अध्याय १४ वा
(श्री चक्रधर स्वामीबद्दल अधिक माहितीसाठी क्लिक करा .)
ग्राम आरोग्य
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
एक श्रोता महाभाविक ।
म्हणे गांवहि केलें ठीक ।
तरी देवाने मारली मेख
। ती निघूं शकेना ॥१॥
प्रत्यक्ष शहर जरी
झालें । तरी देवापुढे ताब न चाले ।
तेथे खेडें शहरापरी केलें । तरी काय होतें ? ॥२॥
देवीदेवतांचा कोप झाला
। कॉलरापटकीचा झटका आला ।
म्हणजे सुधारूंच न शके
कोणाला । बाप वैद्याचा ॥३॥
म्हणोनि देवता राहती
प्रसन्न । ऐसें करावें पूजन ।
गांव असो की शहर संपन्न । सुखी त्याविण न राहे
॥४॥
मित्रा ! ऐक याचें
उत्तर । देवदेवता किंवा परमेश्वर
। हे कृपेचेचि अवतार ।
कोपचि नाही त्याठायीं ॥५॥
कोप करिती ते
दुष्टावरि । त्यांतहि उध्दार भावचि अंतरीं ।
तेथे निरपराध्यांस छळती जरि । तरि त्या देव न
म्हणावें ॥६॥
सर्व लोक लेकरें
त्याचीं । छळणा कां करील कोणाची ?
कृति आपुलीच आपणा जाची
। शत्रु आपणचि आपुले ॥७॥
चहूबाजूंनी केली घाण ।
त्यांत जंतु झाले निर्माण ।
त्यांतूनि रोगांच्या सांथी भिन्न भिन्न । वाढ
घेती ॥८॥
नाही नेमाचा आचार ।
शुध्द नाही आहारविहार ।
अशुध्द हवापाणी, संहार
। करिती जनांचा ॥९॥
कांही केव्हा कुठेहि
खाणें । कधी झोपणें कधी जागणें ।
सप्तहि धातु कोपती
याने । रोगरूपाने फळा येती ॥१०॥
’ हाटेलीं
खाणें मसणा जाणें ’ । ऐसें बोलती शहाणे ।
त्यावरि नाना तिखट व्यसनें । आग्यावेताळासारिखीं
॥११॥
कशास कांही नियम नुरला
। कोण रोगी कोठे थुंकला ।
कोठे जेवला संसर्गी
आला । गोंधळ झाला सर्वत्र ॥१२॥
त्याने रोगप्रचार झाला
। लागट रोग वाढतचि गेला ।
बळी घेतलें हजारो लोकांला । वाढोनि सांथ ॥१३॥
मग कोणी म्हणे कोपली
देवी । कोणी मांत्रिकांसि बोलावी ।
बाहेरभितरचें समजोनि गांवीं । काढती आरत्या
अंधारीं ॥१४॥
कोणी करणी कौटाळ
म्हणती । कोणी पिशाच्चास भारती ।
औषधेंहि न देतां रोगी
मारती । मूर्खपणाने ॥१५
भगत मांत्रिक अरबाडी
जाणते । घुमारे बघती भाविक कोणते ।
पोटासाठी नाना मतें । फैलाविती लोकांमाजी ॥१६॥
करविती नवस सायास थोर
। देवीपूजेचा जोरसोर ।
रेडे बकरे कोंबडे पामर
। कापिताति अज्ञानें ॥१७
देवानेचि केले जीव ।
त्यास कैची मारण्याची हाव ?
मधले दलाल करिती ठेव ।
आपुली हौस पुरवावया ॥१८॥
संतें देवास केलें
प्रसन्न । तेव्हा बळी दिले कोण ?
