अध्याय ७ वा
आचार-प्राबल्य
एका सज्जनें प्रश्न केला ।
लोकरहाटी कळली आम्हांला ।
पुढारी नेतेच सुधारती गांवाला ।
सत्य हें सारें ॥१॥
परि भल्यांनीच गोंधळ घातला ।
पुढारी पुढिलांचा अरि झाला ।
तयांच्या नगार्यापुढे कसला ।
आवाज आमचा ताण मारी ॥२॥
न्यायदेवता सिंहासनी बसविली ।
तीच अन्याय करून गेली ।
मग कैची सुव्यवस्था आली ।सांगा सांगा ॥३॥
सत्संगतीसि पंडित बोलाविला ।
त्यानेच गांवी कलह केला ।
शहाणा म्हणावा तोच निघाला ।
महामुर्ख जैसा ॥४॥
प्रसन्नतेकरिता ठेवलें गायन ।
तेथे ऐकावें लागलें रुदन ।
आपल्या पोटाची सोय व्हावी
म्हणून । अडे ओरडे ॥५॥
घोडें शिकवाया आणला स्वार ।
तोचि पडला मोडोनि कंबर ।
कैसे बसतील मग इतर । घोडयावरि ॥६॥
इमानदार म्हणोनि पाहिला धनी ।
त्यानेच केली बेइमानी ।
आता विश्वास ठेवावा कोणीं ।
कोणावरि ॥७॥
मुलें शिकविण्या ठेविला मास्तर
। त्यानेच केला दुर्व्यवहार ।
शिक्षकासीच शिक्षणाची जरूर ।
ऐसे झालें ॥८॥
औषधि द्याया आणिला डॉक्टर ।
त्याने रोग्यासि दिलें जहर ।
आतां कोणी करावा उपचार । सांगा सांगा ॥९॥
ऐसें झालें आमुच्या गांवी ।
सांगा काय व्यवस्था करावी
कोणांस हांक मारूनि घ्यावी ।
विश्वासाने ॥१०॥
जन मनांत येईल तें करिती । दारू
पिती तमाशे नाचविती ।
पुढारीच पुढाकार घेती । ऐशा
कामीं ॥११॥
गुंडास धरोनिया हातीं । करिती
मनीं येईल त्याची फजीती ।
त्यावांचोनि पुढार्याची गति ।
म्हणती प्रगतिपथा येईना ॥१२॥
ऐसेंचि धरिलें त्यांनी मनीं ।
नाश केला गांवी फिरूनि ।
आता चोरचि झाले धनी । सज्जन
मेले उपवासी ॥१३॥
गांव सगळेंचि बिघडलें ।
आपल्यापरीं स्वैर झालें ।
नाही कोणाचें वर्चस्व राहिलें ।
कोणावरि ॥१४॥
सांगा सांगा काय करावें । तुम्ही म्हणतां गांव सुधारावें ।
कोण्या मार्गे आपण जावें । ऐशा
स्थितीं ॥१५॥
आपण करावें कांही साधन । हसती
टिंगल करोनि जन ।
म्हणती हा साधू आला कुठोन । पोट भरावया ॥१६॥
खराटा घेवोनि झाडझूड करावी ।
तेथेचि मलविसर्जना बसवी ।
म्हणती तुमची सेवा तुम्ही
चालवावी । आम्ही करूं ऐसेंचि ॥१७॥
कांही सांगावें शहाणपण । म्हणती
तुम्ही सांगणारे कोण
खुशी वाटेल तैसें करोन । राहूं
आम्ही ॥१८॥
ऐसी झाली गांवाची स्थिती । वाईट
वाटतें हृदयाप्रति ।
सोडूनि जावें गांवा येई चित्तीं
। परि जीवा आवडेना ॥१९॥
शेवटी आलों तुम्हांसि शरण ।
तुम्ही गांव केले आदर्श म्हणोन ।
कैसे वळविलें तेथील जन । सांगा आम्हालागोनि ॥२०॥
मित्रा ! तूं विचारला प्रश्न
बरवा । अति हर्ष झाला माझ्या जीवा ।
मी सांगेन धरोनि भावा । वर्म माझें ॥२१॥
प्रथम कळूं दे तुझी साधना । काय
ठेवितोसि आपुली धारणा
दिनचर्येंची कैसी रचना । आहे
तुझ्या ॥२२॥
हेचि मुख्य खूण । जोंवरि
वक्त्याचें न दिसे आचरण ।
तोंवरि लोक वागतील म्हणोन ।
समजूं नये ॥२३॥
लोकांसि जें जें शिकवावें । तें
आधी आपणचि आचरावें ।
नुसतें पुढारी म्हणोनि मिरवावें
। तेणें आदर न वाढे ॥२४॥
एकेक विषयाचें पुढारीपण ।
घेवोनि तैसें केलें आचरण ।
त्यांनीच बिघडवूं शकले गांव पूर्ण । गुंड व्यसनी
व्यभिचारी ॥२५॥
तैसेचि गांव सुधाराया आपण ।
विशेष केलें पाहिजे आचरण ।
जेणें येईल अंगी आकर्षण ।
गावांस वेधून घेणारें ॥२६॥
येर पुढारी असोत सर्वहि । परंतु
आपला मार्ग खुंटला नाही ।
लोक जणुं वाटचि पाहती सदाहि ।
कोण होतो पुढे म्हणोनि ॥२७॥
यासाठी निराशेचें नाही कारण ।
आचरणें साधावें पुढारीपण ।
सत्यचि प्रभावी सर्वांहून । ही अमोल खूण विसरूं
नये ॥२८॥
ज्याने सत्याशीं नातें जोडलें ।
त्याचे अंगी गुरुत्वाकर्षण आलें ।
सांगण्याहनिहि सामर्थ्य चाले । त्याच्या शुध्द
जीवनाचें ॥२९॥
यासाठी प्रथम पाहिजे
इंद्रियनिग्रह । खानापानादिकीं नियमाग्रह ।
सर्वचि विषयीं असंग्रह ।
आपुल्यासाठी म्हणोनि ॥३०॥
पवित्र मित आहार-विहार । निद्रा
थोडी शांती फार ।
सदा प्रसन्नता मुखावर । बोलतां
चालतां ॥३१॥
यमनियमादि तैसीं आसनें ।
साधोनिया आरोग्य राखणें ।
बुध्दि-बल-चातुर्यें वर्तनें । तेजोमय असावें
॥३२॥
आपुल्या कष्टावरीच जगावें ।
कुणाचे उपकार अंगी न घ्यावें ।
कमीत कमी खर्चाने रहावें ।
साध्या घरी ॥३३॥
अंग झाकण्यापुरते कपडे । शिवले
असावेत साधे भाबडे ।
शौकपाणी न आवडे । राहावें ऐसें ॥३४॥
आपुलें परक्याचें हित । दोन्ही
असावेत लक्षांत ।
जेणें परक्यासि वाटे पसंत । तैसा व्यवहार असावा
॥३५॥
आपुल्या कोणत्याहि कारभारीं ।
अन्याय न व्हावा कोणावरी ।
सावधानी असावी हृदयांतरी ।
सर्वकाळ सत्याची ॥३६॥
दयाक्षमा शांति नम्रता ।
प्रत्येक जागीं प्रामाणिकता ।
सरळपणा आणि प्रेमळता । ही दैवी
संपत्ति साधावी ॥३७॥
सार्वजनिक कामीं जाऊनि । कष्टत
जावें निःस्पृहपणीं ।
जाति-पक्ष-मित्रशत्रु म्हणूनि । पक्षपात कोठे
नसावा ॥३८॥
असभ्य हेकट नसावें वर्तन ।
कर्कशता न दिसावी वागण्यांतून ।
कुणाचीहि निंदास्तुति ऐकोन ।
दुराग्रही मन न करावें ॥३९॥
प्रत्यक्ष दोष पाहिल्याविण ।
अथवा न समजतां विश्वसनीयांकडून ।
करूं नये न्यायदान । शोधल्यावाचून
सर्व पक्ष ॥४०॥
सामुदायिक जबाबदारी । असेल जी
जी नागरिकावरि ।
न चुकता पाळावी ती निर्धारी । स्वार्थ उरीं न
ठेवितां ॥४१॥
न करावी कोणाची निंदास्तुति ।
आपण आदर्श करावी कृति ।
स्त्रियामुलेंवृध्दादि
सर्वांसांगाती । वागावें प्रेमें विश्वासें ॥४२॥
राखावी शब्दांची किंमत ।
वेळेचें महत्त्व सदोदित ।
दुसर्याचें सुखदुःख आघातहित ।
आपणाइतुकेंचि जाणावें ॥४३॥
हें सर्व जंव पाहतील जन ।
म्हणतील हाचि आहे सज्जन ।
वाढेल तुमच्या कार्यांचें
महिमान । हळूहळू ॥४४॥
लोकांसि कळेंल तुमचें वर्तन ।
अंतबार्ह्य सात्विक पूर्ण।
मग पाहतील देवाप्रमाण ।
तुम्हांलागी ॥४५॥
मित्रा ! ऐसें जंव तूं करिशी ।
तंव लोक राहतील प्रसन्न तुजशीं ।
ऐकण्याची वाटेल खुशी । लोकांना
तुझें ॥४६॥
म्हणतील तुम्हीं सांगावें ।
तैसेंचि आम्ही वागावें ।
तुमच्या बोलण्यांतून निघावें ।
तरि मरण होईल आमुचें ॥४७॥
तेव्हा प्रथम करावा विचार । आपण
घ्यावा की नाही पुढाकार ।
एकदा पाऊल टाकतां समोर । मागे
घेऊं नये कल्पांतीं ॥४८॥
ज्यासि वाटे जनसेवा करावी ।
त्याने प्रथम लोकलाज सोडावी ।
आपुल्या आत्माची ग्वाही घ्यावी
। कार्य सत्य म्हणोनिया ॥४९॥
ज्यांत आहे सर्वांचें सुख । तें
सत्कार्य न करितां राहावें विन्मुख ।
हें तों आहे घोर पातक । समजोनि
घ्यावें ॥५०॥
साहेल तैसी करावी सुरवात ।
मुरवावया जनलोकांत ।
हृदयांत आणि इंद्रियांत । मेळ
राहूं शके ऐसी ॥५१॥
क्रमाने पाऊल पुढे घ्यावें ।
कार्य करितां समाधान मानावें ।
विरोधकांसि उत्तर द्यावें । नम्रतेने ॥५२॥
लोकांसि बोलणें शिकवावें । तरि
आपण उत्तमचि बोलावें ।
बोलण्यांत माधुर्य ओतावे ।
आपुल्या प्रेमें ॥५३॥
आपुल्या बोलण्याने उबगतील जन ।
ऐसें कधी न करावें भाषण ।
कोणचेंही पूर्ण ऐकल्याविण । न द्यावें मधून उत्तर
॥५४॥
आपुलें बोलणें प्रेमाचें ।
दुसर्याचें बोलणें क्रोधाचें ।
परि ते सहन करावे त्याचे । वार
अंगीं ॥५५॥
दुसर्याने कितीही क्रोध केला ।
तरी हसोनि पाहिजे मावळिला ।
उत्तर देतां यावें शांतीनें त्याला । आपुल्यापरी
॥५६॥
शंका विचारावयाची दाटी । लागेल
पदोपदीं पाठीं ।
सहन करोनि ही आटाआटी । पाय पुढे
टाकावा ॥५७॥
एकदा झालिया निश्चय । मग लोकचि
होती साहाय्य ।
कामें करावयाची सोय । सोपी होते
॥५८॥
आपोआपचि होतो निर्वाळा । तांडा
जमतो भोंवती सगळा ।
निवडावा त्यांतूनि जिव्हाळा । आहे कोणा ॥५९॥
त्यांसचि साथी करावें ।
शक्तियुक्तीने मन भरावें ।
कार्य करावयासि सोपवावें ।
आपुल्या जैसें ॥६०॥
ऐसे मिळतां काही जन । आरंभ झाला
सत्कार्या पूर्ण ।
मग सहजचि घ्यावें महत्पुण्य
।गांव-सेवेचें ॥६१॥
याहून नाही दुसरा उपाय ।
आपुल्या गांवाची लागया सोय ।
हाचि मंत्र आहे सिध्दांतमय
।गांव आपुलें सुधारावया ॥६२॥
हें ऐकोनिया माझे उत्तर ।
प्रश्नकर्ता बोलला चतुर ।
यासि लागतील दिवस फार । तोंवरि
गांवाचे होईल कैसें ॥६३॥
आपण सांगितले जें साधन । तेंहि
आहे महाकठिण ।
कोण साधील यमनियम आसन ।
ध्यानादि सर्व ॥६४॥
त्यासि वर्षेहि बरींच लोटतीं ।
तोंपर्यंत आमुची गात्रें शिथिल होतीं ।
मग कोण पाहील गांवाप्रति । उत्तम आहे की वाईट ॥६५॥
आम्हीं मध्येच गेलों मरून । मग
इच्छा राहील अपूर्ण ।
काय सांगावें पुढे कोण । करील
कार्य आमुचें ॥६६॥
यासाठी सांगा सोपा उपाय ।
ज्याने साधेल सर्व सोय ।
देऊं आम्ही खर्च जरी ये । त्यासाठी कांही ॥६७॥
मित्रा ! ऐक याचें उत्तर । तुज
सोडोनि गांव व्हांवे सुंदर ।
ऐसी इच्छा धरिशील तीव्र । तरि ती वेडेपणाची ॥६८॥
माझें गांव सुंदर व्हावें । मी
चोरजारचि राहावें ।
ऐसें विसंगत दिसतें आघवें ।
म्हणणें तुझें ॥६९॥
व्यक्तिशुध्दीविण दुसरा उपाय ।
काय आहे व्हाया साहाय्य
।
टिकविण्यास गांवीं उत्तम सोय । याविण मजला
दिसेना ॥७०॥
तूं म्हणशील सत्तेने सुधारावें
। तांबडतोब कायदे करावे ।
तुझ्यासारखे टाळतील आघवे । ते
तैसेचि ठेवावे स्वार्थीजन ॥७१॥
हें म्हणणें कोण ऐकेल । कितीहि उदार बोलले बोल ।
तरी जनमन ते ओळखील । छीथू करील
आमुचीहि ॥७२॥
आणि तैसेंचि करूं जावें । तरि
गांव कैसें सुधारावें
।
व्यक्ति मिळोनीच गांव आघवें ।
हें विसरतां सर्व फोल ॥७३॥
लोक सुधारणेच्या रेखा फाडती ।
पैसा देऊन करूं म्हणती ।
परि पैसा घेऊनि फसविती । ऐसें लोक उभेच तेथे
॥७४॥
करूं म्हणती व्याख्यानें देऊन ।
तरि लोकहि शिकती व्याख्यान ।
काय होय यांतूनि निष्पन्न । जोंवरि मानव ना बदले ॥७५॥
त्यास मुख्य पाहिजे अंतःकरण ।
जिव्हाळ्याची सेवा पूर्ण ।
तरीच ग्राम होईल नंदनवन ।
अवडंबरावाचूनि ॥७६॥
वास्तविक त्यासि वेळहि नाहि ।
सवेंच चालेल सुधारणाहि
।
सुरू करोनि सांगत जाई । शिकवी
मनासहित जना ॥७७॥
बोल बोल याचें उत्तर । तुझी
तयारी आहे काय सत्त्वर ।
नाहीतरि वेळ मात्र । गमावूं
नकोस आमुचा ॥७८॥
तेव्हा तो निराशेने वदला ।
अपरिग्रह जरि आम्हीं केला ।
काय करील मुलाबाळाला । मग काय झाला फायदा माझा ॥७९॥
कासया करावें एवढे कठीण । चालूं द्या जैसे चालती जन
आपणचि दुःखी होऊन । कां मरावें
यासाठी ॥८०॥
ऐसें बोल ऐकतां प्रश्नकर्त्याचे
। बोललों तुम्हीच गुंड गुंडाचे ।
पुन्हा त्यांतहि आमुचें ।
साहाय्य घेतां बुडवाया ॥८१॥
तुम्हीच गांव बुडविला । सांगायासि आले बोलबाला ।
ऐसाचि वाटे घात झाला । सर्व
गांवदेशाचा ॥८२॥
तुमच्यावरूनि मज बोध झाला । देश
अशांनीच गर्तेत घातला ।
शहाणे म्हणवून नाश केला ।
गांवाचा तुम्ही ॥८३॥
प्रथम जें तुम्ही ऐसें बोलले । जे जे जन सुधारण्यास आणले ।
त्यांनीच गांव बुडविलें ।
आमुचें सर्व ॥८४॥
हें म्हणणे सारें लटके ।
तुम्हांसीच द्यावे वाटे फटके ।
नाहीतरि करा आतां निकें ।
सांगतों तैसें ॥८५॥
तो भला कांही पाय घेईना । फसला
मोह-कर्दमीं नाना ।
म्हणे आलों होतों आपुल्या
दर्शना । लाभ होईल म्हणोनि ॥८६॥
गांवी येती साधु-महंत ।
कार्यकर्ते विद्वान पंडित ।
त्यांचे संगती तैसा तैसा शास्त्रार्थ । करावा
हीच रुचि मज ॥८७॥
जैसे आम्हीं पोथीपुराण वाचतों ।
तैसीच त्याची चर्चा करतों ।
कोण शहाणा हें पाहतों । वरच्या
वरि ॥८८॥
तैसा बोललों आपला ज्ञानचर्चा ।
नेहमीच चालती गप्पा आमुच्या ।
होतील कधीकाळीं मनाच्या ।
भावनाहि ऐशा ॥८९॥
तुम्हीं तर नेटचि लाविला ।
सांगतां सुरवातचि करावयाला ।
यास पाहिजे विचार केला । कांही
वर्षें ॥९०॥
मी ऐकलें त्याचें म्हणणें ।
विव्हळ झालों जीवेंप्राणें ।
ऐसेहि जन निर्मिले भगवंताने !
वाटलें मना ॥९१॥
हात जोडले तयाप्रति । म्हणालों
आता नको आपुली संगति ।
बहू ज्ञान दिलें तुम्हांप्रति । वस्तादाने ॥९२॥
परंतु यापेक्षा मूर्ख बरे । ते
ऐकोनि घेती विचारे ।
आम्ही प्रयत्न करूं म्हणोनि
सारे । घरी जाती सदभावें ॥९३॥
तुम्ही दिसतां पढतमूर्ख । दुसर्या
दुखवोनि घेतां सुख ।
कळोनि न वळे याचें कौतुक ।
करावें तरि लाजिरवाणें ॥९४॥
परि आतां एक ध्यानी ठेवावें ।
याने आपुलें भलें कधीहि नव्हे ।
परि कुणातेंहि समाधान पावे । या
चर्चेने क्रियायोगें ॥९५॥
असो मजसी जैसा प्रश्नकर्तां
भेटला । तैसा का कोणी शहाणा उठला ।
तरि त्याने घातचि झाला । ग्रामसेवाकार्याचा
॥९६॥
बोलण्यांत ते अति शहाणे । परि
कार्य त्यांचें ओंगळवाणें ।
कैसें गांव सुधारेल याने । सांगा मज ॥९७॥
न सोडतांहि पेंढारीपण । त्यांना
पाहिजे पुढारीपण ।
इच्छिती संन्याशाचा सन्मान । पत्नी घेऊनी
खांद्यावरि ॥९८॥
साधूशी भाविकपणें बोलती ।
मूर्खापाशी महंत होती ।
व्यसनी लोकांमाजी मिळूनि जाती ।
व्यसनें भोगतां ॥९९॥
आपणा सर्वत्र मान मिळावा ।
धनाचाहि संग्रह व्हावा ।
आणि जरा न ताणहि न लागावा । ऐसा व्यापार हवा त्यांसि ॥१००॥
हेंचि ओळखावें धू्र्तपण । यासीच
पढतमूर्ख म्हणती शास्त्रज्ञ ।
त्यालागी करूनहि प्रयत्न ।असाध्य त्यांचा
खातारोग ॥१०१॥
त्यांपासोनि ग्राम वाचवावें ।
खरें सात्विकपण गांवी भरावें ।
सरळपणासाठीच प्रयत्न करावे ।
सुधारकांनी ॥१०२॥
यासि मज एक साधन सुचे । जे जे
असतील गांवी ऐसे ।
आधी त्यांचेच लागावें कांसे । ससेमिरा घेऊनिया
॥१०३॥
जे जन बोलण्यांत जिंकती ।
आचरणांत मागे राहती ।
त्यांची घ्यावी चातुर्यें झडती
। ग्राम हातीं घेवोनि ॥१०४॥
फुकी ज्ञानचर्चा नाही झाली ।
म्हणोनि ज्ञानशक्ति कमी पडली ।
ऐसी कधी न पडावी भुली । लोकांस माझ्या ॥१०५॥
अदंभ दया अभयादि गुण । त्यांसीच
गीता म्हणे ज्ञानखूण ।
क्रियावान तोचि पंडित पूर्ण ।
सर्वभूतहितीं रत ॥१०६॥
लाख बोलक्यांहून थोर । एकचि
माझा कर्तबगार ।
हें वचन पाळोनि सुंदर । गांव
सुधारावें कार्याने ॥१०७॥
सुधारणेची करितां बोलणीं ।
म्हणावें चला कामें करूं मिळोनि ।
घ्या हें टोपलें माती भरोनि । शिरावरि आपुल्या
॥१०८॥
सर्वांसीच लावावें काम । हाचि
मार्ग सर्वात उत्तम ।
यानेच बनेल आदर्श ग्राम ।
सहाय्य देतां सत्कार्या ॥१०९॥
आदर्श न करितां जीवन । कैसा
मिळेल आदर्शाचा मान।
कैसा जगीं आदर्श होय निर्माण । तुकडया
म्हणे ॥११०॥
इति श्री ग्राम-गीता ग्रंथ ।
गुरू शास्त्र स्वानुभव-संमत ।
कथिला ग्रामोन्नतीचा आचारपथ ।
सातवा अध्याय संपूर्ण ॥१११॥
अध्याय ७ वा ऑडीओ स्वरुपात --
1 टिप्पणी:
मान्यवर प्रणाम पोस्ट शेअर करताना व्हाट्स ऐप चा पर्याय नाही दीला..
टिप्पणी पोस्ट करा