अध्याय ३९ वा
भूवैकुण्ठ
सर्व जनांचें
समाधान । याहूनि स्वर्ग नाही महान ।
नांदती द्वेष-मत्सराविण । बंधुभावें सर्व जेथे
॥१॥
गरीब-श्रीमंत
कोणी नाही । नाही दारिद्रय रोगराई ।
उंचनीच कामें
सर्वहि । करिती लोक प्रेमभरें ॥२॥
पक्ष नाही पंथ
नाही । जातिभेद विरोध कांही ।
एका कुटुंबापरी राही । गांव आपुलें आनंदें ॥३॥
ऐसें व्हावें
कोठेतरी । त्यासीच आम्ही म्हणतों वैकुंठपुरी ।
जेथे नाही भावनाच दुसरी । परकेपणाची ॥४॥
ग्रंथीं
स्वर्ग-वैकुंठ-वर्णन । वाचतां तल्लीन होतें मन ।
त्यांत वर्णिले हेचि गुण । ते कां आपण न घ्यावे ? ॥५॥
सत्य युगाची
ऐकावी कथा । परि आपुली न सोडावी प्रथा ।
याने समाजाच्या व्यथा । चुकतील कैशा ? ॥६॥
वैकुंठींचा
प्रेमानंद । सत्ययुगाचा समतावाद ।
आपुल्या गांवीं
करावा सिध्द । हेंचि कर्तव्य सर्वांचें ॥७॥
देवाने जगीं
अवतार घ्यावा । ऐसें कां वाटतें जीवा ?
त्रास अन्याय
अनाचार नसावा । कोठेहि लोकीं ॥८॥
जरि हें आपणांसि
आवडे । तरि आपणचि व्हावें कराया पुढे ।
न करितांचि देवानांवें ओरडे । तें सर्व वाया ॥९॥
सर्वचि भगवंताचे
सखे । देवाचिया न्यायाने सारखे ।
मग व्यवहारींच
पारखे । कां ठेवावे ? ॥१०॥
देवाचा न्याय
जगीं आणावा । तरीच मिटे दु:ख-गवगवा ।
यासि टाळील तो
जाणावा । भक्त कैसा ? ॥११॥
जें एकास तेंचि
सकळांस । हेंचि सत्य जीवनाचें रहस्य ।
सर्वांच्या सुखीं दु:खीं समरस । भावना राहती
सकळांच्या ॥१२॥
उणा-अधिक
गुणापाशी । नको जाति वा धनापाशी ।
अधिकार समानचि
सर्वांसि । जीवनाचा ॥१३॥
सर्वांनी करावें
शक्तिभर काम । अधिकारपरत्वें उपक्रम ।
सर्वांसि मिळावें सौख्य सम । गरजांप्रमाणे जरूर
त्या ॥१४॥
ऐसीच सर्वांची
योजना करावी । पूर्ण वर्ष चिंताचि नसावी ।
अन्नवस्त्र धंद्यांची बरवी । योजना व्हावी
सर्वांमिळोनि ॥१५॥
वर्षाचें बजेट
ठरवावें । माणसीं लागेल तें योजावें ।
अन्नवस्त्र
अलंकार बरवे । सर्वांलागी घरदार ॥१६॥
वेगळा नफा वेगळी
संपत्ति । वेगळें वैभव वेगळी महती ।
वेगळे चोचले कोणाप्रति । उरोंचि न द्यावे ॥१७॥
एकचि वस्त्र एकचि
अलंकार । एकचि आदर एकचि शृंगार ।
एकचि भोजन एकचि अधिकार । आपुलाल्या कामाचा ॥१८॥
सर्वांना सारखाच
सणवार । सर्वांचे एकचि मेजवानी-प्रकार ।
एरव्ही न मिळो खानपान इतर । भिन्न कोणा ॥१९॥
सणावारीं कोणी
वारला । तरि गोडधड नसावें गांवाला ।
तो दिवस सोडोनि पाहिजे नेमला । दुजा सर्वांनी
॥२०॥
सर्वांची उठण्याची एक वेळा । घरकाम करण्या हुरूप आगळा ।
सफाई, ध्यान, प्रार्थना सगळा । कार्यक्रम
सामुदायिक ॥२१॥
सर्वांस ठेवावें
सारखें । राहणी, खाणें, कपडे नेटके ।
सर्वांच्या मुलांस शिक्षण निकें । योग्यता-भेद
बघोनि ॥२२॥
शिक्षणाची एकचि
शाळा । राहणीचा एकचि सोहळा ।
प्रेमाचा
सर्वभावें लळा । जेथे तेथे सर्वांशी ॥२३॥
समान व्यवस्था
आरोग्याची । सारखीच उन्नति स्त्री-पुरुषांची ।
एकाची ती सर्वचि गांवाची । जबाबदारी ॥२४॥
जैसे, कोणी येती पाहुणे । ते त्या आदर्श गांवाचेचि म्हणे ।
वाटून द्यावेत आपुलाले कोणें । ऐसेंहि होतें
॥२५॥
परि त्यासि आहे
मर्यादा । तेवढाचि नसावा धंदा ।
पाहुण्याची वेळ, सीमा सर्वदा । निश्चितचि असावी ॥२६॥
एरव्ही करावा
पत्रव्यवहार । जेव्हा नसेल काम जरूर ।
दिवस घालवूं नयेत भराभर । पाहुणेबाजींतचि ॥२७॥
तैसेचि लग्नादि
उत्सव । त्यांसि झटावें गांवाने सर्व ।
परंतु नेहमीच
धावाधाव । न व्हावी तीहि ॥२८॥
गांवच्या
मुलामुलीचें लग्न । सामुदायिक पध्दतिच प्रमाण ।
तेथे तिथि-मुहूर्ताचें कारण । कांहीच नाही ॥२९॥
असोत लग्नें
दहा-पन्नास । गांवचीं शंभरहि त्या वर्षास ।
एकाच वेळीं
सावकाश । उरकवावीं एके जागीं ॥३०॥
गांवीं असावें
विवाहस्थान । भांडीकुंडीं बिछायत पूर्ण ।
सर्वांसाठी
ठेवावी जमवोन । गांवातर्फे ॥३१॥
पवित्र विशाल
सुंदर स्थान । जेथे प्रसन्न राही मन ।
सर्व वरांनी एकचि
ठिकाण । पसंत करावें लग्नासि ॥३२॥
प्रसन्न वेळ आणि
सज्जन । तोचि मुहूर्त सुखसंपन्न ।
प्रसन्न हवापाणी पाहोन । कार्य करावें सर्वांनी
॥३३॥
गांवचे सर्व
जमोनि मित्र । सहकार्य अर्पावें सर्वत्र ।
बसवोन वधुवरांना
एकत्र । करावें लग्नकार्य ॥३४॥
लग्नादिकासाठी
कोणा । उडवूं न द्यावें गांवच्या धना ।
कराव्या
ग्रामोध्दार-योजना । सर्व मिळोनि ॥३५॥
सर्वांनी आपलें
सर्वस्व द्यावें । आदर्ह्स गांवाचें बनोनि राहावें ।
कोणींहि वेगळें न
व्हावें । ऐसी घ्यावी दक्षता ॥३६॥
जरी सर्वांनी
संसारी असावें । तरी संततिनियमन सांभाळावें ।
तीन पुत्रांवरि
पुत्र व्हावे । ऐसें इच्छूं नये कोणी ॥३७॥
पुत्र तान्हपणीं
वाढला । दुसर्या दूधावरि लागला ।
की आईपासोनि
सोडविला । पाहिजेचि तो ॥३८॥
गांवाने करावें
शिशुसंगोपन । म्हातार्या प्रेमळ बायांकडोन ।
जयांचेनि काम भिन्न । होत नाही कष्टाचें ॥३९॥
संपत्ति आणि
संतति । सगळी गांवाची ठेव निश्चिती ।
वाढवोनि साधावी
उन्नति । योग्य मार्गे गांवाची ॥४०॥
आपुल्या गांवाचें
सुखदु:ख । सकळांसीच कळावें नि:शंक ।
येतां परस्परांची
हांक । धावोनि जावें जिव्हाळयाने ॥४१॥
ज्याची कोणास
जरूर पडे । त्यास त्याने बोलवावें निर्भिडें ।
कोणीहि घेऊं नयेत
आढेवेढे । आपुले अडथळे सांगोनि ॥४२॥
कामाचें महत्त्व
पाहोनि । हांकेस त्वरित जावें धावोनि ।
तोहि येईल तैसाचि समजोनि । कामास माझ्या ॥४३॥
जैसें आपण
कोणाचें करावें । तैसेंचि आपुल्या वाटयास यावें ।
ऐसेंचि आहे स्वरूप बरवें । सहकार्याचें
मानवांच्या ॥४४॥
म्हणोनि संकटीं
धावोनि जावें । सर्वांनी कष्ट वाटूनि घ्यावे ।
जेणेंकरूनि
सर्वांस वाटावें । कुटुंब माझें विश्वव्यापी ॥४५॥
जीव जगीं जन्मासि
आला । ऐसेंचि सहकार्य द्यावयाला ।
अज्ञानी प्राणी सेवेसि मुकला । त्यास करावें
सावधान ॥४६॥
कोणास नाही
उद्योगधंदा । कोण लागला भलतिया छंदा ।
पाहावी निरीक्षोनि आपदा । दूर कराया गांवाची
॥४७॥
कोण कोणाशीं
वितंडतो । कोण कोणाला छळीत बसतो ।
कोण स्वार्थासाठी
दंडतो । पाहणें काम आमुचें ॥४८॥
व्यसनाधीन कोण
राहे । कोण जुगारीं बसलाहे ।
चिंतातुर कोण कां
आहे । पाहणें काम आमुचें ॥४९॥
कोणी स्त्रियांना
जाच करिती । कोणी आईबापा कष्ट देती ।
कोणी मुलीच न
पाठविती । कोणी नेती पळवोनि ॥५०॥
हे सर्व दोष
सारावया । जबाबदार आम्हीच तया ।
गांवचे रहिवासी म्हणोनिया । काळजी असो आम्हांसि
॥५१॥
आमुचें करणें
आमुचें नव्हे । त्या जामीन सर्व गांव आहे ।
हें समजोनि
करावें होय-नोहे । सर्व कांही सर्वांनी ॥५२॥
आम्ही गांवीं
दारू प्यालों । म्हणजे ’ दारूडे लोक ’ झालों ।
तेणें ’ दारूबाज गांव ’ नांव चालो । ऐसें होतें ॥५३॥
मग सांगा सर्व
दारूबाज । होतां कैसें चालेल राज्य ?
म्हणोनि व्यसनादिकांचें बीज । येऊं न द्यावें शिवेआंत ॥५४॥
कोणी गांवीं
तमाशा करी । मनोरंजनाचा प्रचार विषारी ।
तेणें मुलें नाचती दारोदारीं । नाचे जैसे ॥५५॥
नृत्यकलेच्या
नांवाखाली । विषयांध भावना पसरली ।
ऐसी नको सुधारणा-भुली । आमुच्या गांवीं ॥५६॥
ही कला नव्हे, विडंबन । पैसे लुटायाचें स्थान ।
ऐसें नाटक, पथक, गायन । असों न द्यावें ॥५७॥
असेल ज्यांत
जनहित । त्यासीच राहावें सहमत ।
वाढूं न द्यावा
वाईट पंथ । कोणताहि गांवीं ॥५८॥
उत्तम कार्यासि
जे निघाले । रामधून भजन कलापथक चाले ।
व्यायाम खेळ मनोरंजन भलें । सर्वकांही ॥५९॥
कोठेचि नाही
कुटिलता । तमाशे-दंडारींची हीनता ।
विचारल्याविण
पुढारी येतां । भय वाटावें तयासि ॥६०॥
परका
कार्यक्रमासि घुसे । विचारल्याविण मुख्यासि सहसें ।
कधीहि घडणार नाही ऐसें । गांवीं आमुच्या ॥६१॥
गांवाच्या
बुध्दीची उच्च पातळी । लोकां कळावें तत्त्वें सगळीं ।
भाषणें चालावीं वेळोवेळीं । ग्रामोन्नतीचीं यासाठी ॥६२॥
आपण कोणी भिन्न
आहों । ऐसी स्वप्नींहि भावना न येवो ।
यासाठी ज्ञानपाठ जागता राहो । गांवीं आमुच्या
॥६३॥
आमुच्या गांवीं
प्रार्थना-मंदिर । जेथे सर्व धर्मांचा आदर ।
विश्वांतील जे असतील थोर । ते आम्हांसि देवतुल्य
॥६४॥
त्याच मंदिरीं
थोरांची जयंति । उत्सव आणि संत-पुण्यतिथि ।
जागती राहे सामुदायिक वृत्ति । बौध्दिक-बळें
॥६५॥
साधुदेवतांची
जयंति । पुण्यतिथि आदि उत्सव किती ।
इच्छा असेल ती सत्कृति । करावी गांवीं ॥६६॥
पण सर्वांचें असावें
मत पवित्र । गांवाने होऊनि एकत्र ।
सामुदायिकचि सर्वत्र । उत्सव करावे ॥६७॥
गांवचा उत्सव तो
सर्वांचा । त्यांत हर्ष अति आदर्शाचा ।
तेथे आपापल्या मनाचा । तोल नसावा विपरीत ॥६८॥
नाहीतरि वाढे
सांप्रदायिकता । जातीयता, व्यक्तिनिष्ठता ।
तेणें गांवाचे तुकडे होतां । वेळ न लागे ॥६९॥
म्हणोनि भेदचि
नको कांही । सर्वांमनीं उत्साह राही ।
एक कुटुंब ऐसें सर्वहि । ग्राम आमुचें प्रेमळ
॥७०॥
आपुलें प्रेमचि
अमोल संपत । आपुले श्रमचि महान दौलत ।
आपुलें सहकार्यचि खरी इज्जत । समजावोनि द्यावें
सर्वांसि ॥७१॥
गांवीं तेंचि
सर्वांनी करावें । कीर्तिस्फूर्तीने गांव भरावें ।
घराघरांत शांतिसुख पावे । जनता जेणें ॥७२॥
कोणी एक मागे
पडला । त्यास दुसर्याने सांभाळिला ।
ऐसें करितांच गांव झाला । सर्व गुणीं संपन्न तो
॥७३॥
गांवांत नाही
झगडा तंटा । कोणी नाही बोलणार उफराटा ।
सरळ सालस स्वभाव
चोखटा । प्राणियांचा दिसावा ॥७४॥
जरी मत भिन्न
झालें । तरी पाहिजे गांवांतचि मिटविलें ।
आपुल्या गांवाविण
नाही उरलें । कोर्टकचेरी-काम कोठे ॥७५॥
गांवचा झगडा
गांवींच मिटे । निवडणुकीचें काम नव्हे खोटें ।
लंदफंद गांवांत नाही कोठे । ऐसें ग्राम सुंदर
हें ॥७६॥
ऐसें सांगाया
वाटावा अभिमान । तेंचि खरें गांवाचें भूषण ।
गांवांतील सर्व लोक सज्जन । परस्परांवरि अति मोह
॥७७॥
यांत कोणी उनाड
दिसला । त्यासि उपदेश द्यावा चांगला ।
एवढें करोनि नाही वागला । तरि तो झाला बहिरंग
॥७८॥
ज्याने गांवांत
धिंगाणा घातला । तो गांव-घातकीच ठरला ।
त्यास पाहिजे सरळ केला । शांति-प्रयत्न करोनि
॥७९॥
मग सर्वांनी
मिळोनि ठरवावें । याचें पुढे काय करावें ।
निरुपाय होतां
पाठवावें । निर्णय करोनि परगांवीं ॥८०॥
मग त्यास न मिळे
सामान । अथवा त्याचें असलेलें धन ।
त्याने पळावें जीव घेवोन । आपुला कोठे ॥८१॥
ऐसें बळकटपण जंव
नाही । तंव आदर्श गांव तमाशाच राही ।
त्यांत स्थिरताच येणार नाही । कांही केल्या ॥८२॥
यावरि श्रोता
प्रश्न करी । गांवांत अडचणी नानापरी ।
सर्व लोक जनोनि
कोठवरि । सोडवतील सर्वचि त्या ? ॥८३॥
सर्वचि पाहती
कारभार । तरि केव्हा करावें काम इतर ?
याने ग्रामजीवन
स्थिर । होईल कैसें सांगाना ? ॥८४॥
ऐका याचें समाधान
। करावी एक समिति निर्माण ।
सर्वांनी आपले प्रतिनिधि म्हणून । नेमावे कांही
कारभारी ॥८५॥
ज्यांनी आपुलें
सर्वस्व द्यावें । तेचि समितीचे घटक बरवे ।
तनमनधन समर्पावें
। ग्रामासाठी जयांनी ॥८६॥
त्या सर्वांना
सभासद करावें । त्यांतून पांचजण निवडावे ।
सर्वांनीं
प्रांजळ मनें पाहावे । इमानदार न्यायनिष्ठ ॥८७॥
सर्वांचें मालधन
एक करावें । सभासदांचें मोजमाप घ्यावें ।
मग सर्वांचेंचि
जीवन बनवावें । एकसारिखें ॥८८॥
सर्वांना भरपूर
कामें द्यावीं । उत्पन्नाची व्यवस्था लावावी ।
सर्व व्यवहार-उपाधि पाहावी । त्याच पंचांनी ॥८९॥
सर्वांनी आपापलें
काम करावें । विकणें घेणें पंचांनी पाहावें ।
आणि उद्योगासि सामान पुरवावें । पंचांनीच ॥९०॥
गांवाकरितां
मार्ग जोडावा । गांवाकरितां व्यापार पुढे न्यावा ।
हरतर्हेचा संबंध आणावा । सुखी कराया गांव हें
॥९१॥
गांवांतून जें
द्रव्य जावें । माल, मनुष्यबल, सामान बरवें ।
तें प्रथम पूर्ण निरीक्षोनि घ्यावें । गांवासाठी
पंचांनी ॥९२॥
सर्वचि योजना
पंचांवरती । कोणाचेंचि नाही इतराहातीं ।
इतर निश्चिंत राहती । कराया प्रगति अधिकाधिक
॥९३॥
एकदा येथें अनन्य
झाले । ते व्यापारचिंतेपासूनि सुटले ।
नि:स्पृह भगवत्प्रेमी झाले । काम आपुलें करोनि
॥९४॥
पंच म्हणजे
परमेश्वरदूत । सर्वांची चिंता करी निश्चित ।
याविषयीं कोणाचें दुमत । असूंचि नये ॥९५॥
तयांनी सर्व
काळजी घ्यावी । गांवची जनता सुखी ठेवावी ।
निर्णय देतांचि ऐकावी । हांक जनतेने पंचांची
॥९६॥
ग्रामीं जनता
असेल मोठी । परि ती पंचापुढे धाकुटी ।
सदा तत्पर
सेवेसाठी । प्राण पणा लावोनि ॥९७॥
पंच बोलले तें
वेदप्रमाण । हीच गांवधर्माची खूण ।
यांतचि ग्रामाचें
आदर्शपण । आमुच्या मतें ॥९८॥
आमुचें गांव एक
कुटुंब । पंच तयाचा मूळस्तंभ ।
सर्वांवरि न्यायाचा दाब । हाचि कळस विकासाचा
॥९९॥
नसतां कोणाचेंहि
शासन । न्यायाने वागती सत्ययुगीं जन ।
त्याचेंचि
रूपांतर पंचायतन । लोकशाही लोकतंत्र ॥१००॥
या योजनेचें एकचि
मरण । तेंहि देतों लक्षांत आणोन ।
पंच म्हणोनि
निवडाल गौण । तरि ये धोका जीवनासि ॥१०१॥
सेवाहीनांची
पंचायत । ती गांवास करील पंचाईत ।
लोकशाही म्हणजे लोकांचें मनोगत । सिंहासनीं
चढावें ॥१०२॥
लोकशाही म्हणजे
लोकांचें हित । लोकांकडूनि व्हावें हातोहात ।
सर्व मालक म्हणोनि सत्य । जबाबदारी ओळखावी ॥१०३॥
तीच म्हणावी
लोकाशाही । जेथे कोणी कामचुकार नाही ।
सेवातत्पर सर्व उत्साही । न्यायी जन ॥१०४॥
लोकशाहींत जो
सत्ताधारी । तो मालक नव्हेचि निर्धारी ।
लोकसेवेचा कारभारी । जबाबदारी हे त्याची ॥१०५॥
सर्व लोक
कार्यतत्पर । त्यांहूनि विशेष जो धुरंधर ।
तोचि ग्रामाधिकारी खरोखर । पंच वा नेता ॥१०६॥
पंच तो असे
आमुच्यांतील । अधिक कामकर्ता आचारशील ।
ज्यासि
संडास-सफाईचेंहि नवल । नसे कांही ॥१०७॥
अधिक सुरळीत काम
करील । नेमाने निष्ठेने राहील ।
तोचि अधिकारी
होईल । या गुणांनी गांवाचा ॥१०८॥
येथे महत्त्व
सदगुणांचें । धाडसाचें, स्वार्थत्यागाचें ।
तेचि पुढारी होती गांवाचे । जे गांवास देव मानती
॥१०९॥
ज्याने गांवचि
देव मानिला । सेवाकार्याचा मंत्र जपला ।
त्याचाचि असावा बोलबाला । गांवामाजीं आपुल्या
॥११०॥
तोचि पंच
अतिसात्विक । गांव मानी जगन्नायक ।
एक सेवाचि महापूज
देख । इतर नाही त्यासि भक्ति ॥१११॥
त्याला नाही
दुसरा धर्म । त्याला नाही दुसरें कर्म ।
एक सेवाचि त्याचा
उपक्रम । सर्वकाळ गांवलोकीं ॥११२॥
त्याचें सर्वस्व
आमुच्या करितां । म्हणोनीच तो आमुचा पिता ।
जेथे जातिधर्मपंथमता । महत्त्व नाही ॥११३॥
तोचि पंच निवडावा
। श्रध्दाविचारें ओळखावा ।
गटबाजीचा होवो न
द्यावा । तमाशा कोठे ॥११४॥
करावें सकळांच्या
हिताचें । तेथे व्यक्तित्वचि नको आमुचें ।
जो करि सर्वांहूनि हित लोकांचें । तोचि नेता
मानावा ॥११५॥
सज्जनांचें
असावें पंचमंडळ । जें गांवा चालवी सर्वकाळ ।
आपुलें कुटुंबचि गांव सकळ । मानावें त्यांनी
॥११६॥
परस्परांना घेऊनि
चालावें । परस्परांचें हृदय एक व्हावें ।
कोठे उणें पडतां
आपणचि समजावें । उणे असों ॥११७॥
आपुल्या
व्यक्ति-कुटुंबा करितां । न व्हावी गांवाची अव्यवस्था ।
ऐसी दृष्टि असावी समस्तां । कार्यकर्त्यासि
॥११८॥
अन्यायें पीडा न
होवो कोणास । न व्हावा मुंगीलाहि त्रास ।
याची जाणीव असावी
प्रमुखास । सर्वकाळ ॥११९॥
सार्वजनिक वस्तु
घरीं भोगणें । आप्तजनांसि सवलती देणें ।
हें टाकूनि करावी
चोखपणें । तत्परतेने जनसेवा ॥१२०॥
आपुला दुराग्रह
दूर सारावा । बहुजनांचा मागोवा घ्यावा ।
शक्यतों कारभार चालावा । एकमताने गांवाचा ॥१२१॥
पांचामुखीं
परमेश्वर । परि नको सत्तेचा अहंकार ।
नियम पाळतां वाटावें सुखकर । ठरलियावरि ॥१२२॥
सर्वांनी
सर्वांसाठी झटावें । सर्वांच्या हितांत स्वहित पाहावें ।
थोरांनी याचे धडे
दाखवावे । आचरोनि निश्चयाने ॥१२३॥
यांतचि आहे
मोठेपण । ग्रामजीवन होई स्वयंपूर्ण ।
हीच आहे खरी खूण
। आदर्श ग्रामराज्याची ॥१२४॥
ग्रामराज्यचि
रामराज्य । स्वावलंबन हेंचि स्वराज्य ।
बोलिले महात्मा
विश्वपूज्य । विकास त्याचा सुंदर हा ॥१२५॥
आमचें ग्रामचि एक
राज्य । सर्वांचें माहेर अविभाज्य ।
ऐसे आदर्श होती
जे जे । नातें आमुचें त्यांच्याशी ॥१२६॥
दुसरें गांव
शत्रु नोहे । परि आमुचा संबंध कामीं राहे ।
सहकार्य देती पंच
निश्चयें । चांगुलपण वाढवाया ॥१२७॥
पंचमंडळ निष्ठेने
राही । तें तें गांव भूवैकुंठ होई ।
त्याच्या प्रभावें पवित्र मही । आपोआप होतसे ॥१२८॥
ऐसें जंव गांव
साधलें । तंव तें प्रांतांत प्रमुख झालें ।
ऐसे प्रांत प्रभावी ठरले । तरीच तें भूषण देशासि
॥१२९॥
देश ऐसा उन्नत
होय । तोचि विश्वाचा घटक शांतिमय ।
एरव्ही जो
स्वार्थे पुढें घे पाय । घातक होय विश्वासि ॥१३०॥
म्हणोनि ऐका लक्ष
लावून । स्वर्ग कराया जगीं निर्माण ।
करा कुटुंब समर्पण । सामुदायिक तत्त्वासि ॥१३१॥
घ्या वाचून, करा तातडी । मग मनन करोनि आवडीं ।
घाला या आदर्शयोजनेंत उडी । आपुलें सर्वस्व
देवोनि ॥१३२॥
श्रोतेहो !
ऐकिलें काय वचना ? मग वेळ कासयासि पुन्हा ?
आजचि तनमनधन
समर्पाना । या कार्यासि ॥१३३॥
यानेच थोरांची
इच्छा सफळ । सार्थकीं लागे ज्ञानभक्ति सकळ ।
मिटेल अंतर्बाह्य
तळमळ । तुकडया म्हणे सर्वांची ॥१३४॥
इतिश्री
ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत ।
आदर्श ग्रामराज्य कथित । एकोणचाळिसावा अध्याय
संपूर्ण ॥१३५॥
अध्याय ३९ वाऑडीओ स्वरुपात --
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा