायदा झालियाचें धन । सर्वांच्याचि मालकीचें ॥११०॥

 

सर्वचि धन हें सर्वांचें । हे उद्योगहि सकळिकांचे ।

हें भुवन प्रत्येकाचें । ग्रामचि आहे ॥१११॥

 

म्हणोनि सर्व एकत्र करावें । ज्याचें काम त्याला द्यावें ।

 उणें असता अधिक मागावें । जास्त द्यावें खजिन्यामाजीं ॥११२॥

 

अहो ! पैशांचें तोंड काळें । सर्व आपुल्याच गांवीं मिळे ।

 न मिळतां प्रयत्नबळें । तैसें करूं ग्राम आमुचें ॥११३॥

 

आमुच्या गांवींचें सर्व धन । ग्रामवासियांचें सुखस्थान ।

आम्ही सर्वचि मिळोन । करूं स्वर्ग गांवासि ॥११४॥

 

याहीवरि उणें पडे । तरि मागूं देश-पित्याकडे ।

पूर्ण कराया पोवाडे । गांवाचे आमुच्या ॥११५॥

 

ग्रामों जरि अधिक उरे । तरि देऊं परगांवीं संतोषभरें ।

यांत तिळभरि अंतर न शिरे । कल्पान्तींहि ॥११६॥

 

आधी ग्राम असावें सुखी । कोणी न व्हावीं कोणाशीं पारखीं ।

 सर्व कामें गांवींच निकीं । करूं आम्ही ॥११७॥

 

याच दृष्टीला धरोन नामी । व्याप्ति करूं विश्वाची आम्ही ।

 लावावया मानवता कामीं । सकळिकांची ॥११८॥

 

ज्या ज्या मार्गें ऐसें घडे । तोचि धर्म तेंचि ज्ञान रोकडें ।

 तुकडया म्हणे समाधान जोडे । सकळ जनांसि ॥११९॥

 

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत ।

सामुदायिक जीवन कथित । अडतिसावा अध्याय संपूर्ण ॥१२०॥





अध्याय३८वाऑडीओ स्वरुपात --



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

।।जय गुरुदेव।।