.

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

हे गुरूदेव ! हम सबको सदबुध्दी दे ,सतकर्तव्य करनेकी प्रवृत्ति दे ,सच बोलनका अभ्यास दे ,सतस्वरूप का ग्यान दे । हे जगदव्यापी परमेश्वर ! हम हर मनुष्य मात्र से प्रेमका,सत्यताका,बंधुत्व- -भावका आचरण करे और सुख दुखःमे सम रहे,ऐसी हमको शक्ती दे,युक्ती दे और भक्ती दे । हे सर्वधर्ममें,सर्व संतमे,समस्त संसार में,रममाण होनेवाले चैतन्यघन!हम तेरे लिए,तेरे देश के लिए,हर जीव जंतु के लिए,कुटीलताका,अनैत्तिकताका,छलछिद्र द्रोहताका त्याग करे ऐसा साहस दे । हे भगवान! अंतमे तुझमें समरस हो जाये यह हमारा ध्येय हैं,उद्देश है । इसके लिये तुझको स्मरके निश्चय करते है, प्रतिज्ञा करते है । हे विश्व धर्मको नियमन करनेवाले परमात्मा !जहाँभी,जिधरभी,हममें कुछ कमी दिखती हो,उसमे हमारा ध्यान लगाकर,उस चिज को,उस कार्यको,पुरा करने में हम अपना स्वराज्य समझते है , सूराज्य समझते है ।यह समझने की और कर्तव्य करनेकी हमको प्रियता दे,शक्ती दे ,वरदान दे

सोमवार, ५ जून, २०१७

अध्याय १२ वा ग्रामशुध्दि

अध्याय १२ वा



ग्रामशुध्दि


एका सज्जनें विचारिलें । म्हणे ग्रामराज्यांत काय ठेविलें !

 जिकडे तिकडे गोंधळ चाले । अस्ताव्यस्तपणाचा ॥१॥

 

कागदीं पुस्तकांत काव्यांत । खेडयाचें वर्णन दिव्य बहुत ।

परि वस्तुस्थिति पाहतां तेथ । क्षणभरीहि राहवेना ॥२॥

 

रस्ते सर्व घाणींनी भरले । आजूबाजूंस डबकें साचलें ।

एकहि काम न निभे तेथलें । शहराविण ॥३॥

 

खेडयाकडे चला म्हणतां । परि एकहि सोय नसे पाहतां ।

घरें कसलीं हुडेचि तत्त्वता । डुकरखोपडे खुराडे ॥४॥

 

नाही कसलें मनोरंजन । दंढारी-तमाशावांचून ।

उगेचि कां करावें वर्णन । खेडें उत्तम म्हणोनि ॥५॥

 

मित्रा ! तुझें म्हणणें ऐकिलें । माझ्या मनीं योग्य तें पटलें ।

 त्याचें कारण तेंहि ऐकिलें । पाहिजे श्रोतीं ॥६॥

जेव्हा कार्यकर्ते होती आळसी । त्यांत उपभोगाची वाढे खुशी ।

 तेव्हाच अंतर पडे कार्यासि । गांवशिवेच्या ॥७॥

 

एकदा चुकलें तरि चाले । पण नेहमी चुकतचि गेलें ।

त्यानेच राज्यांचेंहि मरण ओढवलें । गति काय गांवांची ॥८॥

 

कार्यकर्त्यांनीच घेतली निशा । काय पाहतां मग गांवाची अवदशा ।

 सुरू झाला गुंडांचाचि तमाशा । लोक झाले भलतैसे ॥९॥

 

वतनदार इजारदार । ग्रामजोशी वेशकर ।

पूर्वी ज्यांना ज्यांना ग्रामाधिकार । चुकलें त्यांच्या हातूनिया ॥१०॥

 

चुकलियावरीहि कोणीच बघेना । मग लोक काढती वाटा नाना ।

जैसा ज्यास वाटे धिंगाणा । करूं लागती हौसेने ॥११॥

 

कोणी हौसेने घर बांधलें । मार्गावरीच ओटे वाढले ।

कोणाचें छप्पर पुढे आलें । गाडी कांही जाईना ॥१२॥

कोणी घाण नाली सोडूनि दिली । ती सर्व मार्गावरि आली ।

माणसें ढोरें सारीं फसलीं । घराभोंवती बिचार्‍याच्या ॥१३॥

 

कांहींनी सांडपाणी साचविलें । मच्छर जंतु अति वाढले ।

 रोगराईनी बेजार झाले । शेजारी सगळे ॥१४॥

 

कांहींनी सडकेवरि गुरें बांधलीं । त्यांतहि मारकुंडींच निघालीं ।

 मार्गस्थांची फजीती झाली । सांगतां येना ॥१५॥

 

कांहींनी दारीं दगड ठेविले । जाणाराचें गाडेंचि उलटलें ।

कांही ठोकर लागोनि पडले । अंधारामाजी ॥१६॥

 

कांहींनी टाकला पुंजाणा । केरकैचणीं कांचखिळे नाना ।

 बोचती येणार्‍या-जाणार्‍यांना । बोलूंच नका ॥१७॥

 

साहेब चाले मोटारींनी । कांही जाती जोडे घालोनि ।

गरीबास विचारीना कोणी । पाय त्याचे फुटले तरी ॥१८॥

 

सडकीं फळें शेंग टरफलें । कुजके सोप मार्गीच टाकले ।

आजूबाजूस पाहोनि फेकलें । ढोबर त्यावरि माऊलीने ॥१९॥

 

गांवचे मार्ग विष्टेने व्यापले । आड कोने घाणींनी भरले ।

 ठायींठायीं उकिरडे साचले । गांव वेढलें गोदरींनी ॥२०॥

 

घराघरांचे कुंप सडले । कांटे रस्त्यावरीच पडले ।

फास आणणारासहि न कळलें । साफ करावें म्हणोनिया ॥२१॥

 

गांवीं खंडार्‍यांत माजलें रान । विंचू-सर्प राहती लपोन ।

पडक्या गढीचे हूडे भयाण । तेथील घाण पुसूं नये ॥२२॥

 

विहिरी कोणी बांधून ठेविल्या । त्या पुन्हा नाही दुरुस्त केल्या ।

घुणार्‍या घाण करीतचि गेल्या । सडला पाण्यांत पाचोळा ॥२३॥

 

कोणी रस्त्यावर टाकिला गाळ । विहिरी मोर्‍या उपसोनि ओंगळ ।

 टाकोले हीर फुटके खपरेल । मेलेले उंदीरहि त्यावरि ॥२४॥

 

श्रीमंतांचे वाढले गोठे । रस्त्यावरीच आले ओटे ।

 मार्गीच लाकडें विटा गोटे । कोण बोले तयांना ॥२५॥

 

गांवातील पंच झोपले ।  काय म्हणावेंनातलग मित्र आपलें !

म्हणोनि त्यांनी डोळे लाविले । गांव झालें डोंगर हें ॥२६॥

 

ऐसीच विचित्र गांवाची स्थिति । हें आलें माझ्या अनुभवाप्रति ।

 म्हणोनीच वाटे लावावी सुसंगति । गांवोगांवीं आतातरी ॥२७॥

 

हे सगळेंचि दुरुस्त कराया । शहाण्यांनी जावे खेडयांकडे या ।

आदर्श ग्राम हाचि पाया । राष्ट्राचा असे म्हणोनि ॥२८॥

 

जें जे गांवीं शहाणे झाले । शक्तियुक्तींनी पुढे निघाले ।

 ते सर्व शहराकडे धावले । म्हणोनि माजलें रान येथे ॥२९॥

 

भंगी साफ करिती शहर । तैसे पूर्वी कामदार महार ।

 झाडीत होते गांवगल्ली सुंदर । पुढे केवळ पाटलांची ॥३०॥

 

पवित्र ठेवावा देवाचा मार्ग । हा भाविकांचा जाणोनि ओघ ।

देव मांडिले होते जागोजाग । तेथेहि माजले उकिरडे ॥३१॥

 

नगरप्रदक्षिणेची प्रथा । ती प्रिय होती अनेक पंथा ।

 तीहि गेली लयाला आता । उरलें सगळें करंटेपण ॥३२॥

 

दिंडया-मिरवणुकी होत्या मागे । उत्सव दहीकाल्याच्या

प्रसंगें । त्यांतहि शिरलें बेढंगें । नाचगाणें दंढारी ॥३३॥

 

लोक दिंडया-मिरवणूकी काढती । परि त्याचें तत्त्वचि आतां न जाणती ।

म्हणोनि वाढली गलिच्छता अति । दारोदारीं घरोघरीं ॥३४॥

 

कधीकाळीं काढिती भजन । घरोघरीं बोलावया जाऊन ।

 तुटका वीणा टाळ दोन । मृदंग गेला कामांतूनि ॥३५॥

 

मग राहिले वाजंत्रीबाजे । त्यांतहि तालस्वर अंदाजें ।

कसेंतरी लाविती साजे । लग्नमौंज म्हणोनिया ॥३६॥

 

कर्णा शंख घंटया नगारे एकचि गोंधळ करिती सारे ।

 बेताल होतां कोठूनि भरे । ताल जीवनीं गांवाच्या ॥३७॥

 

ऐसा झाला तालतितंबा । विस्कळित झाल्या कीर्तनें सभा ।

 म्हणती दयायावी रुक्मिणीवल्लभा । आपुली शुध्दचि नाही ॥३८॥

 

गांव-देवळाची पालखी निघे । जो तो तमाशा म्हणोनि बघे ।

कसली भावना खिदळती तुंगे । आयाबाया पाहोनि ॥३९॥

 

चालतांना शिस्त नाही । जनलोकांची अजीव घाई ।

कोणाचाहि पायपोस नाही । पायीं कोणाच्या ॥४०॥

 

कोणी कोणाचें ऐकेना । पुढे घासावयासि करी धिंगाणा ।

 याचे शिक्षणचि नाही कोणा । कैसे चालावें मार्गाने ॥४१॥

 

नाही चालणारांसि शिस्त । चालती जैसीं जनावरें समस्त ।

माणसाचें चालणेंचि स्वस्थ । विसरले लोक ॥४२॥

 

मार्गीं लागती ठोकरा । कितीकांच्या बोटांचा झाला चुरा ।

 रेटा बसे मागे-सामोरां । करितां प्रदक्षिणा ही सारी ॥४३॥

 

सध्याची ऐसीं प्रदक्षिणा । ही प्रदक्षिणेची विटंबना ।

मार्गाची घाण साफ होईना । प्रदक्षिणा काय कामाची ॥४४॥

 

म्हणोनीच काढली रामधून । व्हावयासि गांवाचें पुनर्निर्माण ।

 सेवामंडळ संस्थेंतून । उदय केला कार्याचा ॥४५॥

 

मित्रहो ! रामधून नाही आजची । ही आहे परंपरा प्रदक्षिणेची ।

प्रदक्षिणेंत योजना होती कार्याची । तीच आहे रामधून ॥४६॥

 

मी समजतों गांवहि शरीर । त्यास राखावें नेहमी पवित्र ।

 त्यानेच नांदेल सर्वत्र । आनंद गांवीं ॥४७॥

 

जैसें आपण स्नान करावें । तैसें गांवहि स्वच्छ ठेवीत जावें ।

सर्वचि लोकांनी झिजूनि घ्यावें । श्रेय गांवाच्या उन्नतीचें ॥४८॥

 

आपण तेवढें स्वच्छ राहावें । भोवती गलिच्छ वातावरणचि पाहावें ।

 याने सुमंगलता कधी न पावे । तनमन होई दूषित ॥४९॥

 

म्हणोनि स्वच्छ ठेवावें दुकानघर । नाल्यामोर्‍या सडका चौफेर ।

 मग रामधूनची फेरी सुंदर । काढावी आबालवृध्दांनी ॥५०॥

 

रामधूनपूर्वी गांव पूर्ण । व्हावें स्वच्छ सौंदर्यवान ।

कोणहि घरीं गलिच्छपण । न दिसावें कोठे ॥५१॥

 

त्यांत व्हावयासि मदत । घ्यावेत सेवाभावियांचे हात ।

ज्यांना सेवा हेंचि व्रत । पसंत आहे ॥५२॥

 

मिळोनि करावी ग्रामसफाई । नालीमोरी ठायींठायीं ।

 हस्तेंपरहस्तें साफ सर्वहि । चहूकडे मार्ग ॥५३॥

 

त्यांत जी जी निघेल घाण । ती दूर न्यावी गांवापासून ।

अस्ताव्यस्त न देतां फेकून । नीट व्यवस्था लावावी ॥५४॥

 

त्यासाठी करावे खतखड्डे । गांवाबाहेर जागीं उजडे ।

जनावरांचें मलमूत्र सापडे । तेंहि त्यांतहि भरावें ॥५५॥

 

तैसेचि करावे चरसंडास । मळ दिसोंचि न द्यावा कोणास ।

आपुल्या मळाची आपणांस । व्यवस्था लावणें सोयीचें ॥५६॥

 

नदीकिनारीं वा बोरंगांत । शौचासि जाती स्त्रियादि समस्त ।

ती कुचंबणा आणि घाण निश्चित । दूर होईल चरसंडासे ॥५७॥

 

तेथे बसलिया शौचास । माती झोकावी सावकाश ।

 मलमूत्र येवोनि खतरूपास । कारणीं लागो म्हणोनिया ॥५८॥

 

सर्व गांवाचि ऐसी रीति । जे जे सांगती करोनि घेती ।

त्यांवरीच प्रसन्न राहे क्षिति । खताने तृप्ति होवोनिया ॥५९॥

 

एरव्ही तो वांढाळ गडी । जो वाटेल तिकडे मळा सांडी ।

 ते खतद्रव्यांची करिती नासाडी । वानर जैसे ॥६०॥

 

अहो ! ही निसर्गाची रचना । समजलीच पाहिजे सर्वजना ।

 खाद्यचि होतें खत जाणा । खतापासोनि खाद्योत्पत्ति ॥६१॥

 

आपण जें जें कांही खातों । रसरक्तमांस तेणें जमवितों ।

 त्यांतूनि वाचलें तें खत म्हणतो । भूमिवरि घालावया ॥६२॥

 

त्या खताची झाली जोपासना । तीच फळते काढाया उत्पन्ना ।

खत नसतां भूमिची दैना । होऊं लागे ॥६३॥

 

मूत्रविष्टाहड्डी मिसळली । त्याने भूमीस स्फूर्ति चढली ।

पुन्हा पेरणी करितां उदभवलीं । प्रचंड कणसें ॥६४॥

 

परि गांव हें समजेना । याचें ज्ञानचि नुरलें कोणा ।

करिती विष्टेचा धिंगाणा । आपणासहित गुरांच्या ॥६५॥

 

गोवर्‍या करोनि जाळिती । ते महालाभास आंचवती ।

 शेणांत आहे लक्ष्मीची वसती । धर्मग्रंथींहि वचन ऐसें ॥६६॥

 

म्हणोनि सर्व गांवाचें मलमूत्र । जमवोनि झाकावें जाणोनि तंत्र ।

 त्याने गांवाची जमीन सर्वत्र । खतवोनि द्यावी ॥६७॥

 

याने दूर होईल घाण । थांबेल रोगराईचें नुकसान ।

आणि पिकेल अधिक धान्य । अनेक लाभ एकामाजी ॥६८॥

 

हें समजाविण्याहि पाहिजे कमेटी । तिने करोनि नाना आटाआटी ।

जनता जागृत करोनि शेवटीं । उत्पन्न द्यावें वाढवोनि ॥६९॥

 

