अध्याय २९ वा
दलित-सेवा
श्रोतीं शंका
विचारिली । आपण सर्वधर्मी समानता केली ।
परंतु ’ परधर्म भयावह ’ बोली । गर्जविली गीतेने ॥१॥
स्वधर्मी
मरण्यांतहि श्रेय । परि परधर्मीं आहे भय ।
मग धर्मांचा समन्वय । करिता कैसा ? ॥२॥
ऐका ग्रंथींचा
दाखला । परधर्म भयावह जरी ठरला ।
तरी त्याचा अर्थ पाहिजे जाणला । श्रोतयांनी ॥३॥
हिंदु बुध्द
मुसलमान । ख्रिस्ती पारशी अथवा जैन ।
ऐसें नव्हतें नामाभिधान । धर्मासि तेव्हा ॥४॥
भिन्न धर्मांचा
जन्महि नव्हता । मग परधर्म कां सांगे गीता ?
तेथे कर्तव्याचीच भिन्नता । ध्यानीं तियेच्या ॥५॥
एकाची प्रकृति
ज्या कार्याची । ज्या गुणांची स्वभावेंचि ।
त्यासि गुणकर्में दुसर्याचीं । साधती केंवि ? ॥६॥
कोणात शक्ति
कोणांत युक्ति । कोणांत ज्ञान, सेवावृत्ति ।
साधे त्याचि साधनें करावी भक्ति ।
जनताजनार्दनाची ॥७॥
त्याने आपल्या
प्रकृतिपरी । करावी राष्ट्राची चाकरी ।
दुसर्याचें कर्तव्य घेतां शिरीं । विनाश त्याचा
॥८॥
म्हणोनि परधर्म
भयावह । ऐसें कथिलें नि:संदेह ।
तुपांत नोहे मत्स्याचा निर्वाह । पाण्याहूनि
उत्तम जरी ॥९॥
स्वधर्म म्हणजे
आत्मधर्म । आत्म्याचा स्वभाव सत्य ज्ञान प्रेम ।
यासाठीच करणें जीवनाचा होम । श्रेयस्कर हें
सर्वां ॥१०॥
असत्य, अज्ञान, भेद-वैर । अन्याय, अत्याचार, दुराचार ।
हा अनात्मधर्म दु:खकर । परधर्म हा भयावह ॥११॥
आत्मवश तें तें
सुख । परवश परतंत्र तें दु:ख ।
ऐसेंहि धर्मग्रंथीं अनेक । कथिलें थोरांनी ॥१२॥
परधर्म म्हणजे
विकरांधता । स्वधर्म म्हणजे न्यायसिध्दता ।
हें समजण्याचें तत्त्व हातां । दिलें तयांनी
॥१३॥
आपुला म्हणोनि
हृदयीं धरावा । परका म्हणोनि दूर लोटावा ।
ऐसा ऋषिमुनींचा गवगवा । कोठेचि नाही ॥१४॥
मुसलमान म्हणतां
मारावा । ख्रिश्चन म्हणतां हाकूनि द्यावा ।
आपला पापीहि छातीशीं धरावा । हा नव्हे अर्थ
स्वधर्माचा ॥१५॥
कोणी म्हणती
आम्ही हिंदु । मुसलमानांचा अतिविरोधु ।
ख्रिश्चनासि कधी न वंदूं । भाऊ म्हणोनि आपुला
॥१६॥
मी म्हणतों वंदन
गुणासि आहे । जातिधर्मावरि काय ?
हिंदु उघड पाप करिताहे । त्यासि मान कां द्यावा ? ॥१७॥
मुसलमानाचें
उत्तम वर्तन । तरी तो निंद्य मुसलमान म्हणोन ।
हें कोणीं दिलें न्यायदान ? सांगा सांगा श्रोतेहो ! ॥१८॥
ख्रिश्चन
दूरदेशाहुनि आला । सेवा करतां करतां मेला ।
त्याने जरि धर्म
नाही बिघडविला । तुमचा कांही ॥१९॥
तरी त्यासि
तुम्हीं अव्हेरावा । हें म्हणणें नाही पसंत जीवा ।
तो आपुलाचि
म्हणोनि राखावा । बंधुसखा ॥२०॥
जो कोणी सत्य
सिध्दांती । ज्याची विश्वव्यापी प्रीति मति ।
तो असो कोणत्याहि
धर्मजमातीं । समजावा चित्तीं आपुलाचि ॥२१॥
धर्म माणुसकीसि
म्हणती । माणुसकी न्यायावरि शोधिती ।
न्याय कोणाच्याहि प्रति । एकचि राहतो सर्वदा
॥२२॥
परि ही दृष्टि
मंद झाली । आप-पर भावना बळावली ।
तेणें धर्मपंथांत फूट पडली । आत्मीयता दिसेना
॥२३॥
मूळतत्त्वें
विलया गेलीं । महंती-बुवागिरी वाढली ।
सांप्रदायिक वृत्ति फोफावली । अज्ञानयोगें ॥२४॥
ऐसा प्रकार होत
आला । म्हणोनि खरा धर्म मातींत मिळाला ।
आतां उठणेंचि त्या धर्माला । कठीण झालें ॥२५॥
गुणकर्मांचा लोप
झाला । स्वधर्म-परधर्म ठरेल कोठला ?
गोंधळोनि समाज
गेला । गर्तेमाजीं भेदभ्रमें ॥२६॥
’ विष्णुमय जग ’ हाच स्वधर्म । ऐसें संतीं कथिलें वर्म ।
तरीहि आमुचा न जाय भेदभ्रम । अमंगळ ऐसा ॥२७॥
’ मानव ’ हेंचि आपुलें नाम । मग स्वधर्म म्हणजे ’ मानवधर्म ’ ।
हें तरी ध्यानीं
घ्या सत्य वर्म । साध्या बोलीं ॥२८॥
आपण आहोंत मानव ।
मानव्याचा वाढवावा गौरव ।
सुखी राहावेत आबालवृध्द सर्व । हेंचि कार्य
आपुलें ॥२९॥
मज मान्य धर्म
न्यायनीति । शुध्द चारित्र्य, प्रेमस्फूर्ति ।
करी जो समाजाची
धारणास्थिति । समान भावें ॥३०॥
हें जोंवरि वर्म
नेणें । तोवरि धर्म हो कोणी म्हणे ।
ती अपूर्णतेचीं
धर्मलक्षणें । समजों आम्ही ॥३१॥
मग घ्या
कोणत्याहि ग्रंथाचें वचन । परि वर्म याहूनि नाही भिन्न ।
मानवता हीच आहे
खूण । सर्व धर्म-समन्वयाची ॥३२॥
ज्या ज्या धर्मी
मानवता । ते सर्व धर्म एकचि तत्त्वता ।
यासि विरुध्द नाही गीता । समतावादी कृष्णाची
॥।३३॥
कृष्ण म्हणे ’ समं हि ब्रम्ह ’ । समता हाचि ईश्वरी धर्म ।
समदर्शी तोचि पंडित उत्तम । योगाचें मर्म
समत्वचि ॥३४॥
सर्वठायीं
वासुदेव । ऐसा भाव नव्हे अनुभव ।
दुर्लक्ष तो महात्मा, देव । बोलूनि गेला गीतेमाजीं ॥३५॥
सर्व धर्म
सोडोनिया । शरण जावें एका देवराया ।
सर्वव्यापक जाणोनि तया । हेंचि वर्म उध्दाराचें
॥३६॥
सर्वांविषयीं
समभाव । सर्वांभूती वासुदेव ।
हे जाणे तोचि खरा मानव । सत्य धर्म हाचि त्याचा
॥३७॥
या दृष्टीने करी
जें जें कांही । ती सर्वेश्वराची पूजाच होई ।
जेथे आप-पर भेद
नाही । समन्वयीं चित्त आलें ॥३८॥
मग तो असो
कोणत्या जातीचा । पंथाचा वा धर्मजमातीचा ।
तो खरा स्वधर्मी सखाचि आमुचा । मानूं आम्ही ॥३९॥
यावरि श्रोतीं
विचारिलें । आपण सर्व धर्मी समत्व कथिलें ।
परि याचे फायदे
घेतले । कुटिल जनांनी आजवरि ॥४०॥
कोणीं युध्द
करोनि लोकां जिंकिलें । बळेंचि आपुल्या धर्मी ओढिलें ।
कोणीं प्रलोभनांनी मोहविलें । वाटे का हें योग्य
तुम्हां ? ॥४१॥
कांही
दूरदेशींचें लोक येती । सेवा करोनि प्रवेश मिळविती ।
भोळया जना नागविती । धर्मान्तरा करवोनिया ॥४२॥
वाढवोनि आपुलें
संख्याबळ । करावी सत्तेसाठी चळवळ ।
ऐसा डाव साधती सकळ । विधर्मी हे सेवेंतूनि ॥४३॥
सर्व धर्मीं
समभाव । म्हणतां धर्मान्तरासि मिळे वाव ।
येणें बुडेल राष्ट्राची नाव । सांगा उपाव यासि
कांही ॥४४॥
यावरि ऐकावें
उत्तर । धर्म-समभाव आणि धर्मान्तर ।
ह्या गोष्टींत असे बहु अंतर । खरोखर नव्हे हे
॥४५॥
धर्मान्तराचा
करितां विचार । ज्ञात्याचेंचि योग्य धर्मान्तर ।
परि ज्यासि कळलें सारासार । त्यासि धर्मान्तर
कशासाठी ? ॥४६॥
ज्यासि कळलें
धर्मसमत्व । त्यासि बाह्य भेदांचें नुरे महत्त्व ।
मग तो स्वधर्मीच आचरील तत्त्व । पाहिजे तें तें
॥४७॥
न करील कोणावरि
आक्रमण । न होईल कोणाच्या आधीन ।
लोभें भयें परधर्मग्रहण । हें अध:पतन वाटे तया
॥४८॥
दुसर्या धर्मासि
युध्दें छळिलें । त्यासि धर्मसेवा नाम दिलें ।
हें महापातक असे
बोलिलें । यापूर्वीहि निश्चयाने ॥४९॥
तैसाचि जो समान
अज्ञानी । त्यासि विधर्मी नेलें मोहवूनि ।
त्यायोगेंहि उन्नति कोठूनि ? तें तों सोंग बहुरूप्याचें ॥५०॥
मानवी स्वभाव
प्रेमाचा भुकेला । कांही गरजांमुळे वश झाला ।
तरी त्याचा फायदा असला । घेऊं नये दुसर्यांनी
॥५१॥
कोणींहि सेवा
करायासि यावें । परि धर्मान्तर मोहाने करवावें ।
आपले जनगण वाढवावे । हें तों दुष्ट राजकारण ॥५२॥
धर्मवर्में एकचि
असती । परि हे राजकारण त्यांत गोविती ।
संख्याबल वाढवोनि
करिती । परस्परांचा वैरभाव ॥५३॥
धर्मप्रचाराचे
नांवाखाली । राज्यसाधना आंतूनि घाली ।
त्याची जातचि समजावी भ्रष्ट झाली । धर्मातूनि
॥५४॥
तो नव्हे
कोणत्याहि धर्माचा । स्वार्थ साधणेंचि धर्म त्याचा ।
अव्हेरूनि द्यावा
जिवाभावाचा । असला तरी ॥५५॥
तैसाचि न ओळखतां
स्वत्व । दुसर्यांचें मानोनि महत्त्व ।
उगीच परधर्मीं घे धाव । नाही ठाव त्यासि कोठे
॥५६॥
समजोनि तत्त्व
सर्वांत मिळावें । परि पोटाकरितां धर्मा न सोडावें ।
आत्ममार्ग न समजतांचि करावें । कासयासि हें
सारें ? ॥५७॥
ऐसें जेथे जेथे
झालें । त्यांना कलंकचि लागले ।
पाहतांना आजहि दिसलें । अनुभवियासि ॥५८॥
येथे आपणहि आहों
कारण । याचें असूं द्यावें स्मरण ।
खर्या धर्माचें सक्रिय ज्ञान । कोण देतो दीन
जनां ? ॥५९॥
लोक धर्म-धर्म
ओरडती । प्रसंग पडल्या कामीं न येती ।
संग्रह असोनि चित्त पाहती । आपुलियांचें ॥६०॥
धर्माचा बाळगती
अभिमान । परि धर्मबांधवां नाही स्थान ।
कुत्र्यामांजराइतुकाहि मान । न देती तयां
धर्मलंड ॥६१॥
मानवाचा स्पर्शहि
पाप । मानूनि त्यासि करिती दु:खरूप ।
विधर्मी जातां मानिती बाप । त्यासीच मग ॥६२॥
दीनदलितांची
तहानभूक । दीनदलितांचें सुखदु:ख ।
कांहीच नेणती अभिमानी मूर्ख । स्वधर्म-घोक
चालविती ॥६३॥
सर्वांठायीं
म्हणती ब्रह्म । परि भ्रमासारिखें करिती कर्म ।
ऐसें नाही धर्माचें वर्म । बोलिलें संतीं कोठेहि
॥६४॥
परि हे शिकवाया
उपदेशक कुठले ? कोण लोकांस समजावी भलें ?
हे तों सर्वाचि लागले । पोटापाण्यासि धर्मनावें ॥६५॥
पोटपुजार्यांनी
केला प्रचार । आपुल्या लाभाचा व्यवहार ।
मानवांमाजीं पाडलें अंतर । व्यक्तिसुखासाठी ॥६६॥
हें सर्व आडाणपण
। जोंवरि जाणार नाही मानवांतून ।
तोंवरि जगाची
उन्नति पूर्ण । होणें कठिण समजावें ॥६७॥
त्यासाठी एकचि
करावें । आपापलें धर्मक्षेत्र सुधारावें ।
सकळांसीच सकळांचें द्यावें । तत्त्वज्ञान
समजावोनि ॥६८॥
हें ज्या धर्मास
जातीस फावे । तेणेंचि सुखसोहळे बघावे ।
यासाठी अनेक प्रयत्न करावे । जाणत्या जनांनी
॥६९॥
कांहींनी करावा
आदिवासी-सुधार । जावोनि रानीं खेडयांवर ।
पाहावें गरीब लोकांचें कुटीर । कैसें आहे ॥७०॥
गरीब जंगली
आदिवासी जाती । झाडपालेचि नेसोनि राहती ।
झाडाखालीच असते
वसती । कित्येकांची ॥७१॥
त्यांसि बोलणें
चालणें समजेना । भिवोन पळती बघतांचि आपणा ।
प्रेम लावोनि
त्या कुटुंबांना । करावें आपण आपलेंसें ॥७२॥
त्यांना औषधपाणी
पुरवावें । लिहिणें वाचणेंहि शिकवावें ।
उत्सवीं सहभोजनीं
मिसळावें । कार्यकर्त्यांनी ॥७३॥
जनीं भोजनीं
मंदिरीं । अस्पृश्यतेचीहि न उरावी उरी ।
स्थान-मान सर्वतोपरीं । एक करावें सर्वांचें
॥७४॥
स्वच्छ राहणी
निर्व्यसनी । शिकवावी स्वयें त्यांत मिसळोनि ।
तुच्छ न मानावें दुरोनि । उणीव दावोनि परभारें
॥७५॥
दूर कराव्या
अडी-अडचणी । सुविचारांची करावी पेरणी ।
सर्वचि समाज समानगुणी । करावा नाना प्रयत्नें
॥७६॥
आजवरि यांची केली
उपेक्षा । प्रायश्चित्त म्हणोनि सेवादीक्षा ।
घेवोनि त्यांची वाढवावी कक्षा । संधि देवोनि
सदभावें ॥७७॥
जे कोणी असती
अडले-नडले । रंजले-गांजले रोगें पिडले ।
त्यांसाठी पाहिजे धाम निर्मिलें । सुखशांतीचें, आरोग्याचें ॥७८॥
क्षय अथवा
कुष्टरोग । हे न मानितां दैवाचे भोग ।
त्यांच्या निवारणाचे प्रयोग । केले पाहिजे
गांवोगांवीं ॥७९॥
भंगलेल्या मानवी
मूर्ति । यांच्या सेवेंतचि ईश्वरभक्ति ।
आर्तासि दिल्यावांचूनि शांति । मागतां मुक्ति
मिळे कैसी ? ॥८०॥
जीवनांतूनि जे जे
उठले । त्यांशी सहृदयपणें पाहिजे भेटलें ।
अनाथांचिया सुखास्तव झटले । तेचि आवडले देवधर्मा
॥८१॥
अंध पंगु मूक
बधीर । अशक्त अपंग निराधार ।
या ईश्वरी चित्रां रंगविती सुंदर । ते ते थोर
धर्मशील ॥८२॥
विधर्मी लोक हें
कार्य करिती । म्हणोनि जनांची जडते प्रीति ।
किळस आळस आमुच्या चित्तीं । अधोगति आमुची ही
॥८३॥
सोडोनिया ऐसा
स्वभाव । आपण सेवेसि अर्पावा जीवभाव ।
दलितसमाजा मानोनि देव । सेवा करावी हाचि धर्म
॥८४॥
हाचि धर्म संतीं
आचरिला । जनीं जनार्दन ओळखिला ।
निर्लोभ प्रेमें
सजविला । विश्वबगीचा ॥८५॥
धर्मावतार रामकृष्ण
। जटेने झाडी अस्पृश्यांचें अंगण ।
एकनाथ केलें भोजन । कडे मिरवोन बाळ त्यांचें
॥८६॥
चैतन्य
महाप्रभूने हृदयीं । आलिंगिले दलित, रोगीहि ।
गांधी येशूने तोषविले कुष्टदेही । सेवा करोनि
॥८७॥
विधवा
अनाथ-अपंगसेवा । पैगंबरें मानिला पुण्यठेवा ।
जातिभेदाचा झुगारिला गवगवा । बुध्द गौतमाने ॥८८॥
श्रीरामें
शबरीचीं खादलीं बोरें । गुहका आलिंगिलें प्रेमभरें ।
मित्र केलीं आदिवासी वानरें । अहिल्येसि
उध्दरिलें ॥८९॥
श्रीकृष्ण
गोवळयांत नांदला । स्त्रीशूद्रांचा कैवारी झाला ।
जोबवतीशीं विवाह
केला । आदिवासी जमातीच्या ॥९०॥
भीष्माचिया
वडिलाने । वरिलें कोळियाच्या कन्ये ।
ऐसीं शेकडो
प्रमाणें । सापडती पूर्व ग्रंथीं ॥९१॥
सीता शकुंतला
कर्ण कबीर । ऐसे अनाथ कन्यापुत्र ।
समाजें सांभाळितां झाले थोर । तैसेचि अपार ऋषिजन
॥९२॥
ज्ञानदेव
नामदेवादि संतीं । आलिंगिलें दलित समाजाप्रति ।
किती प्रगटल्या भक्तमूर्ति । मागासलेल्यांत
त्याकाळीं ॥९३॥
संत चोखोबाचें
सारें घर । झालें भक्तीचें मंदिर ।
उपेक्षिल्या
समाजीं देवत्व थोर । देतां संस्कार प्रगटे तें ॥९४॥
सजन कसाई, रविदास चांभार । दादू पिंजारी, गोरा कुंभार ।
कान्होपात्रा, जनी, वंका महार । उदया अपार आले ऐसे
॥९५॥
तैसेचि आजहि उदया
येती । घरोघरीं नामांकित पुरुष-युवती ।
त्यासाठी केली पाहिजे उन्नति । गादलेल्या
समाजांची ॥९६॥
महात्मा गांधी, ज्योतिबा फुले । यांनी मर्म हें ओळखलें ।
दलितोन्नतीचें कार्य केलें । कर्तव्य आपुलें
तेंचि असे ॥९७॥
मानवें मानवा
समान समजणें । परस्परां उन्नत करणें ।
संसारासि या
आनंदें भरणें । हीच खरी धर्मसेवा ॥९८॥
कोणी कोणास
त्रासवूं नये । कोणी कोणास फसवूं नये ।
कोणी कोणास
दुरावूं नये । आपुले म्हणावे सगळेचि ॥९९॥
पाहाव्या
त्यांच्या सुखसोयी । वागणूक सर्वांशी ठेवावी न्यायी ।
भेदभावना समूळ
जाई । जीवन ऐसें निर्मावें ॥१००॥
मग त्यांचा
विश्वास जडे । त्यांना आपला स्वभाव आवडे ।
वळेल तुम्ही म्हणाल तिकडे । मन तयांचें ॥१०१॥
हेचि आहे
धर्मसेवा । करावी आपण धरोनि सदभावा ।
मागासल्या सर्वचि
बांधवां । बंधु समजोनि शिकवावें ॥१०२॥
पडित रान हें
उठवावें । फुलाफळांनी बहरूं द्यावें ।
आहारीं जाऊंच न
द्यावें । कोणाचिया कोणा ॥१०३॥
परि अन्य
धर्मांशीं वितंडावें । कोणी कोणाचे दोष मांडावे ।
हे स्वार्थबुध्दीचे वणवे । चेतवूं नयेत सेवकांनी
॥१०४॥
आपुला पिता जरी
वंद्य । तरी इतरांचा तो न होय निंद्य ।
हेंचि धर्माचें सूत्र आद्य । सर्व धर्मी
समभावनेचें ॥१०५॥
ही दृष्टि
सर्वांसीच द्यावी । समाजीं मानवता वाढवावी ।
म्हणजे धर्म-भेदांची भ्रांति गांवीं । उरणार
नाही ॥१०६॥
साधनांमाजीं
उत्तम साधन । संस्कारें तयार करावें मन ।
सेवामार्गे मनीं घुसोन । सर्व लोकांच्या ॥१०७॥
कलापथक प्रवचन
कीर्तन । तुंबडया पोवाडे पुराण ।
नाटकादि प्रत्येक
साधन । याच कार्यीं योजावें ॥१०८॥
जें जें ज्यासि
असेल ठावें । तें तें समाजा शिकवीत जावें ।
जीवजनास फायदे द्यावे । मानवधर्म म्हणोनि ॥१०९॥
खरा धर्म जाणतील
लोक । तरि अनेकांतहि पाहतील एक ।
मग न गडेल
परकीयांची मेख । स्वार्थभावनेची ॥११०॥
यासाठी
भजन-संकीर्तन । उत्तम लोकशिक्षणाचें साधन ।
प्रपंच-परमार्थ धर्म-ज्ञान । शिकवावें संपूर्ण
त्यांतूनि ॥१११॥
आपुल्या गांवचा
कोणीं प्राणी । मुळीच न ठेवावा अज्ञानी ।
हीच खरी गांवाची बाणी । पुरवा झटूनि सेवकांनो !
॥११२॥
हेलावतां
सदधर्माचा सागर । धर्मनद्या होतील एकाकार ।
मग कोठे धर्म
धर्मान्तर ? द्या संस्कार ऐसे सर्वां ॥११३॥
भ्रामक रूढयांच्या
कल्पनांतून । वर येऊं द्या धर्मनिधान ।
त्यासाठी योजा भजनादि साधन । जागवा जन तुकडया
म्हणे ॥११४॥
इतिश्री
ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत ।
दलित सेवा कथिली येथ । एकोणतिसावा अध्याय
संपूर्ण ॥११५॥
अध्याय२९वाऑडीओ स्वरुपात --
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा