अध्याय ४ था
संसार-परमार्थ
मागे झालें
निरूपण ! चार आश्रमांचें वर्णन ।
त्यांतील तत्त्व
आहे सनातन । सर्वांसाठी ॥१॥
त्यांची करूं
जातां योजना । उत्तम चाले समाजधारणा ।
ऐहिक उत्कर्ष
अधात्मसाधना । सर्वांसि साधे ॥२॥
व्यक्तीचीहि
पूर्ण उन्नती । समाजाची उत्तम स्थिती ।
आश्रमधर्मीं साधे
निश्चती । आजहि सर्व ॥३॥
लहानपणी
ब्रह्मचर्य पाळावें । गुरुघरीं विद्यार्जन करावें ।
पुढे मग्न करोनि
निभवावें । पुत्रपौत्रां ॥४॥
ब्रह्मचर्यें
घ्यावी धर्मसंथा । गृहस्थें साधावी अर्थव्यवस्था ।
काम जिंकणें
वानप्रस्था । मुक्त व्हावया ॥५॥
पुत्र कामाकाजीं
लागलें । की वैराग्य घ्यावें आपण भलें ।
सेवासाधनार्थ
सोडिलें । पाहिजे घर ॥६॥
करावी ग्रामसेवा
ज्ञानसेवा । वानप्रस्थवृत्ति बाणवूनि जीवा ।
आणी मोक्षासाठी
साधावा । संन्यासभाव ॥७॥
संन्यासी सर्वांसीच होणें आहे । त्याविण नाही मोक्षाची नाही सोय ।
मोक्षावांचूनि तरणोपाय ।
दुसरा कोठे ? ॥८॥
वासना हाचि
भवसागर । आसक्ति हाच खरा संसार।
ज्ञानें त्यांचा
पावणें पार । हाचि मोक्ष ॥९॥
झाला वासनेचा नाश
। त्यासीच नाम असे संन्यास ।
मग त्यांचें सर्व
करणें निर्विष । आदर्श लोकीं ॥१०॥
मुक्त तो
वासनेंतूनि मोकळा । कोठे नाही आसक्तीचा लळा ।
ओळखोनी
आत्मस्वरूपी सकळा । विलीन होई ॥११॥
हीच जगाची अंतिम
धारणा । कर्म कराया निर्मळ बाणा ।
यांतचि वसते
उपासना । उध्दाराची ॥१२॥
ही भूमिका ज्यासी
गवसली । त्यांची कर्मे योगरूप झालीं ।
ही संन्यासदशा
साधिली । पाहिजे सर्वांनी ॥१३॥
चौथा आश्रम
वृध्दपण । ऐसें असले जरी वचन ।
तरी या
आत्मविकासासि बंधन । लागु नसेचि वयाचें ॥१४॥
हें सर्वकांहि
वृत्तीवरि । वृत्तीच करावी लागें सुसंस्कारी ।
बाह्यदीक्षा
सहायकारी । म्हणोनि वर्णिली धर्मग्रंथीं ॥१५॥
कल्पिले
आयुष्याचे चार भाग । भोगांतूनि साधाया त्याग ।
परि शतवर्षाचें
आयुष्य अव्यंग । कोणास लाभे ? ॥१६॥
म्हणोनि प्रथा न
पाहतां दीक्षांची । तत्त्वें चारहि आश्रमाची ।
आचरावीं जीवनीं
साची । तातडीने सर्वांनी ॥१७॥
मात्र ज्या क्षणी
वैराग्य आलें । तेव्हांचि घर सोडुनि पळालें ।
ऐसेंहि नाही
पाहिजे केले । वेडयापरी ॥१८॥
कोणी वैराग्य
येतां घर सोडती । तीर्थाटनीं भटकाया जाती ।
जीवन दुसर्यावरि
जगविती । भीक मागती दारोदारीं ॥१९॥
पुन्हा वाढती
क्रोध कामभाव । भोगूनि दुःख पाहूनि गौरव ।
संसाराचा पुन्हा
प्रभाव । पडे त्यांवरि ॥२०॥
यासाठी दीक्षा
संस्कारें घेणें । उचित जीवाच्या प्रगतीकारणें ।
परि बहिरंग
दीक्षेचें सोंग धरणें । व्यर्थचि आहे ॥२१॥
माझा विश्वास आहे
संस्कारावरि । परि व्यवस्था लागते तैशापरीं ।
नाहीपेक्षा
उपेक्षाचि बरी । ऐशा दीक्षेची ॥२२॥
मग तो असो
आश्रमदीक्षा । संप्रदायदीक्षा गुरूदीक्षा ।
व्रत्तदीक्षा वा
कार्यदीक्षा । धर्मदीक्षेसहित ॥२३॥
दीक्षेने मन तयार
होतें । परि कर्म पाहिजे नित्य केलें तें ।
आचराविण फजीती
होते । दीक्षितांची ॥२४॥
एकादशीची घेतली
दीक्षा । भोजन करी मागोनि भिक्षा ।
लोक पाहूनि हा
तमाशा । हासती वेडा म्हणोनिया ॥२५॥
दीक्षा घेतली
व्रतबंधाची । नाही संध्या नित्यनेमाची ।
काय करावी
संस्कारांची । व्यवस्था तेथे ? ॥२६॥
ब्रह्मचर्याची
दीक्षा घेतली । संयमदृष्टीच बिघडली ।
तैसीच
गृहस्थाश्रमाची झाली । उलटी रीति ॥२७॥
आश्रमपण निघोन
गेलें । तमाशाचे भाव वाढले ।
तत्त्वाविण
सामर्थ्य कुठलें । दीक्षेमाजी ? ॥२८॥
वानप्रस्थ
म्हणोनि घर सोडलें । बाहेर व्यापार करूं लागले ।
संन्यासी
मानासाठी झगडले । तरि ते व्यर्थ ॥२९॥
घातली भगवीं
वस्त्रें अंगावरि । परि क्रोध भरला अंतरी बाहेरीं ।
लंगोटीसाठी झगडा करी । यजमानापाशीं ॥३०॥
चुंगी मागूनि धन
जमवी । झोपडी बांधूनि वैभवें सजवी ।
राख फासूनि संन्यासी म्हणवी । दासचि तो संसाराचा
॥३१॥
न सुटे झोपडीचा
अभिमान । मांजरी -श्वानावरि प्रेम पूर्ण ।
वेळ न फावे ब्रह्मज्ञान । सांगावया अनुभवावया
॥३२॥
ही कसली आहे
दीक्षा । नाही सेवा नाही तितिक्षा ।
पशूजैसे शोधती
भक्ष्या । मागती भिक्षा चैनीसाठी ॥३३॥
जी दीक्षा जयाने
घ्यावी । त्याने ती पथ्थे सांभाळावीं ।
वृत्ति वाकडी
होऊं न द्यावी । वाईट कर्मीं ॥३४॥
नाहीपेक्षा
ऐसेंचि जगावें । काम करोनि न्यायें वागावें ।
नांव बदनाम होऊं
न द्यावें । दीक्षा घेऊनि कोणती ॥३५॥
सुखें संसार
करावा । साधेल तैसा परोपकार ।
चारहि आश्रमांचा
सार । आचरणीं आणावा ॥३६॥
बायकामुलांची
चिंता लागली । म्हणोनि वैराग्याची दीक्षा घेतली ।
तें वैराग्य नव्हे कुचराई केली । सोंग घेवोनि
वैराग्याचें ॥३७॥
एका साधकास
वैराग्य आलें । त्याने घरदार सोडूनि दिलें ।
लंगोटी लावून
स्नान केलें । अरण्यामाजी ॥३८॥
रोज रोज स्नान
करी । लंगोटी सुकवी झाडावरि ।
तेथे उंदीर जाऊनि
कातरी । लंगोटी त्याची ॥३९॥
तो लंगोटी मागाया
गांव जाय। म्हणे काय करावा उपाय ?
लंगोटी आमुची खाऊनि जाय । उंदीरराजा ॥४०॥
लोकांनी
बैराग्यास सुचविलें । तेथे पाळा मांजरीची पिलें ।
म्हणजे लंगोटी राखाया झाले । सेवकचि ते ॥४१॥
घेतले बैराग्याने
मना । आणलें मांजरीच्या धना ।
मग त्याची
खाण्याची विवंचना । लागली मागे ॥४२॥
लोक म्हणती गायी
पाळा । म्हणजे त्यांचा निर्वाह सगळा ।
आपणांसहि मिळेल
गोळा । दहीदूधलोण्याचा सात्विक ॥४३॥
तेंहि त्याच्या
मना आलें । लोकांसि मागूनि गोधन केलें ।
पुढे चार्याची
चिंता चाले । मनीं त्याच्या ॥४४॥
चार्या गवताची
मागे भीक । लोक म्हणती बाबा ! हे दुःख ।
करा तेथेचि शेती आणिक । थोडीबहू ॥४५॥
तेंहि पटलें
त्याचे चित्तीं । मिळविली मनमाने शेती ।
राबविलीं
गडीमाणसें , पूर्ति । करावया तिची ॥४६॥
अधिकाधिक तेंचि
केलें । धनधान्य जमा झालें ।
सांभाळायाचें
कोडे पडले । मनामाजी ॥४७॥
कोण मिळेल
इनामदार । नसावा ऐदी अथवा चोर ।
आपला म्हणोनि
करील व्यवहार । ऐसा कोण शोधावा ? ॥४८॥
लोक म्हणती कोणीं
ठरवावें ? बुवा म्हणे लग्नचि करावें ।
म्हणजे होईल आता बरवें । धना मना सांभाळाया ॥४९॥
बिचार्याचे
वैराग्य गेलें । पुन्हा संसारबंधन गळीं पडलें ।
याचें कारण संस्कार पालटले । नव्हते पूर्वीहि
॥५०॥
म्हणोनि म्हणतों
वैराग्यासाठी । घर सोडणें नको उठाउठी ।
त्यासाठी पाहिजे
बुध्दि गोमटी । सेवाभावना त्यागवृत्ति ॥५१॥
आपुलें घर सोडूनि
द्यावे । गांवचि घर समजोनि रहावें ।
सर्व गांवाचे काम
करावें । देवसेवा म्हणूनि ॥५२॥
मनीं ठेवावें
ईश्वरभजन । काम करावें गांवाचें पूर्ण ।
फुकाचें न करावें
भोजन । वैराग्याने कधीहि ॥५३॥
वैराग्य अथवा
संन्यासी बाह्य त्यागचि नको त्यासि ।
त्यागवृत्तीने
गृहस्थासी । वैराग्य साधे संसारीं ॥५४॥
वैराग्य म्हणजे
आसक्तित्याग । संग्रहत्याग उपभोगत्याग ।
लागावी अंगी कार्यास आग । ग्रामसेवा करावया ॥५५॥
आपुल्या
मुलासारखींच सर्व मुलें । होवोत ऐसें मनी आणिलें ।
त्यांच्या
जोपासनेचें व्रत घेतलें । तोचि विरागी म्हणावा ॥५६॥
आपल्या अंगी असो
फाटकें । परि गांवलोक राहोत नेटके ।
हें साधावया जो
कवतुकें । कार्य करी जोमाने ॥५७॥
त्यासी म्हणावे
वैरागी । जो सर्व लोभांचा परित्यागी ।
सेवेसाठी कष्ट घे अंगी । नेहमीच लोकांच्या ॥५८॥
अनेक साधिती
स्वावलंबन । दानी दुसर्यास पुरवी धन ।
जो सर्वस्व
आपुलें दे अर्पोन । तोचि संन्यासी म्हणावा ॥५९॥
ऐसा संन्यास
सर्वांनी घ्यावा । आधी आपुला प्रपंच सावरावा ।
मुरलिया फळापरी
सुखवावा । समाज मग ॥६०॥
कांही मुलांनाच
संन्यास देती । त्यांची असते कोवळी स्थिती ।
ते जंव भरवयांत
येती । पापें करिती मनमाने ॥६१॥
संन्यास घेतलिया
स्वयें । मग लग्नहि करितां नये ।
मग शोधती नाना