गोखरू तरोटा तालीमखाना । ज्यांनी भूमि विढिली जाणा ।

त्यांचेंहि खत कराया सर्वांना । लावोनि पीक वाढवावें ॥७०॥

 

मुबलक खत मुबलक पाणि । मुबलक श्रम मुबलक बी-भरणीं ।

 मुबलक उत्पन्न गगनासि भेदूनि । दिसावें गांवीं ॥७१॥

 

हेचि खरी आहे सेवा । हेंचि आवडे देवाधिदेवा ।

उगीच मोठेपणाचा कांगावा । मिरवावा कासयासि ॥७२॥

 

सर्वांनी गांव स्वच्छ करावें । तेणें आरोग्य नांदेल बरवें ।

घाण-खतांतूनि नवनवें । वैभव येईल उदयासि ॥७३॥

 

ग्रामसफाई झालियावरि । रामधून काढावी नाम-गजरीं ।

 स्वच्छतेसवेंच पावित्र्यहि भारी । वातावरणीं यावयासि ॥७४॥

 

प्रात:काळीं सामुदायिक नामगजर । सुखस्वराज्य तो टिकवी सुंदर ।

 त्यासाठीच ब्राह्ममुहूर्त रामप्रहर । वेदहि म्हणे ॥७५॥

 

यावरि श्रोते विचारती प्रश्न । कैसी प्रदक्षिणेची रामधून

जेणें घडेल ईश्वर-भजन । आरोग्य हेंहि संपादे ॥७६॥

 

रामधूनची ऐका रीति । आधी करा ग्रामशुध्दि ती ।

जेणें स्नान घडे गांवाप्रति । आरोग्यदायी ॥७७॥

 

निघण्यापूर्वी सूर्यनारायण । करावें सडासंमार्जन ।

सर्व गांवाने मार्ग झाडोन । आनंदभुवन निर्मावें ॥७८॥

 

जिकडे तिकडे पाणी शिंपावें । मार्ग रांगोळयांनी सजवावे ।

ठायीं ठायीं ठेवोनि द्यावे । फोटो संतां-थोरांचे ॥७९॥

 

सुंदर बांधावें आम्रतोरण । ठिकठिकाणीं शोभवावें मैदान ।

आपुलाल्या श्रमाचें प्रदर्शन । दारादारांत ठेवावें ॥८०॥

 

मग जमोनि सकल सेवकजनें । रामधून काढावी गांभीर्याने ।

प्रथम रांग चातुर्याने । सजवावी शोभे ऐसी ॥८१॥

 

लहान मुलें मुलांमाजी । तरुण युवक तरुणांमाजी ।

वयोवृध्द सहजासहजीं । वृध्दांमाजी योजावे ॥८२॥

 

स्वतंत्र चालवाव्या महिला मुली । मार्गीं आणावी शोभा चांगली ।

 गीतें म्हणणारांची योजना केली । पाहिजे मधामधांतूनि ॥८३॥

 

बाजूनी चालवावे सेवकजन । सेवक-गणवेषांत परिपूर्ण ।

त्यांनी सांभाळावी सेवकांची लैन । दोन दोन चालवावे ॥८४॥

 

एकाने धरावी घंटा हातीं । दोन ठोके द्यावेत घाटेवरती ।

 चालू लागेल ठरलिया पध्दतीं । रामधून जागेहूनि ॥८५॥

 

 

रघुपति राघव राजाराम । पतितपावन सीताराम ।

म्हणावें गायकाने प्रथम । मग म्हणावें सर्वांनी ॥८६॥

 

अतिधीराची चाल धरावी । ओळ शिस्त सांभाळावी ।

मग गीतें गायकांनी म्हणावीं । राष्ट्र-भक्ति-भावनेचीं ॥८७॥

 

कांही म्हणावीं ग्रामावर । कांही म्हणावीं भक्तिपर ।

कांही म्हणावीं निरंतर । चारित्र्यवान करणारीं ॥८८॥

 

चौकांतूनि दारांतूनि । जात असतां शांतपणीं ।

जयघोष गर्जवावे भेदूनि । गगन सारें ॥८९॥

 

गुरुदेवाच्या जयजयकारें । भारतमातेच्या नामोच्चारें ।

 साधुसंतांच्या घोषें उदगारें । जागृति करावी आनंदें ॥९०॥

 

मार्गी थोरामोठयांचें चित्रदर्शन । वंदावें उभ्यानेचि हात जोडोन ।

थांबूं नये मार्गातून । रामधून सोडोनिया ॥९१॥

 

ऐसी फेरी पूर्ण करावी । गुरुदेव-चौकीं स्थिरावोनि घ्यावी ।

आधीच सेवकांनी लैन लावावी । लोकांपुढे येवोनि ॥९२॥

 

मग तैसेचि लोक उभे करावे । मोकळे मोकळे ओळींत बरवे ।

 लहान लहानांत ठेवावे । तरुण वृध्द ऐसेचि ॥९३॥

 

महिलांची अलग रांग । करावी सुंदर यथासांग ।

ऐसा साजवावा लोकसंघ । चौकामाजी वा मैदानीं ॥९४॥

 

मग सूचकाने सूचना द्यावी । जीं सक्रियपाठीं लिहिली बरवी ।

 प्रार्थना भाषण प्रणाम योजावीं । योजनेपरी ॥९५॥

 

भाषणीं हेंच सांगत जावें । जनतेने नीटनेटकें राहावें ।

सहकार्याने वागत असावें । गांवामाजी ॥९६॥

 

जेव्हा वाढेल मार्गी घाण । तेव्हा होईल मलीन मन ।

तयायोगें विकास पूर्ण । राहील अडोन जीवांचा ॥९७॥

 

सर्वांनी स्वच्छ शिस्तबध्द व्हावें । परस्परांशीं प्रेम करावें ।

 तरीच गांव स्वर्ग व्हावें । सर्वतोपरीं ॥९८॥

 

भाषणानंतरि जयघोष करून । मार्गी वळवावे सकळ जन ।

 शांतपणें चालाया सांगोन । रामधून संपवावी ॥९९॥

 

शेवटीं जावें सेवकजनें । अतिप्रसन्न होवोनि मनें ।

स्वर्ग उतरेल या योजनेने । ग्रामामाजीं ॥१००॥

 

लोकांना मार्गी चालतांहि नये । म्हणोनि काढला हा उपाय ।

 गरीब-अमीर-अनपढ सर्व हे । शिकती चालणें यामाजीं ॥१०१॥

 

दोघादोघांच्या करिती रांगा । एकामागूनि एकाची जागा ।

 गांव पवित्र करी भजनगंगा । वाढे संघटना गांवाची ॥१०२॥

 

सहजचि चालणें बोलणें येतें । शिस्तीने बसणें उठणें कळतें ।

गाणें वाजविणेंहि कळों लागतें । गांवच्या दरबारीं ॥१०३॥

 

घराघरांची होय दुरुस्ती । सौंदर्याची वाढे प्रीति ।

अस्वच्छतेची मिटे प्रवृत्ति । वाढे वृत्ति सहकार्याची ॥१०४॥

 

आपण एक ही वाढे भावना । दिगंतीं जाई आळसीपणा ।

 कोणी न वाटे अधिक-उणा । गुणप्रदर्शना वाव मिळे ॥१०५॥

 

सर्वांचें सर्वांकरितां वाढे मन । लोक राहती अतिप्रसन्न ।

 ऐशी आहे रामधून । सहकार्याची बोधशाळा ॥१०६॥

 

ऐशा योजना घेवोनि हातीं । करावी खेडयांची दुरुस्ती ।

 तेणें आनंद लाभेल सकळांप्रति । तुकडया म्हणे ॥१०७॥

 

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभवसंमत ।

ग्रामस्नान-रामधून वर्णित । बारावा अध्याय संपूर्ण ॥१०८॥

 

  अध्याय  १२   वा  ऑडीओ स्वरुपात -

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

।।जय गुरुदेव।।