.

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

हे गुरूदेव ! हम सबको सदबुध्दी दे ,सतकर्तव्य करनेकी प्रवृत्ति दे ,सच बोलनका अभ्यास दे ,सतस्वरूप का ग्यान दे । हे जगदव्यापी परमेश्वर ! हम हर मनुष्य मात्र से प्रेमका,सत्यताका,बंधुत्व- -भावका आचरण करे और सुख दुखःमे सम रहे,ऐसी हमको शक्ती दे,युक्ती दे और भक्ती दे । हे सर्वधर्ममें,सर्व संतमे,समस्त संसार में,रममाण होनेवाले चैतन्यघन!हम तेरे लिए,तेरे देश के लिए,हर जीव जंतु के लिए,कुटीलताका,अनैत्तिकताका,छलछिद्र द्रोहताका त्याग करे ऐसा साहस दे । हे भगवान! अंतमे तुझमें समरस हो जाये यह हमारा ध्येय हैं,उद्देश है । इसके लिये तुझको स्मरके निश्चय करते है, प्रतिज्ञा करते है । हे विश्व धर्मको नियमन करनेवाले परमात्मा !जहाँभी,जिधरभी,हममें कुछ कमी दिखती हो,उसमे हमारा ध्यान लगाकर,उस चिज को,उस कार्यको,पुरा करने में हम अपना स्वराज्य समझते है , सूराज्य समझते है ।यह समझने की और कर्तव्य करनेकी हमको प्रियता दे,शक्ती दे ,वरदान दे

मंगळवार, ६ जून, २०१७

अध्याय ३९ वा भूवैकुण्ठ



अध्याय ३९ वा

भूवैकुण्ठ

 

 

सर्व जनांचें समाधान । याहूनि स्वर्ग नाही महान ।

 नांदती द्वेष-मत्सराविण । बंधुभावें सर्व जेथे ॥१॥

 

गरीब-श्रीमंत कोणी नाही । नाही दारिद्रय रोगराई ।

उंचनीच कामें सर्वहि । करिती लोक प्रेमभरें ॥२॥

 

पक्ष नाही पंथ नाही । जातिभेद विरोध कांही ।

 एका कुटुंबापरी राही । गांव आपुलें आनंदें ॥३॥

 

ऐसें व्हावें कोठेतरी । त्यासीच आम्ही म्हणतों वैकुंठपुरी ।

 जेथे नाही भावनाच दुसरी । परकेपणाची ॥४॥

 

ग्रंथीं स्वर्ग-वैकुंठ-वर्णन । वाचतां तल्लीन होतें मन ।

 त्यांत वर्णिले हेचि गुण । ते कां आपण न घ्यावे ॥५॥

 

सत्य युगाची ऐकावी कथा । परि आपुली न सोडावी प्रथा ।

 याने समाजाच्या व्यथा । चुकतील कैशा ॥६॥

 

वैकुंठींचा प्रेमानंद । सत्ययुगाचा समतावाद ।

आपुल्या गांवीं करावा सिध्द । हेंचि कर्तव्य सर्वांचें ॥७॥

 

देवाने जगीं अवतार घ्यावा । ऐसें कां वाटतें जीवा 

त्रास अन्याय अनाचार नसावा । कोठेहि लोकीं ॥८॥

 

जरि हें आपणांसि आवडे । तरि आपणचि व्हावें कराया पुढे ।

 न करितांचि देवानांवें ओरडे । तें सर्व वाया ॥९॥

 

सर्वचि भगवंताचे सखे । देवाचिया न्यायाने सारखे ।

मग व्यवहारींच पारखे । कां ठेवावे ॥१०॥

 

देवाचा न्याय जगीं आणावा । तरीच मिटे दु:ख-गवगवा ।

यासि टाळील तो जाणावा । भक्त कैसा ॥११॥

 

जें एकास तेंचि सकळांस । हेंचि सत्य जीवनाचें रहस्य ।

 सर्वांच्या सुखीं दु:खीं समरस । भावना राहती सकळांच्या ॥१२॥

 

उणा-अधिक गुणापाशी । नको जाति वा धनापाशी ।

अधिकार समानचि सर्वांसि । जीवनाचा ॥१३॥

 

सर्वांनी करावें शक्तिभर काम । अधिकारपरत्वें उपक्रम ।

 सर्वांसि मिळावें सौख्य सम । गरजांप्रमाणे जरूर त्या ॥१४॥

 

ऐसीच सर्वांची योजना करावी । पूर्ण वर्ष चिंताचि नसावी ।

 अन्नवस्त्र धंद्यांची बरवी । योजना व्हावी सर्वांमिळोनि ॥१५॥

 

वर्षाचें बजेट ठरवावें । माणसीं लागेल तें योजावें ।

अन्नवस्त्र अलंकार बरवे । सर्वांलागी घरदार ॥१६॥

 

वेगळा नफा वेगळी संपत्ति । वेगळें वैभव वेगळी महती ।

 वेगळे चोचले कोणाप्रति । उरोंचि न द्यावे ॥१७॥

 

एकचि वस्त्र एकचि अलंकार । एकचि आदर एकचि शृंगार ।

 एकचि भोजन एकचि अधिकार । आपुलाल्या कामाचा ॥१८॥

 

सर्वांना सारखाच सणवार । सर्वांचे एकचि मेजवानी-प्रकार ।

 एरव्ही न मिळो खानपान इतर । भिन्न कोणा ॥१९॥

 

सणावारीं कोणी वारला । तरि गोडधड नसावें गांवाला ।

 तो दिवस सोडोनि पाहिजे नेमला । दुजा सर्वांनी ॥२०॥

 

सर्वांची उठण्याची एक वेळा । घरकाम करण्या हुरूप आगळा ।

 सफाईध्यानप्रार्थना सगळा । कार्यक्रम सामुदायिक ॥२१॥

 

सर्वांस ठेवावें सारखें । राहणीखाणेंकपडे नेटके ।

 सर्वांच्या मुलांस शिक्षण निकें । योग्यता-भेद बघोनि ॥२२॥

 

शिक्षणाची एकचि शाळा । राहणीचा एकचि सोहळा ।

प्रेमाचा सर्वभावें लळा । जेथे तेथे सर्वांशी ॥२३॥

 

समान व्यवस्था आरोग्याची । सारखीच उन्नति स्त्री-पुरुषांची ।

 एकाची ती सर्वचि गांवाची । जबाबदारी ॥२४॥

 

जैसेकोणी येती पाहुणे । ते त्या आदर्श गांवाचेचि म्हणे ।

 वाटून द्यावेत आपुलाले कोणें । ऐसेंहि होतें ॥२५॥

 

परि त्यासि आहे मर्यादा । तेवढाचि नसावा धंदा ।

पाहुण्याची वेळसीमा सर्वदा । निश्चितचि असावी ॥२६॥

 

एरव्ही करावा पत्रव्यवहार । जेव्हा नसेल काम जरूर ।

 दिवस घालवूं नयेत भराभर । पाहुणेबाजींतचि ॥२७॥

 

तैसेचि लग्नादि उत्सव । त्यांसि झटावें गांवाने सर्व ।

परंतु नेहमीच धावाधाव । न व्हावी तीहि ॥२८॥

 

गांवच्या मुलामुलीचें लग्न । सामुदायिक पध्दतिच प्रमाण ।

 तेथे तिथि-मुहूर्ताचें कारण । कांहीच नाही ॥२९॥

 

असोत लग्नें दहा-पन्नास । गांवचीं शंभरहि त्या वर्षास ।

एकाच वेळीं सावकाश । उरकवावीं एके जागीं ॥३०॥

 

गांवीं असावें विवाहस्थान । भांडीकुंडीं बिछायत पूर्ण ।

सर्वांसाठी ठेवावी जमवोन । गांवातर्फे ॥३१॥

 

पवित्र विशाल सुंदर स्थान । जेथे प्रसन्न राही मन ।

सर्व वरांनी एकचि ठिकाण । पसंत करावें लग्नासि ॥३२॥

 

प्रसन्न वेळ आणि सज्जन । तोचि मुहूर्त सुखसंपन्न ।

 प्रसन्न हवापाणी पाहोन । कार्य करावें सर्वांनी ॥३३॥

 

गांवचे सर्व जमोनि मित्र । सहकार्य अर्पावें सर्वत्र ।

बसवोन वधुवरांना एकत्र । करावें लग्नकार्य ॥३४॥

 

लग्नादिकासाठी कोणा । उडवूं न द्यावें गांवच्या धना ।

कराव्या ग्रामोध्दार-योजना । सर्व मिळोनि ॥३५॥

 

सर्वांनी आपलें सर्वस्व द्यावें । आदर्ह्स गांवाचें बनोनि राहावें ।

कोणींहि वेगळें न व्हावें । ऐसी घ्यावी दक्षता ॥३६॥

 

जरी सर्वांनी संसारी असावें । तरी संततिनियमन सांभाळावें ।

तीन पुत्रांवरि पुत्र व्हावे । ऐसें इच्छूं नये कोणी ॥३७॥

 

पुत्र तान्हपणीं वाढला । दुसर्‍या दूधावरि लागला ।

की आईपासोनि सोडविला । पाहिजेचि तो ॥३८॥

 

गांवाने करावें शिशुसंगोपन । म्हातार्‍या प्रेमळ बायांकडोन ।

 जयांचेनि काम भिन्न । होत नाही कष्टाचें ॥३९॥

 

संपत्ति आणि संतति । सगळी गांवाची ठेव निश्चिती ।

वाढवोनि साधावी उन्नति । योग्य मार्गे गांवाची ॥४०॥

 

आपुल्या गांवाचें सुखदु:ख । सकळांसीच कळावें नि:शंक ।

येतां परस्परांची हांक । धावोनि जावें जिव्हाळयाने ॥४१॥

 

ज्याची कोणास जरूर पडे । त्यास त्याने बोलवावें निर्भिडें ।

कोणीहि घेऊं नयेत आढेवेढे । आपुले अडथळे सांगोनि ॥४२॥

 

कामाचें महत्त्व पाहोनि । हांकेस त्वरित जावें धावोनि ।

 तोहि येईल तैसाचि समजोनि । कामास माझ्या ॥४३॥

 

जैसें आपण कोणाचें करावें । तैसेंचि आपुल्या वाटयास यावें ।

 ऐसेंचि आहे स्वरूप बरवें । सहकार्याचें मानवांच्या ॥४४॥

 

म्हणोनि संकटीं धावोनि जावें । सर्वांनी कष्ट वाटूनि घ्यावे ।

जेणेंकरूनि सर्वांस वाटावें । कुटुंब माझें विश्वव्यापी ॥४५॥

 

जीव जगीं जन्मासि आला । ऐसेंचि सहकार्य द्यावयाला ।

 अज्ञानी प्राणी सेवेसि मुकला । त्यास करावें सावधान ॥४६॥

 

कोणास नाही उद्योगधंदा । कोण लागला भलतिया छंदा ।

 पाहावी निरीक्षोनि आपदा । दूर कराया गांवाची ॥४७॥

 

कोण कोणाशीं वितंडतो । कोण कोणाला छळीत बसतो ।

कोण स्वार्थासाठी दंडतो । पाहणें काम आमुचें ॥४८॥

 

व्यसनाधीन कोण राहे । कोण जुगारीं बसलाहे ।

चिंतातुर कोण कां आहे । पाहणें काम आमुचें ॥४९॥

 

कोणी स्त्रियांना जाच करिती । कोणी आईबापा कष्ट देती ।

कोणी मुलीच न पाठविती । कोणी नेती पळवोनि ॥५०॥

 

हे सर्व दोष सारावया । जबाबदार आम्हीच तया ।

 गांवचे रहिवासी म्हणोनिया । काळजी असो आम्हांसि ॥५१॥

 

आमुचें करणें आमुचें नव्हे । त्या जामीन सर्व गांव आहे ।

हें समजोनि करावें होय-नोहे । सर्व कांही सर्वांनी ॥५२॥

 

आम्ही गांवीं दारू प्यालों । म्हणजे ’ दारूडे लोक ’ झालों ।

 तेणें ’ दारूबाज गांव ’ नांव चालो । ऐसें होतें ॥५३॥

 

मग सांगा सर्व दारूबाज । होतां कैसें चालेल राज्य ?

 म्हणोनि व्यसनादिकांचें बीज । येऊं न द्यावें शिवेआंत ॥५४॥

 

कोणी गांवीं तमाशा करी । मनोरंजनाचा प्रचार विषारी ।

 तेणें मुलें नाचती दारोदारीं । नाचे जैसे ॥५५॥

 

नृत्यकलेच्या नांवाखाली । विषयांध भावना पसरली ।

 ऐसी नको सुधारणा-भुली । आमुच्या गांवीं ॥५६॥

 

ही कला नव्हेविडंबन । पैसे लुटायाचें स्थान ।

 ऐसें नाटकपथकगायन । असों न द्यावें ॥५७॥

 

असेल ज्यांत जनहित । त्यासीच राहावें सहमत ।

वाढूं न द्यावा वाईट पंथ । कोणताहि गांवीं ॥५८॥

 

उत्तम कार्यासि जे निघाले । रामधून भजन कलापथक चाले ।

 व्यायाम खेळ मनोरंजन भलें । सर्वकांही ॥५९॥

 

कोठेचि नाही कुटिलता । तमाशे-दंडारींची हीनता ।

विचारल्याविण पुढारी येतां । भय वाटावें तयासि ॥६०॥

 

परका कार्यक्रमासि घुसे । विचारल्याविण मुख्यासि सहसें ।

 कधीहि घडणार नाही ऐसें । गांवीं आमुच्या ॥६१॥

 

गांवाच्या बुध्दीची उच्च पातळी । लोकां कळावें तत्त्वें सगळीं ।

भाषणें चालावीं  वेळोवेळीं । ग्रामोन्नतीचीं यासाठी ॥६२॥

 

आपण कोणी भिन्न आहों । ऐसी स्वप्नींहि भावना न येवो ।

 यासाठी ज्ञानपाठ जागता राहो । गांवीं आमुच्या ॥६३॥

 

आमुच्या गांवीं प्रार्थना-मंदिर । जेथे सर्व धर्मांचा आदर ।

 विश्वांतील जे असतील थोर । ते आम्हांसि देवतुल्य ॥६४॥

 

त्याच मंदिरीं थोरांची जयंति । उत्सव आणि संत-पुण्यतिथि ।

 जागती राहे सामुदायिक वृत्ति । बौध्दिक-बळें ॥६५॥

 

साधुदेवतांची जयंति । पुण्यतिथि आदि उत्सव किती ।

 इच्छा असेल ती सत्कृति । करावी गांवीं ॥६६॥

 

पण सर्वांचें असावें मत पवित्र । गांवाने होऊनि एकत्र ।

 सामुदायिकचि सर्वत्र । उत्सव करावे ॥६७॥

 

गांवचा उत्सव तो सर्वांचा । त्यांत हर्ष अति आदर्शाचा ।

 तेथे आपापल्या मनाचा । तोल नसावा विपरीत ॥६८॥

 

नाहीतरि वाढे सांप्रदायिकता । जातीयताव्यक्तिनिष्ठता ।

 तेणें गांवाचे तुकडे होतां । वेळ न लागे ॥६९॥

 

म्हणोनि भेदचि नको कांही । सर्वांमनीं उत्साह राही ।

 एक कुटुंब ऐसें सर्वहि । ग्राम आमुचें प्रेमळ ॥७०॥

 

आपुलें प्रेमचि अमोल संपत । आपुले श्रमचि महान दौलत ।

 आपुलें सहकार्यचि खरी इज्जत । समजावोनि द्यावें सर्वांसि ॥७१॥

 

गांवीं तेंचि सर्वांनी करावें । कीर्तिस्फूर्तीने गांव भरावें ।

 घराघरांत शांतिसुख पावे । जनता जेणें ॥७२॥

 

कोणी एक मागे पडला । त्यास दुसर्‍याने सांभाळिला ।

 ऐसें करितांच गांव झाला । सर्व गुणीं संपन्न तो ॥७३॥

 

गांवांत नाही झगडा तंटा । कोणी नाही बोलणार उफराटा ।

सरळ सालस स्वभाव चोखटा । प्राणियांचा दिसावा ॥७४॥

 

जरी मत भिन्न झालें । तरी पाहिजे गांवांतचि मिटविलें ।

आपुल्या गांवाविण नाही उरलें । कोर्टकचेरी-काम कोठे ॥७५॥

 

गांवचा झगडा गांवींच मिटे । निवडणुकीचें काम नव्हे खोटें ।

 लंदफंद गांवांत नाही कोठे । ऐसें ग्राम सुंदर हें ॥७६॥

 

ऐसें सांगाया वाटावा अभिमान । तेंचि खरें गांवाचें भूषण ।

 गांवांतील सर्व लोक सज्जन । परस्परांवरि अति मोह ॥७७॥

 

यांत कोणी उनाड दिसला । त्यासि उपदेश द्यावा चांगला ।

 एवढें करोनि नाही वागला । तरि तो झाला बहिरंग ॥७८॥

 

ज्याने गांवांत धिंगाणा घातला । तो गांव-घातकीच ठरला ।

 त्यास पाहिजे सरळ केला । शांति-प्रयत्न करोनि ॥७९॥

 

मग सर्वांनी मिळोनि ठरवावें । याचें पुढे काय करावें ।

निरुपाय होतां पाठवावें । निर्णय करोनि परगांवीं ॥८०॥

 

मग त्यास न मिळे सामान । अथवा त्याचें असलेलें धन ।

 त्याने पळावें जीव घेवोन । आपुला कोठे ॥८१॥

 

ऐसें बळकटपण जंव नाही । तंव आदर्श गांव तमाशाच राही ।

 त्यांत स्थिरताच येणार नाही । कांही केल्या ॥८२॥

 

यावरि श्रोता प्रश्न करी । गांवांत अडचणी नानापरी ।

सर्व लोक जनोनि कोठवरि । सोडवतील सर्वचि त्या ॥८३॥

 

सर्वचि पाहती कारभार । तरि केव्हा करावें काम इतर 

याने ग्रामजीवन स्थिर । होईल कैसें सांगाना ॥८४॥

 

ऐका याचें समाधान । करावी एक समिति निर्माण ।

 सर्वांनी आपले प्रतिनिधि म्हणून । नेमावे कांही कारभारी ॥८५॥

 

ज्यांनी आपुलें सर्वस्व द्यावें । तेचि समितीचे घटक बरवे ।

तनमनधन समर्पावें । ग्रामासाठी जयांनी ॥८६॥

 

त्या सर्वांना सभासद करावें । त्यांतून पांचजण निवडावे ।

सर्वांनीं प्रांजळ मनें पाहावे । इमानदार न्यायनिष्ठ ॥८७॥

 

सर्वांचें मालधन एक करावें । सभासदांचें मोजमाप घ्यावें ।

मग सर्वांचेंचि जीवन बनवावें । एकसारिखें ॥८८॥

 

सर्वांना भरपूर कामें द्यावीं । उत्पन्नाची व्यवस्था लावावी ।

 सर्व व्यवहार-उपाधि पाहावी । त्याच पंचांनी ॥८९॥

 

सर्वांनी आपापलें काम करावें । विकणें घेणें पंचांनी पाहावें ।

 आणि उद्योगासि सामान पुरवावें । पंचांनीच ॥९०॥

 

गांवाकरितां मार्ग जोडावा । गांवाकरितां व्यापार पुढे न्यावा ।

 हरतर्‍हेचा संबंध आणावा । सुखी कराया गांव हें ॥९१॥

 

गांवांतून जें द्रव्य जावें । मालमनुष्यबलसामान बरवें ।

 तें प्रथम पूर्ण निरीक्षोनि घ्यावें । गांवासाठी पंचांनी ॥९२॥

 

सर्वचि योजना पंचांवरती । कोणाचेंचि नाही इतराहातीं ।

 इतर निश्चिंत राहती । कराया प्रगति अधिकाधिक ॥९३॥

 

एकदा येथें अनन्य झाले । ते व्यापारचिंतेपासूनि सुटले ।

 नि:स्पृह भगवत्प्रेमी झाले । काम आपुलें करोनि ॥९४॥

 

पंच म्हणजे परमेश्वरदूत । सर्वांची चिंता करी निश्चित ।

 याविषयीं कोणाचें दुमत । असूंचि नये ॥९५॥

 

तयांनी सर्व काळजी घ्यावी । गांवची जनता सुखी ठेवावी ।

 निर्णय देतांचि ऐकावी । हांक जनतेने पंचांची ॥९६॥

 

ग्रामीं जनता असेल मोठी । परि ती पंचापुढे धाकुटी ।

सदा तत्पर सेवेसाठी । प्राण पणा लावोनि ॥९७॥

 

पंच बोलले तें वेदप्रमाण । हीच गांवधर्माची खूण ।

यांतचि ग्रामाचें आदर्शपण । आमुच्या मतें ॥९८॥

 

आमुचें गांव एक कुटुंब । पंच तयाचा मूळस्तंभ ।

 सर्वांवरि न्यायाचा दाब । हाचि कळस विकासाचा ॥९९॥

 

नसतां कोणाचेंहि शासन । न्यायाने वागती सत्ययुगीं जन ।

त्याचेंचि रूपांतर पंचायतन । लोकशाही लोकतंत्र ॥१००॥

 

या योजनेचें एकचि मरण । तेंहि देतों लक्षांत आणोन ।

पंच म्हणोनि निवडाल गौण । तरि ये धोका जीवनासि ॥१०१॥

 

सेवाहीनांची पंचायत । ती गांवास करील पंचाईत ।

 लोकशाही म्हणजे लोकांचें मनोगत । सिंहासनीं चढावें ॥१०२॥

 

लोकशाही म्हणजे लोकांचें हित । लोकांकडूनि व्हावें हातोहात ।

 सर्व मालक म्हणोनि सत्य । जबाबदारी ओळखावी ॥१०३॥

 

तीच म्हणावी लोकाशाही । जेथे कोणी कामचुकार नाही ।

 सेवातत्पर सर्व उत्साही । न्यायी जन ॥१०४॥

 

लोकशाहींत जो सत्ताधारी । तो मालक नव्हेचि निर्धारी ।

 लोकसेवेचा कारभारी । जबाबदारी हे त्याची ॥१०५॥

 

सर्व लोक कार्यतत्पर । त्यांहूनि विशेष जो धुरंधर ।

 तोचि ग्रामाधिकारी खरोखर । पंच वा नेता ॥१०६॥

 

पंच तो असे आमुच्यांतील । अधिक कामकर्ता आचारशील ।

ज्यासि संडास-सफाईचेंहि नवल । नसे कांही ॥१०७॥

 

अधिक सुरळीत काम करील । नेमाने निष्ठेने राहील ।

तोचि अधिकारी होईल । या गुणांनी गांवाचा ॥१०८॥

 

येथे महत्त्व सदगुणांचें । धाडसाचेंस्वार्थत्यागाचें ।

 तेचि पुढारी होती गांवाचे । जे गांवास देव मानती ॥१०९॥

 

ज्याने गांवचि देव मानिला । सेवाकार्याचा मंत्र जपला ।

 त्याचाचि असावा बोलबाला । गांवामाजीं आपुल्या ॥११०॥

 

तोचि पंच अतिसात्विक । गांव मानी जगन्नायक ।

एक सेवाचि महापूज देख । इतर नाही त्यासि भक्ति ॥१११॥

 

त्याला नाही दुसरा धर्म । त्याला नाही दुसरें कर्म ।

एक सेवाचि त्याचा उपक्रम । सर्वकाळ गांवलोकीं ॥११२॥

 

त्याचें सर्वस्व आमुच्या करितां । म्हणोनीच तो आमुचा पिता ।

 जेथे जातिधर्मपंथमता । महत्त्व नाही ॥११३॥

 

तोचि पंच निवडावा । श्रध्दाविचारें ओळखावा ।

गटबाजीचा होवो न द्यावा । तमाशा कोठे ॥११४॥

 

करावें सकळांच्या हिताचें । तेथे व्यक्तित्वचि नको आमुचें ।

 जो करि सर्वांहूनि हित लोकांचें । तोचि नेता मानावा ॥११५॥

 

सज्जनांचें असावें पंचमंडळ । जें गांवा चालवी सर्वकाळ ।

 आपुलें कुटुंबचि गांव सकळ । मानावें त्यांनी ॥११६॥

 

परस्परांना घेऊनि चालावें । परस्परांचें हृदय एक व्हावें ।

कोठे उणें पडतां आपणचि समजावें । उणे असों ॥११७॥

 

आपुल्या व्यक्ति-कुटुंबा करितां । न व्हावी गांवाची अव्यवस्था ।

 ऐसी दृष्टि असावी समस्तां । कार्यकर्त्यासि ॥११८॥

 

अन्यायें पीडा न होवो कोणास । न व्हावा मुंगीलाहि त्रास ।

याची जाणीव असावी प्रमुखास । सर्वकाळ ॥११९॥

 

सार्वजनिक वस्तु घरीं भोगणें । आप्तजनांसि सवलती देणें ।

हें टाकूनि करावी चोखपणें । तत्परतेने जनसेवा ॥१२०॥

 

आपुला दुराग्रह दूर सारावा । बहुजनांचा मागोवा घ्यावा ।

 शक्यतों कारभार चालावा । एकमताने गांवाचा ॥१२१॥

 

पांचामुखीं परमेश्वर । परि नको सत्तेचा अहंकार ।

 नियम पाळतां वाटावें सुखकर । ठरलियावरि ॥१२२॥

 

सर्वांनी सर्वांसाठी झटावें । सर्वांच्या हितांत स्वहित पाहावें ।

थोरांनी याचे धडे दाखवावे । आचरोनि निश्चयाने ॥१२३॥

 

यांतचि आहे मोठेपण । ग्रामजीवन होई स्वयंपूर्ण ।

हीच आहे खरी खूण । आदर्श ग्रामराज्याची ॥१२४॥

 

ग्रामराज्यचि रामराज्य । स्वावलंबन हेंचि स्वराज्य ।

बोलिले महात्मा विश्वपूज्य । विकास त्याचा सुंदर हा ॥१२५॥

 

आमचें ग्रामचि एक राज्य । सर्वांचें माहेर अविभाज्य ।

ऐसे आदर्श होती जे जे । नातें आमुचें त्यांच्याशी ॥१२६॥

 

दुसरें गांव शत्रु नोहे । परि आमुचा संबंध कामीं राहे ।

सहकार्य देती पंच निश्चयें । चांगुलपण वाढवाया ॥१२७॥

 

पंचमंडळ निष्ठेने राही । तें तें गांव भूवैकुंठ होई ।

 त्याच्या प्रभावें  पवित्र मही । आपोआप होतसे ॥१२८॥

 

ऐसें जंव गांव साधलें । तंव तें प्रांतांत प्रमुख झालें ।

 ऐसे प्रांत प्रभावी ठरले । तरीच तें भूषण देशासि ॥१२९॥

 

देश ऐसा उन्नत होय । तोचि विश्वाचा घटक शांतिमय ।

एरव्ही जो स्वार्थे पुढें घे पाय । घातक होय विश्वासि ॥१३०॥

 

म्हणोनि ऐका लक्ष लावून । स्वर्ग कराया जगीं निर्माण ।

 करा कुटुंब समर्पण । सामुदायिक तत्त्वासि ॥१३१॥

 

घ्या वाचूनकरा तातडी । मग मनन करोनि आवडीं ।

 घाला या आदर्शयोजनेंत उडी । आपुलें सर्वस्व देवोनि ॥१३२॥

 

श्रोतेहो ! ऐकिलें काय वचना मग वेळ कासयासि पुन्हा 

आजचि तनमनधन समर्पाना । या कार्यासि ॥१३३॥

 

यानेच थोरांची इच्छा सफळ । सार्थकीं लागे ज्ञानभक्ति सकळ ।

मिटेल अंतर्बाह्य तळमळ । तुकडया म्हणे सर्वांची ॥१३४॥

 

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत ।

 आदर्श ग्रामराज्य कथित । एकोणचाळिसावा अध्याय संपूर्ण ॥१३५॥




अध्याय ३९ वाऑडीओ स्वरुपात --



 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

।।जय गुरुदेव।।