उपाय । उपद्रव बनती गावांचा ॥६२॥
संन्याशाने
संन्यास द्यावा । गांवकर्यांनी जाच सोसावा ।
ऐसा बुध्दिहीनपणा
कां करावा । समाजाने ? ॥६३॥
म्हणोनि हें चूकचि आहे । तो संन्यास संन्यासचि नोहे ।
वानप्रस्थचि
संन्यासी राहे । धोका न होय मुलांऐसा ॥६४॥
संन्यास म्हणजे
थकता काळ । आत्मचिंतनी जीवा वेळ ।
आशीर्वाद मिळावा
सकळ । जनलोकांसि ॥६५॥
परि ज्यांनी
कष्टचि नाही केले । गृह्स्थी जीवन नाही अनुभविलें ।
ते संन्यासी म्हणती झाले । आश्चर्य वाटे ! ॥६६॥
ही घडी
जेव्हांपासूनि चुकली । ग्रामाग्रामाची फजिती झाली ।
प्रजा सर्व भिके लागली । गृहस्थाश्रमाची ॥६७॥
झुंडच्या झुंड
मुलें नेती । कोणी बैरागी संन्यासी करिती ।
आणि मग बोके
होऊनि फिरती । लोकांमाजीं ॥६८॥
त्यांना नसतो
सेवेचा आदर । नसतो कळला कांही व्यवहार ।
मनास येईल तो उपकार । करितीं लोकीं ॥६९॥
म्हणोनि हें
पाहिजे बदललें । अल्पवयीं न पाहिजे मुंडलें ।
त्यास अभ्यासोनीच
काढलें । पाहिजे आधी ॥७०॥
कोणी असती
महासंस्कारी । कोणी उपजत अनुभव -थोरी ।
त्यांनी
इच्छेप्रमाणे संसारी । व्हावें न व्हावें ॥७१॥
त्यांना नसे
आडकाठी । परि हें सुत्र नव्हे सर्वांसाठी ।
याने मोडेल
परिपाठी । उत्तम गुणांची ॥७२॥
हें संतजनांनी
जाणलें । म्हणोनीच कळवळोनि सांगितले ।
रांडापोरें सोडू
नका बोलिलें । परमार्थासाठी ॥७३॥
करावा सुखाने
संसार । करावा अतिथींचा सत्कार ।
बांधा सोपे माडया
घर । उत्तम व्यवहारे धन जोडा ॥७४॥
वैराग्य वाढवा
त्यांतूनि । सेवा परोपकार साधूनि ।
रंगा सदाचारें भक्तिरगंणीं । हाचा राजमार्ग
संतांचा ॥७५॥
ऐसेचि संती
सांगितलें । कितीतरी संत ऐसेंचि वागलें ।
त्यानेच नांव अमर
झालें । तयांचे लोकीं ॥७६॥
हें जाणूनि
वागावें आपण । गृहस्थाश्रमचि उज्ज्वल करून ।
वैराग्याचें
तत्त्व सांभाळून । लोकसेवा साधावी ॥७७॥
सवें घेवोनि
आपुली पत्नी । सेवा करिती मिळोनी दोन्ही ।
हेचि आहे
वैराग्याची निशाणी । संसारसंग सुटावया ॥७८॥
यांतूनचि प्रकटे
खरा संन्यास । नाहीतरि अवघा त्रास ।
आपण न तरे , न तारी कोणास । आसक्त नर ॥७९॥
आणि कोणी
निरासक्त असला । संन्यास घेवोनि वनीं गेला ।
तोहि नाही उपयोग
आला । समाजाच्या ॥८०॥
गृहस्थाश्रमासि नाही जाणलें । ज्याने त्याने मनानेच केलें ।
यानेच कार्य
विस्कळीत झालें । समाजाचें ॥८१॥
गीतेने यथार्थ ज्ञान दिलें । परि तें जनमनाने नाही घेतलें ।
रूढीच्या
प्रवाहीं वाहूं लागले । विसरले सर्वभूतहित ॥८२॥
ब्रह्मचारी अभ्यासचि
करी । वानप्रस्थ वनींच विचरी ।
संन्यासी निरासक्तीच्या भरी । विटाळ मानी जगाचा
॥८३॥
ऐसेचें झालें
धोरण आजचें । त्यामुळे ओझें वाढलें गृहस्थाश्रमाचें ।
प्रत्येकाने
प्रत्येकाचें । पूरकत्व सोडलें ॥८४॥
सर्वांनी सर्वचि
सोडलें । परि गृहस्थाने अधिक जोडलें ।
कष्ट करितां
करितां मोडलें । हाड त्याचें ॥८५॥
सर्वांनाचि मदत
करावी । पुन्हा दीनताचि अंगी घ्यावी ।
वरोनि त्यासि
म्हणे गोसावी । ’ लटका संसार छोड दे ’ ॥८६॥
हें सर्व सहन
करोनी । आपुली हौस त्रास विसरोनि ।
जगाची राखी लाज
देऊनि । धनमानादि ॥८७॥
स्वतः शरीराने
राबावें । आपुलें जीवन आपण निभवावें ।
अधिकाधिक देतचि
जावें । गांवासाठी ॥८८॥
साधु आला संत आला
। राजा आला रंक आला ।
अतिथि पाहूणा
भुकेला । सर्वांसाठी गृहस्थाश्रम ॥८९॥
करी आलेल्यांचा
सत्कार । संतसाधूंचा सन्मान सुंदर ।
सार्वजनिक
कामांचाहि बोझा वर । सांभाळीतसे प्रेमाने ॥९०॥
आला जातिदंड
राजदंड । तोहि भरतसे उदंड ।
मुंगीपासूनि सर्व ब्रह्मांड । जीवजन त्याचेवरि
॥९१॥
हें सर्व
गृहस्थाश्रम करी । मुलेंबाळें पोसोनि घरीं ।
काटकसरीने उरवूनि
करी । अन्न्दान नम्रतेने ॥९२॥
गृहस्थधर्म
म्हणजे जबाबदारी । स्त्रीपुत्रांपरीच सर्वतोपरीं ।
देश -भेष सांभाळणारी । वृत्ति असे त्याची ॥९३॥
येरव्ही असोत
सर्व आश्रम । सर्वात मोठा गृहस्थधर्म ।
गृहस्थधर्मावरील
योगक्षेम । चालतसे सर्वांचा ॥९४॥
ब्रह्मचर्याची
शिक्षादीक्षा । वानप्रस्थांची तितिक्षा ।
संन्यासी
ज्ञात्यांची समीक्षा । गृहस्थधर्माच्याचि योगें ॥९५॥
त्यासचि लोक फजूल
म्हणती । आणि त्याचेवरीच जगती ।
ही कैसी आहे रीति संसाराची ! ॥९६॥
म्हणोनि संती
गृहस्थ गौरविला । धन्य धन्य म्हणितलें त्याला ।
तोचि जगाचा
मातापिता ठरला । पालनपोषण करणारा ॥९७॥
त्याचे उपकार
येरव्ही फिटेना । एकचि आहे त्याची साधना ।
गृहस्थाचे पुत्र जाणा । शिकवोनि स्थानां बसवावे
॥९८॥
लहानपणींच
आश्रमीं न्यावी मुलें । जैसे विश्वमित्रें रामलक्ष्मण नेले।
सांदीपनी द्रोणांनी शिकविलें । तैसें विविध ज्ञान द्यावें ॥९९॥
माधुकरीपुरतेंचि
गांवी न यावें । गांवाचें जीवन सुधारावें ।
घृणा करितां नरकी
जावें । लागेल अहंकारें ॥१००॥
जोंवरि हवें आहे
शरीर । आवश्यक वाटे अन्नवस्त्र ।
न म्हणावा मिथ्या
संसार । सेवा करावी सर्वांची ॥१०१॥
गुरु म्हणोनि न
गुरगुरांवें । आत्मवत सर्वांसि जाणावें ।
उठण्या
बसण्यापासूनि शिकवावें । आईसारिखें अज्ञजना ॥१०२॥
आपापलें कार्य
सर्वांनी करावें । परस्परांना पूरक व्हावें ।
म्हणजे जगाचें ओझें जावें । झेललें सहज ॥१०३॥
आश्रमांनी मुलें
शिकवावी । गृहस्थांनी मदत पुरवावी ।
मुलें वाढतां
पित्याने घ्यावी । परवानगी पुत्रांची ॥१०४॥
जावें
देशपर्यटनीं । अथवा राहावें ग्रामसुधारणीं ।
पुढे संन्यासीहि
होऊनी । सेवाभावेंचि वागावें ॥१०५॥
आपलें पोट
सर्वांनी भरावें । वृत्तीसि कार्यें वाढवीत न्यावें ।
म्हणजे गृहस्थावरि अवलंबावें । ऐसें नव्हे ॥१०६॥
आपपलें कार्य
सांभाळावें । जीवमात्रासि संतुष्ट करावें ।
कोणीच कोणावरि न
राहावें । विसंबोनि ॥१०७॥
मग पुढे सर्वचि
आहे सेवा । कार्य करावें जीवाभावां ।
उरला असेल तो
सगळा ठेवा । वाटूनि द्यावा गांवासि ॥१०८॥
कोण कोण देतो
सेवाधन । आपुलें कार्य सांभाळून ।
यावरीच खरें
महिमान । लौकिकाचें आपुल्या ॥१०९॥
ऐसी आहे परंपरा ।
जेणें चाले जगाचा पसारा ।
वेगवेगळ्या
कामांचा बटवारा । सारखाचि व्हावा ॥११०॥
जेथे सर्वांसीच
काम करणें । कोणीच उत्तम कनिष्ट न म्हणे ।
सर्व मिळोनी जग
साजविणें । आपुल्यापरीं ॥१११॥
मानावे सकलांचे
आभार । करावा परस्परांसि पूरक व्यवहार ।
असो संन्यासी वा
गृहस्थ नर । सारखा अधिकार सर्वाचा ॥११२॥
गृहस्थ तनुमनाने
कष्ट करिती । संन्यासी त्यांना दिशा दाविती ।
मग कां उगेचि
पायां पडती । एक -एकाच्या ? ॥११३॥
मला हें कांही
उमजेना । कोणाचे उपकार आहेत कोणा ?
सर्वचि आपापुल्या
स्थांना । धन्य असती ॥११४॥
पुत्रधर्म पाळतां
पुत्र श्रेष्ठ । पितृधर्म पाळतां पिता वरिष्ठ ।
तेथे म्हणावें
श्रेष्ठ कनिष्ट कोणी कोणां ? ॥११५॥
पायां तयानेच
पडावें । ज्याने आपुल्या कर्मासि चुकावें ।
नाहितरि प्रेम
ठेवावें । परस्परांचे दोघांनी ॥११६॥
कोणी कोणासि न
लेखावें हीन । तो असे सर्वेश्वराचा अपमान ।
अभिमानि
संन्याशाहूनि महान । ठरे लीन पतिव्रता ॥११७॥
येरव्ही कोणाचाहि
आदर । सर्वानी करावा होऊनि नम्र ।
हा तंव आश्रमधर्माचा सार । अहंकार नसावा ॥११८॥
हीनतेची भावनाहि
नसावी । निष्ठेने सत्कार्यें करावी ।
सहकार्य द्यावें
आपुल्या गांवी । गृहस्थाने ॥११९॥
आपुला साधावा
गृहस्थाश्रम । पाळावा ग्रामसेवाधर्म ।
गांवाकरितांच
आपुला नेम । सांभाळावा ॥१२०॥
कष्ट करोनि धन
जोडावें । तें धन सत्कार्यींच लावावें ।
कधीहि निरर्थक न
वेचावें । छंदी कुणाच्या लागूनि ॥१२१॥
याचें मिळावया
शिक्षण । व्हावें गांवोगांवीं कथाप्रवचन ।
वाढवावा
गृहस्थाश्रमाचा मान । नीटनेटका करावया ॥१२२॥
नेटका ऐसा प्रपंच
झाला । तरि परमार्थ त्यांतचि साधला ।
हा समन्वय संतीं सांगितला । तोचि खरा ग्रामधर्म
॥१२३॥
आमुचा गॄहसंसारचि
सार । आहे सहकार्याचें भांडार ।
सर्व मिळोनि उजळूं सुन्दर । ग्रामधर्म आपुला
॥१२४॥
ग्रामधर्माचें
महत्त्व थोर । त्यांत गृहस्थधर्मांचा मोठा अधिकार ।
महातीर्थाचें
तीर्थ सुन्दर । तुकडया म्हणे ॥१२५॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु -शास्त्र -स्वानुभव
संमत ।
निरूपला संसारांत परमार्थ । चौथा अध्याय संपूर्ण
॥१२६॥
अध्याय ४ थाऑडीओ स्वरुपात --
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा