.

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

हे गुरूदेव ! हम सबको सदबुध्दी दे ,सतकर्तव्य करनेकी प्रवृत्ति दे ,सच बोलनका अभ्यास दे ,सतस्वरूप का ग्यान दे । हे जगदव्यापी परमेश्वर ! हम हर मनुष्य मात्र से प्रेमका,सत्यताका,बंधुत्व- -भावका आचरण करे और सुख दुखःमे सम रहे,ऐसी हमको शक्ती दे,युक्ती दे और भक्ती दे । हे सर्वधर्ममें,सर्व संतमे,समस्त संसार में,रममाण होनेवाले चैतन्यघन!हम तेरे लिए,तेरे देश के लिए,हर जीव जंतु के लिए,कुटीलताका,अनैत्तिकताका,छलछिद्र द्रोहताका त्याग करे ऐसा साहस दे । हे भगवान! अंतमे तुझमें समरस हो जाये यह हमारा ध्येय हैं,उद्देश है । इसके लिये तुझको स्मरके निश्चय करते है, प्रतिज्ञा करते है । हे विश्व धर्मको नियमन करनेवाले परमात्मा !जहाँभी,जिधरभी,हममें कुछ कमी दिखती हो,उसमे हमारा ध्यान लगाकर,उस चिज को,उस कार्यको,पुरा करने में हम अपना स्वराज्य समझते है , सूराज्य समझते है ।यह समझने की और कर्तव्य करनेकी हमको प्रियता दे,शक्ती दे ,वरदान दे

मंगळवार, ६ जून, २०१७

अध्याय २२ वा अंत्यसंस्कार



अध्याय २२ वा

अंत्यसंस्कार

 

 

विवाहादि संस्कार आवश्यक । परि खर्च न व्हावा अधिक ।

त्यांचें स्वरूप जाणोनि तात्विक । आचरावे सर्वदा ॥१॥

 

ओटीफळेंमौंजीबंधन । जावळें उतरणें तीर्थी जाऊन ।

वास्तुबारसेंवाढदिवस जाण । अवडंबर नको तेथे ॥२॥

 

तैसेंचि मृत्युसंस्काराचें । स्तोम नसावें अंत्यविधीचें ।

 जेणें मृताचिया नांवें सजीवांचें । दु:खी होय जीवन ॥३॥

 

मृत्युसंस्काराचा ऐका खुलासा । लोक मृत्युसि समजती भलतिसा ।

मी म्हणतों मृत्युजैसा । उत्तम नाही कोणीहि ॥४॥

 

जैसी नदी सागरासि मिळे । सोडोनि भेदभाव कष्टबळें ।

 तिचें कार्यचि होतें सगळें । मिळण्यासाठी सागरीं ॥५॥

 

वाहत राही आपुल्या रंगें । लोक शांत होती सहज संगें ।

 तिच्या पाण्यासि घेवोनि निजांगें । तृप्ति पावती जीवनीं ॥६॥

 

परि तिजसि महत्त्व सागराचें । तैसेंचि आहे मानवाचें ।

 मोहपाश तुटतां आसक्तीचें । धांव घेई निजरूपीं ॥७॥

 

परि कार्याची जी वासना राहते । तीच जीवासि साथ देते ।

तिचेंचि आविष्करण पुन्हा होतें । पुढच्या जन्मीं ॥८॥

 

शरीरमात्र नष्ट झालें । परि संस्कार वासनेअंगीं भरले ।

 पुन्हा जन्म घेतां प्रगटले । ऐसें होतें ॥९॥

 

ज्याने याच जन्मीं मोह मिटविले । उत्तम संस्कार प्राप्त केले ।

 त्याचें पारणेंचि फिटलें । जन्ममरणांचें ॥१०॥

 

परि ऐसे क्वचितचि होती । अढळ परमधाम पावती ।

येर ते प्राणी येती जाती । आसक्तियोगें ॥११॥

 

आसक्तीने इंद्रियीं बांधला । मना येई तसा करूं लागला ।

 तो जन लोकांसहि आवडला । स्वार्थ त्यांनाहि म्हणोनि ॥१२॥

 

जन्मला वाढला मोठा झाला । अवस्था अनेक त्या देहाला ।

 षडऋतूंनी फळाफुला आला । जीर्ण झाला वृक्ष जैसा ॥१३॥

 

त्याची विकृति शिगेस लागली । शरीरगात्रें विस्कळून गेलीं ।

 मग वाट पाहे आपुली । मूळच्या घराची ॥१४॥

 

त्यास मोहपाशें बांधूं पाहती । औषधें वाटेल तैसीं देती । 

 वाचवा वाचवा ’ कळवळोनि म्हणती । कमीं येईल म्हणोनि ॥१५॥

 

मरणोन्मुखासि जीवन द्यावें । पुनरपि उत्तम बनवावें ।

 हें मानवाचें कर्तव्यहि बरवें । समजों आम्ही ॥१६॥

 

परि प्रयत्न करोनि नाही जगला । शेवटीं शरीर सोडोनि गेला ।

 समजावा देवाच्या स्वरूपीं मिळाला । प्राणी आपुल्या ॥१७॥

 

मग ईश्वरास करावी प्रार्थना । त्यास शांति लाभो देवसदनां ।

आमुच्या सुखदु:खाच्या भावना । न बाधोत तया ॥१८॥

 

येथे रडण्याचें नाही काम । आपणांसहि तेंचह घाम ।

 पाहावें लागेल परम । झाल्या उपशम देहाचा ॥१९॥

 

म्हणोनि मृत्युनंतर रोदन । हें आहे अज्ञानाचें प्रदर्शन ।

 कासया दावावें सर्व समजोन । उदास होवोनि मानसीं ॥२०॥

 

हें ज्याचें त्यासचि प्राप्त होतें । मग रडावें कासयासि लागतें ?

 कांही करोनि तरी दाखवावें तें । कीर्तीसाठी ॥२१॥

 

आपण उरलें तें कर्तव्य करावें । तेणें त्याचें नांव भूषवावें ।

 आपल्या कुळांत गौरव पावोनि जावें । तेणें भूषण वडिलांसि ॥२२॥

 

असो ऐसा प्राणी निवर्तला । सर्वामिळोनि न्यावें त्याला ।

 पाहों नये जात-परजात भला । कोण होता ॥२३॥

 

सन्मान द्यावा जाणाराप्रति । अभद्र ऐसी नको अर्थी ।

 गंभीरपणें जावें सांगातीं । आत्मीयतेने ॥२४॥

 

सर्वांनी प्रसंग नीट करावा । हातभार लावोनि द्यावा ।

 आपलाहि संस्कार आठवावा । उत्तम होईल म्हणोनि ॥२५॥

 

मृत्यूहि सुमंगल समजावा । स्मशानयात्रेस सहयोग द्यावा ।

दिंडीघोषें मार्ग सुधारावा । जाणाराचा ॥२६॥

 

अभद्र विद्रूप  किळसवाणी । न ठेवावी रीत कुणी ।

 श्रध्दांजलीच्या भाषणीं । भूषवावें प्रसंगीं ॥२७॥

 

स्मशानीं असावी सुव्यवस्था । पाऊसकालासाठीहि तत्त्वता ।

 संस्कारमंडप सर्वांकरिता । पवित्रता वातावरणीं ॥२८॥

 

मृतशरीराचें करोनि दहन । पवित्र करावें वातावरण ।

गांवें लावोनि ठेवावें सामान । योग्य ठायीं ॥२९॥

 

मृत शरीरास पीतांबर । घरीं नसल्यास विका घर ।

 दु:ख भोगा जन्मभर । ऐसें कोणीं न करावें ॥३०॥

 

असेल तैसेंचि वागावें । जुनेंहि वस्त्र स्वच्छ करावें ।

खुशाल अंगीं बांधोनि न्यावें । मृताचिया गरिबांनी ॥३१॥

 

नवेंचि वस्त्र पाहिजे आणिलें । ऐसें शास्त्राने जरी सांगितलें ।

 तरी आमुच्या घरचें कैसें चाले । नाही ठाउकें शास्त्रासि ॥३२॥

 

तुपावाचोनि नको भोजन । हें शास्त्रवचन पाळतो कोण 

 मग मृतासीच तुप चोळाया जाण शास्त्रवचन कां सांगावें ॥३३॥

 

मृत्यु झाला एकाचिया घरी । खावयास नाही एक दिवस ज्वारी ।

 सुतक धरोनि कैसियापरिं । बसावें तेणें ॥३४॥

 

एक दिवस खाली गेला । तरी उपास पडती गरिबाला ।

 त्याने दहा दिवस उपास भला । कैसा करावा सांगा तुम्ही ॥३५॥

 

म्हणोनि प्रेत नेवोनि कार्य उरकलें । घरीं येवोनि स्नान केलें ।

 मृत्युस्थळ पवित्र करोनि ठेविलें । आटोपले मृत्युसंस्कार ॥३६॥

 

मग त्याने खुशाल कामासि जावें । मोलमजूरी करीत राहावें ।

उत्तम विचारांचें करावें । मनन ध्यान एकांतीं ॥३७॥

 

सुतक धरण्याची प्रथा लाविली । ही तर शोकवृत्तीच दाविली ।

 आड येतील तीं काढून टाकिलीं । पाहिजेत ऐसीं बंधनें ॥३८॥

 

याचा मूळ उद्देश ऐसा होता । मृत देहाचा संसर्ग घडतां ।

 रोगजंतु चढती शुश्रुषा करितां । म्हणोनि दूर राहावें ॥३९॥

 

परि बाप शंभर कोसांवरि मेला । मुलगा सुतक पाळी मुंबईला ।

 हा विपर्यास पाहिजे दूर केला । मूळ चित्तीं धरोनि ॥४०॥

 

गोमूत्र शिंपडणें निंब खाणें । प्रेतासि अग्निसंस्कार देणें ।

 सुतक अस्पर्शता पाळणें । आरोग्यासाठी सर्व हें ॥४१॥

 

म्हणोनि शुध्द जलाने स्नान करावें । शुध्द कपडे परिधान करावे ।

असेल तें वस्त्रपात्र धुवावें । रोगियाचें ॥४२॥

 

हें करणें आहे आवश्यक । यासीच बोलती सुतक ।

 परि दहा दिवस करावा शोक । हें तों मना पटेना ॥४३॥

 

शोकवार्ता सकळांसि कळावी । म्हणोनि एकदा पत्रे टाकावी ।

 यापरि सुधारणा करावी समाजाची ॥४४॥

 

विचारांची दृढता व्हावी । म्हणोनि सदग्रंथांची कास धरावी ।

 परि सहामासवरी रडभूक करावी । पाहुण्यांसवें कासया ॥४५॥

 

विवेकें सांवरोनि भावना । करावी तेराव्या दिवशीं प्रार्थना ।

सर्व लोकांसह जाणा । भजनानंद चाखावा ॥४६॥

 

सांगावी स्मृति म्हणोनि कहाणी । असेल तरि दान देवोनि ।

 सेवा करावी त्या निमित्तानी । नसल्यास मनीं खेद नको ॥४७॥

 

मोकळेपणीं नमन करावें । ’ मी उत्तम वागेन ’ संकल्पावें ।

 सेवेचें कार्य चालवावें । गतात्म्याचिया प्रित्यर्थ ॥४८॥

 

परि पाहावी आपुली परिस्थिति । जित्यांची होऊं नये फजीती ।

 कोणी दान-दक्षिणेंत दिवाळें काढती । ऐसें नको ॥४९॥

 

कोणी रूढिबंधनांत पडती । मृतासाठी कर्ज काढती ।

 त्यांचे नांवाने पंगती उठविती । जातभाई जमवोनि ॥५०॥

 

बुवापंच अथवा ब्राह्मण । यांसि धन देती भूर्दंड म्हणोन ।

 कोणी घेती गोडजेवण । कमर मोडे गरिबाची ॥५१॥

 

कोणी घरीं धनाढय असती । परि पुत्राअभावीं नर्काची भीति ।

 म्हणोनि मरते वेळीं दत्तक घेती । होय फजीती राहिल्यांची ॥५२॥

 

दत्तक करी उधळेपणा । किंवा पूर येई भांडणा ।

अपव्ययाची वाट लागे धना । तेणें नर्क चुके कैसा ॥५३॥

 

जीव स्वककर्मांचीं फळें भोगतो । त्यासि कोण कैसा तारितो ?

 सत्कीर्तीनेच स्वर्ग मिळतो । पुत्रपौत्रें कदा नोहे ॥५४॥

 

स्वर्ग अथवा मुक्ति कांही । सदगतिवेगळी अन्य नाही ।

 मन:प्रवृत्ति सत्याकडे जाई । हीच उध्दारगति जीवाची ॥५५॥

 

यासाठी धन असल्या मालकीचें । करावें कार्य गांव-सोयीचें । विहीरशाळाछात्रालयादि कोणचें । सत्कार्य भावें ॥५६॥

 

अथवा बांधवावा एकादा मार्ग । जेणें जनतेचे चुकती कष्टभोग ।

 आसक्ति सोडण्यानेच स्वर्ग । लाभेल त्यासि ॥५७॥

 

किंवा त्याचे जे नातलग । त्यांनी सत्कार्यांचा आणावा योग ।

 उत्तम कार्यीं करावा उपयोग । धनाचा त्याच्या ॥५८॥

 

तयायोगें जी होईल कीर्ति । तिलाच सज्जन स्वर्ग म्हणती ।

 लोक हृदयें गुण वाखाणती । याविण स्वर्ग असेना ॥५९॥

 

ज्याची पसरेल अपकीर्ति । त्यासि कैसी मिळेल मुक्ति 

लोक मृत्यूवरीहि वाखाणती । ऐसें व्हावें जीवन ॥६०॥

 

याचसाठी उत्तम शिकावें । उत्तम राहावें वागावें ।

 सर्वांस उत्तम करोनि सोडावें । कीर्तीसाठी ॥६१॥

 

कीर्ति तोचि स्वर्ग खरा । अपकीर्ति नरकाचा पसारा ।

 याच जगीं यांचा व्याप सारा । पाहती प्राणी ॥६२॥

 

एरव्ही स्वर्गस्थळींहि गेला । तरी कुकर्में दु:खाचि देवेंद्राला ।

 नव्याण्णव यज्ञें करोनि झाला । सर्प नहुष अहंकारें ॥६३॥

 

म्हणोनि कार्यांतचि स्वर्गनर्क । सकाम ग्रंथांचें फोल कौतुक ।

 मिथ्या कल्पनांत भुलले लोक । स्वार्थियांच्या ॥६४॥

 

म्हणती कावळयाने पिंड नेला । तरीच तो स्वर्गाला गेला ।

 नाहीतरि आत्मा अटकला । त्याचा कोठे ॥६५॥

 

हें म्हणणें कसेसेंचि वाटतें । पिंडाचें नाही महत्त्व येथे ।

 महत्त्वाचें असे काय केलें तें । जन्मा येवोनि मानवाच्या ॥६६॥

 

मेल्यावरि दहा दिवस भ्रमतो । जीव पिंड देतां स्वर्गी जातो ।

 नाहीतरि तो नर्की पडतो । ऐसें म्हणणें व्यर्थ असे ॥६७॥

 

त्याने केलें असेल उत्तम कर्म । तरीच पावेल उत्तम धाम ।

 नाहीतरि पुन्हा अधम । योनींत जाणें स्वाभाविक ॥६८॥

 

प्राणी आपुल्याच कर्म-स्वभावें । भोगी उत्तम-अधम फळ बरवें ।

 हें पिंडदानाने बदलोनि जावें । ऐसें नाही ॥६९॥

 

ज्याने सुकृतचि नाही केलें । त्याचे कितीहि पिंड उचलले ।

 म्हणोनि काय उन्नत झालें । जीवन त्याचें ॥७०॥

 

भिक्षुकाघरीं दिली गाय । तिचें शेपूट धरोनि काय ।

 वैतरणी नदी तरोनि जाय । गेलेला जीव ॥७१॥

 

हा तों आहे कर्मठ सोहळा । सग्यासोयर्‍यांचा विरंगुळा ।

 पुत्रपौत्रांचा पुरवावया लळा । दिला निर्वाळा समाधाना ॥७२॥

 

टीका न करणें मृत्युग्रंथांची । तीहि असे साधना भावनातृप्तीची ।

परि यांतचि सार्थकता जीवाची । ऐसें आम्ही मानूं ना ॥७३॥

 

मृत्यु पावे त्यांचे नांव राहावें । म्हणोनि समाजसेवेस कांही द्यावें ।

 त्याच्या सदगुणांचे गोडवे गावे । आपणहि तैसें व्हावया ॥७४॥

 

खरा पिंड आपणचि उचलावा । कर्तव्य करोनि जीव भूषवावा ।

 त्यानेच पावेल कीर्ति जीवा । उज्ज्वल साची ॥७५॥

 

नाहीतरि मेला की रडावें । जिवंतपणीं लक्ष न द्यावें ।

 ऐसें ढोंग कासायासि करावें । समाजाने ॥७६॥

 

जिवंत असतां रोटी ना दे । मेलियावरि वाजवी वाद्यें ।

 कावळयासि पिंडइतरां दक्षणा दे । म्हणोनि साधे काय त्यानें ॥७७॥

 

श्राध्दासाठी धन उधळावें । लोकलाजेस्तव मरावें ।

 ऐसें कासया करावें । मूर्खपणें ॥७८॥

 

गेला जीव न राहे थांबून । वर्षमासाअंतीं घ्यावया भोजन ।

आपुलें घेवोनि पापपुण्य । फळ भोगाया पुन्हा जन्मे ॥७९॥

 

जीव पुन्हा जीवनीं यावा । कांही सत्संगतीस लागावा ।

 मागील केलेला दोष चुकावा । म्हणोनि करावा सुसंकल्प ॥८०॥

 

किंवा त्याचें गुणवैभव । श्रध्देने आठवावें सर्व ।

 हेंचि श्राध्द असे अपूर्व । श्रध्दांजलीरूप ॥८१॥

 

त्याची कीर्ति राहावी लोकीं । म्हणोनि करावीं दानपुण्यें निकीं ।

आपुल्याच गांवीं कौतुकीं । स्मरण राहील म्हणोनि ॥८२॥

 

जो कोणी ज्या रोगें मेला । तैसे होऊं नये इतरांला ।

 म्हणोनि गांवीं औषधालयाला । मदत द्यावी त्या निमित्तें ॥८३॥

 

परि हें जनासि न कळे धर्मगुज । जाती तीर्थीं करोनि कर्ज ।

 त्याने फावतें व्यापारा सहज । तीर्थियांच्या ॥८४॥

 

कांही सज्जन तीर्थासि जाती । अस्थि-राख भरोनि नेती ।

म्हणे गंगोदकें नाहीशीं होतीं । पापें त्याचीं ॥८५॥

 

’ काश्यां तु मरणान्मुक्ति ’ । ऐसी लोकीं वाढली भ्रांति ।

 गंगाजळीं किडेहि मरती । तरि ते काय मुक्त झाले ॥८६॥

 

काशीवासी भक्त कबीर । समाधीसि निवडती गांव मगहर ।

 ज्यास लोक म्हणती नर्कद्वार । तीच उध्दारभूमि झाली ॥८७॥

 

जन्मभरि सूत विणोन । प्रकट देखिला जनीं जनार्दन ।

 त्या भक्त कबीराचें महिमान । गंगेंतील पाषाण जाणती कैसे ॥८८॥

 

जन्मवरि दोषकृत्यें केलीं । त्यावेळीं नाही गंगेंत ठरविलीं ।

 आता हाडें टाकोनि झाली । सदगति म्हणे जीवाची ॥८९॥

 

हें सांगणारे आणि करणारे । यांना पोटापाण्याचें भरलें वारें ।

 म्हणोनि मेल्यावरि करिती सारे । जिवंतपणीं न सांगती ॥९०॥

 

अहो ! ज्यांत मनचि नसतें । तें करोनिहि वाया जातें ।

 मन देह मन दोन्ही नाहीत जेथे । तेथे काय घडवावें ॥९१॥

 

परि पंडेपुजारी सांगती गौरवें । तुमच्या वडिला स्वर्गीं पाठवावें ।

 तरि बोला दक्षणा काय द्याल भावें । आम्हांलागी ॥९२॥

 

बिचारा भोळाभाळा शेतकरी । मजूर अथवा भाविक व्यवहारी ।

 म्हणे कर्ज करोनि देतों पुरी । दक्षणा तुम्हां ॥९३॥

 

परि आमचे वाडवडील । स्वर्गाला कधी पाठवाल ?

 म्हणूनि रडतो टेकवूनि भाल । पंडयापुढे ॥९४॥

 

ऐशा अंधश्रध्देसि वाढवोनि । धूर्त घेती स्वार्थ साधूनि ।

हें महापाप असे जनीं । निकष्टिकांचें ॥९५॥

 

वास्तविक ऐसी वेळ आली । त्यास पाहिजे संधी साधली ।

सांगावी पंडयाभिक्षुकांनी भली । युक्ति त्यासि ॥९६॥

 

तुझे पितर स्वर्गांत जावे । ऐसें घेतलें तुझ्या जीवें ।

 तरि त्यास संकल्प लागती करावे । गंगेमाजी ॥९७॥

 

मी पितर स्वर्गी जाण्यासाठी । संकल्प करितों जीवें पोटीं ।

दारू गांजा भांग आदि ओठीं । नाही लावणार जन्मभरि ॥९८॥

 

नाही करणार दुर्व्यवहार । नाही फसविणार दीनपामर ।

 देईन सर्वांसि सहकार । सत्सेवेसाठी " ॥९९॥

 

ऐसें जरि पंडयांनी करविलें । तरि त्यांचेहि उदर भरलें ।

 आणि लोकांचेंहि कल्याण झालें । ऐसें होय ॥१००॥

 

परि पंडयाचि व्यसनी दुराचारी । फुकट लुटाया खटपट करी ।

 तरि तो कैसेनि उध्दरी । समाजासि ॥१०१॥

 

म्हणोनि आंधळा कर्मठपणा । हा वाढवूंच न द्यावा कोणा ।

 गांवगंगा म्हणोनि जाणा । तिलाच सर्व अर्पावें ॥१०२॥

 

गांवचा तलाव अथवा नदी । सुंदर पहावी विहीर आदि ।

 स्नान करोनि साधावी शुध्दि । प्रभूला आठव द्यावा त्याचा ॥१०३॥

 

त्याचे निमित्ताने करावें सत्कार्य । कासया बघावें तीर्थ बाह्य ।

 देव सर्वांठायींच आहे । सदासर्वकाळ ॥१०४॥

 

म्हणोनि हें साधन बदलावें । गांवीच सर्वकांही करावें ।

जें जें करणें असेल सदभावें । वळण द्यावें हें सर्वां ॥१०५॥

 

कोणी प्रेताची समाधी करिती । उगीच जागा गुंतवोनि धरिती ।

 ऐसें करितां सारीच क्षिति । गुंतूनि जाइल त्यायोगें ॥१०६॥

 

मेला त्याची एक समाधि । जन्मला त्याच्या घरांची गर्दी ।

 मग उरेल काय भूमि कधी । जगण्यासाठी इतरांना ॥१०७॥

 

जिवंत मानवां नाही घर । कष्टाळूंना नाही वावर ।

तेथे समाधीचें अवडंबर । मृतासाठी कासयासि ॥१०८॥

 

म्हणोनि सरळचि ऐसें करावें । मृतदेहाचे लोभी न व्हावें ।

 पंचतत्त्वांशीं त्यास मिळवावें । अग्निसंस्कार देवोनि ॥१०९॥

 

स्मरण म्हणोनि घरीं वा गांवीं । योग्यशी तसबीर लावावी ।

वेळोवेळीं आठवण करावी । सदगुणी पुरुष म्हणोनि ॥११०॥

 

कुणाचीहि समाधि करोनि ठेवणें । हीं तंव आसक्तीचीं  लक्षणें ।

समाधि करोनि काय होणें-जाणें । सांगा मज ॥१११॥

 

समाधि करोनि दर्शन होतें । तेंचि चित्र पाहोनि मनांत येतें ।

 मनांत येण्याचेंचि महत्त्व येथे । सर्वात मुख्य ॥११२॥

 

वाटल्यास उत्तम स्थान करावें । ज्यात लोकशिक्षण चालेल बरवें ।

स्मरणार्थ म्हणोनि अर्पोनि द्यावें । गांवलोकांसि ॥११३॥

 

ऐसी आहे सहजस्थिति । त्यासि कासया करावी विकृति 

जेणें समाज राहे सुस्थितीं । तीच महती वाढवावी ॥११४॥

 

मानव असो वा पशुपक्षी । न कराव्या त्यांच्या समाधि साक्षी ।

 जिवंत समाज ठेवोनि लक्षीं । करावें कार्य सुस्थितीचें ॥११५॥

 

त्या दृष्टीनेचि भिन्न संस्कार । भिन्न वेळांचें महत्त्व थोर ।

 लक्षूनि करावें सर्वांनी सुंदर । साजे तैसें ग्रामराज्या ॥११६॥

 

मृत्यु असो वा जन्मादि उत्सव । यांचा नुसता नको गौरव ।

 गांवाचें वाढवावें वैभव । बचत करोनितुकडया म्हणे ॥११७॥

 

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्र-स्वानुभव संमत

। कथिला अन्त्यसंस्कार उचित । बाविसावा अध्याय संपूर्ण ॥११८॥





अध्याय२२वाऑडीओ स्वरुपात --



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

।।जय गुरुदेव।।