.

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

हे गुरूदेव ! हम सबको सदबुध्दी दे ,सतकर्तव्य करनेकी प्रवृत्ति दे ,सच बोलनका अभ्यास दे ,सतस्वरूप का ग्यान दे । हे जगदव्यापी परमेश्वर ! हम हर मनुष्य मात्र से प्रेमका,सत्यताका,बंधुत्व- -भावका आचरण करे और सुख दुखःमे सम रहे,ऐसी हमको शक्ती दे,युक्ती दे और भक्ती दे । हे सर्वधर्ममें,सर्व संतमे,समस्त संसार में,रममाण होनेवाले चैतन्यघन!हम तेरे लिए,तेरे देश के लिए,हर जीव जंतु के लिए,कुटीलताका,अनैत्तिकताका,छलछिद्र द्रोहताका त्याग करे ऐसा साहस दे । हे भगवान! अंतमे तुझमें समरस हो जाये यह हमारा ध्येय हैं,उद्देश है । इसके लिये तुझको स्मरके निश्चय करते है, प्रतिज्ञा करते है । हे विश्व धर्मको नियमन करनेवाले परमात्मा !जहाँभी,जिधरभी,हममें कुछ कमी दिखती हो,उसमे हमारा ध्यान लगाकर,उस चिज को,उस कार्यको,पुरा करने में हम अपना स्वराज्य समझते है , सूराज्य समझते है ।यह समझने की और कर्तव्य करनेकी हमको प्रियता दे,शक्ती दे ,वरदान दे

मंगळवार, ६ जून, २०१७

अध्याय ७ वा आचार-प्राबल्य

अध्याय ७ वा



आचार-प्राबल्य

एका सज्जनें प्रश्न केला । लोकरहाटी कळली आम्हांला ।

पुढारी नेतेच सुधारती गांवाला । सत्य हें सारें ॥१॥

 

परि भल्यांनीच गोंधळ घातला । पुढारी पुढिलांचा अरि झाला ।

तयांच्या नगार्‍यापुढे कसला । आवाज आमचा ताण मारी ॥२॥

 

न्यायदेवता सिंहासनी बसविली । तीच अन्याय करून गेली ।

मग कैची सुव्यवस्था आली ।सांगा सांगा ॥३॥

 

सत्संगतीसि पंडित बोलाविला । त्यानेच गांवी कलह केला ।

शहाणा म्हणावा तोच निघाला । महामुर्ख जैसा ॥४॥

 

प्रसन्नतेकरिता ठेवलें गायन । तेथे ऐकावें लागलें रुदन ।

आपल्या पोटाची सोय व्हावी म्हणून । अडे ओरडे ॥५॥

 

घोडें शिकवाया आणला स्वार । तोचि पडला मोडोनि कंबर ।

कैसे बसतील मग इतर । घोडयावरि  ॥‍६॥

 

इमानदार म्हणोनि पाहिला धनी । त्यानेच केली बेइमानी ।

आता विश्वास ठेवावा कोणीं । कोणावरि  ॥७॥

 

मुलें शिकविण्या ठेविला मास्तर । त्यानेच केला दुर्व्यवहार ।

शिक्षकासीच शिक्षणाची जरूर । ऐसे झालें ॥८॥

 

औषधि द्याया आणिला डॉक्टर । त्याने रोग्यासि दिलें जहर ।

आतां कोणी करावा उपचार । सांगा सांगा ॥९॥

 

ऐसें झालें आमुच्या गांवी । सांगा काय व्यवस्था करावी

कोणांस हांक मारूनि घ्यावी । विश्वासाने ॥१०॥

 

जन मनांत येईल तें करिती । दारू पिती तमाशे नाचविती ।

पुढारीच पुढाकार घेती । ऐशा कामीं ॥११॥

 

गुंडास धरोनिया हातीं । करिती मनीं येईल त्याची फजीती ।

त्यावांचोनि पुढार्‍याची गति । म्हणती प्रगतिपथा येईना ॥१२॥

 

ऐसेंचि धरिलें त्यांनी मनीं । नाश केला गांवी फिरूनि ।

आता चोरचि झाले धनी । सज्जन मेले उपवासी ॥१३॥

 

गांव सगळेंचि बिघडलें । आपल्यापरीं स्वैर झालें ।

नाही कोणाचें वर्चस्व राहिलें । कोणावरि ॥१४॥

 

सांगा सांगा काय करावें । तुम्ही म्हणतां गांव सुधारावें ।

कोण्या मार्गे आपण जावें । ऐशा स्थितीं ॥१५॥

 

आपण करावें कांही साधन । हसती टिंगल करोनि जन ।

 म्हणती हा साधू आला कुठोन । पोट भरावया ॥१६॥

 

खराटा घेवोनि झाडझूड करावी । तेथेचि मलविसर्जना बसवी ।

म्हणती तुमची सेवा तुम्ही चालवावी । आम्ही करूं ऐसेंचि ॥१७॥

 

कांही सांगावें शहाणपण । म्हणती तुम्ही सांगणारे कोण

खुशी वाटेल तैसें करोन । राहूं आम्ही ॥१८॥

 

ऐसी झाली गांवाची स्थिती । वाईट वाटतें हृदयाप्रति ।

सोडूनि जावें गांवा येई चित्तीं । परि जीवा आवडेना ॥१९॥

 

शेवटी आलों तुम्हांसि शरण । तुम्ही गांव केले आदर्श म्हणोन ।

कैसे वळविलें तेथील जन । सांगा आम्हालागोनि ॥२०॥

 

मित्रा ! तूं विचारला प्रश्न बरवा । अति हर्ष झाला माझ्या जीवा ।

 मी सांगेन धरोनि भावा । वर्म माझें ॥२१॥

 

प्रथम कळूं दे तुझी साधना । काय ठेवितोसि आपुली धारणा

दिनचर्येंची कैसी रचना । आहे तुझ्या  ॥२२॥

 

हेचि मुख्य खूण । जोंवरि वक्त्याचें न दिसे आचरण ।

तोंवरि लोक वागतील म्हणोन । समजूं नये ॥२३॥

 

लोकांसि जें जें शिकवावें । तें आधी आपणचि आचरावें ।

नुसतें पुढारी म्हणोनि मिरवावें । तेणें आदर न वाढे ॥२४॥

 

एकेक विषयाचें पुढारीपण । घेवोनि तैसें केलें आचरण ।

 त्यांनीच बिघडवूं शकले गांव पूर्ण । गुंड व्यसनी व्यभिचारी ॥२५॥

 

तैसेचि गांव सुधाराया आपण । विशेष केलें पाहिजे आचरण ।

जेणें येईल अंगी आकर्षण । गावांस वेधून घेणारें ॥२६॥

 

येर पुढारी असोत सर्वहि । परंतु आपला मार्ग खुंटला नाही ।

लोक जणुं वाटचि पाहती सदाहि । कोण होतो पुढे म्हणोनि ॥२७॥

 

यासाठी निराशेचें नाही कारण । आचरणें साधावें पुढारीपण ।

 सत्यचि प्रभावी सर्वांहून । ही अमोल खूण विसरूं नये ॥२८॥

 

ज्याने सत्याशीं नातें जोडलें । त्याचे अंगी गुरुत्वाकर्षण आलें ।

 सांगण्याहनिहि सामर्थ्य चाले । त्याच्या शुध्द जीवनाचें ॥२९॥

 

यासाठी प्रथम पाहिजे इंद्रियनिग्रह । खानापानादिकीं नियमाग्रह ।

सर्वचि विषयीं असंग्रह । आपुल्यासाठी म्हणोनि ॥३०॥

 

पवित्र मित आहार-विहार । निद्रा थोडी शांती फार ।

सदा प्रसन्नता मुखावर । बोलतां चालतां ॥३१॥

 

यमनियमादि तैसीं आसनें । साधोनिया आरोग्य राखणें ।

 बुध्दि-बल-चातुर्यें वर्तनें । तेजोमय असावें ॥३२॥

 

आपुल्या कष्टावरीच जगावें । कुणाचे उपकार अंगी न घ्यावें ।

कमीत कमी खर्चाने रहावें । साध्या घरी ॥३३॥

 

अंग झाकण्यापुरते कपडे । शिवले असावेत साधे भाबडे ।

शौकपाणी न आवडे । राहावें ऐसें ॥३४॥

 

आपुलें परक्याचें हित । दोन्ही असावेत लक्षांत ।

 जेणें परक्यासि वाटे पसंत । तैसा व्यवहार असावा ॥३५॥

 

आपुल्या कोणत्याहि कारभारीं । अन्याय न व्हावा कोणावरी ।

सावधानी असावी हृदयांतरी । सर्वकाळ सत्याची ॥३६॥

 

दयाक्षमा शांति नम्रता । प्रत्येक जागीं प्रामाणिकता ।

सरळपणा आणि प्रेमळता । ही दैवी संपत्ति साधावी ॥३७॥

 

सार्वजनिक कामीं जाऊनि । कष्टत जावें निःस्पृहपणीं ।

 जाति-पक्ष-मित्रशत्रु म्हणूनि । पक्षपात कोठे नसावा ॥३८॥

 

असभ्य हेकट नसावें वर्तन । कर्कशता न दिसावी वागण्यांतून ।

कुणाचीहि निंदास्तुति ऐकोन । दुराग्रही मन न करावें ॥३९॥

 

प्रत्यक्ष दोष पाहिल्याविण । अथवा न समजतां विश्वसनीयांकडून ।

करूं नये न्यायदान । शोधल्यावाचून सर्व पक्ष ॥४०॥

 

सामुदायिक जबाबदारी । असेल जी जी नागरिकावरि ।

 न चुकता पाळावी ती निर्धारी । स्वार्थ उरीं न ठेवितां ॥४१॥

 

न करावी कोणाची निंदास्तुति । आपण आदर्श करावी कृति ।

स्त्रियामुलेंवृध्दादि सर्वांसांगाती । वागावें प्रेमें विश्वासें ॥४२॥

 

राखावी शब्दांची किंमत । वेळेचें महत्त्व सदोदित ।

दुसर्‍याचें सुखदुःख आघातहित । आपणाइतुकेंचि जाणावें ॥४३॥

 

हें सर्व जंव पाहतील जन । म्हणतील हाचि आहे सज्जन ।

वाढेल तुमच्या कार्यांचें महिमान । हळूहळू ॥४४॥

 

लोकांसि कळेंल तुमचें वर्तन । अंतबार्ह्य सात्विक पूर्ण।

मग पाहतील देवाप्रमाण । तुम्हांलागी ॥४५॥

 

मित्रा ! ऐसें जंव तूं करिशी । तंव लोक राहतील प्रसन्न तुजशीं ।

ऐकण्याची वाटेल खुशी । लोकांना तुझें ॥४६॥

 

म्हणतील तुम्हीं सांगावें । तैसेंचि आम्ही वागावें ।

तुमच्या बोलण्यांतून निघावें । तरि मरण होईल आमुचें ॥४७॥

 

तेव्हा प्रथम करावा विचार । आपण घ्यावा की नाही पुढाकार ।

एकदा पाऊल टाकतां समोर । मागे घेऊं नये कल्पांतीं ॥४८॥

 

ज्यासि वाटे जनसेवा करावी । त्याने प्रथम लोकलाज सोडावी ।

आपुल्या आत्माची ग्वाही घ्यावी । कार्य सत्य म्हणोनिया ॥४९॥

 

ज्यांत आहे सर्वांचें सुख । तें सत्कार्य न करितां राहावें विन्मुख ।

हें तों आहे घोर पातक । समजोनि घ्यावें ॥५०॥

 

साहेल तैसी करावी सुरवात । मुरवावया जनलोकांत ।

हृदयांत आणि इंद्रियांत । मेळ राहूं शके ऐसी ॥५१॥

 

क्रमाने पाऊल पुढे घ्यावें । कार्य करितां समाधान मानावें ।

 विरोधकांसि उत्तर द्यावें । नम्रतेने ॥५२॥

 

लोकांसि बोलणें शिकवावें । तरि आपण उत्तमचि बोलावें ।

बोलण्यांत माधुर्य ओतावे । आपुल्या प्रेमें ॥५३॥

 

आपुल्या बोलण्याने उबगतील जन । ऐसें कधी न करावें भाषण ।

 कोणचेंही पूर्ण ऐकल्याविण । न द्यावें मधून उत्तर ॥५४॥

 

आपुलें बोलणें प्रेमाचें । दुसर्‍याचें बोलणें क्रोधाचें ।

परि ते सहन करावे त्याचे । वार अंगीं ॥५५॥

 

दुसर्‍याने कितीही क्रोध केला । तरी हसोनि पाहिजे मावळिला ।

 उत्तर देतां यावें शांतीनें त्याला । आपुल्यापरी ॥५६॥

 

शंका विचारावयाची दाटी । लागेल पदोपदीं पाठीं ।

सहन करोनि ही आटाआटी । पाय पुढे टाकावा ॥५७॥

 

एकदा झालिया निश्चय । मग लोकचि होती साहाय्य ।

कामें करावयाची सोय । सोपी होते ॥५८॥

 

आपोआपचि होतो निर्वाळा । तांडा जमतो भोंवती सगळा ।

 निवडावा त्यांतूनि जिव्हाळा । आहे कोणा ॥५९॥

 

त्यांसचि साथी करावें । शक्तियुक्तीने मन भरावें ।

कार्य करावयासि सोपवावें । आपुल्या जैसें ॥६०॥

 

ऐसे मिळतां काही जन । आरंभ झाला सत्कार्या पूर्ण ।

मग सहजचि घ्यावें महत्पुण्य ।गांव-सेवेचें ॥६१॥

 

याहून नाही दुसरा उपाय । आपुल्या गांवाची लागया सोय ।

हाचि मंत्र आहे सिध्दांतमय ।गांव आपुलें सुधारावया ॥६२॥

 

हें ऐकोनिया माझे उत्तर । प्रश्नकर्ता बोलला चतुर ।

यासि लागतील दिवस फार । तोंवरि गांवाचे होईल कैसें ॥६३॥

 

आपण सांगितले जें साधन । तेंहि आहे महाकठिण ।

कोण साधील यमनियम आसन । ध्यानादि सर्व  ॥६४॥

 

त्यासि वर्षेहि बरींच लोटतीं । तोंपर्यंत आमुची गात्रें शिथिल होतीं ।

 मग कोण पाहील गांवाप्रति । उत्तम आहे की वाईट  ॥६५॥

 

आम्हीं मध्येच गेलों मरून । मग इच्छा राहील अपूर्ण ।

काय सांगावें पुढे कोण । करील कार्य आमुचें  ॥६६॥

 

यासाठी सांगा सोपा उपाय । ज्याने साधेल सर्व सोय ।

 देऊं आम्ही खर्च जरी ये । त्यासाठी कांही  ॥६७॥

 

मित्रा ! ऐक याचें उत्तर । तुज सोडोनि गांव व्हांवे सुंदर ।

 ऐसी इच्छा धरिशील तीव्र । तरि ती वेडेपणाची ॥६८॥

 

माझें गांव सुंदर व्हावें । मी चोरजारचि राहावें ।

ऐसें विसंगत दिसतें आघवें । म्हणणें तुझें ॥६९॥

 

व्यक्तिशुध्दीविण दुसरा उपाय । काय आहे व्हाया साहाय्य

 टिकविण्यास गांवीं उत्तम सोय । याविण मजला दिसेना ॥७०॥

 

तूं म्हणशील सत्तेने सुधारावें । तांबडतोब कायदे करावे ।

तुझ्यासारखे टाळतील आघवे । ते तैसेचि ठेवावे स्वार्थीजन ॥७१॥

 

हें म्हणणें कोण ऐकेल । कितीहि उदार बोलले बोल ।

तरी जनमन ते ओळखील । छीथू करील आमुचीहि ॥७२॥

 

आणि तैसेंचि करूं जावें । तरि गांव कैसें सुधारावें

व्यक्ति मिळोनीच गांव आघवें । हें विसरतां सर्व फोल ॥७३॥

 

लोक सुधारणेच्या रेखा फाडती । पैसा देऊन करूं म्हणती ।

 परि पैसा घेऊनि फसविती । ऐसें लोक उभेच तेथे ॥७४॥

 

करूं म्हणती व्याख्यानें देऊन । तरि लोकहि शिकती व्याख्यान ।

काय होय यांतूनि निष्पन्न । जोंवरि मानव ना बदले ॥७५॥

 

त्यास मुख्य पाहिजे अंतःकरण । जिव्हाळ्याची सेवा पूर्ण ।

तरीच ग्राम होईल नंदनवन । अवडंबरावाचूनि ॥७६॥

 

वास्तविक त्यासि वेळहि नाहि । सवेंच चालेल सुधारणाहि

सुरू करोनि सांगत जाई । शिकवी मनासहित जना ॥७७॥

 

बोल बोल याचें उत्तर । तुझी तयारी आहे काय सत्त्वर ।

नाहीतरि वेळ मात्र । गमावूं नकोस आमुचा ॥७८॥

 

तेव्हा तो निराशेने वदला । अपरिग्रह जरि आम्हीं केला ।

 काय करील मुलाबाळाला । मग काय झाला फायदा माझा ॥७९॥

 

कासया करावें एवढे कठीण । चालूं द्या जैसे चालती जन

आपणचि दुःखी होऊन । कां मरावें यासाठी  ॥८०॥

 

ऐसें बोल ऐकतां प्रश्नकर्त्याचे । बोललों तुम्हीच गुंड गुंडाचे ।

पुन्हा त्यांतहि आमुचें । साहाय्य घेतां बुडवाया ॥८१॥

 

तुम्हीच गांव बुडविला । सांगायासि आले बोलबाला ।

ऐसाचि वाटे घात झाला । सर्व गांवदेशाचा ॥८२॥

 

तुमच्यावरूनि मज बोध झाला । देश अशांनीच गर्तेत घातला ।

शहाणे म्हणवून नाश केला । गांवाचा तुम्ही ॥८३॥

 

प्रथम जें तुम्ही ऐसें बोलले । जे जे जन सुधारण्यास आणले ।

त्यांनीच गांव बुडविलें । आमुचें सर्व ॥८४॥

 

हें म्हणणे सारें लटके । तुम्हांसीच द्यावे वाटे फटके ।

नाहीतरि करा आतां निकें । सांगतों तैसें ॥८५॥

 

तो भला कांही पाय घेईना । फसला मोह-कर्दमीं नाना ।

म्हणे आलों होतों आपुल्या दर्शना । लाभ होईल म्हणोनि ॥८६॥

 

गांवी येती साधु-महंत । कार्यकर्ते विद्वान पंडित ।

 त्यांचे संगती तैसा तैसा शास्त्रार्थ । करावा हीच रुचि मज ॥८७॥

 

जैसे आम्हीं पोथीपुराण वाचतों । तैसीच त्याची चर्चा करतों ।

कोण शहाणा हें पाहतों । वरच्या वरि ॥८८॥

 

तैसा बोललों आपला ज्ञानचर्चा । नेहमीच चालती गप्पा आमुच्या ।

होतील कधीकाळीं मनाच्या । भावनाहि ऐशा ॥८९॥

 

तुम्हीं तर नेटचि लाविला । सांगतां सुरवातचि करावयाला ।

यास पाहिजे विचार केला । कांही वर्षें ॥९०॥

 

मी ऐकलें त्याचें म्हणणें । विव्हळ झालों जीवेंप्राणें ।

ऐसेहि जन निर्मिले भगवंताने ! वाटलें मना ॥९१॥

 

हात जोडले तयाप्रति । म्हणालों आता नको आपुली संगति ।

 बहू ज्ञान दिलें तुम्हांप्रति । वस्तादाने ॥९२॥

 

परंतु यापेक्षा मूर्ख बरे । ते ऐकोनि घेती विचारे ।

आम्ही प्रयत्न करूं म्हणोनि सारे । घरी जाती सदभावें ॥९३॥

 

तुम्ही दिसतां पढतमूर्ख । दुसर्‍या दुखवोनि घेतां सुख ।

कळोनि न वळे याचें कौतुक । करावें तरि लाजिरवाणें ॥९४॥

 

परि आतां एक ध्यानी ठेवावें । याने आपुलें भलें कधीहि नव्हे ।

परि कुणातेंहि समाधान पावे । या चर्चेने क्रियायोगें ॥९५॥

 

असो मजसी जैसा प्रश्नकर्तां भेटला । तैसा का कोणी शहाणा उठला ।

तरि त्याने घातचि झाला । ग्रामसेवाकार्याचा ॥९६॥

 

बोलण्यांत ते अति शहाणे । परि कार्य त्यांचें ओंगळवाणें ।

कैसें गांव सुधारेल याने । सांगा मज ॥९७॥

 

न सोडतांहि पेंढारीपण । त्यांना पाहिजे पुढारीपण ।

 इच्छिती संन्याशाचा सन्मान । पत्नी घेऊनी खांद्यावरि ॥९८॥

 

साधूशी भाविकपणें बोलती । मूर्खापाशी महंत होती ।

व्यसनी लोकांमाजी मिळूनि जाती । व्यसनें भोगतां ॥९९॥

 

आपणा सर्वत्र मान मिळावा । धनाचाहि संग्रह व्हावा ।

आणि जरा न ताणहि न लागावा । ऐसा व्यापार हवा त्यांसि ॥१००॥

 

हेंचि ओळखावें धू्र्तपण । यासीच पढतमूर्ख म्हणती शास्त्रज्ञ ।

 त्यालागी करूनहि प्रयत्न ।असाध्य त्यांचा खातारोग ॥१०१॥

 

त्यांपासोनि ग्राम वाचवावें । खरें सात्विकपण गांवी भरावें ।

सरळपणासाठीच प्रयत्न करावे । सुधारकांनी ॥१०२॥

 

यासि मज एक साधन सुचे । जे जे असतील गांवी ऐसे ।

 आधी त्यांचेच लागावें कांसे । ससेमिरा घेऊनिया ॥१०३॥

 

जे जन बोलण्यांत जिंकती । आचरणांत मागे राहती ।

त्यांची घ्यावी चातुर्यें झडती । ग्राम हातीं घेवोनि ॥१०४॥

 

फुकी ज्ञानचर्चा नाही झाली । म्हणोनि ज्ञानशक्ति कमी पडली ।

 ऐसी कधी न पडावी भुली । लोकांस माझ्या ॥१०५॥

 

अदंभ दया अभयादि गुण । त्यांसीच गीता म्हणे ज्ञानखूण ।

क्रियावान तोचि पंडित पूर्ण । सर्वभूतहितीं रत ॥१०६॥

 

लाख बोलक्यांहून थोर । एकचि माझा कर्तबगार ।

हें वचन पाळोनि सुंदर । गांव सुधारावें कार्याने ॥१०७॥

 

सुधारणेची करितां बोलणीं । म्हणावें चला कामें करूं मिळोनि ।

 घ्या हें टोपलें माती भरोनि । शिरावरि आपुल्या ॥१०८॥

 

सर्वांसीच लावावें काम । हाचि मार्ग सर्वात उत्तम ।

यानेच बनेल आदर्श ग्राम । सहाय्य देतां सत्कार्या ॥१०९॥

 

आदर्श न करितां जीवन । कैसा मिळेल आदर्शाचा मान।

कैसा जगीं आदर्श होय निर्माण । तुकडया म्हणे ॥११०॥

 

इति श्री ग्राम-गीता ग्रंथ । गुरू शास्त्र स्वानुभव-संमत ।

कथिला ग्रामोन्नतीचा आचारपथ । सातवा अध्याय संपूर्ण ॥१११॥

 

अध्याय ७   वा   ऑडीओ स्वरुपात --

 


1 टिप्पणी:

Rajesh sawaji म्हणाले...

मान्यवर प्रणाम पोस्ट शेअर करताना व्हाट्स ऐप चा पर्याय नाही दीला..

।।जय गुरुदेव।।