चोखोबा, श्रीचक्रधर,
रामकृष्ण । म्हणती ’ प्रसन्न देव भावें ’
॥१९॥
देवासि पाहिजे बलिदान
। तो पशु आपुला भ्रम अभिमान ।
गांवचें गेल्याविण
अज्ञान । सुखी जीवन न होई ॥२०॥
गांव असो अथवा शहर ।
तेथील बिघडले आचारविचार ।
म्हणोनीच रोगराईने बेजांर । जाहले सारे जन लोक
॥२१॥
गांव व्हावया निरोगी
सुंदर । सुधारावें लागेल एकेक घर ।
आणि त्याहूनहि घरांत राहणार । करावा लागेल आदर्श
॥२२॥
व्यक्ति व्हाया आदर्श
सम्यक । पाहिजे दिनचर्याच सात्विक ।
सारें जीवन निरोगी
सुरेख । तरीच होईल गांवाचें ॥२३॥
नियमीं बांधला एकेक
दिन । त्यानेच सुधरे जीवन संपूर्ण ।
गांवहि होय आरोग्यसंपन्न । सारे प्रसन्न देवीदेव
॥२४॥
नियमांचा मुख्य आधार ।
मजबूत पाहिजे निर्धार ।
त्यावरीच उत्कर्षाची मदार । ऐहिक आणि आध्यात्मिक
॥२५॥
नाहीतरि मानवाने नियम
केले । सर्व जीवन सुरळीत चाले ।
परि एकदा दुर्लक्ष
झाले । की चुकतचि जातें ॥२६॥
एकदा रात्रभरि जागला ।
मग सकाळीं उठणेंच कशाला ?
आळसांत सर्व दिवस गेला
। नियम मोडोनि ॥२७॥
त्यास धाक नाही काळजी
नाही । घरचे लोक बोललेच नाही ।
हा उठला दुसरे
दिवशींहि । दहा वाजतां दिवसाचे ॥२८॥
कांही दिवस अलक्ष
झालें । उशीरां उठणें अंगवळणीं पडलें ।
मग बदलेना, कांही केले । उपचार जरी
॥२९॥
ऐसें कासया घडूं
द्यावें । रोज सकाळींच उठावें ।
न उठतां घरच्यांनी
जागवावें । झोपणारासि निश्चयें ॥३०॥
कांही म्हणती उशीरां
उठणें । हें तों भाग्यवंताचें लक्षणें ।
त्यास काय आहे उणें ।
पोट भराया धनवंता ? ॥३१॥
ऐसें समजोनि आळशी केला
। अरे ! हा भाग्यवान कसला ?
निजण्यावरि भाग्यवान
ठरला । तरि बीमार महाभागी कां नव्हे ? ॥३२॥
तो तर निजलाचि राहतो ।
झोपूनचि खातों-पितों ॥
काय अधिक भाग्यवान
म्हणवितो ? सांगा सांगा ॥३३॥
भाग्यवंताची उलटी
व्याख्या । करणें शोभतें का शहाण्यासारख्या ।
अरे ! सकाळीं उठणारासचि सख्या । भाग्यवंत
म्हणावें ॥३४॥
श्रमांतूनचि उपजे
भाग्यसंपत्ति । निजणारे तिची हानि करिती ।
इतरां श्रम अधिक पडती
। उत्साह घटे आपलाहि ॥३५॥
झोपी गेला घरचा धनी ।
सुर्य चालला डोक्यावरोनि ।
उन्ह पडले तरी निजूनि
। कड फेरितो झोपेचा ॥३६॥
नोकरचाकर आळस करिती ।
म्हणती घरधनीच झोपती ।
मग आपणचि कैशा रीतीं । काम करावें जावोनि ? ॥३७॥
ऐसा सारा अंधार पडे ।
वाजती श्वानांचे चौघडे ।
मूलबाळ रडेओरडे । झोप काढिती आयाबाया ॥३८॥
घरदार कोठूनि पवित्र ? जागल्यावरीहि
आळसलें गात्र ।
अव्यवस्था माजे सर्वत्र । बध्दकोष्ठता वाढ घे
॥३९॥
यांतूनचि वाढती सर्व
रोग । वैद्य डॉक्टरांचा लागला भोग ।
तिकडे बिघडत गेले
उद्योग । शिरलें दुर्भाग्य त्या घरीं ॥४०॥
प्रात:काळची
आरोग्यदायी हवा । सदासर्वदा मानवते जीवा ।
प्रसन्नता देई ऋतु
तेधवा । सर्व प्राणीमात्रासि ॥४१॥
सर्व वनेंरानें जागीं
होतीं । पुष्पें सारी विकास पावतीं ।
पशुपक्षीहि नेहमी उठती । प्रात:काळीं ॥४२॥
पहाटे दोहतां
गाय-म्हैस । त्यांत अधिकचि सार-अंश ।
पहाटवारा चढवी रक्तास । लाली रोगप्रतिकारक ॥४३॥
म्हणोनि प्रात:काळीं
उठावें । ब्राह्ममुहूर्ता डोळयांनी बघावें ।
उठतांच प्रात:स्मरण करावें । आसनस्थानीं ॥४४॥
प्रात:स्मरण म्हणजे
नवीन स्फूर्ति । उगवल्या दिवशीं व्हाया प्रगति ।
उत्तम कार्य घडावें पूर्ण गतीं । म्हणोनि
प्रार्थना देवाची ॥४५॥
त्यावेळीं जो संकल्प
करतो । वाईट न घडो ऐसें चिंतितो ।
तो सुसंस्कारें वाढत
जातो । उन्नतिमार्गे वेगाने ॥४६॥
म्हणोनि प्रात:स्मरण
करावें । नैसर्गिक उत्साहभरें भरावें ।
मग प्रातर्विधी आटोपावे । नित्यनेम हा अमोलिक
॥४७॥
पहाटेस शौचमुखमार्जन ।
त्याने वायुदोषांचें होय शमन ।
शरीरीं नवा जोम निर्माण । होय निर्मळपण लाभोनि
॥४८॥
सकाळीं करावें उष:पान
। त्याने अंतरींद्रियांचें शांतवन ।
नंतर करावें
शीतजलस्नान । अति प्रसन्न चित्त राहे ॥४९॥
शीतजलस्नानाचें महिमान
थोर । तेणें त्वचाशक्ति जागे सुंदर ।
शरीर राहे सदा तरतर ।
उत्साहाने ॥५०॥
मेंदूचा भाग थंड
राहिला । तरीच बुध्दीचा उत्कर्ष झाला ।
ऐसा थोरांना अनुभव आला
। कितीतरी ॥५१॥
उष्ण पाण्याने स्नान
करणें । म्हणजे बीमारचि तो समजणें ।
ऐसी संवय नेहमी लावणें । हानिकारक देहासि ॥५२॥
स्नानोत्तर
अरुणोदयापूर्वी । सामुदायिक ध्यान-उपासना करावी ।
प्रार्थनामंदिर अथवा पडवी । ध्यानास्तव पहावी
निर्मळ ॥५३॥
अरुणोदयाची
सुवर्णप्रभा । दिसे लावण्याची शोभा ।
निसर्ग वाढवी शांति प्रतिभा । अलभ्यलाभा पावती
योगी ॥५४॥
जन म्हणती योग्यांनी
ध्यान करावें । आपण कासया उठावें स्मरावें ?
हें म्हणणें कदापि नोहे बरवें ।
कोणाचेंहि ॥५५॥
योगी आपली समाधि घरी ।
साधक सन्मार्गाचा योग करी ।
जीवन-उज्ज्वलतेचा योग
संसारीं । प्रात:काळीं साधतसे ॥५६॥
ध्यानापरीच सहल
प्रात:काळची । जरूर करावी संवय रोजचि ।
त्याने देह मन राहे निर्मल शुचि ।
प्राणवायुस्पर्शाने ॥५७॥
कोणी धावती कोणी चालती
। कोणी आसनें सूर्यनमस्कार घालती ।
कोणी गाती चिंतन करिती । हें दृश्य दिसो
प्रभातीं ॥५८॥
कांही पठण-पाठण करावें
। शरीरमनासि वळण लावावें ।
आयुष्य सुंदर होतें
आघवें । ऐशा क्रमें ॥५९॥
घरीं असो वा आश्रमी ।
प्रवासीं असो वा तीर्थधामीं ।
प्रात:काळीं नित्यनियमीं । अभ्यासक्रम उरकवावा
॥६०॥
घरा-आश्रमाची करावी
सफाई । स्वच्छता मार्गी ठायीं ठायीं ।
गायीम्हशींचे गोठे
सर्वहि । आरशासारखे करावे ॥६१॥
गडीमाणसांनी सहाय्य
द्यावें । परि प्रत्येकाने काम करावें ।
आईबाई मिळोनि उरकवावे
। कामधंदे चटचट ॥६२॥
कोणीहि बघे अरुणोदयीं
। सडासंमार्जन रांगोळी रई ।
आंतबाहेर गलिच्छता
नाही । कामें झालीं सकळांचीं ॥६३॥
ऐसें ज्या गांवीं
झालें । समजावें लक्ष्मीचें मन मोहिलें ।
आरोग्याचें राज्य आलें । तया गांवीं ॥६४॥
तेथे उदंड आयुष्य
वाढतें । जेथे प्रात:काळीं स्वच्छता होते ।
कोणीहि न दिसे झोपला
जेथे । प्राणीमात्र ॥६५॥
म्हणोनि ऐसे नियम
करावे । चुकलियाहि चुकों न द्यावे ।
पुन:पुन्हा सावरावें ।
वर्तन आपुलें ॥६६॥
ऐसा अभ्यास जडल्यावरी
। आरोग्य भाग्य नांदे संसारीं ।
औषधांची गरजचि नुरे
शरीरीं । वाढे अभ्यंतरीं नवें तेज ॥६७॥
पूर्वी प्रात:काळीं
माध्यान्हा । आणि सायंकाळीं जाणा ।
होती त्रिकाळ
संध्याप्रार्थना । संस्कारास्तव लाविली ॥६८॥
तें सर्वकाळचि उचित ।
म्हणोनि प्रातर्ध्यान नियमित ।
आणि सायंप्रार्थनाहि नेमस्त । करीत जावी
सर्वांनी ॥६९॥
निद्रेचिया आदिअंतीं ।
दिवस-रात्रीच्या संधीप्रति ।
आणि भोजनसमयीं संकल्प होती । ते बनती दृढ
संस्कार ॥७०॥
जनींभोजनीं हरि आळवणें
। गीतापाठादि उच्चारणें ।
सात्विक भाव हृदयीं भरणें । शुध्द करी जीवनासि
॥७१॥
श्रोतयांनी प्रश्न
केला । भोजनीं आळवावें भगवंताला ।
याचें फळ सांगा
आम्हांला । काय कैसे ? ॥७२॥
भोजन म्हणजे आहार
घेणें । तेथे कशाला देवाचें गाणें ?
हास्यविनोद कां न करणें ।
उल्हासास्तव ? ॥७३॥
ऐका याचेंहि उत्तर ।
भोजन म्हणजे पिंडसंस्कार ।
यज्ञहि यासि म्हणती
थोर । वैश्वानर अग्निमाजी ॥७४॥
भोजनाचे वेळीं प्रसन्न
। केलिया विचार शुभचिंतन ।
तैसेचि भिनती निर्मळ गुण । अन्नासवें ॥७५॥
पवित्र धूप सुगंध
सात्विक । तेणें वातावरण रोगनाशक ।
रांगोळया आदि
प्रसन्नकारक । स्वच्छ असावी जागा तरी ॥७६॥
स्वच्छतेविणा जें भोजन
। समजावें तें मलीनपण ।
अग्नि वाढाया हातपाय
धुवोन । पुसोनि भोजन करावें ॥७७॥
कांही करावें
भोजनापूर्वी काम । जेणें मिळे सकळांसि आराम ।
कार्य होतसे सुगम ।
सर्व जनां मिळोनि ॥७८॥
कोणी आसने, पाट
टाकावे । कोणी वाढावे, पाणी ठेवावें ।
कोणी उदबत्ती, धूप
लावावे । सुगंधासाठी ॥७९॥
प्रथम बसोनि पाठ
म्हणावा । गंभीर सुरें रंग भरावा ।
वाढणें संपता
शांतिमंत्र गावा । गांभीर्याने ॥८०॥
मग करावें ब्रह्मार्पण
। आदराने करावें अन्नसेवन ।
भोजनींहि श्लोक, मधुरवचन
। उल्हासाने बोलावें ॥८१॥
भोजनापूर्वी आचमन ।
त्याचा उद्देश अग्निदीपन ।
चित्राहूति जलआवर्तन ।
समर्पण हाचि भाव त्याचा ॥८२॥
ईश्वरें उपजविलें अन्न
। तें अन्न ईश्वरी कृपादान ।
ज्यावरि सर्वांचें असे
जीवन । त्याचें ऋण आठवावें ॥८३॥
त्याचीं लेकरें जीवजन
। त्यांना आधी लाभावें अन्न ।
यासाठी विश्वदेवाचें
संतर्पण । यज्ञमय भोजन या भावें ॥८४॥
भोजन म्हणजे भूमातेचा
प्रसाद । समजोनि सुखें घ्यावा आस्वाद ।
ज्यांत शेतकर्यांचे
कष्ट विशद । तें अन्न सेवावें सेवेस्तव ॥८५॥
ऐशा सदभावें आदरें
सेवावें । उत्तम श्लोक भोजनीं गावे ।
वेडेंवाकुडें न
बोलावें । क्रोधा न यावें भोजनसमयीं ॥८६॥
हास्यविनोद जरी असला ।
तरी अश्लीलता न यावी प्रसंगाला ।
उच्छिष्ट कण न पाहिजे टाकला । भोजनप्रसंगीं ॥८७॥
राजस तामस सात्विक ।
भोजनाचे प्रकार अनेक ।
त्यांत आपली शक्ति पाहूनि सम्यक । पचेल तैसें
करावें ॥८८॥
कोणी सज्जन म्हणती भले
। पचनासाठी सर्वचि खाद्य निर्मिलें ।
परंतु पचनाचें तारतम्य
पाहिलें । पाहिजे जुळवोनि ॥८९॥
कोणी खाद्य रोग करी ।
कोणी खाद्य भोग भरी ।
कोणी खाद्य वाईट
संस्कारी । करितें प्राण्या ॥९०॥
कांही जीव चुनखडीहि
खाती । कांही मांसकिडे भक्षिती ।
परंतु त्यांची स्वभाव-प्रकृति । त्याचि परी राहे
॥९१॥
मानवाने काय खावें ।
म्हणजे मानवपणेंचि शोभावें ।
हेंचि येथे पाहावें ।
लागतें सज्जनांसि ॥९२॥
शुध्द सात्विक अन्न
घेतलें । त्याने सात्विक विचार प्रवर्तले ।
तामस राजस खाद्य
सेविलें । तैसें झालें आचरण ॥९३॥
मद्यमांसाहार करिती
कोणी । विकारबुध्दि वाढे मनमानी ।
भलतेचि रोग जाती
लागोनि । सांसर्गिक आदि ॥९४॥
हें तों निश्चितचि आहे
। खाद्यें रसरक्त उत्पन्न होय ।
रक्तापासूनि मांस मेद
वीर्य । नि:संशय होती शरीरीं ॥९५॥
जैसे ज्याचे रक्तरसगुण
। तैसे विचार होती स्फुरण ।
क्रूर-शूर
मंद-बुध्दिमान । रक्तमिश्रणें दिसताति ॥९६॥
कांही आनुवंशिक गुण
येती । रक्तरेताचिया मिश्रस्थितीं ।
कांही
खाण्यापिण्याचेहि होती । संस्कार अंगीं ॥९७॥
कांही संगतीने वळण
लागे । भूमिपात्रें कांही परिणाम जागे
कांही प्रयत्नशीलतेचे
धागे । वळविती जीवा ॥९८॥
हें सर्व जरी खरें
असलें । तरी मुख्य अंग खाद्यपेयचि झालें ।
कारण त्यानेच
बनलें-घटलें । रक्तमांस जीवांचें ॥९९॥
उत्तम रक्ताचें असावें
शरीर । तरि अन्नहि उत्तमचि खावें सुंदर ।
बाष्कळ खातां
मेंदू-इंद्रियांवर । बाष्कळताचि येईल ॥१००॥
मग विषय-वासना नावरे ।
लागेल बहिरंगाचें वारें ।
झगडती जैसीं जनावरें ।
तैसे अनावर मानवहि ॥१०१॥
ज्यासि क्रूरकर्मचि
करणें आहे । त्याने तेंचि खावें नि:संशय ।
तैसेचि भोगावेत अपाय ।
झालिया अंगीं ॥१०२॥
ज्यासि मनुष्यपण
लाभावें । ऐसें वाटे जीवेंभावें ।
त्याने सात्विक अन्नचि
सेवावें । सर्वतोपरीं ॥१०३॥
एकाने ऐसा प्रश्न केला
। सात्विक अन्न कुठलें गरीबाला ?
त्याने काय करावें बोला ।
जीवनासाठी ? ॥१०४॥
मित्रहो ! सात्विक
अन्नचि सहज मिळतें । जें श्रमाने शेतींत पिकतें ।
भाजीभाकरी भातपोळी
लाभते । अल्प प्रयासें ॥१०५॥
सूर्यकिरणांनी तयार
झालीं । कंद भाज्याफळें बागेंत पिकलीं ।
सत्वांशयुक्त सर्व तीं
भलीं । आरोग्यदायी ॥१०६॥
साधें सहज ताजें पावन
। तेंचि असे सात्विक अन्न ।
नाना विकृतींचें
मिष्टान्न । तें सात्विक नव्हे ॥१०७॥
कांहींना होते
उदर-कुंदी । चाले अपानांतून दुर्गधी ।
लोक हसती ’ खाणेंपिणें स्वच्छंदी ।
कां करतो ’ म्हणोनिया ॥११८॥
प्रकृतीच्या विरुध्द
आहार । नाही काळवेळाचा सुमार ।
आंबट तेलकट आदि विषम मिश्र । ऐसा आहार विषारी
॥११९
कांही लोक ऐसेंचि खाती
। प्रकृति बिघडलिया औषध घेती ।
गरीबास कुठली इतकी
संपत्ति ? वैद्य होती घरोघरीं ॥१२०॥
डॉक्टर म्हणती पथ्यचि
नाही । तेणें रोगाचें मूळ तैसेंचि राही ।
रोगी पाहती तेंच नित्यहि । मृत्यूची घाई
झाल्यापरी ॥१२१॥
पहिलें खावोनि मस्त
व्हावें । मग औषधि घेवोनि पचवावें ।
ऐसे उपद्रव कासयासि
करावे । उन्मत्तपणें ? ॥१२२॥
उगीच आहे ऐसें खाणें ।
पचविण्यासाठी चूर्ण घेणें ।
अन्नरसाची नासाडी करणें । कशासाठी ? ॥१२३॥
आंत वाढत जातां विकृति
। धन्वंतरीहि काय करिती ?
नष्ट करोनि औषधें, संपत्ति । मुखी माती पडतसे ॥१२४॥
परंतु लोक आग्रहीं
पडती । हितचिंतक म्हणवोनि खाया देती ।
ते समजावे घातक
श्रोतीं । ठेवावी निश्चिती आहाराची ॥१२५॥
नियमित सात्विक अन्नचि
खावें । साधें ताजें, भाजीपाले बरवे ।
दूधदही आपुल्यापरी सेवावें । भोजना करावें औषधचि
॥१२६॥
सर्व भोजनीं उत्तम
भोजन । ज्यांत गोघृतदुग्धतक्रपान ।
समजावें अमृताचें सेवन । शरीरासाठी ॥१२७॥
गोदूध नित्य सेवन
करितां । कायाकल्पदि होय तत्त्वता ।
शक्ति चपलता बुध्दिमत्ता । आरोग्य हातां नित्य
राही ॥१२८॥ .
निरोगी आयुष्य लाभेल
बहुत । अल्पमृत्यु अथवा रोगांची सांथ ।
हे पाऊल न ठेवितील गांवात । तुकडया म्हणे ॥१२९॥
इतिश्री ग्रामगीता
ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत ।
व्यक्ति-आचारें ग्रामारोग्य वर्णित । चौदावा
अध्याय संपूर्ण ॥१३०॥
॥ सदगुरुनाथ महाराज की
जय ॥
*
अध्याय १४
वा ऑडीओ स्वरुपात --
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा