अध्याय १२ वा
ग्रामशुध्दि
एका सज्जनें विचारिलें । म्हणे ग्रामराज्यांत काय ठेविलें !
जिकडे तिकडे गोंधळ
चाले । अस्ताव्यस्तपणाचा ॥१॥
कागदीं पुस्तकांत काव्यांत । खेडयाचें वर्णन दिव्य बहुत ।
परि वस्तुस्थिति पाहतां तेथ । क्षणभरीहि राहवेना ॥२॥
रस्ते सर्व घाणींनी भरले । आजूबाजूंस डबकें साचलें ।
एकहि काम न निभे तेथलें । शहराविण ॥३॥
खेडयाकडे चला म्हणतां । परि एकहि सोय नसे पाहतां ।
घरें कसलीं हुडेचि तत्त्वता । डुकरखोपडे खुराडे ॥४॥
नाही कसलें मनोरंजन । दंढारी-तमाशावांचून ।
उगेचि कां करावें वर्णन । खेडें उत्तम म्हणोनि ॥५॥
मित्रा ! तुझें म्हणणें ऐकिलें । माझ्या मनीं योग्य तें
पटलें ।
त्याचें कारण तेंहि
ऐकिलें । पाहिजे श्रोतीं ॥६॥
जेव्हा कार्यकर्ते होती आळसी । त्यांत उपभोगाची वाढे खुशी ।
तेव्हाच अंतर पडे
कार्यासि । गांवशिवेच्या ॥७॥
एकदा चुकलें तरि चाले । पण नेहमी चुकतचि गेलें ।
त्यानेच राज्यांचेंहि मरण ओढवलें । गति काय गांवांची ॥८॥
कार्यकर्त्यांनीच घेतली निशा । काय पाहतां मग गांवाची अवदशा
।
सुरू झाला
गुंडांचाचि तमाशा । लोक झाले भलतैसे ॥९॥
वतनदार इजारदार । ग्रामजोशी वेशकर ।
पूर्वी ज्यांना ज्यांना ग्रामाधिकार । चुकलें त्यांच्या
हातूनिया ॥१०॥
चुकलियावरीहि कोणीच बघेना । मग लोक काढती वाटा नाना ।
जैसा ज्यास वाटे धिंगाणा । करूं लागती हौसेने ॥११॥
कोणी हौसेने घर बांधलें । मार्गावरीच ओटे वाढले ।
कोणाचें छप्पर पुढे आलें । गाडी कांही जाईना ॥१२॥
कोणी घाण नाली सोडूनि दिली । ती सर्व मार्गावरि आली ।
माणसें ढोरें सारीं फसलीं । घराभोंवती बिचार्याच्या ॥१३॥
कांहींनी सांडपाणी साचविलें । मच्छर जंतु अति वाढले ।
रोगराईनी बेजार
झाले । शेजारी सगळे ॥१४॥
कांहींनी सडकेवरि गुरें बांधलीं । त्यांतहि मारकुंडींच
निघालीं ।
मार्गस्थांची फजीती
झाली । सांगतां येना ॥१५॥
कांहींनी दारीं दगड ठेविले । जाणाराचें गाडेंचि उलटलें ।
कांही ठोकर लागोनि पडले । अंधारामाजी ॥१६॥
कांहींनी टाकला पुंजाणा । केरकैचणीं कांचखिळे नाना ।
बोचती येणार्या-जाणार्यांना
। बोलूंच नका ॥१७॥
साहेब चाले मोटारींनी । कांही जाती जोडे घालोनि ।
गरीबास विचारीना कोणी । पाय त्याचे फुटले तरी ॥१८॥
सडकीं फळें शेंग टरफलें । कुजके सोप मार्गीच टाकले ।
आजूबाजूस पाहोनि फेकलें । ढोबर त्यावरि माऊलीने ॥१९॥
गांवचे मार्ग विष्टेने व्यापले । आड कोने घाणींनी भरले ।
ठायींठायीं उकिरडे
साचले । गांव वेढलें गोदरींनी ॥२०॥
घराघरांचे कुंप सडले । कांटे रस्त्यावरीच पडले ।
फास आणणारासहि न कळलें । साफ करावें म्हणोनिया ॥२१॥
गांवीं खंडार्यांत माजलें रान । विंचू-सर्प राहती लपोन ।
पडक्या गढीचे हूडे भयाण । तेथील घाण पुसूं नये ॥२२॥
विहिरी कोणी बांधून ठेविल्या । त्या पुन्हा नाही दुरुस्त
केल्या ।
‘घुणार्या घाण करीतचि गेल्या । सडला
पाण्यांत पाचोळा ॥२३॥
कोणी रस्त्यावर टाकिला गाळ । विहिरी मोर्या उपसोनि ओंगळ ।
टाकोले हीर फुटके खपरेल । मेलेले उंदीरहि त्यावरि ॥२४॥
श्रीमंतांचे वाढले गोठे । रस्त्यावरीच आले ओटे ।
मार्गीच लाकडें
विटा गोटे । कोण बोले तयांना ॥२५॥
गांवातील पंच झोपले । काय म्हणावेंनातलग मित्र आपलें !
म्हणोनि त्यांनी डोळे लाविले । गांव झालें डोंगर हें ॥२६॥
ऐसीच विचित्र गांवाची स्थिति । हें आलें माझ्या अनुभवाप्रति
।
म्हणोनीच वाटे
लावावी सुसंगति । गांवोगांवीं आतातरी ॥२७॥
हे सगळेंचि दुरुस्त कराया । शहाण्यांनी जावे खेडयांकडे या ।
आदर्श ग्राम हाचि पाया । राष्ट्राचा असे म्हणोनि ॥२८॥
जें जे गांवीं शहाणे झाले । शक्तियुक्तींनी पुढे निघाले ।
ते सर्व शहराकडे
धावले । म्हणोनि माजलें रान येथे ॥२९॥
भंगी साफ करिती शहर । तैसे पूर्वी कामदार महार ।
झाडीत होते
गांवगल्ली सुंदर । पुढे केवळ पाटलांची ॥३०॥
पवित्र ठेवावा देवाचा मार्ग । हा भाविकांचा जाणोनि ओघ ।
देव मांडिले होते जागोजाग । तेथेहि माजले उकिरडे ॥३१॥
नगरप्रदक्षिणेची प्रथा । ती प्रिय होती अनेक पंथा ।
तीहि गेली लयाला
आता । उरलें सगळें करंटेपण ॥३२॥
दिंडया-मिरवणुकी होत्या मागे । उत्सव दहीकाल्याच्या
प्रसंगें । त्यांतहि शिरलें बेढंगें । नाचगाणें दंढारी ॥३३॥
लोक दिंडया-मिरवणूकी काढती । परि त्याचें तत्त्वचि आतां न
जाणती ।
म्हणोनि वाढली गलिच्छता अति । दारोदारीं घरोघरीं ॥३४॥
कधीकाळीं काढिती भजन । घरोघरीं बोलावया जाऊन ।
तुटका वीणा टाळ दोन
। मृदंग गेला कामांतूनि ॥३५॥
मग राहिले वाजंत्रीबाजे । त्यांतहि तालस्वर अंदाजें ।
कसेंतरी लाविती साजे । लग्नमौंज म्हणोनिया ॥३६॥
कर्णा शंख घंटया नगारे एकचि गोंधळ करिती सारे ।
बेताल होतां कोठूनि
भरे । ताल जीवनीं गांवाच्या ॥३७॥
ऐसा झाला तालतितंबा । विस्कळित झाल्या कीर्तनें सभा ।
म्हणती दयायावी रुक्मिणीवल्लभा । आपुली शुध्दचि नाही ॥३८॥
गांव-देवळाची पालखी निघे । जो तो तमाशा म्हणोनि बघे ।
कसली भावना खिदळती तुंगे । आयाबाया पाहोनि ॥३९॥
चालतांना शिस्त नाही । जनलोकांची अजीव घाई ।
कोणाचाहि पायपोस नाही । पायीं कोणाच्या ॥४०॥
कोणी कोणाचें ऐकेना । पुढे घासावयासि करी धिंगाणा ।
याचे शिक्षणचि नाही
कोणा । कैसे चालावें मार्गाने ॥४१॥
नाही चालणारांसि शिस्त । चालती जैसीं जनावरें समस्त ।
माणसाचें चालणेंचि स्वस्थ । विसरले लोक ॥४२॥
मार्गीं लागती ठोकरा । कितीकांच्या बोटांचा झाला चुरा ।
रेटा बसे
मागे-सामोरां । करितां प्रदक्षिणा ही सारी ॥४३॥
सध्याची ऐसीं प्रदक्षिणा । ही प्रदक्षिणेची विटंबना ।
मार्गाची घाण साफ होईना । प्रदक्षिणा काय कामाची ॥४४॥
म्हणोनीच काढली रामधून । व्हावयासि गांवाचें पुनर्निर्माण ।
सेवामंडळ
संस्थेंतून । उदय केला कार्याचा ॥४५॥
मित्रहो ! रामधून नाही आजची । ही आहे परंपरा प्रदक्षिणेची ।
प्रदक्षिणेंत योजना होती कार्याची । तीच आहे रामधून ॥४६॥
मी समजतों गांवहि शरीर । त्यास राखावें नेहमी पवित्र ।
त्यानेच नांदेल
सर्वत्र । आनंद गांवीं ॥४७॥
जैसें आपण स्नान करावें । तैसें गांवहि स्वच्छ ठेवीत जावें
।
सर्वचि लोकांनी झिजूनि घ्यावें । श्रेय गांवाच्या उन्नतीचें
॥४८॥
आपण तेवढें स्वच्छ राहावें । भोवती गलिच्छ वातावरणचि
पाहावें ।
याने सुमंगलता कधी
न पावे । तनमन होई दूषित ॥४९॥
म्हणोनि स्वच्छ ठेवावें दुकानघर । नाल्यामोर्या सडका चौफेर
।
मग रामधूनची फेरी
सुंदर । काढावी आबालवृध्दांनी ॥५०॥
रामधूनपूर्वी गांव पूर्ण । व्हावें स्वच्छ सौंदर्यवान ।
कोणहि घरीं गलिच्छपण । न दिसावें कोठे ॥५१॥
त्यांत व्हावयासि मदत । घ्यावेत सेवाभावियांचे हात ।
ज्यांना सेवा हेंचि व्रत । पसंत आहे ॥५२॥
मिळोनि करावी ग्रामसफाई । नालीमोरी ठायींठायीं ।
हस्तेंपरहस्तें साफ
सर्वहि । चहूकडे मार्ग ॥५३॥
त्यांत जी जी निघेल घाण । ती दूर न्यावी गांवापासून ।
अस्ताव्यस्त न देतां फेकून । नीट व्यवस्था लावावी ॥५४॥
त्यासाठी करावे खतखड्डे । गांवाबाहेर जागीं उजडे ।
जनावरांचें मलमूत्र सापडे । तेंहि त्यांतहि भरावें ॥५५॥
तैसेचि करावे चरसंडास । मळ दिसोंचि न द्यावा कोणास ।
आपुल्या मळाची आपणांस । व्यवस्था लावणें सोयीचें ॥५६॥
नदीकिनारीं वा बोरंगांत । शौचासि जाती स्त्रियादि समस्त ।
ती कुचंबणा आणि घाण निश्चित । दूर होईल चरसंडासे ॥५७॥
तेथे बसलिया शौचास । माती झोकावी सावकाश ।
मलमूत्र येवोनि
खतरूपास । कारणीं लागो म्हणोनिया ॥५८॥
सर्व गांवाचि ऐसी रीति । जे जे सांगती करोनि घेती ।
त्यांवरीच प्रसन्न राहे क्षिति । खताने तृप्ति होवोनिया
॥५९॥
एरव्ही तो वांढाळ गडी । जो वाटेल तिकडे मळा सांडी ।
ते खतद्रव्यांची
करिती नासाडी । वानर जैसे ॥६०॥
अहो ! ही निसर्गाची रचना । समजलीच पाहिजे सर्वजना ।
खाद्यचि होतें खत
जाणा । खतापासोनि खाद्योत्पत्ति ॥६१॥
आपण जें जें कांही खातों । रसरक्तमांस तेणें जमवितों ।
त्यांतूनि वाचलें
तें खत म्हणतो । भूमिवरि घालावया ॥६२॥
त्या खताची झाली जोपासना । तीच फळते काढाया उत्पन्ना ।
खत नसतां भूमिची दैना । होऊं लागे ॥६३॥
मूत्रविष्टाहड्डी मिसळली । त्याने भूमीस स्फूर्ति चढली ।
पुन्हा पेरणी करितां उदभवलीं । प्रचंड कणसें ॥६४॥
परि गांव हें समजेना । याचें ज्ञानचि नुरलें कोणा ।
करिती विष्टेचा धिंगाणा । आपणासहित गुरांच्या ॥६५॥
गोवर्या करोनि जाळिती । ते महालाभास आंचवती ।
शेणांत आहे
लक्ष्मीची वसती । धर्मग्रंथींहि वचन ऐसें ॥६६॥
म्हणोनि सर्व गांवाचें मलमूत्र । जमवोनि झाकावें जाणोनि
तंत्र ।
त्याने गांवाची
जमीन सर्वत्र । खतवोनि द्यावी ॥६७॥
याने दूर होईल घाण । थांबेल रोगराईचें नुकसान ।
आणि पिकेल अधिक धान्य । अनेक लाभ एकामाजी ॥६८॥
हें समजाविण्याहि पाहिजे कमेटी । तिने करोनि नाना आटाआटी ।
जनता जागृत करोनि शेवटीं । उत्पन्न द्यावें वाढवोनि ॥६९॥
गोखरू तरोटा तालीमखाना । ज्यांनी भूमि विढिली जाणा ।
त्यांचेंहि खत कराया सर्वांना । लावोनि पीक वाढवावें ॥७०॥
मुबलक खत मुबलक पाणि । मुबलक श्रम मुबलक बी-भरणीं ।
मुबलक उत्पन्न
गगनासि भेदूनि । दिसावें गांवीं ॥७१॥
हेचि खरी आहे सेवा । हेंचि आवडे देवाधिदेवा ।
उगीच मोठेपणाचा कांगावा । मिरवावा कासयासि ॥७२॥
सर्वांनी गांव स्वच्छ करावें । तेणें आरोग्य नांदेल बरवें ।
घाण-खतांतूनि नवनवें । वैभव येईल उदयासि ॥७३॥
ग्रामसफाई झालियावरि । रामधून काढावी नाम-गजरीं ।
स्वच्छतेसवेंच
पावित्र्यहि भारी । वातावरणीं यावयासि ॥७४॥
प्रात:काळीं सामुदायिक नामगजर । सुखस्वराज्य तो टिकवी सुंदर
।
त्यासाठीच
ब्राह्ममुहूर्त रामप्रहर । वेदहि म्हणे ॥७५॥
यावरि श्रोते विचारती प्रश्न । कैसी प्रदक्षिणेची रामधून
जेणें घडेल ईश्वर-भजन । आरोग्य हेंहि संपादे ॥७६॥
रामधूनची ऐका रीति । आधी करा ग्रामशुध्दि ती ।
जेणें स्नान घडे गांवाप्रति । आरोग्यदायी ॥७७॥
निघण्यापूर्वी सूर्यनारायण । करावें सडासंमार्जन ।
सर्व गांवाने मार्ग झाडोन । आनंदभुवन निर्मावें ॥७८॥
जिकडे तिकडे पाणी शिंपावें । मार्ग रांगोळयांनी सजवावे ।
ठायीं ठायीं ठेवोनि द्यावे । फोटो संतां-थोरांचे ॥७९॥
सुंदर बांधावें आम्रतोरण । ठिकठिकाणीं शोभवावें मैदान ।
आपुलाल्या श्रमाचें प्रदर्शन । दारादारांत ठेवावें ॥८०॥
मग जमोनि सकल सेवकजनें । रामधून काढावी गांभीर्याने ।
प्रथम रांग चातुर्याने । सजवावी शोभे ऐसी ॥८१॥
लहान मुलें मुलांमाजी । तरुण युवक तरुणांमाजी ।
वयोवृध्द सहजासहजीं । वृध्दांमाजी योजावे ॥८२॥
स्वतंत्र चालवाव्या महिला मुली । मार्गीं आणावी शोभा चांगली
।
गीतें म्हणणारांची
योजना केली । पाहिजे मधामधांतूनि ॥८३॥
बाजूनी चालवावे सेवकजन । सेवक-गणवेषांत परिपूर्ण ।
त्यांनी सांभाळावी सेवकांची लैन । दोन दोन चालवावे ॥८४॥
एकाने धरावी घंटा हातीं । दोन ठोके द्यावेत घाटेवरती ।
चालू लागेल ठरलिया
पध्दतीं । रामधून जागेहूनि ॥८५॥
रघुपति राघव राजाराम । पतितपावन सीताराम ।
म्हणावें गायकाने प्रथम । मग म्हणावें सर्वांनी ॥८६॥
अतिधीराची चाल धरावी । ओळ शिस्त सांभाळावी ।
मग गीतें गायकांनी म्हणावीं । राष्ट्र-भक्ति-भावनेचीं ॥८७॥
कांही म्हणावीं ग्रामावर । कांही म्हणावीं भक्तिपर ।
कांही म्हणावीं निरंतर । चारित्र्यवान करणारीं ॥८८॥
चौकांतूनि दारांतूनि । जात असतां शांतपणीं ।
जयघोष गर्जवावे भेदूनि । गगन सारें ॥८९॥
गुरुदेवाच्या जयजयकारें । भारतमातेच्या नामोच्चारें ।
साधुसंतांच्या
घोषें उदगारें । जागृति करावी आनंदें ॥९०॥
मार्गी थोरामोठयांचें चित्रदर्शन । वंदावें उभ्यानेचि हात
जोडोन ।
थांबूं नये मार्गातून । रामधून सोडोनिया ॥९१॥
ऐसी फेरी पूर्ण करावी । गुरुदेव-चौकीं स्थिरावोनि घ्यावी ।
आधीच सेवकांनी लैन लावावी । लोकांपुढे येवोनि ॥९२॥
मग तैसेचि लोक उभे करावे । मोकळे मोकळे ओळींत बरवे ।
लहान लहानांत
ठेवावे । तरुण वृध्द ऐसेचि ॥९३॥
महिलांची अलग रांग । करावी सुंदर यथासांग ।
ऐसा साजवावा लोकसंघ । चौकामाजी वा मैदानीं ॥९४॥
मग सूचकाने सूचना द्यावी । जीं सक्रियपाठीं लिहिली बरवी ।
प्रार्थना भाषण प्रणाम योजावीं । योजनेपरी ॥९५॥
भाषणीं हेंच सांगत जावें । जनतेने नीटनेटकें राहावें ।
सहकार्याने वागत असावें । गांवामाजी ॥९६॥
जेव्हा वाढेल मार्गी घाण । तेव्हा होईल मलीन मन ।
तयायोगें विकास पूर्ण । राहील अडोन जीवांचा ॥९७॥
सर्वांनी स्वच्छ शिस्तबध्द व्हावें । परस्परांशीं प्रेम
करावें ।
तरीच गांव स्वर्ग
व्हावें । सर्वतोपरीं ॥९८॥
भाषणानंतरि जयघोष करून । मार्गी वळवावे सकळ जन ।
शांतपणें चालाया
सांगोन । रामधून संपवावी ॥९९॥
शेवटीं जावें सेवकजनें । अतिप्रसन्न होवोनि मनें ।
स्वर्ग उतरेल या योजनेने । ग्रामामाजीं ॥१००॥
लोकांना मार्गी चालतांहि नये । म्हणोनि काढला हा उपाय ।
गरीब-अमीर-अनपढ
सर्व हे । शिकती चालणें यामाजीं ॥१०१॥
दोघादोघांच्या करिती रांगा । एकामागूनि एकाची जागा ।
गांव पवित्र करी
भजनगंगा । वाढे संघटना गांवाची ॥१०२॥
सहजचि चालणें बोलणें येतें । शिस्तीने बसणें उठणें कळतें ।
गाणें वाजविणेंहि कळों लागतें । गांवच्या दरबारीं ॥१०३॥
घराघरांची होय दुरुस्ती । सौंदर्याची वाढे प्रीति ।
अस्वच्छतेची मिटे प्रवृत्ति । वाढे वृत्ति सहकार्याची ॥१०४॥
आपण एक ही वाढे भावना । दिगंतीं जाई आळसीपणा ।
कोणी न वाटे
अधिक-उणा । गुणप्रदर्शना वाव मिळे ॥१०५॥
सर्वांचें सर्वांकरितां वाढे मन । लोक राहती अतिप्रसन्न ।
ऐशी आहे रामधून ।
सहकार्याची बोधशाळा ॥१०६॥
ऐशा योजना घेवोनि हातीं । करावी खेडयांची दुरुस्ती ।
तेणें आनंद लाभेल
सकळांप्रति । तुकडया म्हणे ॥१०७॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभवसंमत ।
ग्रामस्नान-रामधून वर्णित । बारावा अध्याय संपूर्ण ॥१०८॥
अध्याय १२ वा
ऑडीओ स्वरुपात -
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा