.

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

हे गुरूदेव ! हम सबको सदबुध्दी दे ,सतकर्तव्य करनेकी प्रवृत्ति दे ,सच बोलनका अभ्यास दे ,सतस्वरूप का ग्यान दे । हे जगदव्यापी परमेश्वर ! हम हर मनुष्य मात्र से प्रेमका,सत्यताका,बंधुत्व- -भावका आचरण करे और सुख दुखःमे सम रहे,ऐसी हमको शक्ती दे,युक्ती दे और भक्ती दे । हे सर्वधर्ममें,सर्व संतमे,समस्त संसार में,रममाण होनेवाले चैतन्यघन!हम तेरे लिए,तेरे देश के लिए,हर जीव जंतु के लिए,कुटीलताका,अनैत्तिकताका,छलछिद्र द्रोहताका त्याग करे ऐसा साहस दे । हे भगवान! अंतमे तुझमें समरस हो जाये यह हमारा ध्येय हैं,उद्देश है । इसके लिये तुझको स्मरके निश्चय करते है, प्रतिज्ञा करते है । हे विश्व धर्मको नियमन करनेवाले परमात्मा !जहाँभी,जिधरभी,हममें कुछ कमी दिखती हो,उसमे हमारा ध्यान लगाकर,उस चिज को,उस कार्यको,पुरा करने में हम अपना स्वराज्य समझते है , सूराज्य समझते है ।यह समझने की और कर्तव्य करनेकी हमको प्रियता दे,शक्ती दे ,वरदान दे

मंगळवार, ६ जून, २०१७

अध्याय ४ था संसार-परमार्थ



अध्याय ४ था    

श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज
(अधिक  माहिती साठी फोटोवर क्लिक  करा )

 संसार-परमार्थ

मागे झालें निरूपण ! चार आश्रमांचें वर्णन ।

त्यांतील तत्त्व आहे सनातन । सर्वांसाठी ॥१॥

 

त्यांची करूं जातां योजना । उत्तम चाले समाजधारणा ।

ऐहिक उत्कर्ष अधात्मसाधना । सर्वांसि साधे ॥२॥

 

व्यक्तीचीहि पूर्ण उन्नती । समाजाची उत्तम स्थिती ।

आश्रमधर्मीं साधे निश्चती । आजहि सर्व ॥३॥

 

लहानपणी ब्रह्मचर्य पाळावें । गुरुघरीं विद्यार्जन करावें ।

पुढे मग्न करोनि निभवावें । पुत्रपौत्रां ॥४॥

 

ब्रह्मचर्यें घ्यावी धर्मसंथा । गृहस्थें साधावी अर्थव्यवस्था ।

काम जिंकणें वानप्रस्था । मुक्त व्हावया ॥५॥

 

पुत्र कामाकाजीं लागलें । की वैराग्य घ्यावें आपण भलें ।

सेवासाधनार्थ सोडिलें । पाहिजे घर ॥६॥

 

करावी ग्रामसेवा ज्ञानसेवा । वानप्रस्थवृत्ति बाणवूनि जीवा ।

आणी मोक्षासाठी साधावा । संन्यासभाव ॥७॥

 

संन्यासी सर्वांसीच होणें आहे । त्याविण नाही मोक्षाची नाही सोय । 

मोक्षावांचूनि तरणोपाय । दुसरा कोठे ॥८॥

 

वासना हाचि भवसागर । आसक्ति हाच खरा संसार।

ज्ञानें त्यांचा पावणें पार । हाचि मोक्ष ॥९॥

 

झाला वासनेचा नाश । त्यासीच नाम असे संन्यास ।

मग त्यांचें सर्व करणें निर्विष । आदर्श लोकीं ॥१०॥

 

मुक्त तो वासनेंतूनि मोकळा । कोठे नाही आसक्तीचा लळा ।

ओळखोनी आत्मस्वरूपी सकळा । विलीन होई ॥११॥

 

हीच जगाची अंतिम धारणा । कर्म कराया निर्मळ बाणा ।

यांतचि वसते उपासना । उध्दाराची ॥१२॥

 

ही भूमिका ज्यासी गवसली । त्यांची कर्मे योगरूप झालीं ।

ही संन्यासदशा साधिली । पाहिजे सर्वांनी ॥१३॥

 

चौथा आश्रम वृध्दपण । ऐसें असले जरी वचन ।

तरी या आत्मविकासासि बंधन । लागु नसेचि वयाचें ॥१४॥

 

हें सर्वकांहि वृत्तीवरि । वृत्तीच करावी लागें सुसंस्कारी ।

बाह्यदीक्षा सहायकारी । म्हणोनि वर्णिली धर्मग्रंथीं ॥१५॥

 

कल्पिले आयुष्याचे चार भाग । भोगांतूनि साधाया त्याग ।

परि शतवर्षाचें आयुष्य अव्यंग । कोणास लाभे ॥१६॥

 

म्हणोनि प्रथा न पाहतां दीक्षांची । तत्त्वें चारहि आश्रमाची ।

आचरावीं जीवनीं साची । तातडीने सर्वांनी ॥१७॥

 

मात्र ज्या क्षणी वैराग्य आलें । तेव्हांचि घर सोडुनि पळालें ।

ऐसेंहि नाही पाहिजे केले । वेडयापरी ॥१८॥

 

कोणी वैराग्य येतां घर सोडती । तीर्थाटनीं भटकाया जाती ।

जीवन दुसर्‍यावरि जगविती । भीक मागती दारोदारीं ॥१९॥

 

पुन्हा वाढती क्रोध कामभाव । भोगूनि दुःख पाहूनि गौरव ।

संसाराचा पुन्हा प्रभाव । पडे त्यांवरि ॥२०॥

 

यासाठी दीक्षा संस्कारें घेणें । उचित जीवाच्या प्रगतीकारणें ।

परि बहिरंग दीक्षेचें सोंग धरणें । व्यर्थचि आहे ॥२१॥

 

माझा विश्वास आहे संस्कारावरि । परि व्यवस्था लागते तैशापरीं ।

नाहीपेक्षा उपेक्षाचि बरी । ऐशा दीक्षेची ॥२२॥

 

मग तो असो आश्रमदीक्षा । संप्रदायदीक्षा गुरूदीक्षा ।

व्रत्तदीक्षा वा कार्यदीक्षा । धर्मदीक्षेसहित ॥२३॥

 

दीक्षेने मन तयार होतें । परि कर्म पाहिजे नित्य केलें तें ।

आचराविण फजीती होते । दीक्षितांची ॥२४॥

 

एकादशीची घेतली दीक्षा । भोजन करी मागोनि भिक्षा ।

लोक पाहूनि हा तमाशा । हासती वेडा म्हणोनिया ॥२५॥

 

दीक्षा घेतली व्रतबंधाची । नाही संध्या नित्यनेमाची ।

काय करावी संस्कारांची । व्यवस्था तेथे ॥२६॥

 

ब्रह्मचर्याची दीक्षा घेतली । संयमदृष्टीच बिघडली ।

तैसीच गृहस्थाश्रमाची झाली । उलटी रीति ॥२७॥

 

आश्रमपण निघोन गेलें । तमाशाचे भाव वाढले ।

तत्त्वाविण सामर्थ्य कुठलें । दीक्षेमाजी ॥२८॥

 

वानप्रस्थ म्हणोनि घर सोडलें । बाहेर व्यापार करूं लागले ।

संन्यासी मानासाठी झगडले । तरि ते व्यर्थ ॥२९॥

 

घातली भगवीं वस्त्रें अंगावरि । परि क्रोध भरला अंतरी बाहेरीं ।

 लंगोटीसाठी झगडा करी । यजमानापाशीं ॥३०॥

 

चुंगी मागूनि धन जमवी । झोपडी बांधूनि वैभवें सजवी ।

 राख फासूनि संन्यासी म्हणवी । दासचि तो संसाराचा ॥३१॥


न सुटे झोपडीचा अभिमान । मांजरी -श्वानावरि प्रेम पूर्ण ।

 वेळ न फावे ब्रह्मज्ञान । सांगावया अनुभवावया ॥३२॥

 

ही कसली आहे दीक्षा । नाही सेवा नाही तितिक्षा ।

पशूजैसे शोधती भक्ष्या । मागती भिक्षा चैनीसाठी ॥३३॥

 

जी दीक्षा जयाने घ्यावी । त्याने ती पथ्थे सांभाळावीं ।

वृत्ति वाकडी होऊं न द्यावी । वाईट कर्मीं ॥३४॥

 

नाहीपेक्षा ऐसेंचि जगावें । काम करोनि न्यायें वागावें ।

नांव बदनाम होऊं न द्यावें । दीक्षा घेऊनि कोणती ॥३५॥

 

सुखें संसार करावा । साधेल तैसा परोपकार ।

चारहि आश्रमांचा सार । आचरणीं आणावा ॥३६॥

 

बायकामुलांची चिंता लागली । म्हणोनि वैराग्याची दीक्षा घेतली ।

 तें वैराग्य नव्हे कुचराई केली । सोंग घेवोनि वैराग्याचें ॥३७॥

 

एका साधकास वैराग्य आलें । त्याने घरदार सोडूनि दिलें ।

लंगोटी लावून स्नान केलें । अरण्यामाजी ॥३८॥

 

रोज रोज स्नान करी । लंगोटी सुकवी झाडावरि ।

तेथे उंदीर जाऊनि कातरी । लंगोटी त्याची ॥३९॥

 

तो लंगोटी मागाया गांव जाय। म्हणे काय करावा उपाय ?

 लंगोटी आमुची खाऊनि जाय । उंदीरराजा ॥४०॥

 

लोकांनी बैराग्यास सुचविलें । तेथे पाळा मांजरीची पिलें ।

 म्हणजे लंगोटी राखाया झाले । सेवकचि ते ॥४१॥

 

घेतले बैराग्याने मना । आणलें मांजरीच्या धना ।

मग त्याची खाण्याची विवंचना । लागली मागे ॥४२॥

 

लोक म्हणती गायी पाळा । म्हणजे त्यांचा निर्वाह सगळा ।

आपणांसहि मिळेल गोळा । दहीदूधलोण्याचा सात्विक ॥४३॥

 

तेंहि त्याच्या मना आलें । लोकांसि मागूनि गोधन केलें ।

पुढे चार्‍याची चिंता चाले । मनीं त्याच्या ॥४४॥

 

चार्‍या गवताची मागे भीक । लोक म्हणती बाबा ! हे दुःख ।

 करा तेथेचि शेती आणिक । थोडीबहू ॥४५॥

 

तेंहि पटलें त्याचे चित्तीं । मिळविली मनमाने शेती ।

राबविलीं गडीमाणसें पूर्ति । करावया तिची ॥४६॥

 

अधिकाधिक तेंचि केलें । धनधान्य जमा झालें ।

सांभाळायाचें कोडे पडले । मनामाजी ॥४७॥

 

कोण मिळेल इनामदार । नसावा ऐदी अथवा चोर ।

आपला म्हणोनि करील व्यवहार । ऐसा कोण शोधावा ॥४८॥

 

लोक म्हणती कोणीं ठरवावें बुवा म्हणे लग्नचि करावें ।

 म्हणजे होईल आता बरवें । धना मना सांभाळाया ॥४९॥

 

बिचार्‍याचे वैराग्य गेलें । पुन्हा संसारबंधन गळीं पडलें ।

 याचें कारण संस्कार पालटले । नव्हते पूर्वीहि ॥५०॥

 

म्हणोनि म्हणतों वैराग्यासाठी । घर सोडणें नको उठाउठी ।

त्यासाठी पाहिजे बुध्दि गोमटी । सेवाभावना त्यागवृत्ति ॥५१॥

 

आपुलें घर सोडूनि द्यावे । गांवचि घर समजोनि रहावें ।

सर्व गांवाचे काम करावें । देवसेवा म्हणूनि ॥५२॥

 

मनीं ठेवावें ईश्वरभजन । काम करावें गांवाचें पूर्ण ।

फुकाचें न करावें भोजन । वैराग्याने कधीहि ॥५३॥

 

वैराग्य अथवा संन्यासी बाह्य त्यागचि नको त्यासि ।

त्यागवृत्तीने गृहस्थासी । वैराग्य साधे संसारीं ॥५४॥

 

वैराग्य म्हणजे आसक्तित्याग । संग्रहत्याग उपभोगत्याग ।

 लागावी अंगी कार्यास आग । ग्रामसेवा करावया ॥५५॥

 

आपुल्या मुलासारखींच सर्व मुलें । होवोत ऐसें मनी आणिलें ।

त्यांच्या जोपासनेचें व्रत घेतलें । तोचि विरागी म्हणावा ॥५६॥

 

आपल्या अंगी असो फाटकें । परि गांवलोक राहोत नेटके ।

हें साधावया जो कवतुकें । कार्य करी जोमाने ॥५७॥

 

त्यासी म्हणावे वैरागी । जो सर्व लोभांचा परित्यागी ।

 सेवेसाठी कष्ट घे अंगी । नेहमीच लोकांच्या ॥५८॥

 

अनेक साधिती स्वावलंबन । दानी दुसर्‍यास पुरवी धन ।

जो सर्वस्व आपुलें दे अर्पोन । तोचि संन्यासी म्हणावा ॥५९॥

 

ऐसा संन्यास सर्वांनी घ्यावा । आधी आपुला प्रपंच सावरावा ।

मुरलिया फळापरी सुखवावा । समाज मग ॥६०॥

 

कांही मुलांनाच संन्यास देती । त्यांची असते कोवळी स्थिती ।

ते जंव भरवयांत येती । पापें करिती मनमाने ॥६१॥

 

संन्यास घेतलिया स्वयें । मग लग्नहि करितां नये ।

मग शोधती नाना उपाय । उपद्रव बनती गावांचा ॥६२॥

 

संन्याशाने संन्यास द्यावा । गांवकर्‍यांनी जाच सोसावा ।

ऐसा बुध्दिहीनपणा कां करावा । समाजाने ॥६३॥

 

म्हणोनि हें चूकचि आहे । तो संन्यास संन्यासचि नोहे ।

वानप्रस्थचि संन्यासी राहे । धोका न होय मुलांऐसा ॥६४॥

 

संन्यास म्हणजे थकता काळ । आत्मचिंतनी जीवा वेळ ।

आशीर्वाद मिळावा सकळ । जनलोकांसि ॥६५॥

 

परि ज्यांनी कष्टचि नाही केले । गृह्स्थी जीवन नाही अनुभविलें ।

 ते संन्यासी म्हणती झाले । आश्चर्य वाटे ! ॥६६॥

 

ही घडी जेव्हांपासूनि चुकली । ग्रामाग्रामाची फजिती झाली ।

 प्रजा सर्व भिके लागली । गृहस्थाश्रमाची ॥६७॥

 

झुंडच्या झुंड मुलें नेती । कोणी बैरागी संन्यासी करिती ।

आणि मग बोके होऊनि फिरती । लोकांमाजीं ॥६८॥

 

त्यांना नसतो सेवेचा आदर । नसतो कळला कांही व्यवहार ।

 मनास येईल तो उपकार । करितीं लोकीं ॥६९॥

 

म्हणोनि हें पाहिजे बदललें । अल्पवयीं न पाहिजे मुंडलें ।

त्यास अभ्यासोनीच काढलें । पाहिजे आधी ॥७०॥

 

कोणी असती महासंस्कारी । कोणी उपजत अनुभव -थोरी ।

त्यांनी इच्छेप्रमाणे संसारी । व्हावें न व्हावें ॥७१॥

 

त्यांना नसे आडकाठी । परि हें सुत्र नव्हे सर्वांसाठी ।

याने मोडेल परिपाठी । उत्तम गुणांची ॥७२॥

 

हें संतजनांनी जाणलें । म्हणोनीच कळवळोनि सांगितले ।

रांडापोरें सोडू नका बोलिलें । परमार्थासाठी ॥७३॥

 

करावा सुखाने संसार । करावा अतिथींचा सत्कार ।

बांधा सोपे माडया घर । उत्तम व्यवहारे धन जोडा ॥७४॥

 

वैराग्य वाढवा त्यांतूनि । सेवा परोपकार साधूनि ।

 रंगा सदाचारें भक्तिरगंणीं । हाचा राजमार्ग संतांचा ॥७५॥

 

ऐसेचि संती सांगितलें । कितीतरी संत ऐसेंचि वागलें ।

त्यानेच नांव अमर झालें । तयांचे लोकीं ॥७६॥

 

हें जाणूनि वागावें आपण । गृहस्थाश्रमचि उज्ज्वल करून ।

वैराग्याचें तत्त्व सांभाळून । लोकसेवा साधावी ॥७७॥

 

सवें घेवोनि आपुली पत्नी । सेवा करिती मिळोनी दोन्ही ।

हेचि आहे वैराग्याची निशाणी । संसारसंग सुटावया ॥७८॥

 

यांतूनचि प्रकटे खरा संन्यास । नाहीतरि अवघा त्रास ।

आपण न तरे न तारी कोणास । आसक्त नर ॥७९॥

 

आणि कोणी निरासक्त असला । संन्यास घेवोनि वनीं गेला ।

तोहि नाही उपयोग आला । समाजाच्या ॥८०॥

 

गृहस्थाश्रमासि नाही जाणलें । ज्याने त्याने मनानेच केलें ।

यानेच कार्य विस्कळीत झालें । समाजाचें ॥८१॥

 

गीतेने यथार्थ ज्ञान दिलें । परि तें जनमनाने नाही घेतलें ।

रूढीच्या प्रवाहीं वाहूं लागले । विसरले सर्वभूतहित ॥८२॥

 

ब्रह्मचारी अभ्यासचि करी । वानप्रस्थ वनींच विचरी ।

 संन्यासी निरासक्तीच्या भरी । विटाळ मानी जगाचा ॥८३॥

 

ऐसेचें झालें धोरण आजचें । त्यामुळे ओझें वाढलें गृहस्थाश्रमाचें ।

प्रत्येकाने प्रत्येकाचें । पूरकत्व सोडलें ॥८४॥

 

सर्वांनी सर्वचि सोडलें । परि गृहस्थाने अधिक जोडलें ।

कष्ट करितां करितां मोडलें । हाड त्याचें ॥८५॥

 

सर्वांनाचि मदत करावी । पुन्हा दीनताचि अंगी घ्यावी ।

वरोनि त्यासि म्हणे गोसावी । ’ लटका संसार छोड दे ’ ॥८६॥

 

हें सर्व सहन करोनी । आपुली हौस त्रास विसरोनि ।

जगाची राखी लाज देऊनि । धनमानादि ॥८७॥

 

स्वतः शरीराने राबावें । आपुलें जीवन आपण निभवावें ।

अधिकाधिक देतचि जावें । गांवासाठी ॥८८॥

 

साधु आला संत आला । राजा आला रंक आला ।

अतिथि पाहूणा भुकेला । सर्वांसाठी गृहस्थाश्रम ॥८९॥

 

करी आलेल्यांचा सत्कार । संतसाधूंचा सन्मान सुंदर ।

सार्वजनिक कामांचाहि बोझा वर । सांभाळीतसे प्रेमाने ॥९०॥

 

आला जातिदंड राजदंड । तोहि भरतसे उदंड ।

 मुंगीपासूनि सर्व ब्रह्मांड । जीवजन त्याचेवरि ॥९१॥

 

हें सर्व गृहस्थाश्रम करी । मुलेंबाळें पोसोनि घरीं ।

काटकसरीने उरवूनि करी । अन्न्दान नम्रतेने ॥९२॥

 

गृहस्थधर्म म्हणजे जबाबदारी । स्त्रीपुत्रांपरीच सर्वतोपरीं ।

 देश -भेष सांभाळणारी । वृत्ति असे त्याची ॥९३॥

 

येरव्ही असोत सर्व आश्रम । सर्वात मोठा गृहस्थधर्म ।

गृहस्थधर्मावरील योगक्षेम । चालतसे सर्वांचा ॥९४॥

 

ब्रह्मचर्याची शिक्षादीक्षा । वानप्रस्थांची तितिक्षा ।

संन्यासी ज्ञात्यांची समीक्षा । गृहस्थधर्माच्याचि योगें ॥९५॥

 

त्यासचि लोक फजूल म्हणती । आणि त्याचेवरीच जगती ।

 ही कैसी आहे रीति संसाराची ! ॥९६॥

 

म्हणोनि संती गृहस्थ गौरविला । धन्य धन्य म्हणितलें त्याला ।

तोचि जगाचा मातापिता ठरला । पालनपोषण करणारा ॥९७॥

 

त्याचे उपकार येरव्ही फिटेना । एकचि आहे त्याची साधना ।

 गृहस्थाचे पुत्र जाणा । शिकवोनि स्थानां बसवावे ॥९८॥

 

लहानपणींच आश्रमीं न्यावी मुलें । जैसे विश्वमित्रें रामलक्ष्मण नेले।

 सांदीपनी द्रोणांनी शिकविलें । तैसें विविध ज्ञान द्यावें ॥९९॥

 

माधुकरीपुरतेंचि गांवी न यावें । गांवाचें जीवन सुधारावें ।

घृणा करितां नरकी जावें । लागेल अहंकारें ॥१००॥

 

जोंवरि हवें आहे शरीर । आवश्यक वाटे अन्नवस्त्र ।

न म्हणावा मिथ्या संसार । सेवा करावी सर्वांची ॥१०१॥

 

गुरु म्हणोनि न गुरगुरांवें । आत्मवत सर्वांसि जाणावें ।

उठण्या बसण्यापासूनि शिकवावें । आईसारिखें अज्ञजना ॥१०२॥

 

आपापलें कार्य सर्वांनी करावें । परस्परांना पूरक व्हावें ।

 म्हणजे जगाचें ओझें जावें । झेललें सहज ॥१०३॥

 

आश्रमांनी मुलें शिकवावी । गृहस्थांनी मदत पुरवावी ।

मुलें वाढतां पित्याने घ्यावी । परवानगी पुत्रांची ॥१०४॥

 

जावें देशपर्यटनीं । अथवा राहावें ग्रामसुधारणीं ।

पुढे संन्यासीहि होऊनी । सेवाभावेंचि वागावें ॥१०५॥

 

आपलें पोट सर्वांनी भरावें । वृत्तीसि कार्यें वाढवीत न्यावें ।

 म्हणजे गृहस्थावरि अवलंबावें । ऐसें नव्हे ॥१०६॥

 

आपपलें कार्य सांभाळावें । जीवमात्रासि संतुष्ट करावें ।

कोणीच कोणावरि न राहावें । विसंबोनि ॥१०७॥

 

मग पुढे सर्वचि आहे सेवा । कार्य करावें जीवाभावां ।

उरला असेल तो सगळा ठेवा । वाटूनि द्यावा गांवासि ॥१०८॥

 

कोण कोण देतो सेवाधन । आपुलें कार्य सांभाळून ।

यावरीच खरें महिमान । लौकिकाचें आपुल्या ॥१०९॥

 

ऐसी आहे परंपरा । जेणें चाले जगाचा पसारा ।

वेगवेगळ्या कामांचा बटवारा । सारखाचि व्हावा ॥११०॥

 

जेथे सर्वांसीच काम करणें । कोणीच उत्तम कनिष्ट न म्हणे ।

सर्व मिळोनी जग साजविणें । आपुल्यापरीं ॥१११॥

 

मानावे सकलांचे आभार । करावा परस्परांसि पूरक व्यवहार ।

असो संन्यासी वा गृहस्थ नर । सारखा अधिकार सर्वाचा ॥११२॥

 

गृहस्थ तनुमनाने कष्ट करिती । संन्यासी त्यांना दिशा दाविती ।

मग कां उगेचि पायां पडती । एक -एकाच्या ॥११३॥

 

मला हें कांही उमजेना । कोणाचे उपकार आहेत कोणा 

सर्वचि आपापुल्या स्थांना । धन्य असती ॥११४॥

 

पुत्रधर्म पाळतां पुत्र श्रेष्ठ । पितृधर्म पाळतां पिता वरिष्ठ ।

तेथे म्हणावें श्रेष्ठ कनिष्ट कोणी कोणां ॥११५॥

 

पायां तयानेच पडावें । ज्याने आपुल्या कर्मासि चुकावें ।

नाहितरि प्रेम ठेवावें । परस्परांचे दोघांनी ॥११६॥

 

कोणी कोणासि न लेखावें हीन । तो असे सर्वेश्वराचा अपमान ।

अभिमानि संन्याशाहूनि महान । ठरे लीन पतिव्रता ॥११७॥

 

येरव्ही कोणाचाहि आदर । सर्वानी करावा होऊनि नम्र ।

 हा तंव आश्रमधर्माचा सार । अहंकार नसावा ॥११८॥

 

हीनतेची भावनाहि नसावी । निष्ठेने सत्कार्यें करावी ।

सहकार्य द्यावें आपुल्या गांवी । गृहस्थाने ॥११९॥

 

आपुला साधावा गृहस्थाश्रम । पाळावा ग्रामसेवाधर्म ।

गांवाकरितांच आपुला नेम । सांभाळावा ॥१२०॥

 

कष्ट करोनि धन जोडावें । तें धन सत्कार्यींच लावावें ।

कधीहि निरर्थक न वेचावें । छंदी कुणाच्या लागूनि ॥१२१॥

 

याचें मिळावया शिक्षण । व्हावें गांवोगांवीं कथाप्रवचन ।

वाढवावा गृहस्थाश्रमाचा मान । नीटनेटका करावया ॥१२२॥

 

नेटका ऐसा प्रपंच झाला । तरि परमार्थ त्यांतचि साधला ।

 हा समन्वय संतीं सांगितला । तोचि खरा ग्रामधर्म ॥१२३॥

 

आमुचा गॄहसंसारचि सार । आहे सहकार्याचें भांडार ।

 सर्व मिळोनि उजळूं सुन्दर । ग्रामधर्म आपुला ॥१२४॥

 

ग्रामधर्माचें महत्त्व थोर । त्यांत गृहस्थधर्मांचा मोठा अधिकार ।

महातीर्थाचें तीर्थ सुन्दर । तुकडया म्हणे ॥१२५॥

 

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु -शास्त्र -स्वानुभव संमत ।

निरूपला संसारांत परमार्थ । चौथा अध्याय संपूर्ण ॥१२६॥ 



अध्याय ४ थाऑडीओ स्वरुपात --







 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

।।जय गुरुदेव।।