.

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

हे गुरूदेव ! हम सबको सदबुध्दी दे ,सतकर्तव्य करनेकी प्रवृत्ति दे ,सच बोलनका अभ्यास दे ,सतस्वरूप का ग्यान दे । हे जगदव्यापी परमेश्वर ! हम हर मनुष्य मात्र से प्रेमका,सत्यताका,बंधुत्व- -भावका आचरण करे और सुख दुखःमे सम रहे,ऐसी हमको शक्ती दे,युक्ती दे और भक्ती दे । हे सर्वधर्ममें,सर्व संतमे,समस्त संसार में,रममाण होनेवाले चैतन्यघन!हम तेरे लिए,तेरे देश के लिए,हर जीव जंतु के लिए,कुटीलताका,अनैत्तिकताका,छलछिद्र द्रोहताका त्याग करे ऐसा साहस दे । हे भगवान! अंतमे तुझमें समरस हो जाये यह हमारा ध्येय हैं,उद्देश है । इसके लिये तुझको स्मरके निश्चय करते है, प्रतिज्ञा करते है । हे विश्व धर्मको नियमन करनेवाले परमात्मा !जहाँभी,जिधरभी,हममें कुछ कमी दिखती हो,उसमे हमारा ध्यान लगाकर,उस चिज को,उस कार्यको,पुरा करने में हम अपना स्वराज्य समझते है , सूराज्य समझते है ।यह समझने की और कर्तव्य करनेकी हमको प्रियता दे,शक्ती दे ,वरदान दे

मंगळवार, ६ जून, २०१७

अध्याय ४१ वा ग्रंथ-महिमा



अध्याय ४१ वा

ग्रंथ-महिमा

 

 

ईश्वरें व्यापिलें हें विश्व । म्हणोनि जगचि आम्हां देव ।

 विश्वाचा मूळ घटक गांव । ग्रामगीता त्यासाठी ॥१॥

 

यांत ग्रामाचा जयजयकार । सर्व तीर्थक्षेत्रांचें ग्रामचि माहेर ।

ग्राम हा विश्वाचा पाया सुंदर । ग्राम नसतां प्रलयचि ॥२॥

 

ग्राम म्हणजे देवमंदिरे । मानव देवमूर्ति सुंदर ।

 सर्वांची सेवा समप्रकार । तीच पूजा आमुची ॥३॥

 

ग्रामगीता शाब्दिक सेवा । परि दृढ करी संस्कारांचा ठेवा ।

 तेणें ईश्वरी राज्य गांवां । नांदेल सदासर्वकाळ ॥४॥

 

ग्रामगीता दु:खांसि नाशवी । ग्रामगीता मृत्यूसि हसवी ।

ग्रामगीता सहकरीतत्त्व वाढवी । मानवधर्मा फुलवाया ॥५॥

 

चाळीस दिवस म्हणजे मंडळ । ऐसीं अनुष्ठानें प्रांजळ ।

करितां गांव सुधारेल सकळ । संस्कारें ग्रामगीतेच्या ॥६॥

 

म्हणोनि चातुर्मास्यादि निमित्तां । मंदिरींपारींबैठकींत बसतां ।

 वाचावी हर्षभरें ग्रामगीता । रंग रंगणीं आणोनिया ॥७॥

 

परि ऐसी नसावी भावना । अर्थहीन करितां पारायणा ।

ना कळे तरी पुण्यराशी नाना । जमा होतील आमुच्या ॥८॥

 

माझ्या मतें हें अज्ञान । दूर सारोनि करावें वाचन ।

आधी शिकावें अर्थज्ञान । ग्रंथपठन करितांना ॥९॥

 

प्रथम हीच महत्त्वाची खूण । ग्रंथवाचनाचें कळावें ज्ञान ।

आपुलें वाचन आपणा समजून । बोध व्हावा उत्तम ॥१०॥

 

असेल मित्रमंडळी बसली । त्यांनाहि समजावी आपुली बोली ।

 नाहीतरि वाचनपठनें केलीं । कोणा न कळलें तरि काय ॥११॥

 

काय वाचतो याचें ज्ञान । नाही वाचकासीच झालें पूर्ण ।

श्रोते पळती उगेच उठोन । अर्थ काय वाचनासि ॥१२॥

 

कोठे थांबावें वाचकांनी । कोठे वाचावें जोर देवोनि ।

कोठे रंगवावें गंभीरपणीं । कळलें पाहिजे वाचकां ॥१३॥

 

ऐसें जंव कळलेंच नाही । केलीं पारायणें  सर्वहि ।

 लक्ष नसे अर्थप्रवाहीं । तरि तें व्यर्थ वाचन ॥१४॥

 

वाचतांनाचि बोध होतो । अंगीं स्फुरणभाव उठतो ।

 कर्म करावयासि वळतो । जीव जैसा अंतरीं ॥१५॥

 

ऐसें वाचन आधी शिकावें । तरीच ग्रंथपठन करावें ।

मग आपणासि ओळखीत जावें । अधिकारपरत्वें वाचकें ॥१६॥

 

वाचक असावा आचारशील । तरीच श्रोत्यांवरि परिणाम करील ।

नाहीतरि होईल टिंगल । जनतेमाजीं तयाची ॥१७॥

 

मुखाने ग्रंथ वाचावे । घरीं विपरीत आचरावें ।

तैसेचि बाहेरि गोडवे । गाती लोक थट्टेने ॥१८॥

 

मुखें वाचतो ’ सत्य बोलावें ’ । परि सत्य करणेंचि नाही ठावें ।

 म्हणे ’ मज सत्यवान म्हणावें ’ । कैसे म्हणतील ग्रामवासी ॥१९॥

 

मी तों धनावरचा सर्प बरवा । परि मला ’ उदार दाता ’ गौरवा ।

 ऐसें कोण मानील आपुल्या गांवां सांगा सांगा ॥२०॥

 

रंजल्यासि न दे पाणी । म्हणे ’ मज म्हणा दानशूर राणी ’ 

 ऐकेलचि का ऐसें कोणी । किती वाजविले चौघडे तरी ॥२१॥

 

पानतंबाखू खावोनि आला । प्रवचनीं कीर्तनीं शाळेंत बसला ।

 हसती श्रोते-विद्यार्थी त्याला । ’ व्यसनें सोडा ’ बोलतां ॥२२॥

 

एक पंडित जेवणासि बैसला । आरंभ शांतिपाठासि केला ।

 परि जरा वाढण्यासि उशीर झाला । मारलें त्याने बाइलेसि ॥२३॥

 

ती म्हणे वाहवा ऐसी शांति ! उत्तम मंत्राची फलश्रुति !

तोंडाने पति दिव्य बोलती । आचरण करिती क्रूराचें ॥२४॥

 

ऐसें न व्हावें आतातरी । असोत वाचक वक्ते शिक्षक भारी ।

 आहे सर्वांवरीच जबाबदारी । आधी आत्मशुध्दीची ॥२५॥

 

उपदेशक वाचक आचारशील । असले तरीच भाव फळेल ।

 श्रोत्यांचें हृदय-परिवर्तन होईल । लागवेगेंसि ॥२६॥

 

वक्ता असेल सरळ सात्विक । तरीच श्रोते बनतील भाविक ।

 जनलोक करितील कौतुक । बघोनि दोघांसि ॥२७॥

 

म्हणोनि हेंचि वरिष्ठांनी करावें । जैसें सांगावें तैसेंचि वागावें ।

 तरीच होईल त्यांच्या प्रभावें । कल्याण ग्रामजीवनाचें ॥२८॥

 

येथे श्रोत्यांनी विचारलें । आपण अर्थासि वर्तनासि महत्त्व दिलें ।

 परि कित्येक ग्रंथीं सांगितलें । पारायणचि फलदायी ॥२९॥

 

कोणी म्हणती ग्रंथाचें पारायण । करितां मिळेल पुत्रधन ।

 होईल भाग्याचा उदय पूर्ण । पारायणें ग्रंथाच्या ॥३०॥

 

कोणी म्हणती मंत्रचि जपा । हजारोंनी करा संकल्पा ।

 म्हणती सांगतों मार्ग हा सोपा । ज्ञान मिळेल न वाचतां ॥३१॥

 

कोणी म्हणती अनुष्ठान करा । वाचा भागवत-गीता-ब्रह्मसूत्रा ।

 मोक्ष चालत येईल घरां । कानीं पडतां शब्दचि ॥३२॥

 

कोणी म्हणती ग्रंथ ज्या घरीं । तेथे नये काळाची फेरी ।

याचा मेळ कोणेतरी । बसेल सांगा ॥३३॥

 

याचें उत्तर ऐका सज्जन ! फलश्रुति ही रोचक पूर्ण ।

 ग्रंथ-प्रचार व्हावा म्हणून । दिलें प्रलोभन दावूनि ॥३४॥

 

त्यांत एक आहे उत्तमहि । लोक ठेविती ग्रंथ संग्रहीं ।

 त्यापासूनि लाभ घेई । कोणी तरी थोडा-बहु ॥३५॥

 

कानीं पडो एकचि वचन । परि त्यांत असे महापुण्य ।

 हेंहि ओढ लागावीं म्हणून । कथिलें असे थोरांनी ॥३६॥

 

नुसत्या पारायणाचें महत्त्व । त्यांतहि हेंचि आहे तत्त्व ।

 कधीतरी येईल आचरणीं सर्व । संस्कार होतां ॥३७॥

 

कराया सांगितलें जप-अनुष्ठान । तेंहि शुध्द कराया जीवन ।

क्रमाने तितुके दिवस तरि मन । शुध्दाचरणीं लागाया ॥३८॥

 

म्हणोनि मी या सकलां मानितों । परि जपणारे एकांगी समजतों ।

 तेणेंचि लाभ हातां न येतो । बहुतेकांच्या ॥३९॥

 

घोडयासि पाणी दाखवावें । म्हणतां तेंचि धरिलें जीवें ।

 पाणी पाजणें नाही ठावें । तैसें झालें लोकांचें ॥४०॥

 

ऐसेचि नाना ग्रंथ वाचले । परि तैसें मुळीच नाही वर्तले ।

कोण्या तोंडाने मागावें भलें । फळ तयांसि ॥४१॥

 

कांही ग्रंथांतहि अवास्तवपणा । हें न राहवें सांगितल्याविना ।

 त्यांनी श्रध्देचा होतो धिंगाणा । फल न येतां हातामाजीं ॥४२॥

 

ग्रंथीं अपार फलश्रुति कथिली । परि अनुभवासि नाही आली ।

हजारो लोकांनी आम्हां सांगितली । कर्मकहाणी ॥४३॥

 

ग्रंथीं सुखाची फलश्रुति । म्हणोनि वाचती सकाम पोथी ।

 आळसी भोळे ओढवोनि घेती । अधिक आपत्ति दानादिकें ॥४४॥

 

कोणी कोणास साधन सांगती । सोने देवोनि करा म्हणे समाप्ति ।

 घरोघरीं व्रतवैकल्यें आचरती । भुलती बायाबापडया ॥४५॥

 

व्रतांची वाचती कहाणी-पोथी । दान-उद्यापन करा म्हणती ।

 नाहीतरि होईल अधोगति । धाक देती जनतेसि ॥४६॥

 

कांही उदरनिमित्तासाठी । पोथ्या वाचती उठाउठी ।

 सोन्याचे करोनि ग्रंथ शेवटीं । अर्पा म्हणती देवासि ॥४७॥

 

लोकहि असती आसक्त बावरे । कांहीहि सांगोत सांगणारे ।

धावोनिया करिती बिचारे । व्रतसाधनें वेडयापरी ॥४८॥

 

फळ न लाभतां मग चिडती । म्हणती काय चाटावें ग्रंथाप्रति ।

रोज वाचावे ग्रंथ किती । तरीहि पुत्र होईना ॥४९॥

 

पतिपत्नी आरोग्याने वागेना । नवस करिती दगडोबासि नाना ।

 काय होईल बापहो ! सांगाना । ऐशा रीतीं ॥५०॥

 

घाला उंबरीस प्रदक्षिणा । परि सुधारूं नका आचरणा ।

 भोजना करा जडान्न पुन्हा । रोगी व्हाया वेळ कैचा ॥५१॥

 

कलकत्त्याच्या गाडींत बसावें । आणि म्हणे ’ देवा !

पंढरीसि न्यावें ’ । ऐशा प्रार्थनेसि फळ यावें । कोण्या प्रकारें ॥५२॥

 

एकाने चोरी केली ग्रामाप्रति । म्हणती त्यास आली साडेसाती ।

 ती जावया वाची शनीची पोथी । चोरी कांही सोडीना ॥५३॥

 

शेवटीं पोलिसाहातीं सापडला । गुन्हा त्याचा साक्षींत आला ।

 तो पुसतो आपुल्या गुरुला । ’ साधन सांगा सुटण्याचें ’ ॥५४॥

 

गुरुहि होता लाचलुचपती । म्हणे वाच शनीदेवाची पोथी ।

 शिवलीलामृताचा अध्याय चित्तीं । सदभावने आठवी ॥५५॥

 

लावी देवीचें पुराण । करी नेटाने सत्यनारायण ।

 आम्हांसि देई सुवर्णदान । मुक्त होशील लवकरचि तूं ॥५६॥

 

त्याने तैसेंचि सर्व केलें । ग्रंथ साधन करोनि वाचले ।

बुवाब्राह्मणा धन उधळलें । दंड कांही चुकेना ॥५७॥

 

शेवटीं पडला कैदेमाजीं । म्हणे दाखवा तो गुरु पाजी ।

 त्याने केली फजीती माझी । धन तेंहि गमावलें ॥५८॥

 

वाचली नेमधर्माने पोथी । परि जेल न चुके मजप्रति ।

 काय करावी देवपूजा ती ग्रंथ जाळावे अग्नीवरि ॥५९॥

 

बिचारा चोरी करणें सोडीना । पण गुरुसि मागे साधना ।

काय करिती गुरुग्रंथ नाना ?  वाचणारा लबाड हा ॥६०॥

 

ऐसें जन्मभरि साधन केलें । तरी मूर्ख ते मूर्खचि राहिले ।

 याने सांगणारांचेंहि पतन झालें । फिकें पडलें साधन त्यांचें ॥६१॥

 

ऐसें कासयासि करावें । सत्य तेंचि शोधूनि आचरावें ।

आपण बुडावें दुसर्‍या नर्कीं न्यावें । ऐसें न करावें स्वार्थभरें ॥६२॥

 

सांगणाराने तर्कशुध्द सांगावें । करणाराने सत्यचि करावें ।

तेव्हाचि फळ अनुभवास यावें । होतें ऐसें ॥६३॥

 

हीच मुख्य घेवोनि धारणा । झाली ग्रामगीतेची रचना ।

हा ग्रंथ पुरवी सर्व कामना । कैसा तें ऐका ॥६४॥

 

हा आहे प्रखर शब्दबाण । जाय वाचकाचें हृदय भेदून ।

 जैसी मूर्ति घडे टाकी लागून । तैसें वाचनबोधें होतसे ॥६५॥

 

ग्रामगीता नव्हे पारयणासि । वाचतां वाट दावी जनासि ।

 समूळ बदली जीवनासि । मनीं घेतां अर्थ तिचा ॥६६॥

 

ही नव्हे फुलें टाकण्यासाठी । ही ग्रामाची उध्दारदृष्टि ।

 आजच्या युगाची संजीवनी बुटी । मानतों आम्ही ग्रामगीता ॥६७॥

 

कोणी दु:खाने होरपळला । कोणी संसारतापें तापला ।

कोणी असहाय्यपणें संकटीं पडला । त्यासि धीरे दे ग्रामगीता ॥६८॥

 

कोणी अन्यायें लोकां त्रासावी । त्यासि ग्रामगीता मार्गीं लावी ।

 देवत्व सर्वांचें जागवी । दिव्य व्हाया जग सारें ॥६९॥

 

याने संस्कार बनतील उत्तम । मनुष्य होई चारित्र्यक्षम ।

सुखशांति लाभेल करितां उद्यम । सांगितले जे या ग्रंथीं ॥७०॥

 

अल्पबुध्दि जाईल विलया । वाचतां ज्ञान होईल तया ।

 खरा धर्म अंगीं ये सखया ! जीवन उज्ज्वल होतांचि ॥७१॥

 

प्रेम आजवरि होतें एकटें । ग्रंथ-चिंतनें वाढेल चोखटें ।

सर्वांभूतीं दयाभाव प्रकटे । ऐसी फलश्रृति ग्रंथाची ॥७२॥

 

द्वेषबुध्दीचें अज्ञान । ग्रंथ वाचतां जाईल पळोन ।

सत्कार्य कराया धावे मन । करितां अनुष्ठान सक्रिय ॥७३॥

 

ग्रामगीता वाचूनि करी चिंतन । त्यास होईल आत्मज्ञान ।

 दिव्यदृष्टीची संत-खूण । कळे त्यासि आचरतां ॥७४॥

 

ग्रामगीता ग्रंथ वाचला । तैसाचि गांवीं वर्तूं लागला ।

 त्यासि शत्रुचि नाही उरला । ग्राममाजीं कोणीहि ॥७५॥

 

सामुदायिक वाढली वृत्ति । सारें गांव त्याची संपत्ति ।

 ग्रामगीता घडवी मूर्ति । ऐशा आदर्श मानवाची ॥७६॥

 

ग्रामगीतेंतील उद्योगचिंतन । जो कोनी करील मन लावून ।

 त्याचे घरीं धनधान्य । भरपूर येईल समजावें ॥७७॥

 

आरोग्याचा वाचील धडा । आणि घेईल हातीं फडा ।

 रोगराईचा होईल निवाडा । तत्क्षणीं त्याच्या ॥७८॥

 

कार्यास लागतां तत्क्षणीं । फलश्रुतीसि आरंभ होय झणीं ।

 चरित्र सुधरे ग्रंथ ऐकोनि । लक्षांत घेतां अर्थ त्याचा ॥७९॥

 

एकांतीं बैसोनि वाचली गीता । अर्थ समजोनि मनन करितां ।

 जीवनीं उतरे आदर्शता । घरादारांसहितहि ॥८०॥

 

ऐसें घर आदर्श झालें । कीर्ति-स्फूर्तीने गांवीं चमकलें ।

 मग लोक सारे तैसेचि वर्तले । दिसती जनीं ॥८१॥

 

हा केवढा लाभ झाला ! सर्व लोकांना स्वर्ग जणू लाभला !

 आपुला गांव आदर्श केला । ग्रामगीता वाचूनिया ॥८२॥

 

ग्रामगीतेचें फळ नव्हे एकटयासि । एकासहित आहे ग्रामासि ।

 उध्दरतील गांववासी । वाचूनि वर्ततां ग्रामगीता ॥८३॥

 

एक एक साधन वाचतां । आणि मग तैसेंचि वर्ततां ।

 केवढे लाभ येतील हातां । सांगतां नये ॥८४॥

 

ग्रामगीतेंतील संस्कार-रचना । उपासनेची तत्त्वयोजना ।

 ग्राम-रक्षण ग्राम-सुधारणा । ग्राम-रचना आदर्श ॥८५॥

 

नाना कलांची उन्नति । शेती-सुधारणा श्रम-संपत्ति ।

 समजूनि येतां विद्या-महती । विकास होई जीवनाचा ॥८६॥

 

सामुदायिक प्रार्थनेची प्रथा । रामधूनसंत-उत्सव व्यवस्था ।

 साधनसंपदा ऐकतां वर्ततां । शांति लाभे सर्वांसि ॥८७॥

 

गायीगुरांची वाचतां सेवा । करितां तैसेंचि आपुल्या गांवा ।

 दहीदुधाचा दुष्काळ पहावा । न लागे कधी ॥८८॥

 

विवाहादि सर्व संस्कार । समाजीं होतील सुखकर ।

 मागासल्यांची सुधारणा उध्दार । करील राष्ट्राचा ॥८९॥

 

स्त्रिया-मुलें होतील आदर्श पूर्ण । हा ग्रंथ घरीं होतां पठन ।

 ग्राम होईल वैकुंठभुवन । वाचतां वर्ततां ग्रामगीता ॥९०॥

 

भिकारी बेकारी गांवीं राहीना । सत्तेचीं बंधनें नुरतील कोणा ।

 सर्वचि शिकतील शहाणपणा । ग्रामगीता वाचूनिया ॥९१॥

 

आरोग्यसंपन्न होतील जन । नाही गांवीं तंटाभांडण ।

 अन्यायव्यसनेंकारस्थान । जातील लया द्वेषादि ॥९२॥

 

गांवीं वाढेल संघटना । बळ लाभेल सकळांच्या मना ।

नांदेल विश्वकुटुंबाची रचना । आपुल्या गांवीं ॥९३॥

 

ग्राम नांदेल स्वर्गापरी । सुखी होतील नरनारी ।

 परमार्थाच्या खुलतील घरोघरीं । आनंद-लहरा ॥९४॥

 

जी जी इच्छा कराल मनीं । ती ग्रामदेवता देईल पुरवूनि ।

 यांत संदेहचि नाही माझिया मनीं । उरला श्रोतेवक्तेहो ! ॥९५॥

 

येथे नाही अंधश्रध्दा । प्रत्यक्ष अनुभव मिळे सर्वदा ।

जे जे शब्द निघती ते गोविंदा । प्रिय समजावे निश्चयेंसि ॥९६॥

 

मी पंडित नोहे आपुल्या ठायीं । सांगावया पंडिताई ।

 ईश्वराचीच प्रेरणा ही । प्रकट झाली ग्रंथाद्वारें ॥९७॥

 

माझिया बालरूप वृत्तींतूनि । स्फुरला तो गुरुदेव चक्रपाणी ।

 चंद्रभागेतिरीं उमटली वाणी । केली ऐकोनि लिपिबध्द ॥९८॥

 

जैसे जडजीवाने वेद बोलावे । पंगूने हिमगिरीस ओलांडावें ।

तैसेंचि दासाकडोनि घ्यावें । गीताकथन मानतों मी ॥९९॥

 

म्हणोनि पुन:पुन्हा प्रार्थितो । माझा आवाज नव्हे सत्य तो ।

 या शरीराचा शंख वाजवितो । ध्वनि काढतो भगवंत ॥१००॥

 

भगवदगीतेचें हें सक्रिय रूप । प्रकट झालें आपोआप ।

 अर्जुनासम व्हावे महाप्रताप । सर्व ग्रामीन म्हणोनि ॥१०१॥

 

गीता बोधिली अर्जुनाला । ग्रामगीता ही सर्व ग्रामाला ।

राहूं नये कोणी मागासला । म्हणोनि बोलला देव माझा ॥१०२॥

 

मी तों केवळ बालकापरी । संतांचे आशीर्वाद घेतले शिरीं ।

म्हणोनिच प्रकटली धीट वैखरी । देहबासरीमधूनिया ॥१०३॥

 

श्री ज्ञानराज गुरुमाउली । त्यांच्या कृपादृष्टीची साउली ।

 परंपरेने फळासि आली । ग्रामगीतास्वरूपाने ॥१०४॥

 

ग्रामगीतेंत ज्यांचीं नांवेंचित्रण । त्या सर्व संतांचेंचि सहवरदान ।

 ऐसें मी मानतों विश्वासें पूर्ण । फळेल निधान ग्रामगीता ॥१०५॥

 

ग्रामगीता माझें हृदय । त्यांत बसले सदगुरुराय ।

बोध त्यांचा प्रकाशमय । दिपवोनि सोडील ग्रामासि ॥१०६॥

 

शब्दरचना गावंढळ । हें मी समजतों मनीं प्रांजळ ।

 दोष तो तो माझा सकळ । गुण तो तो थोरांचा ॥१०७॥

 

वालुकापात्रीं गंगाजळ । तें पापनाशक मधुर निर्मळ ।

तैसें वाचक श्रोते केवळ । शुध्द घेवोत समजोनि ॥१०८॥

 

आमचें गांवचि मागासलें । तेथे जाड शब्द जरि योजिले ।

 ग्रामीण म्हणतील नाही कळलें । सांगा अर्थ पंडितहो ! ॥१०९॥

 

घरोघरीं पंडित कुठले आहेत तेहि विकृत झाले ।

पोटापाण्यासि लागले । नोकरी धरिली धनिकांची ॥११०॥

 

जे जे कोणी उरले उत्तम । त्यांनाहि कांही रूढिभ्रम ।

 ते म्हणतील हा उपक्रम । वेदबाह्य अधार्मिक ॥१११॥

 

क्वचित असती विद्वदरत्न । सर्वचि याती-यातींमधून ।

 त्यांना आहे हा ग्रंथ प्रमाण । मानतों मी अंत:करणें ॥११२॥

 

ऐसियांसीच पंडित मानावें । जे असतील सात्विक संत स्वभावें ।

 त्यांचे पिसाट शब्दचि ऐकावे । सुधारिती जे ग्रामासि ॥११३॥

 

धुंडाळूं नयेत पंडित कोणी । वाचक निवडावा गांवांतूनि ।

 आचारशील सात्विक इमानी । सुबुध्द प्रेमळ कार्यकर्ता ॥११४॥

 

जो ग्रंथहि प्रेमें वाचतो । नांगर धराया शेतींतहि जातो ।

 वेळ पडल्या सेवा करितो । गांवलोकांची पाहिजे ती ॥११५॥

 

ऐसा असेल कोण्याहि जातीचा । अथवा धर्मपंथदेश-विदेशींचा ।

तरी तो चालेलग्रामोन्नतीचा । जिव्हाळा जया ॥११६॥

 

पंडितांनी वाचूं नये । ऐसें माझें म्हणणें नोहे ।

 परि काम न अडावें त्याशिवाय । नको निष्क्रिय वाद कोणी ॥११७॥

 

पंडित पुराणिक विद्वान । यांनीहि अवश्य करावें वाचन ।

समाजाचे जबाबदार म्हणोन । यथार्थ ज्ञान द्यावें सर्वां ॥११८॥

 

ग्रामीं विचारी शिक्षकजन । त्यांनी वाचावी ग्रामगीता पूर्ण ।

 सकळांस द्यावी समजावोन । लहान-थोरां जमवोनि ॥११९॥

 

जमवोनि श्रोते वृध्द-तरुण-बाल । मुली-तरुणी-माता सकल ।

 मागासल्यांसहि लावावी चाल । उन्नतीची हळूहळू ॥१२०॥

 

जे जे नारीनर साक्षर असती । त्यांना माझी नम्र विनंति ।

 वाचा ग्रामगीताअर्थसंगति । समजावोनि द्या निरक्षरां ॥१२१॥

 

जो समजोनि हा ग्रंथ न वाचे । ग्राम मागासावें असें मत ज्याचें ।

 तो मार्ग धरील अधोगतीचे । पाप न चुके तयालागी ॥१२२॥

 

पाप म्हणजे बिघाड करणें । पाप म्हणजे कुमार्ग धरणें ।

 पाप म्हणजे बळीच राहणें । गरीब प्राण्यां पिळोनि ॥१२३॥

 

ऐसें नसावें वाचकाचें । जें ज्ञान मिळेल ग्रामगीतेचें ।

तैसेंचि वर्ततां वर्तवितां पुढचे । दोष जळती बाधक जे ॥१२४॥

 

ग्रामगीता ग्रंथ वाचोन । कोणी घेऊं नयेत पैसे आपण ।

 ग्रामासीच लाभाया महत्त्व पूर्ण । धन वेचावें वक्त्याने ॥१२५॥

 

ग्रामगीता ग्रंथ सुंदर । निर्मावया गांवाचें चारित्र्य ।

 प्रचार करावा सर्वत्र । होऊनि पवित्र आपणहि ॥१२६॥

 

जे कोणी माझे स्नेही प्रेमळ । त्यांनी करावा ग्रंथाचा सुकाळ ।

 घरोघरीं चालवावा प्रचार । निर्मळ । ग्रामगीता-वाचनाचा ॥१२७॥

 

 ग्रामांत खेळावी ग्रामगीता । सर्वांस पाठ असावीं सूत्रें तत्त्वता ।

प्रमाण द्यावें कोणाचें चुकतां । सर्व आपुले म्हणोनिया ॥१२८॥

 

ज्याचे हातीं हा ग्रंथ पडला । अचानक मधूनि उघडला ।

 वाचतांचि समजावा उपदेश केला । ग्रामदेवतेने मजलागी ॥१२९॥

 

मग तयाचा न घडो अपमान । विचार करावा तारतम्य जाणून ।

कळत नसतां घ्यावी पटवोन । ओवी जाणत्यापासूनि ॥१३०॥

 

उत्तम उपदेश हातीं लाभला । समजावा शुभदिन आज उदेला ।

 तैसेंचि वर्तावें समजोनि बोला । ग्रामगीतेचिया ॥१३१॥

 

प्रथम ऐकावें हें गीतावचन । आचरणासि दृढ करावें मन ।

 मग संकल्पावें कार्याचें साधन । ग्राम स्वर्ग करावया ॥१३२॥

 

प्रथम श्रध्देने वाचन करावें । अर्थ सर्व लक्षांत घ्यावे ।

उठतां बसतां कार्यास लागावें । ग्रामाच्या आपुल्या ॥१३३॥

 

यांतचि माझें समाधान । सुधारेल । ग्रामाचें जीवन ।

पाखंड जाईल वितळोन । मतलबियांचें ॥१३४॥

 

संपोनि जातील भेदवाद । नांदेल गांवीं प्रेम शुध्द ।

 लाभेल आनंदी आनंद । सर्व जना सर्वभावें ॥१३५॥

 

मानवांतील असुरत्वपशुत्व । संपोनि उजळेल देवत्व ।

जीवनीं संचरेल शुध्द तत्त्व । निरूढ ऐसें सर्वांच्या ॥१३६॥

 

निसर्ग साह्य दे वेळच्या वेळीं । वृक्षवेली बहरती फुलींफळीं ।

 जलपूर्ण होतील नद्यातळीं । आपुली मर्यादा न सोडतां ॥१३७॥

 

आरोग्य होईल सर्वांचें भूषण । लोपेल दारिद्रयउणीवअज्ञान ।

कोणीच न राहतील हीनदीन । खळदुर्जन कोठेहि ॥१३८॥

 

समानतेची समाजरचना । शांति देईल जीवजना ।

प्रगतीची नवी नवी प्रेरणा । करील भुवना उन्नत ॥१३९॥

 

शोषण अथवा शासन । यांचें गळोनि पडेल बंधन ।

 नाही शत्रूंचें आक्रमण । स्वयंपूर्ण गांव होता ॥१४०॥

 

दास होतील त्रिविध ताप । नुरेल वैताग वैर पाप ।

 गांव झालिया स्वर्गरूप । शांति लाभेल विश्वासि ॥१४१॥

 

स्वर्गींचे अमर हेंचि इच्छिती । हेंचि संतऋषींच्या चित्तीं ।

 ऐसिया गांवीं लाभतां वस्ती । कासया जाती वनांतरां ॥१४२॥

 

सांडोनिया आत्मस्थितिभाव । संतसज्जनांचे समुदाव ।

ऐसिया गांवा देतील वैभव । आपुल्या जीवन्मुक्तीचें ॥१४३॥

 

त्यांच्या बोधें धर्मनीति । त्यांच्या सहवासें सेवाभक्ति ।

 त्यांच्या प्रभावें शांतिशक्ति । राहील जागती सर्वकाळ ॥१४४॥

 

ऐसी ग्रामगीतेची फलश्रुति । ज्यांत संतविभूतींची संकल्पपूर्ति ।

देवचि गेला बोलूनि चित्तीं । वरदवाणी सज्जन हो ! ॥१४५॥

 

उभा विश्वाचिया विटेवर । सदगुरु विठ्ठल सर्वेश्वर ।

 त्याच्या कृपेचाचि विस्तार । तुकडया म्हणे ग्रामगीता ॥१४६॥

 

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत ।

लाभ घेवोत नित्य ग्रामस्थ । म्हणोनि अर्पिला विश्वरूपा ॥१४७॥





अध्याय ४१ वाऑडीओ स्वरुपात --



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

।।जय गुरुदेव।।